मला तुझ्यापासून वेगळं व्हायचं आहे." राहुल आर्याला म्हणाला.
"काय? अरे, आत्ता तर आपलं लग्न झालंय. फक्त तीन महिने झालेत. तू चेष्टा करतोयस ना? पण तुझ्या चेहऱ्यावर तसं काहीच दिसत नाहीय." आर्या राहुलच्या जवळ येत म्हणाली.
"मी अजिबात चेष्टा करत नाहीय. मला खरंच डिव्होर्स हवा आहे." राहुल अस्वस्थपणे फेऱ्या मारत होता.
"पण का? आपला संसार सुरळीत चालू आहे. गेली पाच वर्षे आपण एकमेकांना ओळखतो. सगळं पारखूनच लग्न केलंय आपण. मान्य आहे, तुझ्या घरी मान्य नव्हतं. पण आता आपलं लग्न झालंय. त्यांना मान्य करावंच लागेल. हो ना?"
"हो. पण आईला मान्य नाहीय. तिचं म्हणणं आहे की, मी तुला डिव्होर्स द्यावा आणि तिच्या पसंतीच्या मुलीशी करावं."
"अजूनही तेच? मग लग्न का केलंस माझ्याशी?" आता मात्र आर्या चिडली. "इतक्यात आपलं प्रेम विसरलास? आपण एकत्र घालवलेले क्षण विसरलास? तुला माहिती आहे, माझ्या मागे -पुढे कोणी नाहीय. आई होती तोवर ठीक होतं. आता मी एकटी कशी राहू? तू तुझ्या आईला कनव्हींस कर. काहीही कर. खरं मी डिव्होर्स देणार नाहीय. माझं सर्वस्व अर्पण केलंय रे मी तुला." आर्याचे डोळे भरून आले.
"गेले दोन महिने मी आईला कनव्हींस करतोय. पण ती ऐकतच नाहीय. मी तुझ्या घरी राहतोय हेही तिला मान्य नाहीय. निदान तू तरी ऐक. " राहुल चिडून म्हणाला. आर्याही चिडली आणि दोघांचं कडाक्याचं भांडण झालं. राहुल ऐकायला अजिबात तयार नव्हता. डोकं सुन्न झालेली आर्या कितीतरी वेळ तशीच बसून होती. राहुल सामान घेऊन आपल्या घरी निघून गेला, हे तिला बऱ्याच उशीरा लक्षात आलं.
पुढचे तीन दिवस राहुलचा काहीच पत्ता नव्हता. तिने खूप फोन केले, पण तो फोनही उचलत नव्हता. अखेर आर्या हिंमत करून राहुलच्या घरी पोहोचली. तिला पाहताच तूच माझ्या पोराला नादाला लावलंस, असं म्हणत ज्योती ताईंनी आकांड - तांडव केला. राहुल फक्त दूर उभा राहून बघत होता.
आर्याने सगळं ऐकून घेत हळुवार ज्योती ताईंच्या हाताला धरून खाली बसवलं. तशा त्या शांत झाल्या.
"तुम्हाला मी आणि राहुल एकत्र राहायला नको आहे?"
"मुळीच नाही." समोरून ठामपणे उत्तर आलं
"कारण?"
"मला तू पसंत नाहीस. मी नको म्हणत असताना देखील त्याने तुझ्याशी लग्न केलं. माझ्या पसंतीच्या मुलीशी लग्न करावं हा माझा हट्ट आहे, इच्छा आहे आणि यात बदल होणार नाही. त्याने माझं ऐकल नाही तर तुमचा संसार सुखाचा होणार नाही. सांगून ठेवते." ताईंच्या डोळ्यात चीड होती, राग होता. आर्याने अपेक्षेने राहुलकडे पाहिलं. पण त्याने मान खाली घातली. आर्या समजून चुकली, या संसाराला आता काहीच अर्थ नाही. "आपण वेगळं होऊ." मोठ्या मुश्किलीने डोळ्यातलं पाणी अडवत तिथून निघून आली.
उद्विग्न मनःस्थितीत असलेल्या आर्याने वाटेतले सगळे सिग्नल तोडले म्हणून एक ट्रॅफिक पोलिस तिच्या मागे घरापर्यंत आला. "तुम्ही सगळे सिग्नल तोडून आलात मॅडम. शिक्षा ही होणारच. दंड काढा."
आर्याने पाचशेची नोट काढून त्या पोलिसाला दिली.
"आत्ताच माझं लग्न मोडलयं. घरचा नकार असताना माझ्याशी लग्न करून तीन महिने माझ्यासोबत राहून आता फक्त आई नाही म्हणते म्हणून लग्न मोडणाऱ्या नवऱ्याला कोणती शिक्षा देणार? असा कोणता कायदा आहे का?" तिच्या या प्रश्नावर त्या पोलिसाकडे उत्तर नव्हतं.
"आत्ताच माझं लग्न मोडलयं. घरचा नकार असताना माझ्याशी लग्न करून तीन महिने माझ्यासोबत राहून आता फक्त आई नाही म्हणते म्हणून लग्न मोडणाऱ्या नवऱ्याला कोणती शिक्षा देणार? असा कोणता कायदा आहे का?" तिच्या या प्रश्नावर त्या पोलिसाकडे उत्तर नव्हतं.
आर्या घरी आली आणि सगळचं उदास, भकास वाटू लागलं. तिला आईची तीव्रतेने आठवण झाली. 'आज ती असती तर राहुल असं वागलाच नसता आणि समजा वागला असता तर त्याची खैर नव्हती. आईचा किती विश्वास होता त्याच्यावर!'
नेहमीप्रमाणे तिचा डब्बा आला. पण जेवायची इच्छाच नव्हती. राहुल सोबत घालवलेले मोहक, सोनेरी क्षण घरात जिथं - तिथं आपलं अस्तित्व दाखवत होते. पुढचे दोन दिवस आर्या उपाशी होती. डब्बा पोहोच करायला आलेला मुलगा अखेर वैतागून म्हणाला, "ताई, जेवणार नसाल तर डब्बा बंद करतो. हे जेवण बनवायला कष्ट लागतात. अन्न असं रोज वाया गेलं तर कसं व्हायचं?" तेव्हा कुठे आर्याच्या पोटात दोन घास गेले.
अजूनही राहुलचा फोन येईल या आशेवर गेले तीन दिवस ती घरातच होती. ऑफिसमधून सारखे फोन येत होते. पण तिची उचलायची इच्छाच नव्हती. सगळ्या खोल्यांत पसारा झाला होता. तो आवरायची शुद्ध देखील नव्हती तिला.
अजूनही राहुलचा फोन येईल या आशेवर गेले तीन दिवस ती घरातच होती. ऑफिसमधून सारखे फोन येत होते. पण तिची उचलायची इच्छाच नव्हती. सगळ्या खोल्यांत पसारा झाला होता. तो आवरायची शुद्ध देखील नव्हती तिला.
अचानक फोनची रिंग वाजली आणि राहुलचा फोन असेल असं वाटून आर्याने पट्कन फोन उचलला.
"आर्या?" पलीकडून एका बाईचा आवाज ऐकू आला.
"हं."
"मी उमा मावशी बोलते. तुझ्या आईची मानलेली बहीण! गेल्या पाच वर्षांत आपण भेटलो नाहीय. मला विसरली असशील ना? मोठ्या मुश्किलीने तुझा मोबाईल नंबर मिळाला गं. तुझी आई गेली आणि मला कळालंच नाही. खूप वाईट वाटलं. बाळा, मला भेटायचंय तुला." आर्या मावशीचं बोलणं ऐकून ओक्साबोक्षी रडायला लागली. तिने कसाबसा आपला पत्ता पाठवला आणि तासाभरात मावशी हजर झाली. आई गेल्याचं दुःख ताजं होतं, तोवर लग्न मोडलं. हे ऐकून मावशीला खूप वाईट वाटलं. एकंदर परिस्थिती पाहून उमा मावशीने आर्याला आपल्या सोबत घरी नेलं.
मावशी एकत्र कुटुंबात राहत होती. नवरा, दोन मुलं, दिर -जाऊ, त्यांची मुलं आणि सासुबाई. मावशीच्या सासुबाईंना आर्या आठवत होती. तिच्या लहानपणी त्या बऱ्याच वेळा घरी आल्या होत्या म्हणे. अर्थात आर्याला हे आठवत नव्हतं.
उमा मावशीने आल्या आल्या सगळ्यांना सांगितलं, आर्या आता इथेच राहणार आहे. आपली दोन मुलं, नवरा अन् सासुबाई या चौघांना आपल्या खोलीत बोलावून मावशीने आर्याची परिस्थिती समजावली. कोणाची ना नव्हती. पण मावशीची मुलगी कस्तुरीला मात्र हे आवडलं नव्हतं. इतक्या वर्षांत संपर्क नसलेली आपली बहीण अचानक घरी येते काय! आणि आई तिची इथे राहायची व्यवस्था करते काय? "आई, मला हे मान्य नाही. आपल्याला तिचा स्वभाव माहिती नाही. तिच्याबद्दल अधिक - उणी माहिती नाही. अचानक तिला घरात घ्यायचं?"
क्रमशः
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा