Login

कॅनव्हास भाग ३

Healing of a Soul

कॅनव्हास भाग ३

©® सौ.हेमा पाटील.


आपण दमयंतीला होणाऱ्या मानसिक त्रासाबद्दल मागील भागात पाहिले. प्रेमकथा, त्यातील आलिंगने, चुंबने, शारीरिक जवळीक या गोष्टींचा दमयंतीला तिटकारा येतो. किळस वाटते.... आता पुढे.

बालपणापासूनच पुरुषांविषयी दमयंतीला तिटकारा होता. तिला आठवते तसे ती लहानपणीही मुलांशी कधी खेळलीच नाही. एवढेच नाही तर तिला मैत्रिणीही फारशा नव्हत्या. ती कुणातच जास्त मिसळत नसे. याचा अर्थ ती अबोल होती असा नव्हता. कुठल्या मुलाने खेळताना तिच्या जवळ येण्याचा प्रयत्न केला तर ती त्याला सरळ ढकलून देत असे. जसजशी ती मोठी होत होती ही भावना अधिक उग्र रूप धारण करत होती. आईचे मुलीकडे जितके बारकाईने लक्ष असले पाहिजे तितके आईचे नलिनीताईंचे हिच्याकडे लक्ष होते.

जसे नलिनीताईंच्या लक्षात आले की, ही स्वतःच स्वतःला कंफर्टझोन मध्ये ठेवतेय तेव्हा त्यांनी तिच्यावर लक्ष ठेवणे कमी केले. आता मात्र आईसाठी दमयंतीचे हे वागणे डोकेदुखी ठरु लागले होते. कितीही चांगले स्थळ असले तरीही दमयंती त्यावर नापसंतीचा शिक्का उठवून नकार देत असे.

अलिकडे तिच्या आईला काळजी लागली होती की, आपल्या मुलीला लग्न करायचे आहे की नाही? तिला कुणी मुलगा आवडला असेल आणि त्यामुळे ती नकार देत आहे का असेही तपासून झाले; पण तसे काही नव्हतेच! आपल्या मुलीला पुरुषांविषयी आकस आहे हे आईच्या लक्षात आले होते. त्याकडे आजवर तिने गांभीर्याने पाहिले नव्हते. आता वयाची तिशी ओलांडल्यानंतरही जेव्हा दमयंती चांगल्या चांगल्या स्थळांना नकार देऊ लागली तेव्हा मागच्या वेळी मुंबईला गेल्यावर आईने दमयंतीला स्पष्टच विचारले की,
"तू असे का करतेस? तुला लग्नच करायचे नाहीय का?"
यावर दमयंती म्हणाली,
" तसे समज. माझी मी एकटी ठीक आहे. मला स्वतःला कुठल्या पुरुषाला सोपवायचे नाहीय."
आई म्हणाली,
" अगं, ते दोघांचे मीलन असते. शिव आणि शक्तीचे मीलन ही सृष्टीची रचना आहे. यात पडल्याशिवाय यातील आनंद तुला कसा समजणार? बालपणापासून तू पुरुषांचा तिटकारा करतेस हे मी पहात आलेय. सुजाण झाल्यावर तुझ्यात फरक पडेल असे वाटत होते म्हणून तेव्हा मी फारसा विचार केला नाही पण आता मला काहीतरी हालचाल करावी लागेल. "
" काहीतरी म्हणजे काय? मी काय अजाण आहे का आई? जबरदस्तीने माझे लग्न लावण्याचा विचार करतेयस का? तसा विचार ही मनात आणू नकोस. त्याचे परिणाम फार गंभीर होतील. शिव आणि शक्तीचे मीलन प्रत्येकाच्या बाबतीत आवश्यक असते का? तू पुन्हा पुन्हा का माझ्यासमोर लग्नाचा विषय काढत असतेस? मला नाही करायचे लग्न. आता आणखी कुठल्या पद्धतीने तुला सांगू?"
लग्न या कल्पनेनेच दमयंती अस्वस्थ झाली. यापुढे आईशी चकार शब्द न बोलता तिने आपली अभ्यासिका गाठली व दार लावून घेतले. आपल्या या कृतीने आईला काय वाटेल असा विचार ही तिच्या मनात आला नाही.

