Login

बाळू

बाळू या व्यक्तीचे व्यक्तीचित्रण
दररोज सकाळी पावणे नऊला मोटरसायकलचा आवाज येतो आणि आमचा मोलू कुत्रा अत्यानंदाने इकडे तिकडे उंच उड्या मारत , विशिष्ट असा कु कूईइ आवाज करीत स्वतःभोवती फिरू लागला की समजावं बाळू आला आहे .तो गाडी लावून येईपर्यंत मोलूचे बाळू प्रतिचे प्रेमाचे हुंकार सुरू असतात. मग त्याच्या अंगावर उड्या मारत आनंद प्रदर्शित होतो आणि एका हातात मोलू आणि एका हातात फोनवर बोलत बाळू ,मोलूला घेतो आणि दोघेजण रपेटीला म्हणजे "मॉर्निंग वॉक"ला निघतात.
तिकडून आल्यावर बाळू नेहमीप्रमाणे हातात खराटा घेऊन एखादे मंदिर झाडावे त्या एकतानतेने घराचे अवाढव्य अंगण झाडायला सुरुवात करतो. मधूनच काड्या निघणाऱ्या खराट्याचा बुंधा भिंतीवर आपटून तो सरळ करतो, तर मधून मधून उभा राहून डाव्या हाताने रुमालाची घडीच्या घडी कपाळावरून, चेहऱ्यावरून फिरवतो .हे काम झाले की तेव्हा कुठे त्याला परमेश्वर सेवेचा आनंद मिळाल्यासारखा वाटतो .खरे तर हे काम कधीही, कोणीही त्याला सांगितलेले नाही आणि तरीही अनेक वर्ष तितक्याच सातत्याने तो ते करतो आहे .
मुलांचा हा बाळू काका आमच्याकडच्या गाडीवर येऊन आज 17 वर्षे झाली .आता तर आमच्या मोठ्या मुलाच्या बाळाचा म्हणजे अग्नेयचा तो बाळू आबा झालेला आहे .इतक्या वर्षांमध्ये आजपर्यंत मी कधीही त्याला चिडलेलं ,संतापलेल ,नाराज बघितलेलं नाही .घरचा मेंबर असलेल्या बाळूला एकदा मी विचारलं की," तुला कधीच राग नाही येत का? "तर तो म्हणाला ,"नाही येत. लहानपणापासून मामाच्या इथे वाढलो .जे सांगतील ते ऐकायचं हीच सवय झाली."
मी कुठूनही गावाहून आले की नेहमीप्रमाणे तो मला घ्यायला गाडी घेऊन स्टेशनवर येतो आणि मग स्टेशन पासून घरापर्यंत आठवड्याभराचा पूर्ण अहवाल मला पंधरा मिनिटात कळतो .अगदी कॉलनीत काय घडलं, तिथपासून आमच्या कॉलनीतील जोशी साहेबांचा नातू इथे आलेला आहे, ते त्याला सकाळी फिरवत असतात. बाळाचे नाव गणेश आहे. पलीकडल्या देशपांडे काकूंनी त्यांच्या आवळ्याच्या आणि आंब्याच्या झाडाच्या फांद्या तोडून घेतल्या आणि त्या पडल्या मात्र आपल्या विजेच्या तारांवर ! त्यामुळे लाईट कसे गेले ,मग शेवटी त्यानेच एम .एस .सी .बी च्या लोकांना बोलावले व त्यांच्याकडून काम कसं करून घेतलं हे तो आवर्जून सांगतो.
