Login

"काय माझा गुन्हा...?" भाग ६४ (अंतिम भाग)

सामाजिक
दिर्घ कथा लेखन स्पर्धा...
डिसेंबर व जानेवारी...२०२५-२०२६


"काय माझा गुन्हा...?" भाग ६४ (अंतिम भाग)


गौरवी आसावरी आणि आरवला भेटून ती  आपल्या आई-वडिलांसोबत घरी परतते...

गौरवी गाडीत बसल्यावर खिडकीतून बाहेर पाहत होती…
रस्ते तेच होते… लोकही तेच होते… पण ती मात्र बदलली होती… आज ती पराभूत स्त्री नव्हती…
ती स्वतःचा निर्णय घेऊन उभी राहिलेली आई होती…


गौरवी आपल्या आईवडिलांच्या घराच्या दारात पाऊल टाकताना
आईने तिच्या डोक्यावरून प्रेमाने हात फिरवला…
आणि म्हणाली...
“हे घर तुझंच आहे बाळ… आणि ते कधीच परकं नव्हतं…”

त्या एका वाक्याने गौरवीच्या मनातला शेवटचा प्रश्नही संपला…

रात्री पलंगावर पडलेली गौरवी हळूच पोटावर हात ठेवते… आणि आपल्या बाळाशी बोलू लागते...
“आपण दोघं मिळून सगळं करू… कोणावर ओझं न होता आपल्या हिमतीवर…”

बाळ जणू उत्तर देत हलकेच हलतं…

गौरवीच्या डोळ्यात पाणी येतं… पण ते दु:खाचं नसतं… ते आत्मविश्वासाचं असतं…

दुसऱ्या दिवशी सकाळी
सूर्य नेहमीसारखाच उगवतो… पण गौरवीसाठी
तो नवीन आयुष्याची सुरुवात घेऊन आलेला असतो…

घरी परतल्यावर शेजाऱ्यांच्या नजरा बदललेल्या होत्या…
कुजबुज सुरू झाली होती...

“नवऱ्याशिवाय बाळ वाढवणार म्हणे…”

“पोटगीही नाकारली…”

"आत्ता हि कायमची आपल्या आईबापाच्या घरी राहणार..."

"चुक हिचीच असेल... म्हणूनच तर त्याने हिला घटस्फोट दिला..."

"आधी आपली जात बघायची ना... चालली उच्च जातीच्या मुलाशी लग्न करायला... शेवटी परिणाम हेच होणार..."

"ती मराठीत म्हण आहे ना... अंथरुन पाहून हातपाय पसरावे..."

पण गौरवीने कुणालाच उत्तर दिलं नाही… कारण ती आता उत्तर देण्यासाठी नव्हे… तर आयुष्य जगण्यासाठी उभी होती…

एके रात्री ती खिडकीजवळ उभी राहून पोटावर हात ठेवते…
“भीती वाटतेय मला… पण पळून जाण्यापेक्षा… लढणं मला जास्त योग्य वाटतंय…”

डोळ्यांत पाणी येतं… पण ते अश्रू कमजोरीचे नसतात…
ते ताकदीची सुरुवात असते… नव्या आयुष्याची सुरुवात...

दुसऱ्या दिवशी सकाळी…

गौरवी पुन्हा अभ्यासाची पुस्तकं उघडते… आता तो अभ्यास फक्त तिच्यासाठी नव्हता… तो तिच्या बाळाच्या सुरक्षित भविष्याकरिता होता…

तेवढ्यात दाराची बेल वाजते… गौरवीचा भाऊ दार उघडतो…
दारात आरव आणि आसावरी उभे असतात…
ते दोघेही आत येतात…

गौरवीचे आई-वडील त्यांचे प्रेमाने स्वागत करतात…

आरव हळूच गौरवीला भेटायला तिच्या खोलीजवळ जातो…
दूरून तो तिला पुस्तक वाचताना पाहतो…
त्या क्षणी त्याच्या मनात एकच विचार उमटतो...
“ही मुलगी हरलेली नाही… ही स्वतःला नव्याने घडवत आहे…”

आरव पुढे येतो… गौरवी त्याच्याकडे पाहून हसते…
ते दोघेही थोडा वेळ शांतपणे बोलतात… त्या संवादात शब्द कमी… आणि आदर जास्त असतो…

मग गौरवी आणि आरव दोघेही हॉलमध्ये येतात… सर्वजण मिळून हसत-गप्पा मारतात… त्या हसण्यात कोणताही बंधनांचा भार नसतो… फक्त मोकळेपणा असतो…

गौरवीच्या आयुष्यात नवीन नातं उभं राहत असतं…
नाव न दिलेलं… पण विश्वासावर उभं राहिलेलं…

एका अशा स्त्रीवर चार ओळी...

जीने स्वतःसाठी नाही…
तर आपल्या बाळासाठी
स्वाभिमानाने उभं राहणं निवडलं…

तिने संसार गमावला…
पण स्वतःला हरवू दिलं नाही…
आणि तेच तिचं सर्वात मोठं बळ ठरलं…

काही नाती तुटतात…
पण त्या तुटण्याने स्त्री कमजोर होत नाही…
ती स्वतःला ओळखते…
आणि नव्याने उभी राहते…

गौरवीची ही कथा घटस्फोटाची नाही… तर ती स्वाभिमानाने जगायला शिकलेल्या एका आईची आहे…

आणि काही मनातलं...

या भारत देशात चंद्रावर जाण्याची पात्रता मिळवलेला समाज
अजूनही माणसाला माणूस म्हणून स्वीकारायला तयार नाही…
स्क्रीन स्मार्ट झाल्या…
पण माणसाची मनं अजूनही अंधारातच आहेत…


— समाप्त —


©® प्राची कांबळे (मिनू)


"सदर दीर्घकथेचे भाग नियमित पोस्ट होणार असून याचे पुढील भाग चुकू नयेत म्हणून पेज फॉलो करा आणि फॉलो सेटिंग मध्ये जाऊन "fevorite" ऑप्शन निवडून घ्या जेणेकरून एकही भाग सुटणार नाही."


0

🎭 Series Post

View all