Login

असला नवरा नको गं बाई (भाग ३)

लग्न करून टाका म्हणजे मुलाच्या आयुष्य सुधारेल या अंधश्रद्धेने कितीतरी मुलीचे आयुष्य उध्वस्त केले आहे
चॅम्पियन्स ट्रॉफी 2025

असला नवरा नको गं बाई !!.
(भाग ३)

जेव्हा सुनंदाला समजले तिला दिवस गेलेत. तिला आशा वाटू लागली की या बाळामुळे विजयच्या वागण्यात काही बदल होईल.

तिने तिच्या गरोदरपणाची बातमी विजयला दिली तेव्हा तोही खूप आनंदी झाला. आपण बाप होणार या भावनेनेच तो भारावून गेला. खरं सांगायचं तर विजय फारसा जबाबदार नव्हता, पण तरीही ही बातमी ऐकून त्याच्या चेहऱ्यावर खूप आनंद होता. बाप होण्याच्या भावनेने त्याला थोडा उत्साह आला.

सुनंदाने त्याला मग समजावले, “आता आपल्याला नव्याने आयुष्य सुरू करायचं आहे. आपलं बाळ या जगात येणार आहे, त्याला चांगलं भवितव्य देण्यासाठी तुम्हाला कामधंदा करायला हवा"

आपल्या बाळाच्या नवीन आयुष्यासाठी तिने विजयला काम करण्याची गळ घातली. तसेच दारू पासून लांब राहण्यासाठीही त्याला सांगितले. विजय खरंच तसे वागायला ही लागला. दारूला हात लावणं त्याने बंद केलं आणि एका छोटेखानी कंपनीत हेल्पर म्हणून नोकरीही धरली. सकाळी उठून कामाला जाणं, थकून भागून संध्याकाळी परत येण त्यामुळे सुनंदाला वाटलं की कदाचित आता तिचं आयुष्य योग्य मार्गावर जाईल.

ती रोज देवाला प्रार्थना करू लागली की, "माझ्या नवऱ्याची ही सुधारणा कायम टिकू दे रे देवा आता तुझ्यावरच भरोसा माझा."पण म्हणतात ना पुरुषाला एकदा का बसून खायची सवय लागली तर ती सवय लवकर सुटत नसते. तसंच झालं. विजय
लहानपणापासूनच मुळातच ऐतखाऊ होता. त्याला निव्वळ बसून तुकडे तोडायची सवय होती. सुरुवातीचे दोन महिने कसाबसा तो सुधारला, पण नंतर हळूहळू जुन्या सवयी उफाळून जाग्या होऊ लागल्या. नोकरीची धडपड, कामाचा ताण, यामुळे तो चिडचिडा होऊ लागला. त्यामुळे दोनच महिन्यात तो हातातील नोकरी सोडून घरी बसला. नुसते बसून कायं करणार म्हणतात ना रिकामे विचार सैतानाचे घर असते त्यामुळे विजय पुन्हा दारू पिऊ लागला.

सुनंदाने खूप समजावलं, भांडणंही झाली, पण विजयवर त्याचा काहीच परिणाम झाला नाही. आता तिच्या लक्षात आलं की विजय म्हणजे पालथ्या घड्यावर पाणी आहे.  हे बेणं कधीच सुधारणार नाही. आज तो त्याच्या आईवडिलांच्या पैश्यावर जगणारा जिवाणू झाला आहे. आज ते आहेत पण उद्याचे कायं?. जर ते गेले तर हा जिवाणू माझ्या वर अवलंबून राहील मलाच याला पोसावे लागेल. येणारे बाळ आपल्या बापाला पाहून त्यालाही असेच वळण लागले तर?. या विचारानेच ती हतबल झाली.

याच क्षणी सुनंदाने ठाम निर्णय घेतला. “असल्या नवराबरोबर संसार करणं म्हणजे स्वतःचं आयुष्य उद्ध्वस्त करणं. त्यापेक्षा एकटीने जगणं मला परवडेल, पण या ब्यादेला माझ्या आणि माझ्या बाळाच्या भवितव्यात जागा नाही.”

तिने मनातल्या मनात ठरवलं की ती विजय सोबत घटस्फोट घेईल. , लोक कायं म्हणतील याची तिला आता काहीच पर्वा नव्हती. तिला तिच्या बाळाचं भविष्य महत्वाचं होतं. त्या क्षणी तिने स्वतःसाठी आणि आपल्या येणाऱ्या बाळासाठी एक नवा मार्ग निवडला होता. तिच्या दृष्टीने तोच निर्णय योग्य होता.

समाप्त.
संतोष उदमले
0

🎭 Series Post

View all