Login

अलगद फुलतील प्रेमाचे अंकुर भाग - ४१

राजकीय फायद्यासाठी झालेलं लग्न आणि लग्नानंतर अलगद उमलणारे प्रेम
दीर्घकथा लेखन स्पर्धा
डिसेंबर 2025 - जानेवारी 2026

"अलगद फुलतील प्रेमाचे अंकुर भाग - ४१"

पावसात भिजल्यामुळे अभिमन्यूची तब्येत खराब झाली होती. वैदही जंगलातल्या रस्त्यातून जाऊन अभिमन्यूसाठी औषध घेऊन येते. रात्रभर त्याच्या डोक्यावर वैदही मिठाच्या पट्ट्या ठेवते.

सकाळ झालेली असते. सकाळचे कोवळे उन सगळीकडे पसरलेले असते. अभिमन्यू नुकताच उठलेला असतो. त्याची थंडी आणि ताप कमी झालेला असतो. त्याला बरे वाटत होते.

अभिमन्यू उठल्यावर बघतो की वैदही त्याच्या डोक्याजवळ झोपलेली असते. अभिमन्यू तिला उठवत नाही. तो अलगद तिच्यावर पांघरून टाकतो आणि खाली येतो. तिथे त्याला केअरटेकर भेटतो.

"दादा बरे वाटले का तुम्हांला?" केअरटेकर अभिमन्यूला विचारतो.

"हो वाटले बरे." अभिमन्यू बोलतो.

"दादा तुम्ही खरंच नशीबवान आहात म्हणून तुम्हाला एवढा जीव लावणारी बायको भेटली." केअरटेकर बोलतो.

वैदहीने जीव धोक्यात घालून कसे अभिमन्यूसाठी औषध आणले हे केअरटेकर त्याला सांगतो. ते ऐकून अभिमन्यूच्या मनात वैदहीबद्दल एक आपुलकी निर्माण होते. अभिमन्यू पुन्हा खोलीत येऊन वैदही जवळ बसतो.

थोड्यावेळाने वैदहिला जाग येते. तिला डोळ्यासमोरच अभिमन्यू दिसतो. अभिमन्यूला बघताच वैदही त्याला बोलते, "तुम्ही कधी उठला? तुम्हाला बरे वाटले का?" असे बोलून वैदही अभिमन्यूच्या गळ्याला, गालाला, कपाळाला हात लावून त्याला ताप आहे की नाही हे बघते.

"मला का बरे वाटणार नाही! तू स्वतःचा जीव धोक्यात घालून माझ्यासाठी औषध आणले. रात्रभर इथे माझ्या डोक्यावर पट्ट्या ठेवल्या. बरे वाटणारच मला." अभिमन्यू बोलतो.

"तुम्हाला कोणी सांगितले?" वैदही विचारते.

"केअरटेकरने मला सगळे सांगितले. तुला भीती नाही वाटली का जंगलातून जाताना?" अभिमन्यू बोलतो.

"मला त्यावेळी फक्त एकच सुचत होते, तुमच्यासाठी डॉक्टर नाही आला तरी किमान औषध तरी आणायचे. तुमचा ताप कमी होतच नव्हता आणि मला तो कमी करायचा होता. त्यामुळे मला दुसरे काही सुचतच नव्हते." वैदही बोलते.

"तुझी ही मदत उधार राहिली." अभिमन्यू बोलतो.

"सॉरी मिस्टर पाटील पण वैदही मैत्रीमध्ये मदत, उधार, उपकार हे सर्व मानत नाही." वैदही बोलते.

"होका, बर ठीक आहे. मी माझे शब्द मागे घेतो." अभिमन्यू बोलतो.

वैदही अभिमन्यूचे नाक पकडून बोलते, "शाब्बास आता पटल मला."

"बरं मग आज काय करायचे दिवसभर?" अभिमन्यू बोलतो.

"तुम्ही सांगा काय करायचे? तुम्हाला हवं असेल ते करू." वैदही बोलते.

"हम... पहिले फ्रेश होऊ मग बघू काय करायचे." अभिमन्यू बोलतो.

इकडे पाटलांच्या घरी देवकी आणि नर्मदा बसलेल्या असतात. त्यांच्या वैदही आणि अभिमन्यूबद्दल गप्पा चालू असतात.

