Login

अरेंज कम लव्ह मॅरेज पर्व २ भाग ४४

Story After Marriage
अरेंज कम लव्ह मॅरेज पर्व २ भाग ४४

मागील भागाचा सारांश: पंकज व निशामध्ये नेमकं काय सुरू याचा विचार ऋतुजा करत होती. रश्मी याबद्दल निशा सोबत बोलून ऋतुजाला वेळोवेळी अपडेट देत राहील अस तिने सांगितलं. ऋतुजाला कॅब सिग्नलला उभी असताना आरती एका मुलासोबत दिसली. आई अर्पिता व रणजीत वर नाराज होती. ऋतुजाने आईला सांगितले की, त्यांचं आयुष्य त्यांच्या पद्धतीने जगुदेत आणि तुमचं तुमच्या पद्धतीने जगा.

आता बघूया पुढे……

स्वयंपाक करता करता आई व ऋतुजा मध्ये गप्पा सुरू होत्या. काही वेळातच अभिराज तिथे आला.

“ऋतू, जावई बापू आलेत ग.” बाबानी हॉल मधून ओरडून ऋतुजाला सांगितले.

“बाबा, मी त्याला सकाळीच भेटले आहे. अस सांगताय जसे तुमचे जावई बापू आणि मी गेल्या महिन्यापासून भेटलेलो नाहीयेत.” ऋतुजा बाहेर येऊन म्हणाली.

“मी तुझं माहेरपण डिस्टर्ब केलंय का?” अभिराजने विचारले.

“नाही. मी अस बोलले नाहीये.” ऋतुजा.

“ऋतू, आता यावर पुढे काहीच बोलू नकोस. मी जेवायला वाढते. लगेच जेवण करून घ्या म्हणजे तुम्हाला लगेच निघता येईल. रात्री उशिरा घरी जाणे सेफ राहणार नाही.” आई किचन मधून बाहेर येऊन म्हणाली.

डायनिंग टेबलवर आई, बाबा, ऋतुजा व अभिराज जेवण करायला बसले.

“रणजीत दादा आणि अर्पिता वहिनी अजून आले नाहीत.” अभिराजला प्रश्न पडला होता.

“ते एका पार्टीला गेले आहेत. बहुतेक त्यांना यायला उशीर होईल.” बाबा म्हणाले.

तेवढ्यात दरवाजावरील बेल वाजली. ऋतुजाने उठून दरवाजा उघडला. समोर अर्पिता, रणजीत व आरव होते. आरवच्या डोक्याला पट्टी बांधलेली होती व त्याचा चेहरा रडवेला दिसत होता.

“वहिनी, आरवला काय झालंय? आणि तुम्ही पार्टीवरून लवकर घरी आलात.” ऋतुजा म्हणाली.

“आरवला लागल्याने आम्हाला लवकर घरी यावं लागलं.” ते तिघेजण घरात आले. ऋतुजा आपल्या जागेवर जाऊन बसली.

“त्याला खूप लागलंय का?” हे काळजीने बोलून आई जागेवरुन उठायला लागली, तेव्हा ऋतुजाने आईचा हात धरून तिला बसवले.

“आई, तू जेवण करून घे. आरव आता रडत नाहीये. वहिनी आणि दादा थकलेले आहेत. त्यांना थोडं रिलॅक्स होऊदेत मग ते सगळं स्वतःहून सांगतीलच.”

अर्पिता आरवला घेऊन डायरेक्ट रूममध्ये गेली. अभिराजकडे बघून ती त्याच्याशी बोलली नाही, हे ऋतुजाला खटकले होते. अभिराजला बघून रणजीत म्हणाला,

“मला वाटलं होत, ऋतू एकटीच येणार आहे. तुम्ही येणार हे माहीत असत तर मी घरीच थांबलो असतो.”

“मी येणार नव्हतोच, पण बाबांनी फोन केल्याने आलो.” अभिराज स्माईल देऊन म्हणाला.

रणजीत डायनिंग चेअरवर येऊन बसला.

“दादा, जेवण करून आला आहेस ना?” ऋतुजाने मुद्दाम विचारले.

“जेवण करण्याआधीच आरव पडला. फक्त स्टार्टर खाल्लं होत.” रणजीतने उत्तर दिले.

“जेवायचं असेल तर तुही जेवायला बस.” आई म्हणाली.

