चला विसावू या वळणावर भाग ३ अंतिम

वेदनेची खपली पुन्हा उकरून काढण्यात काय अर्थ?
"शांता, सारं काही आठवलं तरी त्रास होतो.
त्यात पुन्हा दुःखाचे पाढे तरी कुठपर्यंत वाचायचे? आता आयुष्याच्या या वळणावर मला निवांतपणा हवा आहे. जे घडून गेलंय त्यात मी बदल करू शकत नाही. माझी माणसं सोडून गेली.
माझी आई कशीही असली तरी तिच्या जाण्याने पोकळी निर्माण झाली. ती खंबीरपणे उभी राहिली,त्यामुळे मी पण सावरलो. नाहीतर काय केलं असतं वडीलांशीवाय. मी नाही विसरलो. सगळं लक्षात आहे.

तुला वाटतं मी आईला काही बोलायचो नाही,पण तसं नव्हतं मी तिला कितीही समजून सांगितले तरी, ती तशी वागत होती. मीच हतबल झालो होतो. तुला सोडू शकत नव्हतो ना आईला. तुला खोटं वाटेल;पण एक दिवस असं वाटलं चालत्या ट्रेनमधून उडी मारावी.
एकदाचा मी मोकळा होईल. मी कात्रीत अडकलो होतो. नंतर विवेकचा, तुझा आणि आईचा चेहरा डोळ्यासमोर आला.

माझ्या नंतर कसं होणार माझ्या परिवाराचे?
जे दिवस मी जगलो ते दिवस माझ्या विवेकला,तुला दाखवायचे नव्हते.
पुन्हा मनाला मजबूत केलं. काहीही झालं तरी जगावं लागणार.

आई आजारी पडली, तेव्हाही मी खचलो. खूप खचलो. जसं कळायला लागलं तसं तीच तर होती माझा आधार. मी निराधार होणार होतो. मी खचत चाललो होतो. तेव्हा देखील मी गळून गेलो. आतून कमजोर होत गेलो शांता. तू मला आधार दिला. तू तटस्थपणे घर पाहिले.
इतकं होऊनही तू आईची व्यवस्थित काळजी घेतली. काही कमी पडू दिलं नाही. हाच तर तुझा चांगुलपणा होता. शांता मी कधीच बोललो नाही; पण आई गेल्यावर मन खचून गेलं होतं पुन्हा उभारी देणारी तू होती.

विवेकला सगळं पुरवलं. आपली परिस्थिती नसतांना देखील मी कर्ज काढून त्याच्या क्लासेसची फी भरली. ते कर्तव्यच होतं. वडिल म्हणून सारं काही केलं.

विवेककडून माझ्याही अपेक्षा होत्या.
मी काही कमी कामं केली का? आता ह्या वयात मलाही निवांत राहायचे होते. जबाबदारीच्या ओझ्याने मी थकलो होतो शांता. आता नातवंड होतील, त्याच्यासोबत पुन्हा लहान व्हायचे होते, जे जगणं राहून गेलं होतं ते जगायचं होतं. ह्या विचारात असतांना एक दिवस विवेक आला आणि म्हणाला, "बाबा, आम्हाला वेगळं राहायचे आहे."

त्या एका वाक्याने सारी स्वप्न एका क्षणात धुळीस मिळाली.

शांता तो मनाने केव्हाच दूर गेला होता,केवळ शरीराने जवळ ठेवण्याचा अट्टाहास का करायचा? तुला वाटत होतं मी त्याला वेगळं होण्यापासून रोखलं नाही. एकत्र राहून घरात वाद होणार हे मी जाणले आणि मग ज्या अवस्थेतून मी गेलो त्या अवस्थेतून तो जाणार,ह्या विचाराने अंगाचा थरकाप झाला. मनात नसतांना देखील मी जाऊ दिलं.

तो गेला, निलेश गेला. शांता, मला सगळेच सोडून गेले.

असं बोलून तो रडू लागला.

शांताला फार वाईट वाटत होतं.

"ज्या भावावर मी जीवापाड प्रेम केलं, ज्या मुलाला बाप म्हणून कसल्याच गोष्टीची कमी केली नाही तो देखील सोडून गेला. कोणी माझा एकदाही विचार केला नाही. ज्या बहिणीला जीव लावला ती देखील हिस्सा पाहीजे म्हणून माझ्यावरच रुसून बसली. तिच्या वाटणीचा हिस्सा दिला. ती एका शब्दाने कधी विचारत नाही दादा तू कसा आहेस?"

