एक संसार असाही…भाग १०
आपला संस्कारी मुलगा आपल्या बहिणीला वाट्टेल तसे बोलतोय यामुळे वसंतराव भयंकर चिडले होते. मान्य आहे समोरची व्यकी बेजबाबदारपणे वागत आहे.. म्हणून आपण आपले संस्कार विसरायचे का?
“प्रणव sss” वसंतराव कडाडले.
“बाबा!” प्रणव त्यांच्या चेहऱ्यावरचा राग बघून थोडा घाबरला होताच दोन्ही मुलांना वसंतरावांची भीती असायची. कडक स्वभाव त्यांच्या स्वभावात नव्हता पण वेळे प्रसंगी ते कधी कधी कडक होत. त्यांच्या शब्दापुढे अजून बोलायची हिम्मत दोन्ही मुलात अजिबात नव्हती.
“ आत्या आहे ती तुझी.. तिला मानानं बोलव. एवढ्या मोठ्या आवाजात तिच्याशी बोलायची तुझी हिम्मत कशी झाली? ” वसंतराव रागात असताना बाकीचे कोणीही मधे बोलत नसत. आणि आधीपासूनच सर्वांना त्यांच्या रागात तेल ओतायची सवय अजिबात नव्हती. पण एक व्यक्ती होती जीला ते रागात असताना त्या रागात तेल ओतून भडका उडवल्याखेरीज पाणीही गोड लागत नव्हते. ती व्यक्ती म्हणजेच समोर असलेली वसंत रावांची बहीण होती. आणि आपला भाचा लग्नाला नकार देतोय म्हणून ती मुद्दाम हे प्रकरण मोठं करत होती. हे दयमंती ताईंना कळत होतं पण त्या या क्षणी मधी पडू शकत नव्हत्या. कारण आपली नंनद किती खेळी आहे हे त्या लग्न झाल्यापासून ओळखून होत्या. आपण काही बोललो तर पुन्हा या वादाला भलतेच वळण लागेल आणि रागारागात वसंतराव या लग्नाला होकार देऊन बसतील याची चिंता दयमंती ताईंना लागून राहिली होती. पण मुलाच्या मनाविरुद्ध त्या कोणताही निर्णय घेऊ देणार नव्हत्याच.
“माफ कर आत्या…पण मी आज शेवटचं सांगतोय मी या लग्नाला अजिबात तयार नाही. मला नाही हे लग्न करायचं. अजून मला खूप काही शिकायचं आहे माझं करिअर घडवायचं आहे.”
“ इतकचं ना…मग शोध ना नोकरी पण तोपर्यंत आपण साखरपुडा तर उकरून घेऊ शकतोच ना?” आत्त्याला काहीही करून प्रणव जावई म्हणून हवा होता. कारण आपल्या बेअक्कल मुलीला याच घरात राणी सारखं राहता येणार होतं. आणि म्हणूनच प्रणव नाही म्हणत असतानाही त्याच्या होकार नकाराचे मत मनावर न घेता त्या डायरेक्ट लग्न जमवत होत्या. पण प्रणव हुशार होता. आत्याची वाया गेलेली मुलगी आपली सहचारिणी म्हणून त्याला नको होती. अनेकदा आत्या घरी आल्यावर प्रणवशी लग्न या विषयावरच बोलायची. आणि तिचं ते प्रवचन ऐकून बिचारा प्रणव वैतागून जायचा.
“बाबा…मला आत्याच्या मुलीशी लग्न करण्यात अजिबात इंटरेस्ट नाही. मला माझं करिअर सेटल करायचं आहे त्यामुळे हा विषय मी इथेच स्टॉप करतोय. पुन्हा पुन्हा लग्नासाठी आत्याने मल जबरदस्ती करू नये. नाहीतर मी घर सोडून निघून जाईल.”इतकं बोलून तो त्याच्या रूम मधे निघून गेला. कारण आता त्यालाही आत्याच्या वागण्याचा वैताग आला होता. सतत नुसते आपल्या मुलीशी लग्न कर म्हणून ती वैताग आणत असे.
“पाहिलेस दादा.. शेवटी तुझ्या मुलाने माझा आणि माझ्या मुलींचाही अपमान केलाच…काय वाईट आहे माझ्या मुलीत?”
“हे बघ सुमेधा.. तू जरा अतीच करत आहेस असं नाही वाटत तुला?” वसंतरावांना देखील आपल्या बहिणीने वागणे आवडले नव्हते.
“मग काय करू दादा.. तिकडे लेक माझी प्रणवच्या प्रेमात वेडी झालीय. प्रणवशीच लग्न करणार असा हट्ट करून बसली आहे ती. दोन दिवसापासून उपाशी आहे. तुला तिची आपल्या लाडक्या भाचीची काहीच काळजी नाही का?” सुमेधा डोळ्यात खोटे अश्रू उभा करीत बोलल्या. समोरच्याला त्यांच्या डोळ्यातले अश्रू अगदी पाहताक्षणी खरेच वाटले असते. एवढी भारी ॲक्टिंग सुमेधा आत्या करत होत्या.
