Login

एक सल - भाग २

Middle Age Love Story
रिमझिम गिरे सावन - एक सल -२

(विषय -खेळ नशिबाचा)

लेखिका - स्वाती बालूरकर, सखी

" विदुला खरच, आपण मुंबईच्या पावसात भिजायचं ठरवलं तर आपली जोडी अमिताभ मोसमी सारखीच जोडी दिसणार. . तू काय उंचीला पाच एक वगैरे असशील, म्हणजे फोटो वरून अंदाज आणि मी पाच अकरा. . . ये ना मरीन ड्राईव्हला, वरच्या पायरीवरून तू चाल, तुझा हात मी हातात घेऊन चालतो."

विदुलाच्या चेहऱ्यावर या सगळ्या गोष्टींची कल्पना करून एक आनंदाची चमक आली होती.

"कौशिक, किती सुंदर कल्पना रचत आहात तुम्ही ! हे सगळं बोलत आहात तुम्ही, पण मला ऐकायलाही किती छान वाटतं आहे. असं काहीच कधी घडलं नाही हो माझ्या आयुष्यात, म्हणजे मुळात पाऊस कधी रोमँटिक वाटला नाही. मी तशी नेहमी फिरते बाहेर पण त्यांना पाऊस पडला की भलता राग यायचा."

"स्वच्छतेचा भोक्ता न तुझा नवरा, उन्हाळा प्रिय होता बहुतेक त्यांना. माणसांना पावसाचा राग कसा येऊ शकतो? हे मला कळत नाही."

" सगळे तुमच्यासारखे हळवे आणि संवेदनशील नसतात ना ! ."

इतक्यात तिची मुलगी उठली आणि आवाज दिला, “आई काय करते आहेस , मामाचा फोन आहे, घे बरं !”
हॅलो कौशिक मी पुन्हा बोलते , दुसरा कॉल आलाय.
बाय टेक केअर.”

तिने भावाचा फोन घेतला.
“अगं विदू, फोन एन्गेज येतोय म्हणून रियाच्या फोनवर लावला आहे , कशी आहेस तू ?”

“ मी मजेत आहे, तू बोल.”

“यावर्षी राखी पौर्णिमेला तू येतेस की मी येऊ तुझ्याकडे ? ते विचारावं म्हटलं.”
मग थोडावेळ भावाशी गप्पा मारल्या आणि मग घरच्या कामात लागली.
गेल्या वर्षभरात सकाळचा एक मेसेज त्याचा न चुकवता ठरलेला होता. काहीही झालं तरी त्यावेळी यायचाच. तू तिच्या आवडीने उत्तर द्यायची. तिला स्वतः लाच आश्चर्य वाटत होत कारण असं तिला कधीच वाटलं नव्हतं की आयुष्याच्या या टप्प्यावर तिची कुणा अनोळखी पुरुषासोबत अशी मैत्री होईल की मनात काहीही न ठेवता ती मोकळेपणाने बोलू , वागू शकेल.

पाच सहा दिवसानंतर -

संध्याकाळी साडेचार पाच वाजले असतील. अशीच भुरभुर चालू होती. विदुला बाल्कनीत बसून आपल्या टवटवीत फुलझाडांना पाहून आनंदी होत होती. पाहता पाहता पावसाचा आवाज आणि गती वाढली. एकदमच पावसाचा जोर वाढला आणि तो धो धो पडायला लागला, इतका वेळची भुरभुर बंद ! पावसाचं जणू प्रौढ पण प्रगल्भ रूप दिसायला लागलं. पाऊसही कसा कधी लहान बालकासारखा उड्या मारत मनमौजी सारखा पडतो, कधी तो संततधार लागून राहतो, कधी वाऱ्यासंगे तरुणाप्रमाणे डोलतो, उच्छृंखल होती, तर कधी तो मुसळधार पडतो . . . कधी कधी तर दबक्या पावलांनी तो पडतो पण कळत नाही. . . मनात तळाशी जपलेली आठवण फक्त भिजवून जातो.
पावसाला पाहून अचानक मागच्या आठवड्यात त्याच्याशी झालेला संवाद आठवला आणि तिच्या चेहऱ्यावर हसू आला तिने त्याला मेसेज टाकला.

“कौशिक, पाऊस वाढला आहे हो इकडे. . मस्त पडतो आहे !”

लगेच फोन वाजला आणि त्याने तिकडून कॉल लावला.” इकडे पण बाहेर पाऊस आहे. . आणि माझ्या मनातही पाऊस आहे. .ऐकतेस ना विदुला !”

“हो का! अहो कौशिक, बोला .तुम्ही बोलताय आणि मी ऐकत नाही असं होईल का?”

" हम्म. ते पण आहे. विदुला आज या पावसाळी दिवसात तुझ्याकडे एका गोष्टीचे कबुली द्यायची आहे ."
"काय हो ? काय झालं?"

