Login

ललाटलेख भाग १ (सौ.हर्षाली प्रसन्न कर्वे)

नशिबाचे फेरे
ही गोष्ट आहे दोन सख्या बहिणींची. सख्या असूनही दोघींचे जीवन पूर्णपणे वेगळे आहे.


भाग १

गुणा आणि बाळा काकांचे लग्न झाले तेव्हा गुणा होती फक्त सतरा वर्षाची. खरतरं गुणाला लग्न करायचे नव्हते. पण पुढे शिकण्याची सोय ही गावात नव्हती. त्याकाळची मॅट्रिक म्हणजे अकरावी झाल्यावर सावित्री मोठी म्हणून तिला स्थळे यायला सुरवात झाली. सावित्री नाकीडोळी नीटस पण रंगाने सावळी होती. मोठ्या बहिणीला सावित्रीला बघायला म्हणून आलेल्या बाळाकाकांनी सरळ सगुणा म्हणजे गुणाला मागणी घातली, आणि सर्वांना स्पष्ट सांगितले. “मला ही मुलगी पसंत आहे, मला हिच्याशी लग्न करायचे आहे. जर तुम्हाला पटत असेल तर सांगा. माझी काही फक्त दहा दिवसच आहे.’ गुणा सावित्री पेक्षा उजवी होती. रंग गोरा, काळेभोर लांब सडक केस आणि जरासे पिंगट बोलके डोळे, सगळं पहाणाऱ्याच्या मनात भरत असे. बाळाकाकांनी सांगितल्यावर सगळेच गप्प झाले. पण आठ दिवसात गुणा आणि सावीचे लग्न ही झाले. गुणाने नाही म्हणण्याचा प्रश्नच नव्हता. अव्वा तात्या आणि मोठे मामा तिघे ठरवतील तेच होणार होते. त्याकाळी मुलीला “मुलगा पसंत आहे का?’ हे सुद्धा विचारले जात नसे. अव्वा आणि तात्या म्हणाले “स्थळ चांगले आहे. मुलगा चांगल्या नोकरीत आहे. आणखी काय हवे? थोड लांब जावे लागेल इतकेच.’ अव्वा तात्या आणि मोठ्या मामाने सगळे ठरवले. गुणाचे आणि सावीचे ही लग्न तोच करणार होता. अव्वा शाळेत शिक्षिका होती पण घरात खाणारी सात तोंड होती, आणि तात्यांची काहीही मिळकत नव्हती. अव्वा आणि तात्यांची परिस्थिती नव्हतीच. लग्न झाले तेव्हा गुणा आणि सावी दोघींना लग्न म्हणजे काय हे देखील माहिती नव्हते. तो काळ होता १९५७/५८ चा. गुणा आणि सावी दोघीही अगदीच बाळबोध वळणाच्या होत्या. सावित्रीचा नवरा विठ्ठलपंत मिलीटरीमध्ये होता. त्यालाही जिकडे पोस्टिंग मिळेल तिकडे लांब लांब जावे लागायचे. विठ्ठलपंत ही अतिशय तापट स्वभावाचे होते. आधीच मिलीटरीची शिस्त आणि त्यात मुळचा तापट स्वभाव. बाळाकाकांची शिस्त निराळी आणि विठ्ठलपंतांची निराळी होती. बाळाकाकांना वेळच्या वेळी जेवण आणि झोप हवी असे. रात्री दहा वाजता बाळाकाका झोपणारच. तर विठ्ठलपंतांची जेवायची नक्की वेळच नव्हती. दुपारचे जेवण कधी तीन वाजता कधी पाच वाजता असे. रात्रीचे जेवण तर दहा वाजल्यानंतर केव्हातरी व्हायचे. सावित्री मुळातच हरहुन्नरी आणि समजूतदार होती. जे समोर येईल ते स्विकार करण्याचा तिचा स्वभाव होता. त्यामुळे तिने सगळे काही सांभाळून घेतले. कशाचीही तक्रार केली नाही. गुणाचा नवरा बाळाकाका दिल्लीत एका कंपनीत कामाला होते. लग्नानंतर सहा महिन्यांनी बाळाकाकांनी गुणाला माहेरपणासाठी आणून पोचवले. जाताना तो अव्वाला सांगून गेला, “ हिला लग्नानंतरच्या आयुष्याबद्दल काहीच माहिती नाही. अशाने मीही सुखी होणार नाही आणि तीही. तिला थोडी शहाणी करा. पंधरा दिवस राहू दे, मी येतो आणि तिला घेऊन जातो.’ अव्वा तरी काय सांगणार तिला. ती गुणाला एका डाॅक्टरीण बाईंकडे घेऊन गेली. बरोबर पंधरा दिवसांनी बाळाकाका हजर झाले आणि गुणाला आपल्या बरोबर घेऊन गेले.