“ हे बघ सुमेधा आता प्रणव रागात आहे. त्याला तुझी मुलगी अजिबात आवडत नाही. उरला प्रश्न लाडक्या भाचीचा तर तिचं लग्न चांगल्या मुलाशी लाऊन द्यायला तिचा मामा समर्थ आहे. तू उगीच प्रणवच्या मागे लागू नकोस. आता त्याने त्याचा अंतिम निर्णय सांगितला आहे म्हणजे तो त्या निर्णयावर ठाम आहे. आणि उगीचच त्याच्या डोळ्यात तू तुझी प्रतिमा मलिन करून घेऊ नकोस. तू एकुलती एक आत्या आहेस…आत्या आणि भाच्याचे हे प्रेमळ नाते असेच वृद्धिंगत होईल अस वाग..” वसंतरावांनी शांतपणे आपल्या बहिणीला समजावलं. पण सामोरची व्यक्ती आपलेच खरे या उक्तीने वागणारी असल्याने त्यांच्या बोलण्याचा परिणाम कीचिंत होणार का हाच सगळ्यात मोठा यक्ष प्रश्न उभा होता.
त्या दिवसापासून प्रणव घरात कोणाशीच बोलत नव्हता. अगदी अबोल होता. आणि सुमेधा आत्याही कोणाशी बोलली नव्हती. त्यांच्या लेकीन दुसऱ्याच दिवशी सुसाईड करण्याचं नाटक करून वातावरण पुन्हा तंग करून ठेवलं. ते सगळ निस्तरून होतात न होतात तोच प्रणव हा देश सोडून परदेशात जायला निघाला. कारण इथ राहिलं तर त्याची आत्या त्याला सुखाने जगू देनार नव्हतीच.. त्यामुळे शिक्षणाच्या निमित्ताने आपण परदेशात जाणार आहोत एवढं सांगून तो निघून गेला.
एका आलिशान बंगल्यात एक फ्रेम हातात घेऊन तो भरल्या डोळ्यांनी त्यातल्या त्या दोन व्यक्तींना पहात होता. प्रेमाने त्या फ्रेम वरून हात फिरवणे सुरूच होते.
अंदाजे पंचवीस सव्वीस वर्षाची एक स्त्री त्याच्याजवळ आली आणि त्याला पाठीमागून मिठी मारत बोलली.
“प्रणव…आई बाबांना मिस करतोय ना?”
“हम्म्म खूप…”
“एवढीच आठवण येतेय तर आपण जाऊया का भारतात?” गौरी म्हणाली.
“आता खूप उशीर झालाय गौरी.. आता आई बाबा मला नक्की माफ करतील अस नाही वाटत मला..”प्रणव बोलला.
“ प्रणव ते जन्मदाते आई बाबा आहेत तुझे…ते तुझ्यावर जास्त दिवस राग धरूच शकत नाहीत. गौरी समजावत बोलली.
“ तरीही भीती वाटते मला.. मी त्यांच्यावर रागावून नव्हतो दूर आलो होतो.. फक्त आत्याच्या मुलीशी लग्न करायचं नव्हत म्हणून मनात नसतानाही इथे सातासमुद्रापार येऊन राहिलो.आता माझं लग्न झालंय मला..
तो काही बोलणार तोच एका लहान मुलाचा आवाज कानावर पडला
“आई बाबा...” नकुल ओरडत घरात आला.
छोटा नकुल झोपेतून ओरडत येत होता. हा नकुल प्रणव आणि गौरीचा मुलगा तिसरीत शिकतोय.
“बाबा मला आजोबाशी बोलायचं आहे.”
“ बाळा आता आजोबा दुपारचे झोपले असतील..” प्रणव त्याला समजावत बोलला.
“नाही बाबा तुम्ही मला प्रॉमिस केलं होतं आज अजोबाशी बोलायला द्याल म्हणून.” नकुल आठवण करून देत बोलला.
“प्रणव आपला लेक ही इंडियात जायला उत्सूक आहे.. द्या त्याला कॉल लाऊन बोलू दे.. त्याच्या लाडक्या अजोबांशी.” गौरी बोलली.
“अगं पण…”
“प्लीज…”गौरीने सगळं ठीक होईल अस नजरेनेच सांगितलं.
प्रणवने थरथरत्या हाताने फोन लावला.. आता तोही घाबरला होता. पलीकडून फोन उचलला गेला. प्रणव हॅलो बोलणार तोच नकुल फोन घेऊन पळाला.
“हॅलो आजोबा ssss ”
फोनवर आजोबा म्हणणाऱ्या त्या निरागस नातवाचा गोड आवाज कानावर पडताच वसंतरावांचे डोळे भरून आले…