Login

कॅनव्हास भाग २

Healing of a Soul

कॅनव्हास भाग २

©® सौ.हेमा पाटील.

मागील भागात आपण पाहिले दमयंतीने कथा लिहिली आहे. त्या कथेतील ऋतुपर्णा आणि तिच्यावर ओढवलेल्या अतिप्रसंगाच्या घटनेतून दमयंती अजून बाहेर पडली नाहीय. ती नजर आपला पाठलाग करतेय अशी तिला जाणीव होतेय....आता पुढे


दिवाळी अंकासाठी कथेचा विषय तिने स्वतःच निवडला होता म्हणून तर तिने अशी कथा लिहिली होती. आपल्यावर त्या कथेतील पात्रांचा हॅंगओव्हर यावेळी जरा जास्तच चढलाय असे तिला वाटले; परंतु दोन चार दिवसांत होईल सगळे नीट अशी तिने मनाची समजूत घातली. त्याचवेळी ती नजर आपल्या शरीरात अगदी आरपार शिरतेय, आपल्या अणूरेणूंना स्पर्श करतेय असे जाणवून ती एकदम दचकली. तिच्या अंगावर शहारे आले. आपण जरी कथेपुरती ती नजर जिवंत केली होती तरी तिचे अस्तित्व अजूनही का पुसले जात नाहीय याचे तिला कोडे पडले होते. ती नजर सतत आपला पाठलाग करतेय या जाणीवेने ती अस्वस्थ होत होती.
आकाशिक रेकॉर्डींग बद्दल तिने मध्यंतरी एक लेख वाचला होता ते तिला अचानक आठवले. आपण जे काही बोलतो ते शब्द नष्ट होत नाहीत. ते अवकाशातील पोकळीत कायमस्वरूपी उपस्थित असतात. भले ही आपल्याला त्याची जाणीव होत नाही पण ते असतात! तसेच प्रत्येक आत्म्याचे जेवढे जन्म झालेले असतात त्यांचे मागील जन्मातील सगळे रेकाॅर्ड अवकाशातील पोकळीत कायमस्वरूपी उपस्थित असते असा त्या लेखाचा मतितार्थ होता.

' याप्रमाणेच आपण कथेत ज्या पात्रांची निर्मिती करतो ती जिवंत रहात असतील का?' हा विचार तिच्या मनात आला आणि तिच्या मनात भीतीची लहर चमकून गेली.
' असे कसे शक्य आहे? आपण खरोखर थोडीच पात्रांची निर्मिती करतो? आपण तर कल्पनेने पात्रे उभी करतो. खरोखरची पात्रे निर्माण करायला आपण थोडेच ब्रह्मदेव आहोत? आपल्याला भास होत असणार.' असे म्हणत स्वतःशीच हसत ती आंघोळीला बाथरुममध्ये शिरली.


अजून लग्न केले नसल्याने व घरचे सगळे पुण्यात रहात असल्याने ती एकटीच मुंबईत रहात होती. नोकरी करत करत ती आपला लिखाणाचा छंद जोपासत असे. तसेच चित्रे काढणेही तिला तितकेच प्रिय होते. शाळेत असताना तिने एलिमेंटरीच्या तीन परीक्षा दिल्या होत्या. तेवढ्यावरच ती सुंदर चित्रे रेखाटत असे.

अधूनमधून ती पुण्याला जात असे तर आईबाबा अधूनमधून मुंबईत येत असत. चार दिवस राहून तिला लग्नासाठी आलेल्या स्थळांबाबत माहिती देत असत, फोटो दाखवत. आजपर्यंत तिला कुठलेच स्थळ पसंत पडले नव्हते.

"काय गडबड आहे लग्नाची? आता पूर्वीसारखे राहिले नाही," असे ती आईला बजावत असे. तिच्या घरात चोवीस तास रहाणारी बाई होती जी घरातील सर्व कामे करत असे. सोबत असावी म्हणून आईनेच गावाकडची गरजू विधवा बाई तिच्याकडे पाठवली होती. त्यामुळे तिला घराकडे अजिबात लक्ष द्यावे लागत नव्हते.