बाळाकाका अतिशय सज्जन माणूस होते. पण तितकेच शिस्तप्रिय ही. त्यांचे सगळे शिक्षण त्यांनी माधुकरी मागून, स्वतः कष्ट करून, एकीकडे काम करून एकीकडे शिक्षण घेत पूर्ण केले. आपल्यासाठी कोणाला त्रास झालेला त्यांना आवडायचा नाही. लहानपणी दोन वेळचे जेवणही महाग असल्याने त्यांना अन्न वाया घालवणे ही आवडायचे नाही. खाणेही मोजून मापून आणि ते करायचे सुद्धा मोजून. दिल्लीला बाळाकाका आणि गुणा दोघेच रहायचे. दोघे किती खाणार हे बघून, विचारून घेऊन गुणाने स्वयंपाक करायचा, तो ही दोन्ही वेळेला ताजा करायचा. बाळाकाकांना फक्त आई होती, वडील लहानपणीच वारले होते. ती सुद्धा सहा महिने बाळा काकांकडे व सहा महिने त्यांच्या भावाकडे रहायची. हे सुद्धा बाळाकाकांनीच ठरवलेले होते. इतक्या शिस्तप्रिय बाळाकाकांशी गुणाचेही छान जमले होते. गुणाने त्यांच्या शिस्तीत रहाणे पसंत केले. माहेरी सतत मामाच्या किंवा इतर कुणाच्या आधाराने, त्यांचे मिंधे होऊन रहाणे तिला खटकत होते. बाळाकाकांनी तिला लग्न झाल्यावर लगेचच सांगितले होते, “तू माझी धर्मपत्नी आहेस, बायको आहेस. तुझी सर्व जबाबदारी आता माझी आहे. तुला हवं नको ते सर्व तू मला सांग. तुझ्या अव्वा तात्यांकडे पण काही मागायचे नाही. मला जमले तर नक्कीच मी लगेच देईन, पण लगेच नाही जमले तरी मी लवकरात लवकर तुला देण्याचा प्रयत्न करीन.’ आणि त्याप्रमाणे बाळाकाका वागत ही होते. सहा महिन्यात गुणाने गोड बातमी दिली. बाळाकाकांच्या व्यवस्थित देखभाल करण्याने आणि शिस्तबद्ध आहार विहारामुळे गुणा अगदी गुटगुटीत झाली होती. सातवा संपताना ती बाळंतपणासाठी माहेरी आली. बाळंतपणाचा खर्चही बाळाकाकांनी आधीच अव्वाकडे देऊन ठेवला. इकडे अव्वा सुद्धा तिची व्यवस्थित काळजी घेत होती. माहेरी आल्यामुळे गुणाला विश्रांती ही मिळत होती आणि थोडी मोकळीक ही मिळत होती. दिल्लीत ती एकटी कुठे जाऊ शकत नव्हती, इकडे मात्र मैत्रिणींबरोबर आणि अव्वा बरोबर ही ती बाहेर फिरायला जात होती. बाळाकाका सोबत नसल्यामुळे कुठलेही बंधन नव्हते त्यामुळे ती मजेत रहात होती. नऊ महिने पूर्ण झाल्यावर गुणाने एका छान मुलीला जन्म दिला. गुणा सारखी गोरी पान, नाकीडोळी नीटस असलेल्या आपल्या पहिल्या नायिकेने जन्म घेतला. बाळाकाकाने तिचे नाव ठेवले “निशा”.

क्रमशः

©️®️ सौ. हर्षाली प्रसन्न कर्वे
मिरज

🎭 Series Post

View all