Login

चालाख ' कहाणी ' ची १० वर्षे

कहाणी चित्रपटाविषयी थोडेसे
चित्रपट :- कहाणी
दिग्दर्शक :- सुजॉय घोष
मुख्य कलाकार :- विद्या बालन - रॉय कपूर, नवाजुद्दीन सिद्दीकी, परमव्रत चटर्जी, इंद्रनील सेनगुप्ता

रिलीज डेट :- ०९ मार्च २०१२

मला स्वतःला मिस्ट्री - थ्रीलर चित्रपटांची खूप आवड आहे. लहानपणापासून असे बरेच मराठी, हिंदी, साऊथ इंडियन भाषेतील मूव्हीज मी बघत आलो आहे. त्यातील माझा सर्वाधिक आवडता ठरला 2012 सालीचा \" कहाणी \" हा हिंदी चित्रपट. ज्याला आज १० वर्षे पूर्ण झाली.
क्षणाक्षणाला उत्कंठा वाढवत नेणारे व शेवटी जबरदस्त धक्का देणारे कथानक, कलाकारांचा सुंदर अभिनय आणि उत्तम दिग्दर्शन या सर्वांचा सुरेख मेळ या चित्रपटात साधला आहे.

कथेच्या सुरुवातीस कलकत्ता शहराच्या मेट्रोत एक दुर्घटना घडते. ज्यात अनेक निष्पाप जीवांचा बळी जातो. दोन वर्षानंतर विद्या बागची ( विद्या बालन - रॉय कपूर ) नामक एक तरुण गर्भवती स्त्री लंडनहून कलकत्त्याला येते. सर्वप्रथम विद्या थेट पोलीस स्टेशन ला येऊन आपला, कामानिमित्त महिन्याभरासाठी कलकत्त्यास आलेला व पुन्हा न परतलेला पती \" अर्णव बागची \" बेपत्ता झाल्याची तक्रार नोंदवते. त्यानंतर स्वतःही आपल्या परीने पतीच्या शोध घेण्यास सुरुवात करते. ज्यात तिला मदत करतो असिस्टंट सब इंस्पेक्टर सात्यकी सिन्हा / राणा ( परमव्रत चटर्जी ) .
अर्णव बागची थांबला असलेल्या एका गेस्ट हाऊसमध्ये चौकशी केल्यावर या नावाचा कुठलाही व्यक्ती तिथे राहिला नसल्याचे समजते. अर्णव च्या कलकत्त्यातील ऑफिस मध्ये विचारणा केल्या नंतरही आधी हेच सांगितले जाते. मात्र नंतर, दोन वर्षांपूर्वी अर्णव बागची च्याच चेहऱ्या मोहऱ्याचा मिलन दामजी ( इंद्रनील सेनगुप्ता ) नावाचा तिथे एक काम करत असल्याची जराशी आश्चर्यकारक माहिती समजते. अन् कथेला वेगळेच, थरारक वळण येते. पुढे खूप धक्कादायक खुलासे समोर येतात ; पण शेवट मात्र अत्यंत अकल्पनीय, व घडलेल्या घटनांची परिमाणं, त्यांचे कार्यकारणभाव पूर्णपणे बदलून टाकणारा ठरतो. आणि तितकाच भावनिकही.

गर्भवती असून तशा अवस्थेतही पतीला शोधण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करणाऱ्या, प्रसंगी जीवही धोक्यात घालायला मागे पुढे न पाहणाऱ्या धाडसी, धैर्यवान आणि तितक्याच चालाख स्त्रीच्या भूमिकेला विद्या बालन - रॉय कपूर ने पूरेपूर न्याय दिला आहे. एकीकडे आपल्याला \" विद्या बागची \" बद्दल कणव, सहानुभूती वाटते, तर दुसरीकडे तिच्या धाडसाचं आणि हुशारीच कौतुकही वाटते‌.
परमव्रत चटर्जीने एक इनोसंट, संवेदनशील पोलिस चांगल्या तऱ्हेने उभा केलाय. नवाजुद्दीन सिद्दीकी यांनी Rude स्वभावाच्या ; पण कर्तव्यनिष्ठ आय. बी आधिकाऱ्याचे पात्र छान वठवले आहे.
यांसोबतच एका निरूपद्रवी वाटणाऱ्या साध्या नोकरीपेक्षा व्यक्तीच्या बुरख्याआड दडलेल्या क्रूर कॉन्टॅक्ट किलरची भूमिका साकारणाऱ्या सास्वत चटर्जी यांचा अभिनयही उल्लेखनीय आहे. थोडा स्क्रीन टाईम असूनही त्यांचे पात्र लक्ष वेधून घेण्यात, उरात धडकी भरवण्यात यशस्वी होते. चित्रपटाला रहस्यमयते सोबत थरारकतेची जोड देण्यात त्यांचा महत्त्वाचा वाटा आहे.
मिस्ट्री थ्रीलर चित्रपटाच्या भोक्त्यांनी हा चित्रपट पाहिला असेलच. अजूनही नसेल बघितला तर युट्यूब वर फ्री अव्हेलेबल आहे, नक्की बघाच. हा लेख कसा वाटला हे कमेंट्स द्वारे नक्की कळवा. धन्यवाद.

@ प्रथमेश काटे