अरेंज कम लव्ह मॅरेज पर्व २ भाग ४५
मागील भागाचा सारांश: अभिराज ऋतुजाच्या आई-बाबांच्या घरी जेवायला आला होता. आरवला दुखापत झाल्याने अर्पिता व रणजीतला पार्टी सोडून घरी यावे लागले होते. अर्पिता व रणजीत आरवला घेऊन त्यांच्या रूममध्ये घेऊन गेले. ऋतुजाला त्यांचं वागणं खटकल्याने ऋतुजा रणजीतला चार शब्द सुनावून आली होती.
आता बघूया पुढे….
“अभी, एखाद आईस्क्रीम पार्लर बघून गाडी थांबव. माझं डोकं जाम दुखत आहे.” ऋतुजाने सांगितले.
पुढे लगेच आईस्क्रीम पार्लर दिसल्याने अभिराजने लगेच गाडी थांबवली. दोघेजण आत जाऊन बसले. ऋतुजाने तिच्या आवडीच आईस्क्रीम ऑर्डर केलं.
“तू रणजीत दादा व वहिनीच्या वागण्याने दुखावली आहेस ना?” अभिराज म्हणाला.
“ते दोघेजण असे कसे वागू शकतात. अचानक त्यांच्यात इतका बदल का झाला असेल? मला सुरुवातीला वाटलं होतं की, आईच्या त्यांच्या कडून जरा जास्तच अपेक्षा आहेत.” ऋतुजा चिडली होती.
“आता तू त्यांना जे बोलायचं ते बोलून आली आहेस ना, मग आता चिडचीड का करत आहेस? तो विषय आता सोड ना. तू अतिविचार करून स्वतःला त्रास का करून घेत आहेस?” अभिराज.
“मला ना दादा व वहिनीचा खूप राग आला आहे.” ऋतुजा.
“तू पहिले आईस्क्रीम खा, शांत हो, मग आपण बोलू.” अभिराज.
आईस्क्रीम खाल्ल्यावर ऋतुजाच भनभन करणार डोकं शांत झाल. ऋतुजा शांत झालेली बघून अभिराज म्हणाला,
“ऋतू, आता तो विषय डोक्यातून काढून टाक. तुला जे दिसलं आणि पटलं नाही ते तू दादाला बोलून आली आहेस. तुझ्या बोलण्याने त्यांना त्यांची चूक कळली असेलच. आता राहिला प्रश्न आई-बाबांचा, तर ते त्यांच्या गोष्टी हँडल करतील. तू या सगळ्यात थोडी अलिप्त रहा. जेव्हा बोलण्याची वेळ येईल तेव्हा बोलत जा.
तू बोलल्याने तुझं आणि दादाच नातं सफर व्हायला नको. हे बऱ्याचदा तुच मला समजावून सांगत असतेस.”
“हो, मी आज जरा ओव्हर रिऍक्ट झाले अस मला वाटतय. मला ना सगळं त्यावेळी कंट्रोलच झालं नाही. दादा-वहिनीची काही बाजू असेल, ती ऐकून घ्यावी अस मला वाटलंच नाही.” ऋतुजा.
“इट्स ओके. हैद्राबाद वरून आल्यावर तू त्यांना भेटून त्यांच्याशी समक्ष बोल.” अभिराज.
“हो, आता तेच करावं लागेल.” ऋतुजा.
अभिराजने आईस्क्रीमचे बिल दिले. बाहेर पडता पडता ऋतुजाने सहज मोबाईलचे नेट ऑन केले तर अर्पिताचा मॅसेज आलेला होता.
“हाय ऋतुजा,
आज तुम्हाला जे दिसलं त्यावर तुम्ही रिऍक्ट झालात. कदाचित तुमच्या जागेवर मी असते तर माझीही ही रिऍक्शन सेमच असली असती. फक्त तुम्ही बोलताना एकतर्फी विचार करायला नको होता.
आज तुम्हाला जे दिसलं त्यावर तुम्ही रिऍक्ट झालात. कदाचित तुमच्या जागेवर मी असते तर माझीही ही रिऍक्शन सेमच असली असती. फक्त तुम्ही बोलताना एकतर्फी विचार करायला नको होता.
