डार्लिंग डॉट कॉम : भाग ८
पार्वतीने सुदर्शनला माफ करण्याचा काळ खूप कठीण होता. तिचं मन, तिचं हृदय, दोन्ही एकाच वेळी वेगळ्या दिशांमध्ये खेचलं जात होतं. तीने अनुभवलेल्या वेदना आणि दु:खाच्या खोल जखमा तिला सतत सुदर्शनने केलेल्या कृत्याची आठवत करून देत होत्या. सुदर्शनला माफ करायचं की नाही, हा प्रश्न तिच्या मनात सतत फिरत होता. पण सुदर्शनचं प्रेम आणि त्याने केलेले प्रयत्न तिला पुन्हा त्याचं मन जिंकून घेण्यासाठी प्रेरित करत होते.
सुदर्शनने पार्वतीच्या मनावर प्रेमाचं पाणी शिंपडायला सुरुवात केली होती. तो तिच्या प्रत्येक गरजेची काळजी घेत होता, तिच्या छोट्या मोठ्या इच्छांचा आदर करत होता. पण एक दिवस, त्याने एक अनपेक्षित गोष्ट केली. पार्वतीच्या आईला अचानक त्रास झाला आणि त्यांना तातडीने दवाखान्यात नेण्याची गरज होती. सुदर्शनला जेव्हा हे समजलं, तेव्हा त्याने स्वतः जाऊन पार्वतीच्या आईला रुग्णालयात घेऊन जायचं ठरवलं.
पार्वती: (आश्चर्यचकित होऊन) "तुम्ही का त्रास घेताय? मी नेते तिला, काही काळजी करू नका."
सुदर्शन: "पार्वती, ही फक्त तुझीच आई नाहीये, माझी देखील सासू आहे ,त्याची काळजी घेणं हे माझं कर्तव्य आहे. तूच म्हणाली होतीस की संसार म्हणजे एकमेकांची साथ आणि सहकार्य असणं. माझं तुझ्यावर प्रेम आहे, आणि तुझ्या आईची काळजी घेणं हे माझंही कर्तव्य असणारच ना."
पार्वतीच्या डोळ्यांत पाणी आलं. तिने पाहिलं की सुदर्शनने हे सगळं फक्त तिच्या आईसाठी केलं नव्हतं, तर तिला समजून घेण्यासाठीही केलं होतं.
सुदर्शनने पार्वतीच्या मनातील त्या दु:खाच्या आठवणींच्या विरुद्ध एक नवा अध्याय सुरू करण्याचा निर्णय घेतला. तो सतत पार्वतीच्या मनातल्या आठवणींना जागं ठेवण्याचा प्रयत्न करत होता. एके दिवशी, त्याने पार्वतीला हवं असलेलं एक जुने पुस्तक शोधून आणलं, ज्याचं मुखपृष्ठ खराब झालं होतं.
सुदर्शन:"हे घे पुस्तक..पार्वती, तुला आठवतंय का? आपण एकत्र वाचलं होतं हे पुस्तक, पहिल्यांदा तू मला दिलं होतं हे पुस्तक."
पार्वती:(हळू आवाजात) "होय, आठवतंय. तेव्हा आपण किती दूर होतो पण मनाने जवळ होतो आणि आता जवळ असूनही किती दूर"
सुदर्शन: " अजूनही आपण मनाने जवळ येऊ शकतो, पार्वती."
सुदर्शनने तिला थेट विचारलं की ती त्याच्यावर अजून किती काळ रागवणार आहेस
सुदर्शन: "पार्वती, मला माहित आहे की मी खूप मोठी चूक केली आहे. पण आता सहा महिने होत आलेत तू अजूनही मला माफ नाही केलं आहेस. मला तुझ्या मनातलं स्पष्ट जाणून घ्यायचं आहे."
पार्वती: (थोडं कटू स्वरात) "सुदर्शन, तुझं कृत्य मी कधीच विसरू शकत नाही. पण तू हे का केलं, हे मात्र समजायला हवं होतं."