त्याने दिर्घश्वास घेतला.
क्षणभर शांत बसला..

त्याने कसंबसं स्वतःच्या अश्रूंना आवर घातला.

"शांता,मी आतापर्यंत सर्वांच्या मनाचा विचार केला. आई,भाऊ,तू,विवेक सर्वांचा विचार केला. सर्वांसाठी जगलो. माझं कर्तव्य मनापासून निभावले. जे ही वाट्याला दुःख आलं ते एकांतात रडून, तर कधी तुझ्यापासून लपवून सहन केलं. शांता आता मला थोडं माझ्यासाठी जगायचे आहे.
माझं जग आता तू आहे. तू आणि मी. आपले छंद जोपासायचे आहे. तुझ्यासोबत फिरायचे आहे. आता मला विवेकचाही विचार नको आहे. वडील म्हणून एकच अपेक्षा त्याने त्याच्या संसारात खुश रहावं. शांता, आता कसलेच विषय नको. पुरे आता. फार त्रास होतो. सहन करण्याची शक्ती संपली आहे. मला विश्वास आहे तू मला कधीच सोडून जाणार नाही. तूच आहेस माझी साथीदार. आता फक्त तुझ्यासोबत उरलेललं आयुष्य सुदंर जगायचे आहे. आता पाठी घडलेल्या घटना नको आहेत, खूप त्रास होतो.

शांता हेच कारण होतं, मी तुला बोलतांना थांबवलं. मला तुझी बाजू कळली आहे; पण आता माझ्यात ताकद नाही जुन्या जखमांची खपली उकरून काढायची.

मरण्याआधी नव्याने जगायचं आहे. डोक्यावर कसलं ओझं नको, बस तुझी साथ हवी. मला आता काही नको शांता. आता मला तू हवी आहेस आणि तुझ्यासोबत गोड क्षण."

"तुम्ही मरण्याच्या गोष्टी करू नका. तुम्हीच तर आहात, तुमच्यासाठी जगते आहे. तुमच्याशिवाय मला आहे तरी कोण?" शांता अश्रू पुसत म्हणाली.

दोघेही भावुक झाले होते.
ती त्याच्या मिठीत विसावली.

इतके दिवस शांताची धुसफूस चालली होती, आज मात्र कमलेश व्यक्त झाल्यामुळे, त्याच्या अंतरंगात किती दुःख दडलं होतं ते समजलं होतं. तिला फार वाईट वाटलं. तिनेही वचन दिले.

"यापुढे मी मागे घडलेल्या गोष्टी उकरून काढणार नाही. अगदी विवेकचा विषय काढणार नाही, तुम्ही बरोबर बोलताय त्याला त्याचा संसार करू दिला पाहीजे. आपण नव्याने सुरवात करूया. नवीन आठवणी, सारं काही नवीन. आता फक्त स्वतःसाठी जगायला शिकायचे. मनसोक्त जगायचे."

कमलेश देखील खुश झाला.

शांता आणि कमलेशच्या मनात एकच गीत होतं ते म्हणजे

भले बुरे जे घडून गेले
विसरून जाऊ सारे क्षणभर
जरा विसावू या वळणावर, या वळणावर

समाप्त.
अश्विनी कुणाल ओगले.

माझ्या एका वाचकाने माझी स्त्री वादी कथा होती, त्यावर कंमेंट केली होती. कथा छान आहे;पण पुरुषांविषयी देखील लिहा. हा विषय सुचला आणि लिहिला. खरंच कथा लिहिताना डोळ्यात पाणी आले. त्यांच्या वेदना सहज दुर्लक्षित होतात. तिची सल ही जरा कथा तुम्ही वाचली असेल त्यातही पुरुषांची बाजू मांडण्याचा प्रयत्न केला आहे.
वाचकहो तुम्हाला ही कथा कशी वाटली जरूर कंमेंटमध्ये सांगा. एक like जरूर द्या.

सध्या सावर रे मना ही कथामालिका लिहीत आहे. ती देखील जरूर वाचा. अभिप्राय द्यायला विसरू नका.

कथेचा वापर you tube वर विडिओ बनवण्यास परवानगी नाही.