Login

कॅनव्हास भाग १

Healing of a Soul
कॅनव्हास

©® सौ.हेमा पाटील.

दमयंती कॅनव्हासवर कुशलतेने उभा आडवा ब्रश फिरवत होती. यात ती इतकी तल्लीन झाली होती की रात्रीचा एक वाजून गेला आहे याचेही तिला भान उरले नव्हते. तिची अभ्यासिका ही फक्त तिची एकटीची जागा होती. तिथे अन्य कुणालाही प्रवेश नव्हता. अर्थात पार्वती काकू सोडल्या तर घरात होतेच कोण! पण पार्वती काकूंना सुद्धा फक्त झाडू मारण्यापुरतीच अभ्यासिकेत येण्याची मुभा होती.

तिचे हात थांबले तेव्हा तिने चित्राकडे नजर टाकली. तेच दृश्य तिला पुन्हा एकदा दिसले. हताशपणे ती खुर्चीवर बसली. खाली जमिनीवर तिने चुरगाळून टाकलेल्या कागदाच्या बोळ्यांमधून अर्धवट काढलेली चित्रे डोकावत होती. त्या सर्वांमध्ये आणि कॅनव्हासवरील चित्रात एक समानता आहे आणि खूप प्रयत्न करुनही आपण ती गोष्ट चित्रातून काढून टाकू शकत नाहीय यामुळे ती हताश झाली होती. असे आज पहिल्यांदाच घडत होते....

लिखाणात पूर्णपणे गुंग झालेल्या दमयंतीने कथेला पूर्णविराम दिला . लॅपटॉप बंद केला. त्यानंतर ती कॅनव्हासवर चित्र काढण्याचा प्रयत्न करत होती. आज मात्र मन अशांतच राहिल्याने चित्र काढण्याचा प्रयत्न सोडून ती तिच्या भौतिक जगात परतली.

प्रसिद्ध लेखिका दमयंती हिच्या नावावर आज बारा कथासंग्रह, पाच कादंबऱ्या, बालसाहित्य, अनेक दिवाळी अंकात नेमाने दरवर्षी छापून येणाऱ्या कथा, मासिके , वर्तमानपत्रे यांतील लेख असे खूप साहित्य होते. लेखनात अतिशय जिवंतपणा आणणे ही तिच्या लेखनकलेची खुबी होती..आपली नोकरी सांभाळून ती करत असलेले लिखाण निश्चितच वाखाणण्याजोगे होते.

तिची कथा किंवा कादंबरी वाचायला हातात घेतली की वाचक त्यात पूर्णपणे डुंबून जातो. हे कथानक प्रत्यक्ष नजरेसमोर घडताना आपण पहातोय असा अनुभव वाचकांना येतो. याचे कारण दमयंती लेखन करत असताना त्या पात्रांशी इतकी एकरुप होते की, स्वतःचे अस्तित्व विसरते. त्यामुळे ती त्या कथेपुरते त्या कथेतील पात्रांचे आयुष्य जगत असते. त्यांच्या आयुष्यात येणाऱ्या संकटांना सामोरी जात असते. त्यांच्या आयुष्यात येणारे सुखाचे क्षण वेचत असते तर दुःखाचे डोंगर सोसत असते.

