आई तुझं लेकरू येडं गं कोकरू
अंतिम भाग
राहुलने पुढे UPSC ची तयारी सुरू केली. त्याच्या आईने त्याला प्रत्येक पावलावर प्रोत्साहन दिलं होतं, आणि त्याच्या यशाची पायरी चढायला मदत केली होती.
राहुल नेहेमीप्रमाणे रोज आईशी फोनवर बोलायचा. तिला त्याच्या दिवसभरातील प्रत्येक घटनेची माहित देयचा. "आई, आज अभ्यास खूप जड गेलाय. मन अगदी थकलंय... आई तुझं लेकरू येडं गं कोकरू ..रानात फसलय ,रस्ता चुकलंय, सांग मी काय करू" राहुल हे गाणं म्हणायचा.
शोभा लगेच त्याला धीर देत म्हणायची, "बाळा, अशा वेळेस मनाची घाबरगुंडी होणारचं. पण अशावेळी घाबरायचं नाही. अभ्यास एकत्र नको करू. जरा विश्रांती घे. मग ताजं मन घेऊन पुन्हा सुरू कर."
राहुलच्या मनातला भीतीचा एक टुकडा तिच्या बोलण्यातचं विरघळून जायचा. आईचं बोलणं म्हणजे त्याच्यासाठी औषधासारखं होतं. तिला सगळं सांगून राहुलचं मन मोकळं व्हायचं, आणि तो पुन्हा जोमाने अभ्यासाला लागायचा.
शहरातील बाजारपेठा, तिथले लोक, खाण्याचे पदार्थ, सगळं काही राहुल आईला सांगायचा. कधी कधी तो अजयच्या फोनवरून व्हिडिओ कॉल करून बाजारपेठा आईला दाखवायचा.
"आई, बघ, इथे किती गर्दी आहे. सगळीकडे लोकांची वर्दळ आहे," राहुल उत्साहाने बोलायचा.
आई हसून म्हणायची, "हो रे बाळा, अगदी आपल्या गावासारखंच वाटतंय. पण तू खूप काळजी घे, गर्दीत नीट सांभाळून चाल."
असं म्हणतचं ती त्याच्याशी संवाद साधायची, त्याला जवळ असल्यासारखा भास देत राहायची.
एके दिवशी राहुलला आईचा फोन आला, "राहुल, आज जरा दमलेय, पण तुझ्या फोनची वाट पाहत बसले होते."
राहुलने तिला विचारलं, "आई, तुझं तब्येतीचं काय चाललंय? काही त्रास नाही ना?"
शोभा हसत म्हणाली, "बाळा, म्हातारं शरीर आहे, थोडा थकवा होणारचं. तू आपलं आपलं काम कर, काळजी नको करू."
राहुलच्या मनात एक प्रश्न उठला, पण आईच्या हसण्याने त्याचा तो विचार तात्काळ पळून गेला. त्याला आईने दिलेल्या धीराची खरी किंमत कळायची होती.
राहुलची मेहनत फळाला आली, आणि तो IAS परीक्षेत उत्तीर्ण झाला. जेव्हा त्याचं नाव यादीत आलं, तेव्हा त्याच्या डोळ्यांतून आनंदाश्रू ओघळले. त्याच्या मनात फक्त एकच विचार आला – "आईला हे सगळं सांगायला हवं."
दोन वर्ष झाली होती, राहुलने आईला प्रत्यक्ष पाहिलं नव्हतं. त्यामुळे त्याने तात्काळ गावाकडे जाण्याचं ठरवलं. तो प्रवास करताना त्याच्या मनात अनेक विचार उमटत होते,जाताना त्याने आईने त्याच्यासाठी शिवलेला पांढरा खादीचा शर्ट घातला होता. "आईला किती आनंद होईल! मी तिचं स्वप्न पूर्ण केलंय," तो विचार करत होता.
गावात पोहोचल्यावर राहुलचं जोरदार स्वागत करण्यात आलं. लोकांनी त्याला खांद्यावर उचलून घेतलं, गुलाल फेकत त्याची मिरवणूक काढली. सगळीकडे आनंदोत्सव साजरा होत होता. पण राहुलच्या मनात फक्त एकचं विचार सुरू होता – आईला भेटायचं.