आठवडा होऊन गेला तरी अद्यापही ती नजर तिचा पिच्छा सोडत नव्हती. पण आता दमयंतीला तिची सवय झाली होती. ती नजर बराच वेळ दिसली नाही तर तिला चुकल्यासारखे वाटायचे. नवीन कथाबीज तिच्या मनात घोळत होते. ती कथा लिहायला सुरुवात केली की ही नजर आपोआप दूर होईल असे तिला वाटत होते. तसेही लिखाणापासून ती फार काळ दूर राहू शकत नव्हती कारण ती हाडाची लेखिका होती.
नवीन कथाबीज प्रेमाभोवती फिरत होते. ही कथा आणि ती नजर यांचा आपापसांत काहीही संबंध नसतानाही तिथे जाणवणारी ती विखारी नजर तिला अस्वस्थ करत होती. ही कथा लिहून पूर्ण तर झाली, पण तिचा लिखाणातील आनंद हरवला होता. कथा पूर्ण झाली की जे समाधान मिळायचे ते यावेळी तिला मिळाले नाही.

तिने नेहमीप्रमाणे चित्रात मन रमवायचा प्रयत्न केला, पण तो ही फोल ठरला. खरं तर प्रेमकथा लिहिताना नेहमीच आपण अवघडून जातो हे तिला माहीत होते. त्यामुळे शक्यतो प्रेमकथा लिहिणे ती टाळायची. नवरसातील एक महत्त्वाचा रस शृंगार रस आहे आणि या रसाविषयी वाचायला बहुसंख्य वाचकांना आवडते. त्यामुळे या रसातील कथा तिला लिहाव्या लागतात.

प्रेमकथा लिहिली की आपण खूप उदास होतो, आपल्या मनात आतल्या आत प्रचंड राग उफाळून येतो हे तिला अनुभवाने माहीत झाले होते. अशा वेळी कथानकाकडे तटस्थपणे पहायचे असा ती प्रयत्न करते. पण दोन प्रेमी जीवांची शारीरिक जवळीक, आणि त्यासंबंधीचे वर्णन लिहिताना ती नेहमीच अस्वस्थ होऊन जात असे.

'जे न देखे रवी ते देखे कवी ' ही उक्ती सार्थ असली तरीही प्रेमकथा कधी एकदा लिहून हातावेगळी होतेय असे तिला वाटायचे. प्रेमकथा लिहून झाल्यावर ती आधी आंघोळ करायची. ते कथेतील प्रेमी युगुलाला हवेहवेसे वाटणारे स्पर्श आपल्या शरीरावर झाले आहेत अशी भावना तिला नकोशी वाटत असे. त्या पुरुषी स्पर्शाच्या नुसत्या कल्पनेनेच तिचे पूर्ण शरीर आकसून जाई.

आंघोळ करून अंशतः का होईना ती त्या तिला ओंगळवाण्या वाटणाऱ्या स्पर्शांना दूर सारु शकत असे. अनेकदा तिने अंतर्मुख होऊन विचार केला की, असे का होते? पण तिला याचे उत्तर मिळाले नाही. याचे उत्तर आपल्या भूतकाळात लपलेले असावे असे तिला वाटायचे.
परंतु तिला असा कुठलाही प्रसंग आठवत नव्हता ज्यात तिची कुणाशी जबरदस्तीने अगर प्रेमाने शारीरिक जवळीक निर्माण झाली होती. मग असे का? हा प्रश्न तिच्यासाठी कायम अनुत्तरित रहात होता....
क्रमशः ©® सौ.हेमा पाटील.
अष्टपैलू लेखक स्पर्धा - २०२५

🎭 Series Post

View all