लेखन हे लेखकाचे अपत्य असते असे मानतात; कारण कथेचे छोटेसे असणारे कथाबीज केवळ त्याच्या कल्पनाशक्तीने फुललेले असते.
जेव्हा लेखक एखादी कथा, कादंबरी लिहित असतो तेव्हा तो त्या पात्रांच्या अगदी निकट पोहोचलेला असतो. त्याशिवाय तो कथा लिहूच शकत नाही. कधी कधी लेखकाच्या आयुष्यात घडलेल्या घटनांमध्ये काल्पनिक गोष्टींची सरमिसळ करुन तो कथा लिहित असतो. कधी त्याने आपल्या आसपास घडणाऱ्या घटना कथेत गोवलेल्या असतात. तर कधी एखादा विषय त्याला एकदम क्लिक होतो आणि त्यावर तो कल्पनेने कथा लिहितो; पण तो जर यात समरस झाला नाही तर कथा फारशी रंगत नाही. ती वरवरची होते. हेच गमक होते प्रसिद्ध लेखिका दमयंती गुप्ते यांच्या लेखनाचे !
दमयंती मात्र एवढ्यावरच न थांबता थेट पात्रांच्या भूमिकेत शिरते. मग कथा पूर्ण झाली की या पात्रांच्या भूमिकेतून बाहेर पडायला तिला त्रास होतो; कारण कथा पूर्ण होईपर्यंत ती ते पात्र अक्षरशः जगलेली असते. तिच्या मनावर, बुद्धीवर त्या पात्राचा अंमल चढलेला असतो. तो अंमल उतरवण्यासाठी ती कॅनव्हासवर रंगांचे फराटे मारते व आतपर्यंत शिरलेल्या पात्राला प्रयत्नपूर्वक स्वतःपासून वेगळे करते. जेवढी भावनिक गुंतवणूक ती पात्रांशी करते तेवढीच ढिल ती ब्रशला देते. त्यामुळे तिने काढलेली चित्रेही बहारदार होतात. साधारणपणे भगवंत प्रत्येकाला एखादी कला बहाल करत असतो पण दमयंती लेखनाइतकेच चित्रे काढण्यात ही तरबेज होती.

आज मात्र प्रथमच ती हताश झाली होती. प्रयत्न करुनही त्या कथेतून बाहेर पडणे तिला जमत नव्हते. ऋतुपर्णा कथेतील नायिका आपल्या गावी जाते. तिकडे संध्याकाळी ती फेरफटका मारायला गेल्यावर एका पायवाटेने आत जाते आणि तिथे निर्जन स्थळी तिला अनेक अनाकलनीय अनुभव येतात. तिच्यावर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला जातो. हा अतिप्रसंग करणारी कुणी व्यक्ती नसून केवळ जाणवणारी एक अमानवीय शक्ती असते. त्यातील तिच्यावर रोखलेले डोळे दिसत नसूनही जाणवत असतात. जाणवत असते त्या डोळ्यांतील धगधगती वासना! त्यातून प्रयत्नपूर्वक स्वतःची सही सलामत सुटका करुन घेणारी ऋतुपर्णा!

ही ऋतुपर्णाची सगळी धडपड दमयंतीने कथेत हुबेहूब मांडली होती. लिहित असताना हे काल्पनिक अनुभवून सुद्धा तिच्या अंगावर शहारे आले होते. कथा पूर्ण झाल्यावरही ती वासनांध नजर, ते रोखलेले डोळे तिच्या नजरेसमोर तरळत होते. दरवेळेस ती कथा पूर्ण झाल्यावर चित्रात ब्रशच्या सहाय्याने आपल्या भावना ओतून ती स्वतःला मुक्त करत असे आणि पुढच्या कलेसाठी स्वतःच्या मनाचा कॅनव्हास कोरा करत असे. मागील कथेच्या कथानकाचा मागमूसही तिथे उरलेला नसतो; पण यावेळी तिच्या चित्रातही ते डोळे, ती नजर उपस्थित होती. जाणूनबुजून वेगवेगळी चित्रे रेखाटण्याचा तिने प्रयत्न करुन पाहिला पण तरीही मन:पटलावरील अस्तित्व पुसले गेले नाहीच!

शेवटी कंटाळून तिने तो प्रयत्न थांबविला व ती झोपायला गेली. आज तिला शांत झोप लागली नाही. झोपेतही ती नजर तिचा पाठलाग करत होती. सकाळी उठल्यावर ती फ्रेश झाली व ऑफीसला गेली. कामात गुंतल्यावर ती रात्रीच्या प्रसंगाला विसरली. ती दुपारी जेवायला बसली तेव्हा तिला पुन्हा जाणीव झाली की ती नजर तिथेही उपस्थित आहे आणि आपल्याला न्याहाळत आहे.
क्रमशः ©® सौ.हेमा पाटील.


कुणाची होती ती नजर जी दमयंतीचा पाठलाग करत होती? हा भास होता की सत्य? हे जाणून घेण्यासाठी पुढील भाग वाचा.
अष्टपैलू लेखक स्पर्धा - २०२५

🎭 Series Post

View all