Login

अरेंज कम लव्ह मॅरेज पर्व २ भाग ४६

Story After Marriage
अरेंज कम लव्ह मॅरेज पर्व २ भाग ४६

मागील भागाचा सारांश: ऋतुजाला रणजीत व अर्पिताच्या वागण्याचा राग आला होता, तेव्हा अभिराजने तिला त्यांचीही काहीतरी बाजू असेल हे जाणवून दिले. अर्पिताने ऋतुजाला मॅसेज करून तिची बाजू मांडली.

आता बघूया पुढे….

अभिराजला झोप लागत नसल्याने तो किचनमध्ये पाणी पिण्यासाठी गेला. पंकज त्यावेळी जागाच होता.

“पंकज, अजून झोपला नाहीस.” अभिराज त्याच्यापुढे जाऊन म्हणाला.

“एक इंटरेस्टिंग वेबसेरीज बघत होतो.” पंकज कानातील हेडफोन काढून म्हणाला.

“उद्या सकाळी ड्युटीला जायचं आहे ना. इतक्या उशीरा पर्यंत जागण योग्य नाहीये.” अभिराज म्हणाला.

“तू या वेळेला जागा कसा?” पंकज.

“डोक्यातील विचार शांत बसू देत नाहीयेत.” अभिराज.

“काही टेन्शन आहे का?” पंकजने विचारले.

अभिराज सोप्यावर बसला,

“आज मी आरतीला एका मुलासोबत बघितलं. ती त्याच्या सोबत खूप खुश दिसत होती. आरती आपल्यापासून हे का लपवत असेल? तो तिचा फक्त मित्रही असू शकेल, पण तसं आरतीने आपल्याला सांगायला हवं. पुन्हा ती एखाद्या चुकीच्या व्यक्तिमध्ये अडकायला नको एवढीच माझी इच्छा आहे.”

“ओह! मलाही याबद्दल काहीच ठाऊक नाहीये. मी आरतीला विचारू का?” पंकज.

“डायरेक्ट विचारू नकोस. इनडायरेक्टली बोलून बघ. मी बोललो तर ती कशी रिऍक्ट होईल हे सांगता येत नाही.” अभिराज.

“मी तिचा अंदाज घेतो आणि मग तुला सांगतो. तू तिचा एवढा विचार करू नकोस. तुम्हाला उद्या संध्याकाळी हैद्राबादला जायच आहे ना, तर शांत झोप.” पंकज.

“हो, गुड नाईट.” अभिराज आपल्या रूममध्ये निघून गेला.

दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यावर ऋतुजाने मोबाईलचे नेट ऑन केले, तर तिच्या कंपनीच्या ग्रुपवर बरेच मॅसेज आलेले होते. ऋतुजाने मॅसेज चेक केले, तर तिला धक्काच बसला.

अभिराजला हलवून हलवून तिने उठवले.

“ऋतू, झोपू दे ना यार.”

“अभी, आपण ज्या ट्रेनिंगला जाणार होतो, ते ट्रेनिंग कॅन्सल झालं आहे.” ऋतुजा मोबाइल मध्ये बघत म्हणाली.

“काय?” त्यालाही धक्का बसला होता. त्याने त्याचा मोबाईल चेक केला, तर त्याच्या कंपनीच्या ग्रुपवर सेम मॅसेज फिरत होता.

“ओह शीट मॅन! चांगलं ट्रेनिंग कॅन्सल झालं राव.” अभिराज डोक्याला हात लावून बसला होता.

“आता बसून काही होणार नाही. ट्रेनिंग जरी कॅन्सल झालं असल तरी आपल्याला ड्युटीवर जावं लागेल, ते काही चुकणार नाही.” ऋतुजा म्हणाली.

“आपण मस्त फिरायचा प्लॅन केला होता ना.” अभिराज.

“इतका वैतागू नकोस, आपण सुट्टी घेऊन दुसरीकडे फिरायला जाऊयात.” ऋतुजा.

“तू ट्रेनिंग कॅन्सल झाल्याचं किती पटकन स्विकारलं.” अभिराज.

“न स्वीकारून कोणाला सांगायचं. ज्या गोष्टी आपल्या हातात नसतात त्या स्विकारायच्या सोडून आपल्याकडे दुसरा पर्याय नसतो.” ऋतुजा.

