वर्गमित्र भाग 8

मैत्रीच्या हऴुवार नात्याला स्पर्श करणारी भावस्पर्शी कथा वर्गमित्र...

# वर्गमित्र- 8
©®राधिका कुलकर्णी.

प्रसाद पोहोचला असेल एव्हाना.पण मग मेसेज कसा नाही आला अजून त्याचा?
आशूच्या मनात विचारचक्र फिरत होते.एकीकडे मुलांची जेवणे उरकत होती.सतत फोनवर नजर.काही मेसेज आहे का?
काय करावे? मेसेज करू का? की वाट पाहू अजून थोडी?

"आशू,ताट वाढ ग् भूक लागलीय सपाटून."
श्रीधरच्या आवाजाने विचारचक्र भंगले आणि मी भानावर आले.
होऽऽ होऽ.पानं घेतलीएत.ये लवकर.
सगळी रूटीन कामे सवयीने उकरत होते तरीही का कुणास ठाऊक आज जराशी अस्वस्थच होते मी.
प्रसाद सारखा शांत,धीरगंभीर स्थिर आणि विचारी मुलगा मेसेज करणार नाही हे शक्यच नव्हते.
कारण मी काळजी करेल हे जाणून एवढी औपचारिकता  तो नक्कीच पाळेल असे असताना आज त्याचे स्वभावा विरूद्ध वागणे मला खटकत होते.
उशीर खूप झाल्याने मेसेज करण्याचा विचार मी झटकला.
        # # # # # # # # #
सकाळचा रोजचा साडेपाचचा गजर वाजला तशी जागी होवुन मी सगळ्यात आधी मेसेजेस चेक केले.पण अख्खी रात्र जावून आता सकाळ झाली तरीही प्रसादचा कोणताही मेसेज आलेला नव्हता.
मग न राहवून मीच मेसेज केला,"अरे सुखरूप पोहोचलास का?"
सकाळची ही एक कृती करून मी आपल्या कामाला लागले.
आजतर मुलांच्या शाळेतही पालकसभा होती.श्रीला जमणार नव्हते म्हणून तिकडेही मलाच जावे लागणार होते.
श्री आम्हाला शाळेत ड्रॉप करणार होता ऑफिसला जाता जाता म्हणून मलाही घाईनेच आवरावे लागत होते.
8 वाजताआम्ही सगळेच बाहेर पडलो.

नेहेमी प्रमाणेच मुलांचा प्रोग्रेस रिपोर्ट आणि इतर सूचना असा सगळा कार्यक्रम चालू होता.
परिक्षे पूर्वीची शेवटचीच चाचणी परीक्षा.ह्यानंतर आता डायरेक्ट वार्षिक परिक्षाच होणार होत्या त्यामूळे ह्या मार्कांवर जास्त महत्त्व दिले जात होते. 
नेहेमी प्रमाणेच माझ्या पोरांचे निकाल पहिल्या पाचात होते त्यामूळे मी खूपच समाधानी होते.
सगळ्यांच्या पालकांच्या गप्पा आणि चर्चेत किती अन्  कसा वेळ गेला कळलेच नाही.
11:30/12 च्या सुमारास घरी आले.
आज क्लासला सुट्टीच द्यावी असे वाटत होते तेवढ्यात दारावरची बेल वाजली.
मूलेच होती,"मॅम आम्ही तासापूर्वीच येवून गेलो."
"हो ठिक आहे,बसा."
"आज आपण प्रश्नपत्रिकाच सोडवू गणिताची." 
मुलांना पेपर सोडवायला देवून मी जराशी फ्रेश झाले.
            # # # # # # #
फोन तर मुलांच्या शाळेत असल्या पासून बंदच होता.
घाईघाईने आधी फोन चेक केला.बरेचसे मेसेजेस पडले होते शिवाय एका मेसेजच्या.
प्रसादने माझ्या मेसेजला कोणताही रिप्लाय दिला नव्हता.
आता तर माझी सहनशक्ती संपत चालली होती.
मी सरळ फोनच लावला.
रिंग वाजून वाजून थांबली पण काहीच प्रतिसाद नव्हता पलिकडून.
हे काय आहे? काय होतेय हे सगळे?
काय झालेय?
तो ठिक तर अाहे ना?
प्लेन पोहोचलेय ना.....??
आता काळजीची जागा अनामिक भीतीने घेतली होती.
काय करू म्हणजे त्याची खूशाली कळेल ह्याचा विचार करत होते पण डोकेच काम करेनासे झाले होते.
गेल्या कित्येक दिवसात आज पहिला दिवस असा होता की प्रसाद आशूशी एक शब्दही बोलला नव्हता.
तिचे मन सैरभैर झाले होते.प्रसाद इतका बेजवाबदार कधीच नव्हता.
मग आज असे काय झालेय कि कुठूनच काहीच संपर्क होत नव्हता? ??

