Login

अजब गजब लग्न - भाग 47

पाखी आणी राज एकत्र येतील का? त्यांच्या आणी तिच्या आजोबांना सगळे समजेल का? त्यांचे पुढे काय होईल.
दीर्घकथा लेखन स्पर्धा  डिसेंबर- जानेवारी 2025-26
अजब गजब लग्न - भाग 47


पाखी कशीतरी स्वतःला सावरत बेडवर आडवी झाली.
मन मात्र शांत होईना.
डोळे मिटले होते… पण विचार जागेच होते.

राजचा चेहरा सतत डोळ्यांसमोर येत होता. ऑफिसमधला तो गंभीर चेहरा… पार्टीतला हसरा राज…आणि आजोबांनी सांगितलेला तोच राज तिचा नवरा असे का?

“उद्या काय होणार आहे?” हा एकच प्रश्न मनात घोळत होता.

कधी उशी घट्ट धरून ठेवत होती, कधी डोळ्यांच्या कडा ओल्या होत होत्या.

थकवा हळूहळू जिंकत गेला. विचारांचा गोंधळ थोडा थांबला.

आणि शेवटी… अनेक प्रश्न, भीती, आशा
मनातच ठेवून पाखी कशीतरी झोपून गेली.

......

राजची रात्र बेचैन होती.
डोळ्यांना झोप लागायचं नावच घेत नव्हतं.
घड्याळाकडे पाहत पाहत तो कधी उजाडते याचीच वाट बघत होता.

“सकाळ झाली की थेट पाखीला भेटायचं…”
“तिला सगळं सांगायचं… काहीही लपवायचं नाही…”

मनात एकच ध्यास होता.

तिची माफी मागायची आहे… मनापासून, शब्दांपेक्षा जास्त भावनांनी.

“मी उशिरा समजलो, पण चुकीचा नव्हतो,” हे तिला सांगायचं होतं.

तिला आपल्या घरी घेऊन यायचं होतं…
हक्काने… आदराने… प्रेमाने.

कधी खिडकीतून बाहेर पाहत होता, कधी डोळे मिटून पाखीचा चेहरा आठवत होता.

आज पहिल्यांदाच सकाळ उशिरा येतेय असं त्याला वाटत होतं.

कारण
त्या सकाळीसोबत  त्याच्या आयुष्याचा सगळ्यात मोठा सत्य क्षण येणार होता. कधी तरी त्यांचा डोळा लागला.

......

पाखी सकाळी लवकर उठली.
नेहमीप्रमाणे तिने आपली सगळी कामं आवरली, डब्बा बनवला.
मन मात्र आज जड होतं… विचारांची गर्दी होती.

आजोबांना भेटायला गेली.
आजोबा खिडकीजवळ बसले होते. पाखी त्यांच्या जवळ बसली.
थोडा वेळ साध्या गप्पा झाल्या, पण आजोबांच्या डोळ्यांत काळजी स्पष्ट दिसत होती.

आजोबा हळूच म्हणाले,
“पाखी, राज भेटला तर त्याच्यासोबत नीट बोल.
राग, गैरसमज बाजूला ठेव. तो तुझी माफी मागायला आला होता… मनापासून.”

पाखी काहीच बोलली नाही.
फक्त मान हलवली… पण डोळ्यांत प्रश्न दाटले होते.
मन अजून तयार नव्हतं, तरीही आजोबांची काळजी तिला जाणवत होती.


---

दुसरीकडे…
राशी नाश्त्याच्या टेबलवर बसली होती. प्लेट समोर होती, पण लक्ष कुठेच नव्हतं. चमचा हातात धरून ती विचारात हरवली होती.

रवी तिच्याकडे बघत होता. तिला असं गप्प पाहून तो म्हणाला,
“काय झालं राशी? एवढ्या विचारात का आहेस?”

राशीने एक दीर्घ श्वास घेतला आणि म्हणाली,
“पाखीचा नवरा आला आहे. तो आजोबांना भेटून माफी मागून गेला. आता आजोबा पाखीला सांगतायत
त्याला माफ कर… आणि त्यांच्या घरी जाऊन राहा.”

हे ऐकून रवीचे हात थबकले. तो तिथेच खुर्चीवर बसून राहिला.

क्षणभर त्याला काहीच सुचलं नाही. मनात कुठेतरी दुखरं टोचलं…पाखीचा आनंद हवा होता,
पण तिला गमावण्याची जाणीवही त्याला झाली.

तो काहीच बोलला नाही… फक्त शांत बसून राहिला.

......

राज आज लवकर उठला होता. चेहऱ्यावर वेगळीच चमक होती. मनात एकच विचार आज सगळं स्पष्ट सांगायचं… पाखीशी.

तो पटकन तयार झाला.
आरशात स्वतःकडे पाहत हसला.
आज मन हलकं वाटत होतं, कारण सत्य लपवायचं नव्हतं.

“आज नाही सांगितलं तर कधीच जमणार नाही,”
तो मनात म्हणाला.

पाखीची प्रतिक्रिया काय असेल याची भीती होती,
पण त्याहून जास्त आशा होती ती समजून घेईल…
ती माफ करेल…

आज तिला भेटून, तिच्यासमोर उभं राहून,
सगळं मनातलं सांगायचं ठरवून, राज घरातून निघाला.



क्रमश

"सदर दीर्घकथेचे भाग नियमित पोस्ट होणार असून याचे पुढील भाग चुकू नयेत म्हणून पेज फॉलो करा आणि फॉलो सेटिंग मध्ये जाऊन "fevorite" ऑप्शन निवडून घ्या जेणेकरून एकही भाग सुटणार नाही"


दिपाली चौधरी


तुम्हांला कथा आवडत असेल तर, लाईक आणी  कमेंट करा


0

🎭 Series Post

View all