एवढेच नाही तर मी गावाहून आल्याची वर्दी बरेचदा माझ्या मैत्रिणींना आपसूकच पोहोचलेली असते . तसे विचारल्यावर तो सांगतो की, त्या अनघा मॅडम विचारत होत्या तुम्ही आल्या का ,मी सांगितलं दोन दिवसांपूर्वीच आल्यात.. माझ्या सगळ्या मैत्रिणी, त्यांची घर याला माहिती आहेत. आणि खरंतर पूर्ण कॉलनीचा आणि आमच्या परिचयातील सगळ्यांचा बाळू अत्यंत लाडका आहे. खरं म्हणाल तर तो एक जगत्मित्रच आहे. कुणाशी कसं वागावं, बोलावं, आपल्या मर्यादा कशा राखाव्या आणि तरीही आपुलकी कशी जोपासायची हे त्याच्याकडून शिकावं .कुणाशीही बोलायला त्याच्याकडे विविध विषय आणि तितकीच माहिती असते .बोलण्यात गोडवा आणि नम्रताही आहे. पुन्हा मदत करण्याची तत्परता पण आहे. कुणाला नाव ठेवणं, राग ,मत्सर ,आज पर्यंत त्याने कधी कुणाचा केलेला मी बघितलेला नाही.
हं ! कधीतरी कुणीतरी कसं अव्यवहार्य वागले, "मग मी मंदी पडून शनि कसा प्रॉफिट करून दिला," म्हणून आत्मप्रौढी किंवा बँकवाले कसे काम करतात आणि त्यांची शिस्टीम कशी त्रासदायक आहे एवढ्याची कॉमेंट्री तो करतो ,कारण त्याला त्यात खूप हेलपाटे पडलेले असतात. पुन्हा स्वतःचा मोठेपणा तो कोणासमोर दाखवायचा तेही त्याला नीट कळतं. सरांशी सोडून तो घरातल्या सगळ्यांबरोबर वेगवेगळ्या गप्पा करतो. आजी-आजोबांना तो, शेजारी अर्धवट बांधून पडलेल्या घरा मागचं सगळं गौडबंगाल ऐकवतो ,नाहीतर मॅडम बरोबर जाताना रस्ते बनविण्याची सिस्टीम कशी असते ?त्यात काय काय वापरतात ? कोणता मशीन वापरतात ?असे नॉलेज पुरवतो.
घराचा तर तो उजवा हात आहे. घरातील जास्तीचे तिखट, हळद कुठे ठेवले आहे, इथ पासून इतर आजोबांची काम, बँकेची काम ,सरांची काम यासाठी सगळ्यांना तोच लागतो.
" बाळू बाळा ...अरे ते पॅन कार्ड, आधार कार्ड आणि फोटोच्या कॉपीज दे बरं ! "सर म्हणतात .
मॅडम म्हणतात ,"बाळू आपला प्रॉपर्टी टॅक्स भरला का रे ?आणि बाजारात मटार स्वस्त झाली का रे?"
तेवढ्यात आजी बोलावतात," अरे ,बाळू तुझ्या सवडीने मला मागचे लाल फुल आणून दे बर देवासाठी ."
तर राघव म्हणतो," बाळू काका, माझा मोबाईल ओला झाला .पुण्यापेक्षा इथे स्वस्तात दुरुस्त होईल. तुला केव्हा वेळ आहे तेव्हा आपण पैठण गेटला जाऊ .सगळीकडून फक्त बाळूच्या नावाचा गजर होत असतो . त्यामुळे मी माझा नातू लहान असल्याने मुलाकडे जाणार आहे असे ऐकल्यावर सगळे विचारतात ,"मग आता आजी आजोबा जवळ कोण मग ?" बाळूचे नाव सांगितले की शेजारीपाजारी सुद्धा निर्धास्त होतात .घरदार ,पैसे अडके, लहान मुले मुली किंवा घरातील वयोवृद्ध यांना काळजीने कुठूनही कुठेही प्रवासाला नेऊ शकणारा आमचा एकमेव सारथी म्हणजे बाळू आहे.