"अभी आणि वैदही तिकडे फिरायला गेले आहे पण काय माहित त्यांचे काय चालू असेल!" देवकी बोलते.

"ताई मला वाटतकी सगळे नीट चालू असेल. सगळे नीट नसते तर वैदहिने आपल्याला फोन केलाच असता." नर्मदा बोलते.

"तिकडे काही त्यांना अडचण जरी आली, तरी वैदही फोन करणार नाही. ती एकटीच तिकडे सर्व निस्तारित बसेल." देवकी बोलते.

"ताई एवढेच असेल तर आपण त्यांना फोन करून बघू." नर्मदा बोलते.

"नाही नको. जोपर्यंत वैदही फोन करत नाही किंवा तिचा काही संदेश येत नाही आपण काही करायचे नाही." देवकी बोलते.

"ताई तुमचं असं आहे काळजी पण करणार आणि चौकशी पण नाही करणार." नर्मदा बोलते.

देवकी आणि नर्मदाच्या गप्पा चालूच असतात. इकडे फार्महाऊसवर वैदही आणि अभिमन्यू फ्रेश होऊन निवांत गप्पा मारत होते. त्यांच्या गप्पा चालू असतानाच केअरटेकर धावत येतो.

"दादा, ताई लवकर खाली चला." केअरटेकर घाबरत बोलतो.

"दादा, काय झाले आहे? तुम्ही एवढे का घाबरले आहात?" अभिमन्यू बोलतो.

"दादा, तुम्ही खाली चला तुम्हाला कळेल सर्व." केअरटेकर बोलतो.

अभिमन्यू आणि वैदही खाली येताय. खाली ती कालचीच टवाळखोर पोरं असतात ज्यांनी वैदहीची छेड काढलेली असते. सोबत अजून काही इतर पोरं पण होती जी काल नव्हती.आणि आता त्यांच्याबरोबर पोलिस पण असतात.

"तुम्ही या पोरांना मारले अशी यांची तक्रार आहे." पोलीस बोलतात.

"हो मारले मी त्यांना. त्यांनी वैदहीची छेड काढली होती." अभिमन्यू बोलतो.

"तुम्हांला पोलिस स्टेशनला यावे लागेल." पोलीस बोलतात.

"एक पाच मिनिटे द्या." असे पोलिसांना बोलून अभिमन्यू वैदहिला घरी म्हणजे आबासाहेबांना फोन करायला सांगतो. वैदही आबासाहेबांना फोन करून पोलीस अभिमयूला अटक करायला आले हे सांगते. आबासाहेब वैदहिला काळजी करू नको असे सांगतात.

पाच मिनिटाचा वेळ जातो. पोलिसांना त्यांच्या वरिष्ठांचा फोन येतो.

"आरे कोणाच्या विरोधात तक्रार केली आहे. वरिष्ठांना गृहमत्र्यांचा फोन आला होता यांना अटक करू नका असे सांगितले आहे. समोरचा माणूस पाहून त्याला नडारे." पोलीस त्या टवाळखोर पोरांना बोलतात.

पोलिसांचे बोलणे ऐकल्यावर सगळ्यांना धक्का बसतो हा नेमका कोण आहे?

पोलीस तिथून जायला लागतात. अभिमन्यू त्यांना थांबवून बोलतो, "माझी तक्रार घ्या. या सगळ्यांनी माझ्या बायकोची छेड काढली. यांना अटक करा."

अभिमन्यूच्या सांगण्यावरून पोलिस त्या टवाळखोर पोरांना घेऊन जातात.

अभिमन्यूच्या तोंडून माझी बायको असे ऐकल्यावर वैदहीचे भान हरपून जाते. तिला जगातले सर्व सुख भेटले असे तिला वाटू लागते. अभिमन्यूच्या शब्दाने वैदही हरवून गेली होती.

"सदर दीर्घकथेचे भाग नियमित पोस्ट होणार असून याचे पुढील भाग चुकू नयेत म्हणून पेज फॉलो करा आणि फॉलो सेटिंग मध्ये जाऊन "fevorite" ऑप्शन निवडून घ्या जेणेकरून एकही भाग सुटणार नाही"

क्रमश:
0

🎭 Series Post

View all