2 स्टेटस भाग ४
आधीच्या भागांमध्ये आपण पाहिले कि कवल आणि श्रेयस एकमेकांच्या घरी जाऊन आले. दोघांच्याही घरच्यांची लग्नाला संमती होती.. आता चालू होतील, लग्नाची बोलणी..
" हॅलो, नमस्कार मी श्रेयसचे बाबा बोलतो आहे, सुरेश."
" नमस्कार भाईसाब, अरे मी करणारच होतो तुम्हाला फोन. तुम्ही उगीच तकलीफ घेतलीत.."
" तकलीफ कसली त्यात.. आता मुलांनी स्वतःच लग्न ठरवून आपली एक तकलीफ तर कमी केलीच आहे ना.. मग कधी भेटायचे पुढची बोलणी करायला.."
" तुम्ही या ना आमच्याकडे, 'रोकाच' करून टाकू.. काय?"
" रोका?? रोको माहित आहे मला, हे रोका काय असते?"
" आप भी ना भाईसाब, बडे मजाकिया हो.. रोका म्हणजे लग्न फिक्स करून टाकायचे.."
" अच्छा, साक्षसुपारी.. चालेल ना.. कधी करायचे मग?"
" तुम्ही ठरवा.. रविवार ठरवूया कि शनिवार रात्री? तुम्ही या इथे मस्त रोका झाल्यावर छान प्लॅन करू, गपशप करू.. मजा येईल.. तुम्ही घेत असाल तर तो ही इंतजाम करू.."
बाजूला बसलेल्या शोभाताई हे ऐकत आहेत याची जाणीव असल्यामुळे सुरेशरावांना हे ऐकून घाम फुटला..
" शनिवार नको आपण रविवारी सकाळीच भेटू. म्हणजे कोणालाच सुट्ट्या काढायला नको.." सुरेशराव सकाळीच वर जोर देत म्हणाले..
" अच्छी बात.. तुमच्यासोबत कोण कोण येणार ते फक्त सांगाल का? म्हणजे तशी जेवणाची तयारी करायला.."
" आमच्याकडून आम्ही चौघेच येऊ."
" अजून कोणी मेहमान नाही येणार?"
" त्याचे काय आहे ना, आम्ही अजून कोणालाच सांगितले नाही.. आधी आपण भेटू, मग सांगता येईल.."
" कोई गल नही.. तुम्ही या रविवारी मग बोलू."
" अजून एकच गोष्ट.. आम्ही ना नॉनव्हेज खात नाही हा.." शोभाताईंनी खुणावून सांगायला सांगितले..
" जरूर भाईसाब.. याद है मुझे.. आप कोई फिकर ना करे.. आप सिर्फ मिलने आईये.. "
सुरेशरावांनी फोन ठेवला..
" अग ते रोका करूया , असे म्हणत आहेत.."
" अग बाई, आता हे काय नवीन.."
" म्हणजे थोडे आपल्या साक्षसुपारीसारखे.."
" अच्छा.. मग आपण काय वेगळे करायचे आहे का?"
"म्हणजे?"
" इथे सगळेच वेगळे चालू आहे ना.. म्हणजे ना बघण्याचा कार्यक्रम, ना पत्रिका बघणे..ना नातेवाईकांना काही सांगणे.. म्हणून विचारले आता या रोको मध्ये आपण काय करायचे.."
" तुझ्या मैत्रिणींना विचारतेस का?" सुरेशरावांनी सुचवले..
" अजिबात नाही.. सगळ्या हसतील मला."
" ते का बरे?" सुरेशराव गोंधळले होते.
" मी नेहमी म्हणायचे ना.. आमचा श्रेयस म्हणजे अगदी नाकासमोर चालणारा.. मला तर वाटते मलाच त्याचे लग्न ठरवावे लागेल.. एकवेळ सुमीत स्वतःचे स्वतः जमवेल.. पण श्रेयस नाही.. आणि आता थेट पंजाबी मुलगी आहे म्हटल्यावर तर काय. त्यांना संधीच मिळाली, आता मला बोलायची.." शोभाताई नाराज झाल्या होत्या..
