Login

आदरणीय लेखिका छाया राऊत : शिक्षणाच्या ज्ञानगंगेतून लेखणीचा उदय ..!!

स्री शिक्षणाने अवघा समाज समृद्ध झाला आहे.
?आदरणीय लेखिका छाया राऊत : शिक्षणाच्या ज्ञानगंगेतून लेखणीचा उदय ..!

एक आदर्श शिक्षिका देशाचे उज्वल भविष्य घडवते....!

— सुविचारसंस्कार

बालपण जातं तरुणपण येतं
संंघर्षातून सारं जीवन घडतं
अक्षर येतं फळ्यावर फुलतं
शिक्षणाने जीवन समृद्ध होतं
✍️

ईरा व्यासपीठाने अनेक लेखकांना लिहते केले आहे. केवळ मर्यादित भागापुरते ईरा व्यासपीठ राहिले नसून संपुर्ण जगात ईराने नावलौकिक मिळवला आहे. लेखकांची प्रतिभाशक्ती , नाविन्यपूर्ण सकस दृष्टिकोन, बदलत्या जीवनशैलीचे सुक्ष्म निरीक्षण आणि लिहण्याची कमालीची आवड यामुळे ईरामध्ये ' लेखकांची साहित्यिक मांदियाळी ' सदैव बहरलेली दिसते. यामध्ये प्रामुख्याने स्री लेखिकांंचे विचार समाजाला तारणहार ठरले आहेत. बौद्धिक सुपिकतेने व दर्जेदार विचारांने बहरलेली समृद्ध स्री समाजाला कधी दिसलीच नाही; पण ईरावरील लेखिकांचे विचार जेंव्हा समाजात रुजू लागतात तेंव्हा स्रीयांचे विचार किती प्रगल्भ असतात याची जाणीव होते. अशाच विविधतेने नटलेल्या व आपल्या विचारांना सामाजिक किनार असलेल्या आदरणीय छाया राऊत या वैचारीक व अनुभवशील लेखिका आहेत.

ऐतिहासिक वारसा लाभलेल्या अमरावतीने अनेक गुणी व संपन्न लेखक, लेखिका समाजाला बहाल केल्या. इथल्या मातीशी इमान राखत लेखकांनी साहित्यिक क्षेत्रात मोलाची भर घातली.याच मातीत छायाजी यांचा जन्म झाला. आईवडिलांचे सुयोग्य संस्कार यामुळे त्यांचे बालपण चांगले गेले.गरीब परिस्थितीत छायाजी यांनी शालेय शिक्षण घेतले. शेजारील मुलगा याला साहित्याची खूप आवड होती त्याच्यासोबत ही लहान भांवडे पाणी आणत असता तो कविता म्हणून दाखवत असे.तो पुस्तके वाचायला देत होता यातून छायाजी यांना वाचनाची आवड निर्माण झाली.शालेय जीवनात ही आवड त्यांनी मनापासून जपली. जीवनात संर्घर्ष बालपणापा सहन केला आहे. पावसाळ्याच्या सुरवातीला सोसाट्याच्या वा-याने घराचे पत्रे उडून गेले त्यामुळे पावसात काढलेली रात्र आणि राहते घर बांधत असताना पडलेल्या भिंती या संकटावर मात करत छायाजीनी आपले जीवन व्यतीत केले आहे. जीवनातील ही आठवण त्यांना संस्मरणीय वाटते.

छायाजी यांना डॉक्टर व्हायचे होते परंतू घरच्या आर्थिक परिस्थितीमुळे त्यांनी कुटुंबाला आधार देण्यासाठी डिएड करुन शिक्षकेची नोकरी पत्करली. मुलांना चांगले मार्गदर्शन करुन त्यांनी संस्कारक्षम पीढी निर्माण करण्याचे कार्य मनापासून केले.केंद्रप्रमुख म्हणून सेवानिवृत्त होताना त्यांनी अनेक मुलांशी व शिक्षकांशी सहृदयतेचे नाते जोडले आहे. सेवानिवृत्त झाल्यानंतर एका गजानन नावाच्या विद्यार्थाचा त्यांना भेटायला येण्यासाठी फोन आला. त्याच्याकडे छायाजींचा फोन नंबर नव्हता पण फेसबुकवरुन नंबर शोधून त्यांना तो विद्यार्थी भेटण्यास आला. त्याला छायाजीनी शिक्षकदिनानिमित्त भेटण्यास सांगीतले.नंतर तो विद्यार्थी बुके व पेढे घेऊन पत्नीसह छायाजींना भेटला.इतकं त्यांनी मुलांवर भरभरुन प्रेम केल आहे. आजही त्या तितक्याच सर्वांचा जिव्हाळा जपत आहेत.

शिक्षणासारखे ज्ञानदानाचे कार्य चालू असताना त्यांनी लेखनाचा छंद जपला.आपले विचार अधिक सदृढ करताना त्यांनी ईरासारख्या व्यासपीठावर व्यक्त होण्यास सुरवात केली. सेवानिवृत्तीनंतर त्यांनी या संधीचे सोने केले. समर्पण, निर्णय,जन्माची शिदोरी सरतही नाही आणि उरतही नाही, रानवेल, माऊली, आहुती अशा कथांमधून त्यांनी समाजातील सजगता स्पष्ट केली आहे. विविध विषयावरील लेखाव्दारे त्यांनी आपले प्रभावी विचार वाचकांच्यासमोर सादर केले आहेत. सध्या त्या पुस्तकनिर्मितीत व्यस्त असून लवकरच त्यांची ही साहित्यकृती वाचकांना मेजवानी ठरेल.

छंद आणि माणुसकी जपण्यासाठी वयाची मर्यादा नसते, आजही त्या जनमाणसांत प्रेमाने वावरत आहे. ईराच्या नाशिक येथील स्नेहसंमेलनात त्यांचा उत्साह वाखाणण्याजोगा होता.स्वभावाने अत्यंत शांत, प्रेमळ, सयंमी अशा उत्साही व सेवाभावी शिक्षिका व उदात्त वैचारिक लेखिका आदरणीय छायाजी राऊत यांचे पुढील आयुष्य आरोग्यदायी व सुखकारक जावे आणि त्यांचे लेखन असेच वृद्धीगंत व्हावे ही सदिच्छा ..!

©®नामदेव पाटील