“आपण अशी काय चूक केली असेल म्हणून देवाने आपल्याला एकटं पाडलं असेल ? हा विचार सतत अस्वस्थ करत असतो मला.”

“ असा विचार करू नका, असतात काही गोष्टी लिहिलेल्या! आपण फक्त स्वीकार करायचे. एकटे कुठे आहोत आपण ? आपल्या मैत्रीने तो एकटेपणा भरून काढलाय ना, मग!”

“तू खूप पॉझिटिव्ह आहेस विदुला आणि तुझ्यामुळेच कदाचित मला एकटं राहूनही जगण्याचं बळ मिळत आहे. माझ्या उदास जीवनात तुझ्यामुळे एक सुखाची लहर आलेली आहे. खूप खूप मिस करतो मी तुला.”

“ हो ना! मग निगेटिव्ह बोलायचं नाही. आपले पार्टनर आपल्या सोबत असते तर आपली ओळख सुद्धा झाली नसती. . हो की नाही!”

“ आणि आपणच पार्टनर असतो एकमेकांचे तर? काय सुंदर आयुष्य राहिलं असतं. . !” तो पुन्हा भावनिक झाला होता.

“कौशिक. . अहो. . काय बोलू मी यावर?”

"विदुला, तू माझ्या जीवनाचा अविभाज्य भाग झाली आहेस गं, अगदी न भेटताही!समाजाच्या दृष्टीने आपण काय आहोत, त्याच्याशी मला काहीही देणंघेणं नाही. आपण आपलं मर्यादांमध्ये राहून देखील मनाने एकमेकांशी प्रेम करू शकतो ना ! मी कधीच काही अपेक्षा केली नाही तुझ्याकडून. अगदी तुला एकदा पाहण्याची सुद्धा इच्छा दाखवली नाही. कारण मला त्याची गरजच वाटत नाही. तुझे फोटो पाहतो फेसबुक वर, स्टेट्स वर पण. . . . खरं सांगू , असं शारीरिक आकर्षण नाही, कारण मला वाटतं तुझ्या आत्म्याशी माझं कनेक्शन आहे."

"यावर मला असं काहीच बोलता येत नाही तुमच्यासारखं. मी काय बोलू , कौशिक?"

"बोल ना बिनधास्त! पण खूप हुशार आहेस तू. तुझ्या कबुलीची वेळ आली की शिताफिने टाळतेस. त्यात तुझी चूक नाही. तू ज्या वातावरणात वाढलीस, तुझी जडण घडण कशी झाली त्यावर ही अवलंबून आहे. पण तुझ्या शालीनतेचा मला आदर आहे. अगं, पहा, पावसाचा जोर खूप वाढला आहे इकडे. . वातावरण थंड झालं आहे, मी चहा करतो आहे, दोन कप ठेवलाय !"

"दोन कप ? का हो ?"

"दुसरा कप तुझ्या नावाचा आहे, ट्रे मध्ये ठेवीन. . तुझा एक घोट आणि माझा घोट घेईन!" तो हसला.

" किती गोड बोलत आहात तुम्ही !"

" पण काय उपयोग?” तो मोठ्याने हसला.
“तेच म्हणतोय आपण अगोदर भेटलो असतो तर ? अगदी कॉलेजच्या वयात भेटलो असतो तर काय झालं असतं? का देवाने असा खेळ खेळला असेल आपल्याशी? अगं, मी वेडा झालो आहे तुझ्यासाठी पण नाईलाज आहे. . !"

"कौशिक , या वयात तुम्हाला इतकं सगळं रोमँटिक कसं सुचतं ?"

" वय काय असतं गं? म्हणजे मी पण 55 आहे पण हे काय म्हातारपण नाही, तू पण दोन चार वर्षे लहान असशील. म्हणजे आयुष्यात आपण जे कधी केलं नाही, ते करायचं नाही, असं सुद्धा नाही ना ! आता पहा, लहानपणी मला थोडा अस्थमाचा त्रास होतो त्यामुळे आईने कधीच पावसात जाऊ दिलं नाही ,ती जपत राहिली. पुन्हा तब्येत बिघडू नये म्हणून बायको जपत राहिली. पण बायको कधीपर्यंत जपणार जोपर्यंत ती होती तोपर्यंतच ! अर्धवट वयात कॅन्सर ने ती सोडून गेली. मुलगा बाहेर देशी शिकायला निघून गेला. आता मला अस्थमाचा त्रासही नाही, मग राहिलेल्या गोष्टी आता केल्या तर ? कोण जाणे कुठला दिवस शेवटचा !"

" हेच म्हणते मी , चांगलं बोलता बोलता असं नकारात्मक बोलत जाऊ नका तुम्ही ."

"म्हणून तर म्हणतो . . ये इकडे पावसात भिजूया दोघे, मस्त पकोडे , कांदा भजी बनवूया . . मग नकारात्मक बोलायला काहीच राहणार नाही" तो खूप भावनिक झाला होता.

क्रमशः
0

🎭 Series Post

View all