दिशा भाग 42

Sir Explains What He Has Done In His Entire Life


दिशा:- भाग 42

बाहेरच्या पार्टीचा मागमुस ही नसलेली आतली एक रूम. त्या रूममध्ये मोजून चार लोक होते.त्यातले दोन एकमेकांकडे पाहत नव्हते तर उरलेले दोन त्या दोघांकडेच पाहत होते. बराच वेळ त्या शांततेत गेला होता, कोणीच बोलायचं नाव घेईना
शेवटी ती शांतता आदित्यने फोडली.

"सर तुम्हाला बोलावं लागेल! त्या बोलतील याची वाट न पाहता तुम्ही बोला...."
सरांनी चष्मा काढला आणि खिशातल्या रुमालाने डोळे पुसले घसा खाकरला आणि लटपटत्या आवाजात ते म्हणाले," शालू...."

"माझ्या आईचं नाव शालिनी आहे तेच नाव तुम्ही घ्या..." आदिती जोरदार आवाजात म्हणाली.
तसा आदित्यने तिचा हात दाबला.

सर मान डोलवत म्हणाले, "खरंय शरयू तुझे...तिला शालू म्हणायचा अधिकार मी तसाही गमावला आहे.
खरंतर मी सगळेच अधिकार गमावले आहेत. मला माहिती नव्हते की ती मला कधी अशावेळी परत भेटेल. खरं सांगायचं मी तुला विसरलो होतो शालिनी...म्हणजे तशा अर्थाने नाही पण तू परत येण्याची शक्यता असू शकते हे मी विसरलो होतो.
मी स्वतःला या सिच्युएशन पर्यंत आणले ते काही लोकांना मागे सोडून, काही लोकांचा त्याग करून, काही लोकांचा विश्वासघात करून आणि त्यात शालिनीचा नंबर पहिला आहे.

तो दिवस मला आठवतो ज्यावेळेस मी शालिनीला मुंबईला सोडले होते. सगळे कळण्याचे दिवस होते असं काही नाही पण मी म्हणेन की, जे मी करत होतो तेव्हा कळत अजिबातच नव्हतं असेही नाही.
तेव्हा फक्त एकच कळलं होतं की शालिनीला त्या ठिकाणी दिल्यावर मला पैसे मिळतील आणि त्या पैशांनी दुबईला जाईल. दुबईला मला भरपूर पैसे मिळतील, ज्यामुळे माझे आयुष्य सुखी होईल.
माझ्या दुबईच्या सुखापुढे त्याकाळी शालिनीला तिथे सोडताना मला अजिबात वाईट नव्हते वाटले. मी दुबईला गेलो तिथे एका शेखच्या मदतीने मला भरपूर काम मिळाले दोन वर्षातच मी बराच गल्ला साठवला आणि माझ्याकडे बऱ्यापैकी पैसे आले.

तिथेच एका मित्राच्या मदतीने मी स्वतः साठवलेले पैसे त्याच्या एका कंपनीत गुंतवले. ती कंपनी भरभक्कम निघाली. पुढच्या दोन वर्षात सगळे पैसे तिप्पट झाले होते.

त्यावेळी तरुण होतो बराच.. त्यामुळे पैशाचा उन्माद चढला होता.पैसे मिळवायचे, पैसे उडवायचे आणि परत पैसे मिळवायचे एवढेच आयुष्य होते.
सगळे उत्तम चालले होते.. भरपूर शौक केले, भरपूर मजा केली, जे हवं ते पैसे फेकून मिळायचे. आनंदाची दुसरी व्याख्या पैसा होती.

एके दिवशी ज्या मित्राबरोबर पार्टनरशिप मध्ये बिझनेस सुरू केला होता त्याने मला फसवलं.
एका शिपिंग कंपनीमध्ये आम्ही इन्व्हेस्ट करणार होतो. आधीच्या कंपनीच्या अनुभवामुळे मी तेव्हा लगेच दुसऱ्या कंपनीत पैसे टाकण्यास तयार होतो.
माझे जवळजवळ 50% पैसे मी त्या शिपिंग कंपनीत इन्वेस्ट केले आणि माझे सगळे पैसे घेऊन तो पळून गेला.

काही दिवस माझा या गोष्टीवर विश्वास बसेना आणि जेव्हा बसला तेव्हा माझे डोळे खाडकन उघडले.
त्यावेळेस ठरवलं की या प्रदेशाला रामराम करायचा आणि जेवढे काही पैसे आहेत ते घेऊन भारतात परतायचं.
तसाच भारतात आलो. मुंबईत पोचलो काय करायचं हे तेव्हा ठरवलं नव्हतं पण दोन चार बिझनेस करायचे हे नक्की होते.
ते दोन तीन बिझनेस करता करता, ऍडव्हर्टाइजमेंट फर्म ची कल्पना सुचली आणि त्यात ही कंपनी उभारली.

नशीबाने साथ दिली आणि कंपनी भरपूर पुढे आली. हे सगळं होत असताना मी आतल्या आत बदलत होतो. प्रचंड विश्वासाने आणि संयमानं स्वतःमध्ये अनेक बदल घडवून आणले. सगळे चुकीचे मार्ग सोडले, सतत फक्त चांगले करण्यासाठी कष्ट घेतले आणि म्हणतात ना आपण असे ठरवले की सगळे आपल्या मनासारखे होते.

कंपनी खूप मोठी झाली परिवार वाढला. मला बिझनेस मध्ये पहिल्यापासून रस होता त्यामुळे या कंपनीची अनेक ऑफिसेस मी भारतात उघडली. माझी प्रगती पाहून माझा जो विश्वासघात केलेला मित्र होता तो परत आला आणि त्याने माझ्याकडे कंपनीत परत जॉईन होण्याची इच्छा व्यक्त केली. पण तेव्हा मला त्याचा कावा माहिती होता आणि मी पूर्णपणे त्याला दुर्लक्षित केले.
त्याने अनेक कुरघोडी करण्याचा प्रयत्न केला पण मी त्याला पुरून उरलो. माझे घेतलेले जे पैसे होते त्यातले कुठलेच पैसे शिल्लक ठेवले नव्हते त्यामुळे त्याला मुंबईत येण्याकरता मी माझ्या ओळखीने बंदी घालू शकलो.

त्यावेळेस एकदा मला शालिनीची आठवण आली होती जर मी तिच्याकडे गेलो तर ती मला दुर्लक्ष करेल का असे मला वाटलं म्हणून मनाला समाधान देण्यासाठी जिथे तिला मुंबईत सोडलं होते त्या जागेत गेलो होतो पण शालिनी तेव्हा तिथे नव्हती आणि कोणाला तिची माहिती पण नव्हती.
आता त्या घटनेला जवळजवळ अकरा वर्ष झाले असतील आणि या काळात मी पूर्णपणे बदललो.
मी मोठा सर झालो.मी आदरणीय व्हायला लागलो.
मी सगळ्यांसाठी खूप चांगला आणि रिस्पेक्टेबल ठरलो. ही इमेज मला ठेवण्याकरता मी फक्त स्वतःच्या बिझनेस वरती लक्ष दिले.

आता माझ्या खुप सार्‍या इन्व्हेस्टमेंटस आणीनखूप सार्‍या प्रॉपर्टी आहेत पण स्वतःचा असं कोणीच नाही. मला कायएम प्रश्न पडायचा की मी गेल्यावर या सगळ्याचे काय होईल? पण आज या प्रश्नाचे उत्तर मला असं वाटतं मिळालं आहे" ते शरयूकडे पाहत म्हणाले.

शरयूचा चेहरा तेव्हासुद्धा रागाने धुमसत होता तर आदित्य अतिशय शांतपणे तिथे उभा होता.

तेवढ्यात सरांचा पी.ए. आतमध्ये डोकावलां आणि म्हणाला, "सर तुम्ही जॉईन करणार आहात का?"
तसे सर म्हणाले, "नाही मला वेळ लागेल तुम्ही कंटिन्यू करा."

तू गेल्यावरती सर शालिनी कडे वळून म्हणाले,
" मला तुझं ऐकायचं आहे शालिनी... तू काय केलं इतके वर्षे? तू कुठे होतीस? तुला माझी आठवण आली का माझा राग यायचा का माझ्या नावाने तू खडे फोडायची? बोल शालिनी बोल तू जेवढे बोलशील तेवढं मला मोकळे वाटेल.. मी स्वतः या विचारांनी वेडा झालोय की तू काय केलं असशील... बोल आता..."

क्रमशः
©® अमित मेढेकर

🎭 Series Post

View all