“तुमचं जेवण होऊदेत. मी अर्पिताला जेवायचं का ते बघतो. आरव पडल्याने तिचा मूड स्पॉईल झाला आहे.” रणजीत रूममध्ये निघून गेला.

आईने ऋतुजाकडे बघितले. ऋतुजाने तिला नजरेने शांत रहा अस सांगितलं.

“अभिराज, आई बाबा कसे आहेत?” ऋतुजाच्या बाबांनी विषय बदलला.

“ते मजेत आहेत. बाबांचं रुटीन सुरू आहे. त्यांचं काम आणि ते हे ठरलेलं गणित असत त्यांचं. आई तिच्या घरकामात व्यस्त असते.” अभिराज.

“फ्लॅटच इंटेरिअर कधी करताय?” बाबा.

“हैदराबादहुन परत आलो की सुरू करूयात. तसं इंटेरिअर डेकोरेटर सोबत आम्ही दोघेही भेटलो आहोतच.” अभिराज.

इकडच्या तिकडच्या गप्पा मारत त्यांचे जेवण झाले. रणजीत व अर्पिता अजूनही रूममधून बाहेर आले नव्हते. ऋतुजाने तिला लागणारे कपडे बॅगमध्ये भरले. बॅग हॉलमध्ये आणून ठेवली.

“मी आरवला भेटून येते, मग आपण निघूयात.” ऋतुजाने रणजीतच्या बेडरूमच्या दरवाजावर नॉक केले.

रणजीत दरवाजा उघडून म्हणाला,
“ऋतू, काय म्हणतेस?”

ऋतुजा रूममध्ये गेली व तिने दरवाजा बंद केला. आरव मोबाईल बघत होता. अर्पिता डोक्याला हात लावून बसलेली होती.

“आरव, कसा आहेस बाळा?” ऋतुजा त्याच्याजवळ जाऊन म्हणाली.

“थोडं दुखतंय.” आरव.

“हळूहळू बर वाटेल. डॉक्टरने दिलेली औषधे घेत जा. खेळताना जरा हळू खेळावं.” ऋतुजा म्हणाली.

आरव पुन्हा मोबाईल मध्ये गुंग झाला.

“दादा, मी काही वेळापूर्वी आईलाच रागावले. तुम्हाला तुमच्या पद्धतीने आयुष्य जगू द्या अस सांगितलं, पण आता मलाच असा अनुभव आला आहे की, आई बरोबर आहे असं वाटत आहे.

तुम्हाला दोघाना नको होतं, तर आई बाबांना इकडे रहायला का बोलावल? मी एकटी असताना तुम्ही असे वागला असता तर मला काही वाटलं नसत, पण तुम्ही अभिराज समोर तुमचं खर रूप दाखवल आहे. दादा, तुमचा नेमका प्रॉब्लेम काय आहे हे मला माहित नाही, पण जे काही तुम्ही दोघे तुटक वागत आहात ते मला अजिबात पटलेलं नाहीये.

दादा, आम्ही दोघे काय दररोज इथे येऊन बसत नाही. आरवला कस व किती लागलं याची काळजी त्याच्या आजी आजोबाला लागलेली असेल, पण ते हक्काने विचारुही शकत नाही. आरव जसा इथे बसला आहे तसाच तो बाहेर हॉलमध्येही बसला असताच ना.

मला वाटलं होतं की त्याचे कपडे बदलून अर्पिता वहिनी लगेच बाहेर घेऊन येतील. दादा, तुम्ही दोघेही माझ्या पेक्षा मोठे आहात. आई-बाबा व तुमच्यात दरी निर्माण करू नका. तुम्हाला त्यांच्या सोबत रहायला जमत नसेल, तर त्यांनी दिलेले पैसे त्यांना परत देऊन टाक म्हणजे ते त्यांचे ते दुसरीकडे रहायला जातील. तुम्हाला त्यांची अडचण तर होणार नाही.

आम्हाला जायला उशीर होतोय. मी जाते. हैदराबाद वरून परत आल्यावर मी पुन्हा येईल तेव्हा मला हे वातावरण बदललेले हवे आहे.” ऋतुजाच्या डोळ्यात राग दिसत असला तरी ती शांतपणे बोलून निघून गेली.

आई-बाबांच्या पाया पडून त्यांचा आशिर्वाद घेऊन ऋतुजा व अभिराज घराबाहेर पडले.