सुदर्शन: (गंभीरपणे) "हो, पण मी फक्त तुझं मन जिंकण्यासाठी नाही बोलत आहे. मी प्रामाणिकपणे हे मानतो की माझं तुझ्यावर प्रेम आहे. मी फक्त तुझ्या कष्टांचा आदर करतो, आणि मला जाणवतं की तुझं हृदय किती दुःखावलं आहे."
पार्वतीला सुदर्शनच्या प्रामाणिकपणाची जाणीव झाली. त्याच्या शब्दांतली सच्चाई तिला जाणवत होती, आणि तीचं कठोर मन हळूहळू मऊ होऊ लागलं.
सुदर्शन: "पार्वती, तुझ्या प्रेमामुळे आणि तुझ्या सहनशीलतेमुळे मी आज इथं उभा आहे. तुझ्या समर्थनाने मी माझ्या बहिणीला मदत करू शकलो. आणि आता, तुझ्या प्रेमाला उत्तर देण्याची वेळ आली आहे."
पार्वतीच्या डोळ्यांत अश्रू आले. तिला सुदर्शनच्या त्या कृतज्ञतेच्या शब्दांत खूप मोल मिळालं. तिला जाणवलं की सुदर्शनचं प्रेम फक्त शब्दांत नाही, तर कृतीतही आहे.
पार्वतीने अखेर सुदर्शनला माफ करण्याचा निर्णय घेतला, तिच्या मनातल्या सगळ्या दुःखाच्या आणि रागाच्या जखमांना प्रेमाच्या ओलाव्याने भरून काढलं होतं. त्या दिवशी संध्याकाळी, घरात शांतता होती. बाहेर पाऊस सुरू झाला होता. पार्वती खिडकीत उभी राहून पाऊस बघत होती, आणि तिच्या मनात विचारांच्या लाटांनी पुन्हा एकदा जोर धरला होता.
सुदर्शनने तिच्या मागे येऊन हळुवारपणे तिच्या खांद्यावर हात ठेवला.
सुदर्शन:"पार्वती, तू मला माफ केलंस, याचा खूप आभारी आहे. मी खरंच तुझ्याशिवाय काहीच नाही."
पार्वती हळूच वळली, तिच्या डोळ्यांत अश्रू होते. तिच्या मनातल्या भावना व्यक्त करणं तिच्यासाठी अवघड होतं, पण त्यावेळी ती भावनांच्या ओघात वाहून गेली.
पार्वती: "सुदर्शन, मला तुझ्यावर किती राग आला होता, हे कधीच शब्दांत सांगता येणार नाही. पण तुझ्या प्रेमाने, तुझ्या कष्टांनी, आणि तुझ्या प्रामाणिकपणाने माझं मन पुन्हा जिंकलं आहे."
सुदर्शनने तिच्या डोळ्यांत पाहिलं, तो तिला जवळ घेत होता. पार्वतीने हलकेच त्याला मिठी मारली, आणि तिचे अश्रू त्याच्या खांद्यावर ओघळू लागले. तिने मनातलं सगळं दुःख, ताण, आणि राग त्या मिठीत सोडून दिलं.
सुदर्शन: "मी तुझ्यासाठी सगळं करायला तयार आहे, पार्वती. तुझं प्रेम, तुझा विश्वास, हेच माझ्यासाठी सगळं काही आहे."
त्याच्या शब्दांनी पार्वतीचं मन मोकळं झालं. तीने त्याला अजून घट्ट मिठी मारली, जणू ती पुन्हा त्याच्या प्रेमात पूर्णपणे विरघळली होती.
सुदर्शनने तिच्या चेहऱ्यावरचे अश्रू पुसले, आणि तिच्या कपाळावर चुंबन दिलं. त्या क्षणात, त्यांच्या दोघांच्या मनातली सगळी कटुता, दुःख, आणि वेदना दूर झाली होती. त्यांनी एकमेकांना पुन्हा नव्याने समजून घेतलं होतं, आणि त्या प्रेमाच्या ओलाव्यात ते दोघेही विरघळले होते.
त्यानंतर, त्या रात्री त्यांनी एकमेकांना पूर्णपणे समर्पित करून, एकमेकांच्या जवळ येण्याचा आनंद अनुभवला.
क्रमशः
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा