Login

देवता _ असंही एक नातं (भाग २)

एका मैत्रिणीने दुसऱ्या मैत्रिणीला अडचणीच्या वेळी केलेली मदत

देवता - असंही एक नातं (भाग २)

मधुरा करत असलेल्या सांत्वनामुळे नीलिमाच्या डोळ्यांपुढून मिलिंद भेटल्यानंतरचा सारा घटनाक्रम तरळून गेला.

नीलिमा आणि मिलिंदची प्रेमकहाणी पूर्ण कॉलेजमध्ये चर्चेचा विषय झाला होता.  दोघांनाही सारी मित्रमंडळी लव्हबर्ड्स म्हणायचे.  खरंतर कॉलेजच्या पहिल्या वर्षाला त्या दोघांमध्ये फक्त मैत्रीचे नातं होतं.  त्यांचा दहा जणांचा ग्रुप म्हणजे अगदी सळसळता उत्साह होता.  सहा मुली आणि चार मुलं असा त्यांचा ग्रुप सगळ्या ऍक्टिव्हिटी मध्ये नेहमीच भाग घेत होता.  कॉलेजच्या दुसऱ्या वर्षाला असताना नीलिमा आणि मिलिंदने गॅदरिंग मध्ये एका एकांकिकेमध्ये नल आणि दमयंतीची भूमिका केली होती.  बस तेव्हापासून सर्वांनी त्यांना नल आणि दमयंती चिडवायला सुरुवात केली.  ह्या अशा चिडवाचिडवीतून दोघांमध्ये हळुवार प्रेमभावना कधी निर्माण झाली त्यांचे त्यांनाही कळलं नाही.  दोघांनाही प्रेमाचा आविष्कार झाला आणि मग काय विचारायलाच नको.  सर्वांच्या नजरा चुकवून दोघंच भेटू लागले.  या चोरट्या भेटिंबद्दल कोणालाही काही पत्ता लागू नये म्हणून दोघेही कॉलेजच्या बाहेरच भेटू लागले.

दोघे एकमेकांना वाढदिवसाला सर्वांबरोबर कॉन्ट्रीब्युशन काढून भेट द्यायचे शिवाय एक छोटीशी वैयक्तिक
भेटसुद्धा दिली जाऊ लागली.  या अशा चोरट्या प्रेमात दोघांनाही खूप आनंद मिळायचा.  अर्थात प्रेमाचा त्यांनी अभ्यासावर मुळीच परिणाम होऊ दिला नाही.   मिलिंद खूपच हुशार होता परंतु नीलिमाची बुद्धी सुमार होती.  कॉलेजच्या शेवटच्या वर्षाला असताना त्यांच्या ग्रुपला त्यांच्या प्रेमाबद्दल कळलं.  मग ते राजरोसपणे त्या दोघांना एकांत देऊ लागले.  शेवटच्या वर्षाची परीक्षा झाल्यावर मिलिंदला एका नामांकित कंपनीत उच्च पदावर नोकरी मिळाली.  नीलिमाने घरी राहणं पसंत केले.  तिला तसं पण नोकरीची गरज नव्हती.

दोघांनी आपापल्या घरी त्यांच्या प्रेमाबद्दल सांगितल्यावर दोन्ही घरी भूकंप झाला.  घरचे आपल्या लग्नाला परवानगी देतील याची वाट पाहून शेवटी त्यांच्या विरोधात जाऊन दोघांनी लग्न केलं.  एकमेकांवरच्या प्रेमामुळे त्यांचा संसार सुखाने चालू होता.  दोन वर्षानंतर त्यांच्या प्रेमाचे प्रतीक म्हणून मयूरने त्यांच्या जीवनात प्रवेश केला.  मयूरच्या आगमनामुळे त्यांचा आनंद द्विगुणित झाला होता.  हळूहळू मयूर मोठा होत होता.  तो सहा वर्षाचा झाल्यावर क्षुल्लक आजाराचे गंभीर आजारात रूपांतर होऊन मिलिंदने ह्या जगाचा निरोप घेतला.  नीलिमा वर जणू आभाळच कोसळले.  असं कधी होईल असे स्वप्नातही वाटलं नव्हतं.  आता स्वतःला सावरून मयूरला मोठं करणं हे एकच तिचं ध्येय होतं.

मिलिंदच्या मृत्यूनंतर त्याच्या कंपनीतून मिळालेली रक्कम तरी किती काळ पुरणार.  त्याच्या कंपनीच्या अनुकंपा तत्त्वानुसार नीलिमाला तिथे नोकरी देण्यात आली.  परंतु मिलिंद उच्च पदावर होता तरी हिला पात्रतेनुसार कारकुनाची नोकरी मिळाली.  तरीही संसाराचा गाडा चालवण्यासाठी तिने ते स्वीकारली.  पूर्वीचं सगळं विसरून तिची आई तिच्या मदतीला आली आणि दिवसभर मयूरला सांभाळण्याची जबाबदारी तिने स्वीकारली.  आता एक तारखेपासून नीलिमाच्या जीवनाचा नवीन अध्याय सुरू होणार होता.

क्रमशः

(कधीही नोकरी न केलेल्या नीलिमाचे यापुढील जीवन कसं असेल पाहू या पुढील भागात)