Login

मी अजूनही परकी

सुनेने सासरी कितीही जुळवून घेण्याचा प्रयत्न केला तरीही ती तिथे कायम परकी असते.
चॅम्पियन ट्रॉफी २०२५


"पल्लवी.. अगं, थोडा विचार कर बाळा."

पल्लवीने आई कडे बघितलं आणि म्हणाली,

"आई अजूनही तू हे म्हणते."

"तसं नाही गं पण तुझ्या भावाचा पण संसार आहे उगाच आपल्यामुळे त्यांच्यात वाद नको."

"आई मी म्हटलं तुला की, मी इकडे येऊन राहते, मी फक्त मला तिथे नाही राहायचे."

"अगं पण आतापर्यंत सगळं चागलं होतं आणि आताच काय झालं?"


"आई अगं आधीपासून असेच होते. तुला माहित आहे, लग्न झाल्यानंतर तुला काहीच शिकवलं नाही का तुझ्या आईने असं म्हणाल्या होत्या. तेव्हा मलाही बोलता आले असते की, आमची भाजी बनवायची पद्धत वेगळी आहे आणि तुमची वेगळी, माझ्या आईला कसं माहित असणार तुमची पद्धत? पण मी गप्प राहिले."

"अगं पण तू कधी सांगितलं नाहीस."

"तुला कशाला सांगत बसू. तुला कुठल्याही गोष्टींचे टेन्शन येते. त्यानंतर अगदी छोट्या छोट्या गोष्टीवरून टोकणे सुरू असायचे. हा टॉवेल इथेच का टाकला, ही भांडी इकडे नव्हती ठेवायची, आज हे काय कपडे घातले,  आज ही काय भाजी केली."

"अगं चालायचं हे, घर म्हटलं का होतच राहते लहानसहान गोष्टी."

"अगं आम्हाला मुल कधी होऊ द्यायचं हां निर्णय पण त्यांनी घ्यायचा का मग? बरं मुल झाले तर सांभाळायला नको मग मला नोकरी सोडा. सगळी काम झाली थोडा आराम करावा म्हटलं तर नवऱ्याला  सांगितले जाते की, महाराणी दिवसभर झोपा काढते."


"अगं सासूबाईच सोड, जावईबापू चांगले आहेत ना बस्स."

"तेच तर ...तेही कधीकधी असे वागतात ना की असं वाटत सगळ सोडून यावं इकडे. इकडे म्हणजे तुझ्या घरात नाही बरं का!"

"अगं काय बोलते आहेस?"

"आता चिंटू पहिलीला गेला, त्याची शाळा बदलली, अगं मला का शब्दाने विचारलं नाही तो माझाही मुलगा आहे ना. त्यांची बहीण त्यांची आई सगळे निर्णय घेतात माझा काही संबंध नसतो. मी जशी फक्त कामवाली बाई आहे तिथे असं वाटत मला आता."

तेवढ्यात पल्लवीचा भाऊ आणि वहिनी घरी आले.

"चल आई येते मी."

"अगं आम्ही आलो आणि तू निघाली."

"अरे दादा मी बऱ्याच वेळची आली आहे."


"अहो पल्लवी ताई, थांबा ना तश्या कधीच थांबत नाही तुम्ही. जेवून तरी जा. मी लगेच जेवण बनवते."

"थँक्यू वहिनी पण नको, तुम्हाला तर माहीत आहे माझ्या सासरचं वातावरण, उगाच वाद नको. संध्याकाळचा स्वयंपाक केला नाही म्हणून."

"ताई खर सांगू का तुम्ही ना पहिल्यापासून त्याच सगळं ऐकत आलात, म्हणजे ऐकू नका हे मी म्हणत नाही पण काहीतरी तुमच्या मनाचा पण त्यांनी विचार केला पाहिजे."

"झाले, हिला फक्त बोलायला पाहिजे."

"तसं नाही दादा पण मलाही वाटते की, वाहिनी बरोबर आहे."

"ताई मी बनवते जेवण तुम्ही थांबा."