अचानक आठवले.आमचा आणखी एक वर्गमित्र आणि प्रसादचा जीगरी दोस्त मनिष त्याला विचारू का?
पण काय विचारू?
शेवटी हिय्या करून फोन केलाच.
मनिष म्हणजे एकदम दिलखूलास व्यक्तिमत्त्व.
प्रत्येकाच्या मदतीला सगळ्यात पहिले धावुन जाणार.
"हॅलो!!हाय आशू.!"
"आज कशी काय आठवण  झाली ग तूला?"
"हाय मनिष!
"अरे वाटले की बोलावे तुझ्याशी."
"तू तर काही फोन करत नाहीस मग मीच केला."

मी शक्यतोवर खेळकरपणे बोलतच मनाशी विचार करत होते की आता पूढे कसे विचारू प्रसाद बद्दल.?
"कशी आहेस तू?"
मनिषच्या वाक्याने मी भानावर आले.
"मी मस्त.सध्या परिक्षांचे दिवस ना,त्यामुळे जरा बिझी आहे.
तू सांग तुझे काय चाललेय?
काय म्हणतोय तुझा बेटरहाफ?
मी हसत हसतच प्रश्न केला.
तोही गडगडाटाचे हास्य करत बोलला,"खरय बाई! अगदी मस्त उपमा दिलीस हं."
"अगऽऽ माझी बायको सूद्धा बऱ्याचदा हे असेच म्हणते.
तु्म्हाला प्रसाद भावजी असले की बायकोची ही आठवण येत नाही.
हं!!( मी ही हसुन दुजोरा दिला.)
अगऽऽदोन चार दिवसांपासुन बाहेरच होता तो.आज आला तर भेट होइलच.
"ओह्..!!"
"अरे मी त्यालाही फोन केला, पण उचलला नाही त्याने."
"वाटले आज बोलूया सगळ्यांशीच तर बघ तुझ्या मित्राने फोनच नाही उचलला."
मी जराशा तक्रारीतच गंम्मत करतीय हे भासवले.
"अरेच्या!!! असेय का?"
"थांब हं मी कॉन्फरन्स कॉल लावतो.मग तिघेही एकत्रच बोलू."
त्याने लगेच फोन लावला.
तसा प्रसादचा आवाज ऐकायला आला.
"हॅलोऽकाय रे आत्ता ह्यावेळी कसा केलास फोन?"
"सगळे ठिक ना?"
"हो रे सगळे ठिक आहे.एक मिनिट थांब एक सरप्राईज आहे एेक.."
"ए बोल ग्"
असे मनिषने म्हणताच मी गळा साफ करतच, 
" हाय प्रसाद! कसाएस?
"मी ठिक. तू??"
"मी ही.अरे मी फोन केला होता तूला तासाभरापुर्वी?"
"ओह्..सॉरी !!"
"मी मिटिंग मधे होतो."
"आताही जरासा बिझीच आहे.चला नंतर बोलतो.
तुम्ही बोला."
असे म्हणत त्याने फोन डिसकनेक्ट पण केला.
मग मनिषशी थोड्यावेळ बोलून आम्हीही निरोप घेतला..
     # # # # # # # # 
माझ्या साठी ही गोष्ट अतर्क्य होती की मिटिंग मधे बिझी असताना त्याने मनिषचा कॉल घेतला होता पण त्या आधी काहीच वेळापूर्वी मी केलेला कॉल मात्र ......
असे तो का करत होता??

प्रश्नांची एवढी गर्दी डोक्यात कधीच माजली नव्हती..
डोळ्यांच्या कडा पाणावल्या होत्या.पण आश्रू बाहेर पडत नव्हते.
प्रत्येक सुखा नंतर दु:ख येते.दु:ख मिळाल्या खेरीज सुखाची किंमत कळत नाही असे म्हणतात.
कदाचित मैत्रीचे सूख   मिळाले होते म्हणुनच की  काय त्याची दूसरी बाजूही आज अनुभवत होते.
त्यातल्या त्यात समाधानाची बाजू एकच,ती म्हणजे तो सुखरूप पोहोचला होता.

माझ्या मनात आलेल्या वेड्या वाकड्या शंका तरी आता दूर झाल्या होत्या.
तरी एक प्रश्न अजुनहीअनुत्तरीतच होता,काल जाई जाई पर्यंत भरभरून बोलणारा हा  माणूस आज इतक्या त्रयस्थपणे का वागत होता???
    
तिन्हीसांजेच्या मंद दिव्या समोर आज नकळत मी माझ्या मैत्रीसाठी प्रार्थना करत होते..
# # # # # # # # ## ## # #
(क्रमश:8)
©®राधिका कुलकर्णी.
-------------------------------------
नमस्कार मंडळी,
कसा वाटला हा भाग?
वर्गमित्र कथा आवडतेय की नाही ?
हे कमेंटद्वारे जरूर कळवा.
(लेखन वितरणाचे सर्व हक्क लेखिकेच्या स्वाधीन.माझ्या नावासकट कथा नक्की शेअर करू शकता.) 
धन्यवाद.

🎭 Series Post

View all