घरी कुणीही पाहुणे आले की याला खूपच आनंद होतो. कुणाचेही नातेवाईक आलेत तरी हा लगेच पाया पडतो, चौकशी करतो ,मुले घरी आली खूप दिवसांनी ही तर बाळू काकाचा प्रेमळ उद्गार "खराब झाला" हा ठरलेला असतोच. मुलांनाही खूप मजा वाटते. प्रत्यक्षात चांगली उंची पुरी ,मोठी दिसत असली तरी मुले बाहेर राहतात, बिचारी किती कष्टात बाहेरच खातात, अशी ही प्रेमळ जाणीव त्या "खराब झाला" या शब्दामागे असते.
त्याला दुनियेतली कुठलीही गोष्ट आणायला सांगितली तरी तो शोधून आणणारच हे शंभर टक्के सत्य ! हनुमानाला संजीवनी बुटी आणायला सांगितल्यावर जसा पूर्ण मेरूपर्वत उचलून आणला अगदी तसेच कुठलाही काम सांगितलं आणि ते झालं नाही असं होत नाही ,पूर्ण गाव पालथा घालेल पण वस्तू घरी येणारच !
कलात्मकता, व्यवस्थित पणाची त्याला उपजतच आवड आहे. त्यानुसार मॅडम ना आता हे कसं ठेवलेले आवडेल हे त्याला सहज कळतं. सरिता, त्याची बायकोही त्याला तशीच सौंदर्य दृष्टी लाभलेली मिळालेली आहे, हे आत्ता त्याने बांधलेले घर बघितलं तेव्हा सहज लक्षात आलं .घरातील टाइल्सचे डिझाइन्स, रंग ,कलर कॉम्बिनेशन अतिशय सुंदर झालेले आहे .
अलीकडे त्याच्याही तब्येतीवर वयाच्या खुणा दिसू लागलेल्या आहेत .मुलेही आली की म्हणतात, "आई , बाळू काका ही म्हातारा दिसायला लागला ग ! " किंचित पिकलेले आणि मागे गेलेले केस, स्थूल शरीर असा हा बाळू बाहेर मात्र 'शेर 'असतो .एकदम अधिकाऱ्यासारखा आवाज काढतो, तेव्हा आम्हाला खूप गंमत वाटते.
गेली सतरा वर्ष त्याचे आणि सरांचे छत्तीस गुण जुळले आहेत हे नक्की ! कारण वक्तशीरपणा, कामातला काटेकोरपणा, प्रामाणिकपणा, मन लावून काम करणं ,कष्टाला मागे पुढे न करणं ,माईंड फुलनेस ,कुठलीही गोष्ट या कानाची त्या कानाला न जाऊ देणे ,असे सगळे गुण त्याच्यात आहेत, बाळूला सरिताची ,त्याच्या पत्नीची खूप सुंदर साथ आहे .अगदी 'टूकीच' म्हणतात तसा त्यांचा संसार आहे. गरजा कमीत कमी ठेवून, संसार करण्याचं कसबं त्या दोघांना साधंले आहे. दोन मुलांना चांगली शाळा, शिक्षण देतानाच त्यांनी मनोरंजन ,हिंडणे ,फिरणे ,मौजमजा ,याला मात्र पूर्ण फाटा दिलेला आहे .दररोजच्या रुटीन मध्ये एखादी बायको कंटाळून कुरकुर करील पण अशी कुरकुर चुकूनही माझ्या कानावर अजून आलेली नाही. त्यांच्या सुखाच्या संसाराचा मंत्र समाधान आणि समतोल हा आहे असं वाटतं .त्याच्याबरोबरचे लोक मॉलमध्ये फिरतात ,देवदर्शनाला जातात, पण बाळूला कदाचित "कर्माचा सिद्धांत " कळला असावा . त्यामुळे त्याचा दिवस नेहमी तसाच उगवतो , तितक्या तन्मयतेने आणि तितक्याच कर्तव्यपरायणतेने ! सकाळी बरोबर पावणे नऊला त्याची गाडी घरासमोर लागते .


मानसी गिरीश फडके.