काही वेळात दरवाजावरची बेल वाजली, टिंग टाँग.... टिंग टाँग.....

दादाने दरवाजा उघडला,
"जावईबापू ,तुम्ही? या ना, चिंटू कसा आहेस ?"

"मम्मा...मम्मा....चिंटूने येऊन आईला मिठी मारली."

परेशने पल्लवीकडे बघितलं. तिच्या डोळ्यात बरेच प्रश्न होते पण माहेरी तमाशा नको म्हणून ती काहीच बोलली नाही. मात्र परेशने बोलायला सुरुवात केली.

"भाऊ हिला काही तरी समजावा, अहो उगाच आईच्या तोंडोतोंडी लागते ही आज बघा सकाळपासून इकडे येऊन बसली आहे."


"मी जरी इकडे आली असेल पण घरचे सगळं करून आली आहे." पल्लवी जरा रागात बोलली.

"अगं पण चिंटूला कोण भरवणार? तो खातो का कुणाच्या हाताचं."

"त्याला सवय लावली तर खाईल ना तो तुमच्या हातचं."

"चल घरी आता खूप उशीर झाला आहे, आई काय म्हणेल?"

"बघ दादा,आई काय म्हणेल? आताही त्यांना त्याचं पडलेलं आहे मला काय वाटते काही घेणं देणं नाही. आज ४..५  वर्ष झाले तरीही मी त्या घरात परकी आहे. कुठला निर्णय मला विचारत नाही म्हणजे मला सांगत पण नाही, बाकीचे सोडा पण माझ्या मुलाच्या बाबतीत पण. घरात काही चागलं झाले तर त्यांच्यामूळे आणि काहीही चुकीचे होऊ दे..ते ही फक्त माझ्यामुळे."

"तुझा तसा समज आहे याला मी काहीही करू शकत नाही." परेश थोडा रागातच बोलला.

"तुमच्या घरात जेव्हा गप्पा सुरू असतात तेव्हा मी जर आले तर तुम्ही एकदम शांत बसता म्हणजे मला काही माहीत नको व्हायला."

परेश आता मात्र शांत बसला.

"आता बोला ना, मी म्हणत नाही की तुम्ही आईला माझ्यासाठी बोला पण माझी बाजू  घ्या कधीतरी."

तेवढ्यात वहिनी किचनच्या बाहेर आल्या आणि म्हणाल्या,

"ताई तुम्ही त्यांच्याकडून नका अपेक्षा करू, तुम्ही  खंबीर व्हा आणि स्वतःसाठी स्वतः उभ राहायला शिका."

हे ऐकून आई म्हणाली,
"वनिता... गप्प बस जरा."


"वहिनीचे बरोबर आहे आई, तू बघ ना तुमच्या घरात कशी वागणूक मिळते वहिनीला, आणि मला बघ. वहिनीचे अगदी बरोबर आहे."

आईने परेशला जेवणाचा आग्रह केला आणि आई सुद्धा स्वयंपाक घरात गेली. इकडे परेशने घरी आईला फोन करून सांगितलं की ,

"आई आम्ही दोघे जेवण करून येतो."

"अरे पण माझ्या जेवणाचे काय?"

परेशने पल्लवीकडे बघितले,

"आई तेवढं करून घे ना प्लीज."

आईने रागातच फोन ठेवला.

पहिल्यांदा परेशने आईला असे सांगितले हे बघून पल्लवीला आश्चर्य वाटले.

"अगं पल्लवी तू चुकते मी कधी म्हणत नाही."

"पण मी बरोबर आहे हे ही तुम्ही कधी म्हणत नाही ना.."

"बरं बाई तू परकी आहेस हा विचार सोडून दे."

"देईल नक्की फक्त तुम्ही मला थोडा तरी आपलेपणा वाटू द्या."

"यापुढे याची काळजी मी नक्कीच घेईल."

"चला पटकन जेवण करून घ्या सगळे....मस्त गरमागरम."
वहिनीने जेवण वाढले आणि सगळ्यांनी मस्त गप्पा मारत मारत जेवण केले.
©® कल्पना सावळे