तो तात्काळ पेढ्याचा बॉक्स घेऊन घरात धावत गेला. "आई, बघ मी पास झालोय. मी IAS झालोय आई...!" असं ओरडतचं तो घरात शिरला. पण घर सगळं शांत होतं. त्याने आजूबाजूला पाहिलं, पण आई कुठेचं दिसली नाही. हळूहळू त्याच्या मनात शंका येऊ लागली. तो बाहेर जाण्याचा प्रयत्न करणार, तोच त्याला आईच्या फोटोवर हार घातलेला दिसला.
त्याच्या डोळ्यांतून पाणी ओघळू लागलं. जवळ असलेल्या अजयकडे वळून त्याने त्याला विचारलं, "अजय, हे काय आहे? माझी आई कुठे आहे?"
अजयने त्याला शांत करण्याचा प्रयत्न केला, पण त्याच्या मनातलं दु:ख स्पष्ट दिसत होतं. "राहुल, तू फोनवरून मला कॉल कर. आईशी बोल," अजयने शांतपणे सांगितलं.
राहुलला काहीचं समजेनासं झालं. पण अजयच्या म्हणण्यानुसार त्याने फोन केला. फोनवर आईचा आवाज आला, "राहुल, मी तुझ्यावर खूप अभिमान आहे. मला माहिती होतं की तू IAS होणारचं आहेस."
राहुल अजूनही आश्चर्याने विचार करत होता, "आई, तू आहेस ना? मग तुला हार का घातला आहे?"
त्या क्षणी आईचा आवाज शांत झाला, आणि फोनवर संदेश आला, "राहुल, माझ्या निधनानंतरही तुझं धैर्य तुटू नये म्हणून AI च्या मदतीने मी तुझ्याशी संवाद साधला,ज्यादिवशी तू मला विचारशील की,माझ्या फोटोला हार का घातलाय त्या दिवसापासून AI तंत्रज्ञान वापरून तयार केलेला हा व्हॉइस आणि व्हिडिओ प्रयोग आपोआप बंद होईल. आजपासून तुला एकट्याने जगायला शिकायचं आहे. मी तुझ्यासोबत नेहमीचं आहे, पण आता मी फक्त आठवणीत जिवंत आहे..."
राहुलचं मन ढवळून निघालं. तो पायऱ्यांवर बसून रडू लागला. त्याच्या डोळ्यांतून अश्रू वाहू लागले. त्याला कळलं की गेली दोन वर्षे झाली त्याची आई वारली होती, पण AI तंत्रज्ञानाने ती त्याचं सोबत राहिली होती.
त्याला आठवलं की शेवटच्या कॉलमध्ये आईने कसं त्याचं मनोबल वाढवलं होतं. "राहुल, मला माहित होतं की तू IAS होणार आहेस. मी तुझं स्वप्न पूर्ण करण्यासाठी काहीही करू शकते," असं आईने त्याला सांगितलं होतं.
आईच्या शेवटच्या संदेशाने राहुलला सगळं स्पष्ट झालं. त्याच्या डोळ्यांतून ओघळणारे अश्रू त्याच्या आईच्या प्रेमाचं प्रतीक होते. तिने आपल्या मुलासाठी जगाच्या पलीकडे जाऊन सुद्धा त्याचं धैर्य वाढवलं, त्याला त्याच्या स्वप्नांच्या धावपळीत एकटं सोडलं नाही.
राहुलने आईच्या फोटोसमोर वाकून प्रणाम केला. "आई, तू खूप मोठं केलंस. मी तुझ्यामुळेचं आज इथे आहे. तुझा आशीर्वाद नेहमीचं माझ्यासोबत राहील," तो मनातचं म्हणाला.
त्या क्षणी राहुलला समजलं की आईचं प्रेम अमर आहे. तिने जिवंत असताना आणि मृत्यूनंतर सुद्धा त्याच्यावरील तिचं प्रेम कमी होऊ दिलं नाही. राहुलच्या आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर आईची सावली त्याच्यासोबत होती, आणि राहील.
राहुलच्या मनात एकचं विचार आला—आईने तिला दिलेलं धैर्य आणि तिची शिकवण आज त्याचं आयुष्याचं आधार बनलं होतं. तिने जे दिलं ते फक्त आठवणीत जिवंत नव्हतं, तर राहुलच्या हृदयातही ते कायम होतं.
समाप्त.
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा