Login

दुभंग (भाग-३ अंतिम)

नात्यातील अंतर स्वतःच वाढवून त्यात दुभंग निर्माण करणाऱ्या अग्निशची कथा
जलद लेखन स्पर्धा - २०२५

विषय:- नात्यातील अंतर

शीर्षक:- दुभंग

भाग:- ३ (अंतिम)

फिल्म पूर्ण झाल्यानंतर अग्निश तेजस्वीला  म्हणाला,"थॅंक्यू सो मच, जान. तुझ्यामुळे माझं ड्रीम प्रोजेक्ट असलेली फिल्म पूर्ण झाली. आता तू तुला हवा तो निर्णय घेऊ शकतेस. इथून पुढे तुला काम करायचं की नाही ते.‌ पण त्या राजबरोबरची मैत्री मला चालणार नाही."

त्याने शेवटचे वाक्य अगदी निक्षूनपणे सांगितले. जे तेजस्वीला रूचलं नाही.

आधी आनंदाने व नंतर तो थोडा रागात असल्यागत त्याचा स्वर होता.

"अहो, हे काय बोलतात तुम्ही? राज माझा चांगला मित्र आहे. माझ्यामुळे त्याने ही पूर्ण फिल्म पूर्ण करायला मान्य केले होते आणि आता तुम्हीच म्हणतात की मी त्याच्याशी बोलायचं नाही. कुठलाही संबंध ठेवायचं नाही असं नाही होणार. का असं बोलताय तुम्ही? " ती नाकपुड्या फुगवत म्हणाली.

"तुला म्हणालो ना मी, मला चालणार नाही म्हणजे चालणार नाही. पण हा तुला जर माझ्यासोबत राहायचं असेल तर तुला त्याच्याशी संबंध तोडावे लागतील." तो रागाने डोळे मोठे करून म्हणाला.

"पण का?.." ती डोळ्यात पाणी आणत म्हणाली.

"मी सांगते म्हणून. तू मला प्रश्न विचारायचे नाहीस." तो त्वेषाने बोट नाचवत म्हणाला.

"अहो पण.." ती पुढे काही बोलणार तोच तिचे बोलणे मध्येच तोडत तो तिच्यावर गरजला," विषय संपला म्हणालो मी, संपला म्हणजे संपला. याच्यावरती कोणताही वाद करायचा नाही, समजलं." 

"ओह ! आता आलं लक्षात माझ्या. राजवर तुम्ही जळता. आमची चांगली मैत्री तुमच्या डोळ्यात खुपते. तुमच्या मनात आधीपासूनच त्याच्याविषयी रोष आहे, हे तर मी विसरूनच गेले होते की.‌ कितीही चांगले नाते असले तुम्ही त्यात खोटंच काढणार. त्याला मी तरी काय करणार?  ठीक आहे तुम्ही म्हणताय तर तुमच्या मनासारखा होईल ; पण एक लक्षात ठेवा इथून पुढे मी तुमच्या कुठल्याही फिल्ममध्ये काहीही अगदी जरी झालं तरी, काही सांगितलं तरी मी काम करणार नाही. दॅट्स फायनल ! " तीही रागाने पेटून त्याच्या डोळ्यांत जळजळीत कटाक्ष टाकत म्हणाली‌ आणि मानेला झटका देत तोऱ्यात तिथून निघून गेली.

तेजस्वीने तिचा निर्णय‌ सुनावल्यावर तो एकदम शांत झाला. त्यालाही असेही पुढे ती कुठल्याही फिल्ममध्ये नकोच होती ; पण त्याला कुठे माहित होतं की त्याला आता प्रत्येक पावलावर तिची गरज पडणार होती.

त्या फिल्मसाठी राज आणि तेजस्वी यांना दोघांनाही बेस्ट ॲक्टर, ॲक्टरेस आणि अग्निशला बेस्ट डायरेक्टरचा अवाॅर्ड भेटला. अग्निश खूप हवेत होता. त्याला अर्ध जग जिंकल्यासारखं वाटत होतं. त्याच्याकडे आता अक्षरशः चित्रपटांची रांग लागली. त्यानेही कुठलाही विचार न करता आणि वेळ न घेता सगळे चित्रपट करण्यासाठी घेतले. पण प्रत्येक निर्मित्याला प्रत्येक चित्रपटांमध्ये तेजस्वीच हीरोइन म्हणून हवी होती.‌ मग आता प्रश्न हा होता की ती सोबत काम करेल का ?

अवार्ड मिळण्याच्या धुंदीत त्याने भरपूर ड्रिंक करण चालू केलं होत.‌ एकदा असाच मद्यधुंद अवस्थेत तो घरी आला. घरी आल्यावर त्याने तिला जवळ घेतलं ; पण तिला आता त्याची ती जवळीक किळसवाणी वाटल्याने आवडली नाही.‌ त्याच्या तोंडाचा दारूचा घाणेरडा वास तिला सहन झाला नाही. तिने नाकाला हात लावला.‌

"तुम्ही खूप ड्रिंक केलेले आहात. आपण उद्या बोलूया. सोडा मला." तिला त्याच्या वागण्यात वासना दिसू लागल्याने तिने मनात उचंबळून आलेल्या रागावर कंट्रोल ठेवत स्पष्ट स्वरात त्याच्यापासून लांब जात म्हणाली.

"तू माझी बायको आहेस. मला का नाही म्हणतेस तू? अजून एक उद्यापासून तू माझ्यात प्रत्येक फिल्ममध्ये काम करणार आहेस. मला नाही म्हणायचे नाहीस तू." लांब जाणाऱ्या तिला खसकन जवळ ओढत तिचा जबडा त्याच्या राकट पंजात दाबून धरत तो तिच्यावर दरडावत म्हणाला.

तिने सगळे बळ एकवटून त्याला दूर ढकलले. तो नशेत असल्याने दोन पावलं मागे गेला. रागारागाने तिच्याकडे पाहत धावून येत तिच्या हात उचलणार तोच तिने त्याचा हात हवेत पकडला आणि जोरात झटकत रागाने थपथपत म्हणाली," खबरदार, जर पुन्हा माझ्यावर हात उचललात तर.‌"

तो डोळे उघडझाप करत मागेपुढे डुलत लाल डोळ्यांनी तिला पाहत होता.‌

"वा ! खूप चांगल आहे हे. जेव्हा पाहिजे तेव्हा तुम्ही स्वतःसाठी माझा वापर करून घेतात आणि जेव्हा नको असेल तेव्हा फेकून देता. मी कोणती वस्तू किंवा खेळणी नाही.‌ मलाही मन आहे, भावना आहेत. तुमच्यावर मनापासून प्रेम करत होते मी म्हणून आतापर्यंत सगळे‌ सहन केलं ; पण आता नाही." तिने आत्तापर्यंत दाबून ठेवलेली भडास काढली. रागात तिचा उर धपधपत होता.

"खूप माज आलाय काय तुला? जा गं जा.  तुझ्यासारख्या छप्पन बघितलेत मी. तू काय सहन केलेस मला ! मी सहन करत होतो तुला इतक्या दिवस. साधं एक मुलं देऊ शकली तू? " तो कुत्सित  हसत म्हणाला.

त्याने तिच्या वर्मावर घाव घातला. त्यामुळे तिला खूप वाईट वाटले. ती रागात डोळ्यांतील अश्रू उलट्या हाताने पुसली आणि रूममध्ये जाऊन काही पेपर घेऊन आली. ते त्याच्या अंगावर फेकले.

नाक वर ओढत रडत ती म्हणाली, " मी मूल देऊ शकले नाही की तुम्ही? हे रिपोर्ट सांगतात. तुमचा विचार करून मी गप्प बसले. सगळं स्वतः वर ओढून घेतलं, पण तुम्ही तर माझ्या मातृत्वावरच बोट ठेवलंत. चांगलं फळ मिळाले मला. तुम्ही म्हणताय तर बोलवा मग त्या छप्पनजणींना आणि करा तुमची फिल्म. मी आता तुमच्या फिल्मच काय तुमच्या आयुष्यातही राहणार नाही. आता आपल्या नात्यातील अंतर वाढत गेलाय. एक दुभंग पडलाय, दरी निर्माण झाली. जे परत कधी भरून निघणार नाही. पुन्हा हे नात जोडण्याची तीळ भरही जागा नाही आणि मलाही रस नाही. गुड बाय, मिस्टर अग्निश."

त्याच्यावर नशेचा अंमल होता. तिने त्याच्या पुरूषातत्त्वावर बोट उचलले होते हे त्याला सहन झाले नाही.

"जा, जा, मलाही गरज नाही तुझी. गेट आऊट फाॅर्म माय लाईफ ! " तो चावताळून म्हणत रागात तिचा दंड धरून त्याने तिला दाराच्या दिशेने ढकलले.

ती धडपडत उठली. त्याला रागात पाहत रातोरात घर सोडून निघून गेली.

सकाळी जेव्हा अग्निशला जाग आली तेव्हा सगळ्या घरभर तो तेजस्वीला शोधत होता ; पण ती त्याला कुठेच दिसली नाही. त्यामुळे त्याने नोकरांना विचारले तेव्हा त्यांनी सांगितले की मॅडम रात्रीच कुठेतरी निघून गेल्या आहेत.

आता मात्र त्याचे धाबे दणाणले.

आपण रात्री‌ नशेत वाट्टेल ते बोललो‌ हे त्याच्या लक्षात आले ; पण आता खूप उशीर झाला होता.  त्याच्या नात्याल्या अंतर पडून दुभंग पडले होते. त्याने स्वतःच स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारून घेऊन खूप मोठं नुकसान करून घेतलं होतं.‌ जे कधीही भरून निघणार नव्हतं.

समाप्त-

नातं दोरीसारखं असतं.‌ ताणलं की तुटतं. एकदा तुटली की परत जोडणे फार अवघड असतं.

जयश्री शिंदे

प्रस्तुत कथा पूर्णतः काल्पनिक आहे. जीवित अथवा मृत व्यक्तीशी काहीही संबंध नाही. तसे आढळून आल्यास तो निव्वळ योगायोग समजावा.


0

🎭 Series Post

View all