भय इथले संपत नाही पर्व 2 भाग 14
मागील भागात आपण पाहिले विभावरी कृष्णाला घेऊन गेली.त्याबरोबर महादेवसुद्धा तिच्या ताब्यात आला. हे सगळे चिंतामणरावांनी पाहिले. इकडे सगुणाबाईंनी मागितलेली मदत पोहोचली होती. आता पाहूया या युद्धात पुढे काय होणार?
विभावरी महादेव आणि कृष्णाला घेऊन नियोजित जागी पोहोचली. आता तिच्या मूळ रूपात तिने पायापर्यंत रुळणारे केस मोकळे सोडले होते. कपाळावर चेटकीण वंशाचे चिन्ह कोरले होते. तिची वाढलेली टोकदार नखे आणि हास्य तिला आणखी भयावह बनवत होते.
तिने विधीची तयारी सुरू केली. जखिन महादेवला घेऊन आली.
विभावरीने आदेश दिला,"त्याला नग्न कर. आज मी त्याचा उपभोग घेणार."
जखिन नाईलाजाने तयारीला लागली.
इकडे सगुणाबाई,निरंजन आणि मिथिला विभावरीचा शोध घ्यायला बाहेर पडले.
निरंजन म्हणाले,"मिथिला यंत्र काढ."
मिथिलाने यंत्र बाहेर काढले. त्यानंतर तिने यंत्र सिद्ध केले.
निरंजन म्हणाला,"सगुणाबाई,इथे कुठे जंगलात गुहा आहे?"
सगुणाबाई म्हणाल्या,"हो,गावाबाहेर जंगलात एक गुहा आहे. तिकडे कोणीही जात नाही."
मिथिला म्हणाली,"चला,तिथेच आपल्याला जायचे आहे."
तेवढ्यात निरंजन म्हणाले,"थांबा,आपल्याला पूर्ण तयारीने जावे लागेल. विभावरीला मारता आले नाही तर तिला कैद करावे लागेल."
सगुणाबाई म्हणाल्या,"त्याची सर्व सिद्धता मी केली आहे.जिवाजी आणि शांता येतच असतील."
मिथिला म्हणाली,"सर्वांनी शस्त्रे जवळ ठेवा.कोणतीही परिस्थिती येऊ द्या मागे फिरायचे नाही."
इकडे विभावरीने नग्न होऊन सैतानाची पूजा केली. वधस्तंभ सिद्ध केला. त्यानंतर तिने जादूने शय्यागृह निर्माण केले. मंगलाचे रूप घेऊन तिने मंत्राने महादेवला शुद्धीवर आणले.
भोवताली असणारी मंगला आणि इतके छान सजवलेले शय्यागृह पाहून महादेव विचारात पडला. तेवढ्यात विभावरीने तिच्या हाताने केशरी दुधाचा प्याला त्याच्या ओठाला लावला.
मधाळ आवाजात म्हणाली,"काहीही विचार करू नका. आता इथे फक्त आपण दोघे आहोत."
तिच्या काळ्याभोर डोळ्यात महादेव हरवून गेला,"ह्या दिवसाची खूप वाट पाहिली. आता नाही धीर धरवत."
असे म्हणून त्याने तिला जवळ ओढले.वस्त्रांचे अडथळे दूर झाले. त्याचा परिपूर्ण देह पाहून तिने त्याला बाहुपाशात घेतले.
सगुणाबाई आणि त्यांचे साथीदार गुहेच्या दाराशी पोहोचले. तिथे दोन खविस पहारा देत होते.
निरंजन म्हणाला,"आमचा मार्ग सोडा."
तसे खदाखदा हसत एक खविस म्हणाला,"हा गोसावी आपल्याला हुकूम करणार. आम्ही फक्त आमच्या मालकीनीचा हुकूम ऐकतो. बऱ्या बोलणे चालता हो."
निरंजन हसले त्यांनी मुक्ती मंत्र जपला. पवित्र जल आणि मंत्राचा वापर करताच खविस जळून भस्म झाले. त्याबरोबर विभावरीला धोक्याची जाणीव झाली.
विभावरी आता हाताशी आलेला घास गमावणार नव्हती. प्रणय परमोच्च स्तरावर पोहोचला. तिच्याशी रत होऊन,तृप्तपणे महादेव बाजूला पडला. त्याने डोळे मिटलेले होते. ते पाहून विभावरी खंजीर घेऊन सिद्ध झाली.
ती तो धारदार खंजीर त्याच्या गळ्यावर फिरवणार एवढ्यात,"विभावरी थांब."
असा आवाज झाला आणि वार गळ्याऐवजी छातीवर झाला. समोर वहिनी आणि इतर लोक पाहून महादेव वस्त्रे शोधू लागला. तेवढयात विभावरीने मागून खंजीर आरपार खुपसला. त्याबरोबर महादेव कोसळला आणि एक दिव्य चावी तिच्या अंगात विलीन झाली.
लहानगा कृष्णा झोपलेला होता. विभावरी क्रूर हसत त्याच्याकडे जाऊ लागली. निरंजन सावध होते. त्यांनी पवित्र भस्म काढले. विभावरीभोवती रिंगण घातले.