ऋतुजा बेडवरून खाली उतरली. फ्रेश होऊन, अंघोळ करून ती किचनमध्ये गेली. आरती स्वयंपाक करत होती.

“वहिनी, तुम्ही दोघे नाश्ता घरीच करणार आहात ना?” आरतीने विचारले.

“हो, आमचं ट्रेनिंग कॅन्सल झालंय सो आम्ही कुठेच जात नाही आहोत.” ऋतुजाने सांगितले.

“मी भाजी आमच्या दोघांपुरतीच केली होती.” आरती.

“आम्ही कॅन्टीन मध्ये खाऊन घेऊ. तसही डबा घेऊन जायचा आज माझा मूड नाहीये.” ऋतुजा.

“अभी दादा उठला नाही का?” आरती.

“ट्रेनिंग कॅन्सल झाल्याने दुःख मनवत बसला आहे.” ऋतुजा.

“मग आता तुम्हाला फ्लॅटच इंटेरिअरच काम करून घेता येईल.” आरती.

“हो, आता त्याकडेच लक्ष द्यावं लागेल. आपलं घर असताना अस किती दिवस भाड्याच्या घरात रहायच.” ऋतुजा.

“हो, तेही आहेच.” आरती.

“तुम्ही दोघेजण हैद्राबादला जाणार असल्याने आई पुण्याला येणार होती.” आरती.

“आम्ही असतानाही आल्या तरी आमची काहीच हरकत नाही. त्यांना येउदेत की.” ऋतुजा.

“आईशी बोलावं लागेल, ती काय करेल ते कळेल.” आरती.

“आईंना माझा काही प्रॉब्लेम आहे का?” ऋतुजाने डायरेक्ट विचारले.

“नाही, दादा व तिच काहीतरी झालं. आईच्या अपेक्षा वेगळ्या आहेत आणि दादा त्या अपेक्षा पूर्ण करत नाही म्हणून तिला त्याचा राग आला आहे.” आरती.

“वहिनी, तुम्ही दोघे किती वाजता निघणार आहात?” पंकजने किचनमध्ये येऊन विचारले.

“आमचं ट्रेनिंग कॅन्सल झालय.” ऋतुजाने त्याच्याकडे बघितले तर तो फोनवर बोलत होता. त्यांचं बोलणं ऐकून तो नक्कीच आईसोबत बोलत असेल हा अंदाज तिला आला होता.

“आई केव्हा येणार आहेत?” ऋतुजाने बाहेर जाऊन पंकजला विचारले.

“आईच येत नाहीये.” पंकजने उत्तर दिले.

“का?” ऋतुजा.

पंकजने काहीच उत्तर दिले नाही. ऋतुजाला जे समजायचं ते समजून गेलं होतं. ती तशीच बेडरूममध्ये गेली.

“अभी, आईंचा काय प्रॉब्लेम आहे? आपण हैद्राबादला जाणार होतो म्हणून त्या पुण्याला येणार होत्या. आपण जात नाहीये हे ऐकून त्यांनी त्यांचं येणं लगेच कॅन्सल केलं. याचा अर्थ मी काय समजायचा?” ऋतुजा चिडली होती.

“ऋतू, एकतर यातील मला काहीच माहिती नाहीये. आता सकाळी सकाळी वाद घालण्यापेक्षा आपण आपापल्या ड्युटीवर गेलेलं बर राहील. मी संध्याकाळी बाबांशी बोलतो. ते आईला समजावून सांगतील.” अभिराजच बोलणं ऋतुजाला न पटल्याने ती तेथून निघून गेली.

ऋतुजा कोणाशीच बोलली नाही. चहा, नाश्ता करून ती घराबाहेर पडली.

“दादा, वहिनी व तुझ्यात भांडण झालय का?” पंकजने विचारले.

“आईला कस हँडल करू हे कळत नाहीये. ऋतुजाची प्रतिक्रिया योग्य आहे. तिला अस वाटतय की, तिच्यामुळे आई इकडे येत नाहीये. आईला कस समजावल म्हणजे पटेल काय माहीत.” अभिराज वैतागला होता.

“तू बाबांशी बोल, तेच यातून मार्ग काढतील.” पंकज.