" मला एक सांग, मुलगा महत्त्वाचा कि तुझ्या मैत्रीणी?"
"काहिही प्रश्न काय विचारताय? मुलगा.."
" याचे उत्तर जर एवढ्या ठामपणे देत आहेस.. मग त्यांचा विचार करून मुलाच्या आनंदावर का विरजण घालते आहेस? तू जर ठामपणे त्याच्या पाठिशी उभी राहिलीस तर कोणाची हिंमत त्याला काय बोलायची? आणि लोक काय , दोन्ही बाजूंनी, पाठीमागे बोलायलाच असतात.. तर तो विचार सोडा.. आणि रोकाची तयारी करा.. रोकोची नाही.."
" कधी कधी ना मला असे वाटते , माझ्यापेक्षा जास्त चांगले शिक्षक तुम्हीच झाला असता.." शोभाताई हसत म्हणाल्या..
" आणि अजून एक गोष्ट.. सगळ्यांना आत्ताच कवलजीत बद्दल कळवून टाक.. असेही लग्न ठरल्यातच जमा आहे.."
" नको.. आधी त्या माणसांना भेटू. मग सांगू.. तू म्हणशील तसे.."
" अजी सुनती हो.. श्रेयसच्या बाबांचा फोन आला होता.. मी त्यांना म्हटले रविवारी रोका करू? चालेल ना?"
" चंगा जी.. आपण कोणाला बोलवायचे?"
" ते चौघेच येणार आहेत. आपली जास्त माणसे बघून घाबरायला नको.. आता आपणच चौघे थांबूया.. नंतर सांगू सगळ्यांना.."
" जैसा आप कहे.. खाने में क्या बनाये?"
" अरे त्यांनी सांगितले आहे कि ते नॉनव्हेज नाही खात.. सो अच्छासा व्हेज मेनू बनाओजी... तुम क्या पानी उबालके दोगी वोभी बढिया होगा.."
" कुछभी.. अभी बच्ची कि शादी हो रही है.. फिरभी आपका बचपना नही जाता.."
" अरे वो गया जिंदगीसे तो बाकी क्या रहा? "
" मुझे ना थोडा डर लग रहा है."
" किस बात का?"
" अजी उनकी रहनसहन अलग, भाषा अलग, रितीरिवाज अलग. अपनी बेटी रह सकेगी उस घरमें? हमारी जातका कोई होता तो कुछ फिकर ना होती.."
" ऐसा सचमें लगता है तुझे? तुझ्या बहिणीची मुलगी आठवते ना? काय झाले तिचे? आईवडिलांच्या मर्जीनेच झाले होते ना लग्न? तिच्या सासरच्या लोकांच्या मागण्या पूर्ण करताना किती त्रास झाला तुझ्या बहिणीला.. तरिही ती सुखी आहे का? इथे कमीत कमी तो मुलगा तरी चांगला आहे. आणि आपण नाही का आपला मुलुख सोडून इथे राहायला आलो. इथलेच झालो.. आता तर गावाला गेलो तरी जास्त राहायला आपल्याला आवडत नाही.. करेल ती पण ॲडजस्ट.. नको विचार करूस जास्त.. आणि रोकाची तयारी कर.."
" चंगा जी.."
"आता खुश?"
" क्यों खुश होने जैसा कुछ हुवा है?"
" हा.. मी ऐकलंय रविवारी कोणाची तरी साक्षसुपारी आहे म्हणून.."
" यार,अभी ये साक्षसुपारी क्या है?" कवलने विचारले..
" अजी तुम्हारा रोका.."
" क्या बात है? मुंडा पंजाबी सीख रहा है?"
" हां, अभी पंजाबनसे शादी हो रही है, तो सिखना तो पडेगाही ना.."
" अच्छा. आज इतना मस्का क्यू?"
" मी काय म्हणतो कवल.. आता आपला रोकापण होणार आहे.. मग काय हरकत आहे? थोडा गले मिलना. और क्या कहते हो तुम लोग.. पपी शपी.."