विभावरी हसली,"असली रिंगणे मला फार काळ रोखू शकत नाहीत."
इतक्यात सगुणाबाई जिवाजीला म्हणाल्या,"जीवा,कृष्णाला घेऊन जा."
विभावरी चित्कारली,"खबरदार त्याला हात लावशील तर."
असे म्हणून तिने मंत्र उच्चारला आणि जिवाजी जागेवर जळून खाक झाला. आता मात्र सगुणाबाई चिडल्या. त्यांनी मिथिला आणि निरंजनला इशारा केला.
तिघांनी मंत्र उच्चार सुरू केले. मंत्रोच्चार वाढत गेले आणि विभावरी कैद होत गेली.
तरीही ती ओरडत होती,"मी परत येईल,माझी इच्छा अपूर्ण आहे."
विभावरी कैद होताच सगुणाबाई धावत जाऊन कृष्णाला घेऊन आल्या."
त्यानंतर तो वाडा सोडून सरदेसाई इथे गढीवर रहायला आले. आजही त्या गढीजवळ अनेकांना विभावरी दिसते. ती गढीच्या हद्दीत कैद असल्याने बाहेर येऊ शकत नाही. इतके बोलून हिराबाई थांबल्या.
प्रिया म्हणाली,"पण मग ही तिक्षिता कोण आहे?"
हिराबाई म्हणाल्या,"तिचा विभावरीशी काय संबंध तेच कळत नाहीय. आता आपल्याला जयवंत,विनय आणि छोट्याला जपले पाहिजे."
इतक्यात हॉस्पिटलमधून फोन आला,"हॅलो,हिराबाई आहेत का?"
हिराबाईंनी फोन घेतला,"काय झाले?"
तिकडून आलेले उत्तर ऐकून त्या ओरडल्या,"असे कसे होऊ शकते? तुमच्या हॉस्पिटलमधून पेशंट असा गायब कसा होऊ शकतो?"
फोन ठेवताच हिराबाई म्हणाल्या,"जयवंत भाऊजी गायब आहेत."
प्रिया म्हणाली,"आपल्याला राणी अवंतिका आणि विभावरी दोघींनाही रोखायचे आहे."
हिराबाई निशाला म्हणाल्या,"आपल्याला मदत लागेल. त्यासाठी तुला मी सांगते तिथे जावे लागेल."
इतक्यात वाड्याबाहेर आरडा ओरडा ऐकून सगळे बाहेर धावले. गावकरी भयभीत होऊन जमा झाले होते.
हिराबाई समोर आल्या,"काय झाले? तुम्ही सगळे असे का जमला आहात?"
त्यातील एकजण पुढे झाला,"आक्का,मंदिराचे पुजारी सकाळी जंगलात मान मोडलेल्या अवस्थेत सापडले."
हिराबाई ओरडल्या,"काय? त्यांना कोणी मारले? आजवर कधीही काळया शक्ती मंदिराच्या पुजाऱ्यांना मारू शकल्या नाहीत."
तितक्यात एकजण म्हणाला,"आक्का,गावातील प्रत्येक देवळातील मूर्ती गायब आहे. मंदिराशेजारी असलेले झाड कापायचे प्रयत्न झाले आहेत."
हिराबाई म्हणाल्या,"घाबरु नका.आम्ही आहोत तुमच्याबरोबर."
इकडे पडक्या वाड्याजवळ एक गाडी येऊन थांबली. त्यातून तीन तरुण आणि एक तरूणी उतरले. ते चौघे आत गेले.
तरुणीने पुजाऱ्याला मारताना काढलेला व्हिडिओ दाखवला आणि म्हणाली,"आम्ही तुझे काम केले.आता आम्हाला किंमत हवी."
त्याक्षणी तिक्षिताने सोने त्यांना दिले.
तितक्यात त्यातील एक तरुण म्हणाला,"आम्हाला आणखी हवे. नाहीतर हे काम करणार नाही."
तो असे म्हणताच तिक्षिता गरकन वळली. तिचा हात दहा फुटांवरून त्या तरुणाच्या गळ्याशी पोहोचला.
ती क्रूर हसत म्हणाली,"माझे काम करायला नकार द्याल तर तुम्ही जिवंत जाऊ शकणार नाही. आता त्या प्रत्येक मंदिराशेजारी असलेले झाड तुम्हाला कापायचे आहे."
असे म्हणून तिने त्याला सोडले. ते बाहेर पडताना ती म्हणाली,"पळून गेलात तर मृत्यू आहे.लक्षात ठेवा."
प्रिया नकाशा वाचत होती. अचानक तिला नकाशात एक खूण दिसली.
खाली पाली भाषेत लिहिले होते,"विजयाचा मार्ग इथे सापडेल."
प्रिया आनंदाने ओरडली,"आजी इकडे बघा.आपल्याला ह्या जागी जावे लागेल." .
हिराबाई म्हणाल्या,"प्रिया,इथे जायचे म्हणजे जीवाशी खेळ आहे. पण ते दिव्य करावेच लागेल."
कुठे आणि काय असेल विजयाचा मार्ग? तीक्षिताला मदत करणारे कोण असतील?
वाचत रहा.
भय इथले संपत नाही.
