Login

"काय माझा गुन्हा...?" ४४

सामाजिक
दिर्घ कथा लेखन स्पर्धा...
डिसेंबर व जानेवारी...२०२५-२०२६


"काय माझा गुन्हा...?" भाग ४४


गौरवी स्टेशनकडे चालत होती… पावलं पुढे जात होती,
पण मन मागे मागे खेचत होतं…

प्रत्येक रस्त्याच्या वळणावर आईचा आवाज कानात घुमत होता… तर बाबांचा शांत, पण कडक चेहरा डोळ्यासमोर येत होता… आणि खोडकर भावासोबतची भांडणे आठवत होती...

तरीही ती थांबली नाही… स्टेशनचं घड्याळ दिसलं... आणि तिच्या छातीत धडधड वाढली…
"माधव येईल ना…? खरंच सगळं ठीक होईल ना…?

प्लॅटफॉर्मवर पाऊल टाकताच तिने आजूबाजूला नजर फिरवली… लोकांची गर्दी… घोषणा… गाड्यांचा आवाज…
आणि मग... प्लॅटफॉर्मच्या टोकाला एक ओळखीची आकृती दिसली… माधव…

तिला पाहताच... तो एक पाऊल पुढे आला… त्याच्या चेहऱ्यावर हसू होतं, पण डोळ्यांत ताण स्पष्ट दिसत होता…

“गौर…”
तो हळूच म्हणाला…
त्या एका शब्दात महिन्यांची ओढ होती… भिती होती… आणि आशा सुद्धा होती…

गौरवी जवळ आली… पण अचानक तिची पावलं थांबली…

“माधव…”
ती कुजबुजली…
“आपण खरंच बरोबर करतोय ना…?”

माधव क्षणभर गप्प राहिला…
मग म्हणाला...
“मला खात्री नाही… पण तुझ्याशिवाय आयुष्याची कल्पना मला आता करवत नाही…”

तेवढ्यात डेक्कन राणी एक्स्प्रेसची घोषणा झाली… तेव्हा तो क्षण निर्णयाचा होता…

गौरवीने एकदा प्लॅटफॉर्मच्या पलीकडे पाहिलं… जणू घर दिसेल का...?  आई-वडीलांना कळाले असेल तर ते धावत शोधत येतील का…?"
अशी एक शेवटची आशा तीच्या मनात निर्माण करत होती…
पण काहीच घडलं नाही… तिने खोल श्वास घेतला…
आणि माधवच्या बाजूने डब्यात चढली… गाडी सुटली…
रेल्वे हळूहळू पुढे सरकू लागली… आणि मागे फक्त स्टेशन नाही… तर एक संपूर्ण आयुष्य राहून गेलं…

इकडे… गौरवीच्या घरी… संध्याकाळ झाली तरी
गौरवी परतली नाही… म्हणून गौरवीच्या आईने गौरवीला फोन केला… परंतु फोन बंद असल्याचा ती फोनमधील स्त्री सतत सांगत होती…
फोन बंद असल्याचा आणि संध्याकाळ टळून गेली तरी गौरवी घरी परतली नाही कि तीचा फोन लागत नाही... हे ऐकून गौरवीच्या आईच्या छातीत धस्स झालं…

“आज कॉलेज एवढं लांबलं कसं…?”
गौरवीच्या वडिलांनी विचारलं…

आईचं मन कुठेतरी अडकलं… ती उठली आणि तडक गौरवीच्या खोलीत गेली... आणि तिने कपाट उघडलं…
त्या कपाटात काही कपडे नव्हते…,  छोटी हॅनडबॅग नव्हती… आणि तीच्या काही गरजेच्या वस्तू जागच्या जागी नव्हत्या...
क्षणात गौरवीच्या आईला सर्व काही समजलं…

गौरवीची मटकन आई जमिनीवर बसली… आणि तीच्या डोळ्यांत पाणी जमा व्हायला लागलं…

आणि तीच्या तोंडून एकच वाक्य बाहेर पडलं...
“ती पळून गेली रे…”

गौरवीचे वडील ते एकून स्तब्धच उभे राहिले… व त्यांनी लगेच
डोळे मिटले…
आणि त्यांच्या डोक्यात एकच विचार आला...
"आपण तिला जपायला कमी पडलो का…?"



क्रमशः....

©® प्राची कांबळे (मिनू)


"सदर दीर्घकथेचे भाग नियमित पोस्ट होणार असून याचे पुढील भाग चुकू नयेत म्हणून पेज फॉलो करा आणि फॉलो सेटिंग मध्ये जाऊन "fevorite" ऑप्शन निवडून घ्या जेणेकरून एकही भाग सुटणार नाही."


0

🎭 Series Post

View all