Login

तरुणाईला इशारा : क्षणिक आकर्षणाची किंमत

तरुण वय हे स्वप्नांचे, भावनांचे आणि आकर्षणाचे वय असते. मात्र आज आकर्षणालाच प्रेम समजले जाते आणि प्रेमाच्या नावाखाली विवेक बाजूला ठेवला जातो.
तरुणाईला इशारा : क्षणिक आकर्षणाची किंमत...सुनिल पुढेTM.

घणी गेले, थोडे उरले आणि उरलेले क्षणही हळूहळू हातातून निसटत चालले आहेत, याची जाणीव आजची तरुण पिढी फारशी ठेवताना दिसत नाही. विशेषतः स्त्रीच्या आयुष्यात एखादा क्षण, एखादा चुकीचा निर्णय किंवा अति विश्वास संपूर्ण आयुष्याची दिशा बदलून टाकतो. कारण समाज आजही स्त्रीच्या चुकीकडे केवळ चूक म्हणून न पाहता तिला आयुष्यभर वाहून घ्यावा लागणारा डाग म्हणून पाहतो. त्यामुळे स्त्रीचे आयुष्य अधिक सावध, अधिक जबाबदारीचे आणि अधिक संघर्षमय बनते.

तरुण वय हे स्वप्नांचे, भावनांचे आणि आकर्षणाचे वय असते. मात्र आज आकर्षणालाच प्रेम समजले जाते आणि प्रेमाच्या नावाखाली विवेक बाजूला ठेवला जातो. गोड बोलणे, मोठी आश्वासने आणि उज्ज्वल भविष्याची चित्रे दाखवून अनेक तरुणी स्वतःच्या अस्तित्वाची किंमत विसरतात. एका क्षणाच्या मोहासाठी शिक्षण, कुटुंबाचा विश्वास आणि स्वतःचा सन्मान धोक्यात घातला जातो, आणि नंतर उरते ती फक्त अंतःकरण जळजळीत करणारी खंत.

हा जन्म सहज लाभलेला नसतो. आई-वडिलांचे कष्ट, त्याग आणि अपेक्षा यांतून तो घडलेला असतो. तरीही क्षणिक सुखासाठी स्वतःचे आयुष्य उद्ध्वस्त करणे ही स्वतःवर केलेली मोठी अन्यायकारक कृती ठरते. चुकीचे पाऊल उचलले गेले, तर त्याची किंमत समानरीत्या मोजली जात नाही. दोष दोघांचा असला, तरी समाजाच्या कठड्यावर उभी राहते ती बहुतेक वेळा स्त्रीच.

एका क्षणाच्या चुकीमुळे अनेक मुलींची स्वप्ने अधुरी राहतात, शिक्षण अर्धवट थांबते, आत्मविश्वास ढासळतो आणि आयुष्यभराची भीती मनात घर करून बसते. म्हणूनच तरुण मुलींनी नाती जोडताना शब्दांपेक्षा कृती तपासावी, भावनांपेक्षा जबाबदारी ओळखावी. जिथे सन्मान नाही, सुरक्षितता नाही आणि स्पष्टता नाही, तिथे प्रेम नसते, तिथे केवळ स्वार्थ असतो.

त्याचबरोबर तरुण मुलांनीही हे समजून घेतले पाहिजे की क्षणिक करमणुकीसाठी कोणाचे आयुष्य उद्ध्वस्त करणे ही शौर्याची गोष्ट नाही. खरे सामर्थ्य जबाबदारी स्वीकारण्यात, दिलेल्या शब्दाला जागण्यात आणि कठीण प्रसंगी साथ न सोडण्यात असते.

एक क्षण सावरला, तर आयुष्य सावरते. एक निर्णय विवेकाने घेतला, तर भविष्य उजळते. म्हणून भावनांवर संयम ठेवा, विचारांना दिशा द्या आणि आयुष्याला डाग न लागू देता सन्मानाने जगण्याचा मार्ग निवडा. आयुष्य एकदाच मिळते आणि ते अभिमानाने आठवता येईल असेच असावे.........
लेखक:- सुनिल पुणेTM 9359850065
0