माझ्या मनात आई-बाबा किंवा तुमच्याबद्दल राग नाहीये. आई-बाबा मला या घरात माझ्यासोबतच हवे आहेत, पण गोष्टी अशा घडत आहेत की, मला शांत बसायला वेळच मिळत नाहीये.
मला घरातील काम करायला जमत नाहीये, म्हणून स्वयंपाक करायला बाई लावूयात बोलले तर आई त्याला नाही म्हणत आहेत. त्या स्वयंपाक बनवणार आणि मी बसून खाणार हे मला पटत नाहीये.
हे घर घेताना किंवा त्याच इंटेरिअर करताना एकदम एवढा खर्च करायला नको अस मी रणजीतला खूपदा बोलले, पण शो ऑफ करण्याच्या नादात त्यांनी या सगळ्याकडे लक्ष दिले नाही.
आता लोनचे हप्ते इतके डोईजड झाले आहेत की मला पार्ट टाईम जॉब करावा लागत आहे. मी माझ्या कामामुळेच जास्त वेळ बाहेर राहते किंवा रूममध्ये राहते.
आज कोणतीही पार्टी नसून माझा सेमिनार होता. सेमिनार सुरू असतानाच आरव पडला आणि रडायला लागला. एवढ्या कष्टाने बनवलेलं प्रेझेंटेशन माझं वाया गेल आणि तो प्रोजेक्टही मला आता मिळणार नाही.
रणजीतने त्यावेळी आरवला नीट हँडल केलं असत, तर ही वेळ आलीच नसती. माझा राग रणजीतवर होता. आरव हल्ली खूपच हट्ट करत असतो म्हणून मी त्याला आई-बाबांकडे ठेवत नाही. तो त्यांना खूप त्रास देईल.
मी पार्ट टाईम जॉब करते हे कोणाला कळू देऊ नये हे रणजीतचे मत होते, पण आता मी लगेच आई-बाबांना सगळं खरं सांगणार आहे. उगाच माझ्याबद्दल त्यांच्या मनात गैरसमज निर्माण व्हायला नको.
तुम्ही हैद्राबाद वरून आल्यावर आपण या सगळ्यावर इन डिटेल मध्ये बोलूच.”
अर्पिता बद्दल आपण किती चुकीचा विचार करत होतो याचे गिल्ट ऋतुजाच्या मनाला लागले होते.
“सॉरी वहिनी, माझा खरच खूप मोठा गैरसमज झाला होता. मी हैद्राबाद वरून आल्यावर भेटून बोलूयात.” ऋतुजाने रिप्लाय केला.
“आज आपल्याला घरी जायचं आहे ना?” अभिराजने विचारले.
ऋतुजा तिच्या विचारांच्या तंद्रीतून बाहेर आली व तिने अभिराजला अर्पिताच्या मॅसेज बद्दल सांगितलं.
“जास्त गैरसमज होण्यापेक्षा सगळं आताच सॉर्ट झालं ते एक बर झाल. आता आपण नॉनस्टॉप घरी जाऊयात. बराच उशीर झाला आहे.” हातावरील घड्याळात बघत अभिराज म्हणाला.
अभिराज व ऋतुजा आपल्या घराच्या दिशेने मार्गस्थ झाले. अभिराज व ऋतुजा घरी गेले, तर पंकज वेबसेरीज बघत जागा होता, आरती रूममध्ये झोपलेली होती.
कपडे बदलून ऋतुजा लगेच झोपून गेली, पण अभिराज मात्र कसलातरी विचार करत जागा होता. झोपलेल्या ऋतुजा कडे बघून तो मनातल्या मनात म्हणाला,
‘तुझ्याशी आज मला काही तरी शेअर करायचं होतं, पण तूच वेगळ्या गोंधळात अडकलेली होतीस. आपल्या डोळ्याला जे दिसतंय ते खरं आहे की त्या पलीकडे काही सत्य असेल हे जाणून घ्यावे लागेल.’
अभिराज कसला विचार करत होता? हे बघूया पुढील भागात….
©®Dr Supriya Dighe