" चुप.. बिल्कूल नही...."
एका बाजूला दोन्ही घरी रोकाची तयारी चालू होती.. दुसरीकडे हे दोन प्रेमी लग्नाच्या आधीचा पिरियड एन्जॉय करत होते..
रविवारी सकाळी श्रेयसच्या घरी सगळी घाई सुरू होती.
" सुमीत झाले का तुझे आवरून?"
" अहो ती साडी आणि मिठाई घेतलीत का?"
" तुम्हाला निघायला अजून किती वेळ आहे, असे कवल विचारत होती.."
शेवटी एकदाचे हे कुटुंब केवलच्या घरी पोचले.. कवलने शोभाताईंनी दिलेली साडी नेसली होती.. ते पाहून नाही म्हटले तरी त्यांना बरे वाटले.. ओळख, चहापाणी झाल्यावर परमिंदर उठली.. तिने श्रेयस आणि कवलला एका बाजूला बसवले. श्रेयसला गंध लावले.. एक छानसा शर्ट आणि एक पाकिट त्याच्या हातात दिले.. नंतर शोभाताईंना सांगितले.. त्यांनी कवलला कुंकू लावले.. तिला एक छानसा ड्रेस देऊन तिची ओटी भरली..
"काकी तुमच्याकडे साडी देतात ना, मग ड्रेस का? कवलने विचारले..
" अग , मी म्हटले तुम्ही आजच्या मुली साड्या नेसता, नाही नेसत.. मागच्या वेळेस तू अचानक आलीस म्हणून साडी दिली.. आता मुद्दाम ड्रेस आणला. आवडतो का बघ.."
" काकी ड्रेस छानच आहे.. पण तुम्ही ना तुमच्या पद्धतीत जेव्हा जेव्हा साड्या देतात ना तेव्हा साड्याच द्या.. मला आवडेल.."
" नक्की.. लक्षात ठेवीन.."
" अब बन गये हम समधी" असे म्हणत दिलजीतने सुरेशला मिठी मारली.. यावेळेस त्यांनी अफझलखान- शिवराय भेटीचा अनुभव घेतला. वडिलांची अवस्था बघून सुमीतने सुखविंदरशी फक्त हातच मिळवला..
" चलो, अब रस्में हो गई है तो खाना शुरू करे?" सुखविंदरने विचारले..
जेवायला मस्त मक्केकी रोटी, सरसोका साग, पनीरची भाजी, मुगाचा हलवा असे बरेच काही होते.. ते बघून सुमीत खुश झाला.. पण शोभाताई पटकन खाईनात..
" क्या हुआ, बहेनजी खाना पसंद नही आया?"
" असे नाही.. मी एवढे मसालेदार जास्त खात नाही.. ॲसिडिटीचा त्रास होतो नंतर.. मी फक्त भात खाईन.." हे ऐकून परमिंदरचा चेहरा उतरला.. ते पाहून सुरेश म्हणाले," अरे एवढे नका वाईट वाटून घेऊ.. आम्ही आहोत ना खायला.."
" मग त्यांना लस्सी वगैरे दे.." दिलजीत म्हणाले..
" अरे असे काही नाही.. तुम्ही बसा.. मला काही हवे असेल तर मी तुम्हाला सांगेन. शोभाताई म्हणाल्या..
जेवणं वगैरे झाल्यावर सगळे बोलत होते.. "आता महत्त्वाचे बोलूयात का?" सुरेशरावांनी विचारले..
" बोला ना भाईसाब.."
" मग लग्न कसे आमच्याच पद्धतीने करायचे ना?"
" असे कसे ? आमची एकुलती एक मुलगी आहे, लग्न आमच्याच पद्धतीने झाले पाहिजे.."
काय वाटते तुम्हाला, लग्न कसे व्हावे या गोष्टीवरून लग्न जुळेल कि मोडेल?
कथा कशी वाटली ते सांगायला विसरू नका...
सारिका कंदलगांवकर
दादर मुंबई
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा