Login

चार लघुकथा

चार वेगवेगळ्या विषयांच्या लघुकथा
मायानगरी

"आई, मी स्वतःचे निर्णय घेऊ शकत नाही का?" 
स्वरा चिडून म्हणाली.

आई म्हणाली, "स्वतःचे निर्णय घेणे म्हणजे काय? लग्नाचे वय झाले आहे, आणि हा मुलगाही चांगला आहे."

"पण मला अजून शिकायचे आहे, मुंबईत जाऊन नाटकात आणि सिनेमात काम करायचे आहे, लग्न करून माझ्यावर बंधने घालू नका!" 

स्वराच्या डोळ्यात मुंबईच्या मोहमायेची स्वप्ने होती, पण लग्न हे तिला या सगळ्यांकडून बंधन वाटत होते.

आई वडिलांनी कशीबशी समजूत घालून तिचे लग्न ठरवले.

पण एके दिवशी ती अचानक पळून गेली, जाताना एक चिठ्ठी लिहून ठेवली होती.

"मला आता लग्न करायचे नाही, मला माफ करा, पण मला माझे स्वतःचे आयुष्य जगायचे आहे."

आईवडील कावरे बावरे झाले.  तिला सगळीकडे शोधले. पोलिसांत तक्रार केली, पण कुठेच ठाव ठिकाणा लागला नाही.

पाच वर्षं गेली. 

एके दिवशी स्वराची आई, एका शासकीय मनोरुग्ण इस्पितळात एका समाजसेविकेबरोबर सेवा करायला गेली. तिथे एका कोपऱ्यात तिच्या नशिबाने स्वरा बसलेली दिसली. केस विस्कटलेले, डोळे हरवलेले, हातात एक फाटलेले मासिक आणि त्यात ती येणाऱ्या ‘इंटरव्ह्यू’ची तयारी करत होती.

मुंबईच्या एका कुंटणखान्यातून तिला आणली होती. सिनेमात काम देतो असे सांगून तिला कोणीतरी मुंबईच्या मायावी नगरीमध्ये फसवले होते.

स्वराची आई स्तब्ध झाली.

"स्वरा?" तीने हळूच हाक मारली.

स्वरा हसली… "माझी मुलाखत घ्यायला आलात ना ?"

तिने स्वतःच्या आईला देखील ओळखले नव्हते.

आईचे डोळे भरून आले.

लग्न हे तिला जे बंधन वाटत होते, कदाचित तेच तिच्यासाठी चांगले होते. कारण आता वास्तवाच्या बेड्यांनी तिला एक वेगळ्याच बंधनात अडकवून ठेवले होते.

समाप्त


सॅल्युट

सकाळचे पाच वाजले होते. अंधारात साखळदंड वाजवत दोन शिपायांनी त्याला खोलीबाहेर आणले. तो त्याच्या हातातून निसटून जाण्याचा अजिबात प्रयत्न करत नव्हता. त्याच्या चेहऱ्यावर भीतीचा कुठलाही लवलेश नव्हता, उलटपक्षी एक माज डोकावत होता.

"तयार आहेस का?" जेलरने विचारले.

तो हसला, "मरणाला कोण घाबरते साहेब? मी जे केले त्याचे मला यत्किंचितदेखील दुःख नाही."

जेलर थोडासा गोंधळला. "तू तर हुशार होतास… शिकलेला. मग एवढ्या मोठ्या माणसातला का मारलेस?"

त्याने निर्भीडपणे उत्तर दिले.
"तुम्ही जन्माला आलात इंग्रजांच्या छत्रछायेत… 
आणि मी गावच्या मातीत,
तुमच्यासाठी देश म्हणजे सत्ता आहे, पण माझ्यासाठी ती आई आहे."

तो पुढे बोलतच राहिला. " माझ्या आईला बंधनातून मुक्त करण्यासाठी असले हजारो खून करायला मी मागेपुढे पाहिले नसते, त्या अँड्र्यूने माझ्या देशाच्या झेंड्यावर पाय दिला, त्याला त्याची शिक्षा मिळायलाच पाहिजे होती."

जेलर काही बोलला नाही, पण त्याच्या हातातला कागद थरथरत होता, एकवीस वर्षाचा कोवळा मुलगा होता तो.

"तुला काही शेवटचे सांगायचे आहे का?" त्याने विचारले.

"होय," तो म्हणाला. "माझ्या मातीला सांगा, तिचा पुत्र हसत हसत गेला!"

क्षणभर शांतता पसरली. आजूबाजूच्या लोकांनी टाळ्या वाजवल्या, इंकलाब जिंदाबादचे नारे लावले.

त्याला फासावर नेण्यात आले. मरताना त्याच्या ओठांवर एकच शब्द होता.

