Login

कथा-आधार भाग १

Story About Little Girl
कथा -आधार भाग १


आईने चुलीवर ठेवलेली भाकर मीरा ने ताटलीत घेतली. त्यावर चटणी व वरून पाणी घेऊन पाण्याच्या एका एका घोटाने भाकर गिळली .पाळण्यात झोपलेल्या तिच्या दोन वर्षाच्या बहिणीला पाळण्यातून काढून तिचे कपडे बदलले. आईने दुधाचा करून ठेवलेल्या काल्याचे दोन घास तिला भरविले. शाळेतून मागच्या वर्षी मिळालेला, पाठीमागून फाटलेला ड्रेस घातला. बहिणीला कडेवर घेऊन आपल्या घराच्या तुटलेल्या दाराच्या पाट्या बाहेरून लावून घेतल्या. दाराची कडी लावली.

आपले दप्तर व कडेवरच्या बहिणीला सांभाळत, शाळेच्या वाटेने निघाली. इतक्यात शेतात जाणाऱ्या बायकांचा जत्था तिच्या समोरून गेला. लहानगीला तिची आई दिसली. मीराच्या कडे वरून आईला जोरात आवाज देत ती रडू लागली. तिचा आकांत पाहून शेतात जाणाऱ्या आईची पावलं आपोआप थबकली. बायका समोर निघून गेल्यात. परंतु तिच्या आईने लहानगी ला जवळ घेऊन तिला शां
त केले.

वर्ग चारच्या वर्ग शिक्षिका वर्गात आल्या. मीरा आपल्या छोटी ला सोबत घेऊन वर्गातल्या चटईवर दप्तर घेऊन बसली होती. बाईंनी एक नजर मीरावर टाकली. आणि हजेरी घेण्यास सुरुवात केली. बाईंच्या मनात दररोज विचार यायचा... ही मीरा आपल्या छोट्या बहिणीची किती काळजी घेते... हिचं वय काय! तिच्यावर पडलेली जबाबदारी काय! बरे.. ही अभ्यासातही हुशार. चुणचुणीत .उदाहरणे तर चुटकी सरशी सोडविते. खरोखर असं म्हणतात, "खुरट्या झाडाला लवकरच फुले येतात"
असा विचार मनात सुरू असताना, बाईंनी आपलं दैनंदिन अध्यापन सुरू केलं.

आज मीरा जरा अस्वस्थ वाटली... तिने तिच्या धाकटीला सोबत आणले नव्हते. 'काय ग मीरा! तुझी छोटी कुठे आहे'? बाई! 'तिले लय ताप हाय .मायनं सरकारी दवाखान्यात नेलं तिले. आज माय घरीच हाय' ...
बरं !'चला मुलांनो, हे उदाहरण सोडवा बघू'.
'सांगा, या उदाहरणातून २६-२४=किती शिल्लक राहिले'? दररोज पटकन उत्तर देणाऱ्या मीराचं आज फळ्या कडे लक्षच नव्हतं. तिचं लक्ष होतं, वर्गाच्या कोपऱ्यात असणाऱ्या, बिळात जाणाऱ्या उंदराकडे...
बाईंनी मीराला विचारले ,सांग मीरा! किती शिल्लक राहिले? मीरा मोठ्याने म्हणाली... बाई!' फक्त शेपूट शिल्लक राहिले'.
तसा संपूर्ण वर्ग खो-खो हसायला लागला. मीरा कावरीबावरी झाली.' मीरा! लक्ष कुठे आहे तुझं'?


आज मधल्या सुट्टीत, शाळेतील सर्व मुले आनंदाने खेळत होती. खेळण्याचा आनंद पटांगणावर ओसंडून वाहत होता. परंतु मीराचं लक्ष शाळेतून दूरवर दिसणाऱ्या तलावाकडे होतं. ती नेहमीच मधल्या सुट्टीत त्या तलावाकडे एकटक पाहत बसायची .शाळा गावाच्या मानाने बऱ्याच उंचावर असल्यामुळे, तो तलाव शाळेतून सहज दिसत होता. तिची त्या तलावाकडे जी दृष्टी लागलेली असायची ,त्याला कारणही तसंच होतं...

मागील वर्षीच्या गणेशोत्सवात, गावातील गणपती विसर्जनाची मिरवणूक धुमधडाक्यात निघाली होती. गावकऱ्यांच्या उत्साहाला उधाण आलं होतं .ढोल ताशाच्या गजरात मिरवणूक तलावाजवळ आली. मागील वर्षी पाऊस भरपूर झाल्यामुळे तलावाची पातळी सुद्धा वाढलेली होती. या मिरवणुकीत तिचे वडील एकनाथराव सुद्धा होते. गणपती विसर्जना साठी एकनाथराव पुढेच होते. गणपती पाण्यात गेला, तसे एकनाथराव सुद्धा पाण्यात बुडाले. ते वर आलेच नाहीत .गावकऱ्यांनी पाण्यात शोध घेतला. परंतु गणेशाच्या पाटा खाली ते दबल्या गेले की काय कुणास ठाऊक!

ही वार्ता मीरा च्या घरापर्यंत पोहोचली. माय लेकींनी एकच हंबरडा फोडला. दोन नकळत्या वयाच्या मुली व बायकोला सोडून, मीराचे वडील पाहता पाहता त्यांच्या डोळ्यासमोरून दिसेनासे झाले. मीरा ची आई धाकट्या, दूध पित्या लेकीला व मीराला छातीशी कवटाळून रडू लागली.
खरोखर "नियतीचं काही खरं नसतं"... "तिच्या मनात काय आहे, हे कुणालाच कळत नसतं...
आता "आसवांना निजवून, हूंदक्यांना जागा देणं", एवढेच त्या दोघींच्या हाती होते.


मीराचा शैक्षणिक प्रवास पुढे कसा होतो पाहूया पुढील भागात भाग २ मध्ये


छाया बर्वे राऊत अमरावती