तिची ही अस्वस्थता जाणून आई तिच्या अभ्यासिकेकडे गेली नाही, तसेच त्यानंतर तिथे तिने लग्न या विषयावर पुन्हा अवाक्षरही काढले नाही. यावर काहीतरी केले पाहिजे अशी खूणगाठ मात्र आईने मनाशी बांधली. यावेळी दमयंतीने निर्वाणीच्या भाषेत लग्नाला नकार दिला होता.

‌‌ आत अभ्यासिकेत गेलेल्या दमयंतीला कॅनव्हासवर ब्रशने उभ्या आडव्या रेषा काढताना आपला श्वास फुलला आहे हे लक्षात आले. आपल्या डोळ्यांतून अश्रू गळत आहेत त्यामुळे समोरचा कॅनव्हास पुसट दिसतोय हे समजल्यावर तिने ब्रश बाजूला ठेवला व ती उद्विग्न अवस्थेत खिडकीपाशी उभी राहिली.

आपण आईशी खूप रुडली वागलो याचे तिला दुःख झाले. कितीदा सांगितले तरी आई सारखी त्याच विषयावर येऊन का थांबते हे तिला समजत नव्हते. एखाद्या व्यक्तीने लग्न केले नाही तर आभाळ कोसळणार आहे का? जर इच्छा होत नाही तर पुन्हा पुन्हा तोच विषय आई का काढते असे तिला वाटत होते. परतेपर्यंत आईने पुन्हा लग्नाचा विषय काढला नाही म्हणून तिला हायसे वाटले.

त्यानंतर पंधरा दिवसांनी शनिवारी आईबाबा येणार आहेत म्हणून ती सामान आणण्यासाठी पार्वती काकूंना घेऊन संध्याकाळी बाजारात गेली. मागच्या वेळी लग्न या विषयावर आईत आणि तिच्यात वाद झाला होता. आता आईशी प्रेमाने वागायचे असे तिने मनोमन ठरवले होते.

खरंतर ती स्वभावाने प्रेमळ होती, पण पुरुषाशी संबंधित विषय समोर आला की आपण आपोआपच बिथरतो हे ती जाणून होती. आता मात्र प्रयत्नपूर्वक आपल्या भावनांना काबूत ठेवायचे व आईचे दोन दिवसांचे येथील वास्तव्य आनंदी करायचे असे तिने स्वतःला बजावले होते. मागच्या वेळेसारखे आईने काही विषय काढला तर तेथून मुकाट्याने निघून जायचे, पण आईला उलट उत्तर द्यायचे नाही असे तिचे मनाशी कितीदा तरी ठरवून झाले होते.

घरातील आवश्यक सामान,भाज्या, किराणा माल घेऊन दोघी घरी आल्या. तिला माहीत होते, आई आली की स्वयंपाकघराचा ताबा घेते व दोन दिवस वेगवेगळे पदार्थ बनवून खायला घालते. पार्वती काकू जेवण चांगले बनवतात हे खूपदा सांगूनही तिला फरक पडत नाही.

"अगं, दोन दिवस तर येतेस.कशाला स्वयंपाकघरात शिरतेस? काकू बनवतील जेवण. तू मस्तपैकी आरामात रहा ना! एंजॉय कर जरा." असे ती दरवेळी सांगते पण आई ऐकत नाही.
"मुल कितीही मोठे झाले तरी तिच्यासाठी ते तिचे छोटे लेकरुच असते." असे आईचे म्हणणे होते.
क्रमशः
©® सौ.हेमा पाटील.

काय होते यावेळच्या आईबाबांच्या भेटीत? आई पुन्हा लग्नाचा लकडा मागे लावते? की दमयंतीच्या कलाने घेते? की वेगळेच काही घडते हे जाणून घेण्यासाठी पुढील भाग नक्की वाचा.
अष्टपैलू लेखक स्पर्धा -२०२५


🎭 Series Post

View all