"वंदे मातरम्!"

जेलर पहिल्यांदाच डोळे पुसत होता, त्याने मनात त्या कोवळ्या मुलाला नाही, तर स्वतःच्या जन्मभूमीवर लहान वयात मरायला तयार झालेल्या त्या प्रेमाला एक सॅल्युट ठोकला.

समाप्त


संवाद

"कोण आहेस तू? इथे एकटा पावसात काय करत आहेस." उर्वशी त्या लहानग्याला विचारत होती, पण त्याला ते काहीही कळत नव्हते.

त्या संध्याकाळी उर्वशी बसस्टॉपवर उभी होती. पावसाच्या सरी पडत होत्या. तेवढ्यात तिला एक छोटा मुलगा दिसला, ओला झालेला, घाबरलेला, तो काहीही बोलत नव्हता… फक्त हातवारे करत होता.

"तू हरवलास का?" उर्वशीने विचारले.

तो डोळे मोठे करत फक्त हात हलवत राहिला. 
काही वेळातच ती समजली, तो *दिव्यांग* होता, त्याला ऐकायला आणि बोलायला येत नव्हते.

उर्वशीने आधी पोलिसांची मदत घ्यायचे ठरवले,  पण ते त्याला कुठल्यातरी आश्रमात नेऊन टाकतील, त्यामुळे तिने स्वतःच त्याची मदत करायचे ठरवले. आपल्या मोबाईलवर  त्याचे हातवारे लिहून तो काय बोलत आहे हे जाणून घेतले. पूर्वी तिला ज्या हातवाऱ्यांची मजा वाटायची  आज ती ते स्वतः करून त्या मुलाबरोबर बोलायचा प्रयत्न करत होती.

थोड्याच वेळात तिने ओळखले की तो ‘रसायनी नगरचा' आहे.

ती त्याला घेऊन रिक्षाने तिथे गेली.रसायनी नगर येताच तो आता उर्वशीला हातवारे करून त्याचे घर कुठे आहे हे दाखवत होता. एका गल्लीच्या कोपऱ्यावर पोहोचल्यावर तो आनंदाने धावत पळाला… त्याची आई रडून रडून दारातच बसलेली होती.

आई रडत म्हणाली,
"तो बाजाराच्या मार्गात हरवला होता… खूप शोधले पण सापडत नव्हता,  काय करावे कळतच नव्हते!"

उर्वशीने फक्त हसून त्याचा पापा घेतला.

भाषा ही केवळ शब्दांची नसते, काहीवेळा ती कुठल्याही स्वरूपात समोरच्याची संवाद घडवून आणू शकते.

समाप्त



तत्व

डॉ. विनायक जोशी, वय ७८. रिटायर झाल्यावरही त्याच्या खोलीत स्टेथोस्कोप आणि जुन्या फायली नीट ठेवलेल्या होत्या. आयुष्यभर एकच तत्व त्यांनी पाळले. "कुठलीही तडजोड करायची नाही."

तरुणपणी त्याने पैशासाठी सरकारी नोकरी नाकारली, लग्नासाठी साधी पण प्रेमळ मुलगी नाकारली, कारण ती "त्यांच्या स्वप्नांशी जुळत नव्हती." 
सर्व निर्णय कठोर होते पण त्यांनी ते काटेकोरपणे अंमलात आणले होते.

आज ते वृद्धाश्रमात एकटे बसलेले होते. कोणी त्यांची विचारपूस  करायला येत नसे. कधी नव्हे ते एक तरुण डॉक्टर त्यांना भेटायला आला.

"सर, मी तुमच्या पुस्तकांवरून शिकलो… पण तुम्हाला इतके एकटे बघून दुःख होते?"

विनायकने त्याच्या नेहमीच्या अंदाजात उत्तर दिले,

"कारण मी नेहमी आयुष्याशीच स्पर्धा केली… आणि त्याला हरवत राहिलो."

पण त्यावर तो नवोदित डॉक्टर म्हणाला.

"पण आयुष्य ही स्पर्धा म्हणून जगायची नसते, ते काही गणित नसते, कधी कधी हिशोब विसरून, माणसे जपणे महत्त्वाचे असते."

जोशींना त्याचे म्हणणे कळत होते, आयुष्याच्या शेवटी शेवटी त्याला या गोष्टी पटत होत्या. पण आता वेळ उडून गेली होती.

ते शांतपणे खिडकीबाहेर पाहत राहिले. स्पर्धा संपून गेली होती, आणि उरले होते फक्त तेच "एकटे".

तत्त्वांवर चाललेले आयुष्य अखेर पश्चातापाच्या सावलीत थांबलेले होते