Login

छायेतून आलेले पावलांचे आवाज. भाग - २ (अंतिम भाग)

मिताली एका जुन्या रिकाम्या घरात राहायला येते, परंतु तिथे असलेला आत्मा तिला त्रास देतो. नंतर मितालीला त्या आत्म्याबाबत घडलेले सर्व कळते. त्या आत्म्याला न्याय मिळवून दिल्यानंतरही तो आत्मा मितालीला का सोडत नाही ?
छायेतून आलेले पावलांचे आवाज


घरात पुन्हा अंधार पसरला होता. मेणबत्ती विझल्यावर काही क्षण मितालीला काहीच दिसत नव्हतं. पण कान मात्र अजूनही तीच ओळखीची लय ऐकत होते,
“टक…टक…टक…”

तिने हातांनी भिंत शोधली, मोबाईल घेतला आणि टॉर्च चालू केला.
समोर काहीच नव्हतं. पण खोलीच्या कोपऱ्यात धुळीत काहीतरी हालताना दिसलं.
जणू सावली जिवंत झाली होती.

“कोण आहेस तू?” ती ओरडली.

आवाज आला, “मी… इथेच होते… नेहमीपासून…”

ती थरथरली. “सुष्मा?”

पण उत्तर आलं नाही. फक्त सावली भिंतीवरून हलली आणि तिच्या मागे उभी राहिली.

थंड श्वास तिच्या मानेला लागला.
“तू… माझी जागा घेतलीस.”

मिताली घाबरून मागे सरकली, टॉर्च खाली पडला. सावली अंधारात विलीन झाली.


पहाटे जाग आली तेव्हा सर्व काही शांत होतं.
काल रात्रीचं सगळं स्वप्न वाटावं असं भासत होतं. पण आरशात पाहिलं, तेव्हा तिला थबकायला झालं,
तिच्या मानेवर काळे ठसे होते. बोटांचे ठसे.

शाळेत गेल्यावर सगळे विचारत होते,
“मॅडम, तब्येत बरी आहे ना? चेहरा फार फिक्का दिसतोय.”

ती फक्त मान हलवून म्हणाली, “थोडं बरं नाही वाटते.”
पण मनात मात्र विचार सुरू होता, काल रात्री जे घडलं, ते पुन्हा घडेल का?


त्या दिवसानंतर मितालीच्या जीवनात बदल जाणवू लागले.
ती शांत स्वभावाची होती, पण आता अचानक चिडचिड करू लागली.
कधी कधी वर्गात ती अनोळखी नावं उच्चारायची,
“रघु… पाण्यात ढकलू नकोस…”
विद्यार्थी घाबरून तिच्याकडे बघायचे.

एक दिवस तिच्या सहशिक्षकाने विचारलं,
“मिताली मॅडम, तुम्ही काल रात्री शाळेजवळ काय करत होता? आम्ही पाहिलं, तुम्ही शाळेच्या विहिरीत काहीतरी टाकत होतात…”

ती दचकली, “मी? मी तर घरात होते!”

पण तिच्या हातांवर त्या दिवशी चिखल लागलेला होता.


रात्री झोप येत नव्हती. अंगणात आवाज यायचे, आता फक्त चालण्याचे नव्हे, तर कुजबुजण्याचे.
“तिने माझी जागा घेतली आहे…”
“तिचं शरीर माझं आहे…”

मिताली आरशासमोर उभी राहिली.
आरशात तिचा चेहरा दिसत होता, पण डोळ्यात काहीतरी वेगळं, जणू कोणी दुसरंच तिच्यातून बघत होतं.

अचानक तिच्या मागे आरशात एक स्त्री दिसली,
पांढरं वस्त्र, ओले केस, फिक्कट चेहरा.
ती हसली.

“तू मला न्याय दिलास. आता मला तुझं आयुष्य दे.”

मिताली किंचाळली. आरसा फुटला.

दुसऱ्या दिवशी ती गावातील जुने पुजारी, हरिदासबुवा, यांच्याकडे गेली.
त्यांनी तिच्याकडे पाहताच ओळखलं,
“तुझ्या अंगावर काहीतरी आहे, बाळ. हे आत्म्याचं छायाबंधन आहे.”

“ते कसं दूर करता येईल?” मितालीने विचारलं.

बुवा म्हणाले, “संध्याकाळी सूर्यास्तानंतर त्या घरात जाऊन विहिरीपाशी सगळं जाळायचं आहे, त्या पत्रांसकट, त्या वस्त्रांसकट. आत्म्याची शरीराची ओढ तुटली की तो शांतीला जातो.”

तीने धैर्य एकवटलं. त्या रात्री ती परत घरात गेली.

संध्याकाळ झाली. आकाश लालसर झालं.
तीने सर्व वस्तू, सुष्माची पत्रं, हार, आणि तिचं पांढरं वस्त्र, एका तांब्याच्या ताटात ठेवले.

विहिरीजवळ पोहोचताच, वारा जोरात सुटला.
आजूबाजूला सावल्या नाचू लागल्या.
“थांब! हे करू नकोस!”
आवाज पुन्हा आला, स्त्रीचा.

“तू मला शांततेचा मार्ग दे,” मिताली ओरडली, “नाहीतर मी तुला बांधून टाकेन!”

सावली जवळ आली. तिचा चेहरा आता स्पष्ट होता,
सुष्मा. पण तिच्या डोळ्यांत आग होती.
“तू मला जिवंत केलंस… आता मला नाही जायचं. मला शरीर हवंय!”

वारा भयानक झाला. झाडं हलू लागली.
मितालीने मंत्र पुटपुटला, वस्त्राला आग लावली.

सुषमा किंचाळली, “आआआह्ह्ह!!!”

पांढऱ्या धुरात तिचं रूप विलीन झालं. आवाज थांबले.
वारा शांत झाला.

मिताली गुडघ्यावर कोसळली.


दुसऱ्या दिवशी पहाटे गावात शांतता होती.
पाटलांनी पाहिलं, विहिरीभोवती राख पडलेली, आणि घराचं दार उघडं.
मिताली बाहेर बसलेली, पण तिचे डोळे रिकामे.

“मॅडम?” पाटलांनी विचारलं.
ती हळूच हसली. “सगळं संपलं.”

ती काही दिवसांनी गाव सोडून गेली. शाळेत दुसरी शिक्षिका आली.
गावात शांतता परतली.

एक महिन्यानंतर गावातील एका मुलाने त्या घराजवळ खेळताना आवाज ऐकला,
“टक…टक…टक…”

त्याने आत डोकावलं. भिंतीवर धुळीत लिहिलं होतं,
“मिताली… आता माझी जागा तुझी…”

त्या मुलाने धावत पळ काढला.

आणि त्या घराची खिडकी पुन्हा आपोआप बंद झाली.
अंधारात कोणीतरी हलकं हसत होतं.

समाप्त
0

🎭 Series Post

View all