एक संसार असाही…भाग 1
सूर्यदेव डोक्यावर आले होते. अजूनही दामिनी झोपून होती. माहेरी आलेली दामिनी गेले आठ दिवस अगदी निवांत होती. केंव्हाही उठायचं, आयते मिळालेलं गिळायचं, टि.व्ही बघायची अन् मस्त ताणुन द्यायचं. असा तिचा गेले आठ दिवस दिनक्रम सुरू होता.
लग्नाला वर्ष झालं असेल. नवरा नशिबाने मुंबईत एका कंपनीमध्ये नोकरीला असल्याने कशाची काळजी नव्हती. पण तिच्या नवऱ्याची कामाची वेळ कधीही जा आणि कधीही या अशी असल्याने नवऱ्याला लागणारे साहित्य, जेवणाचा डबा बनवताना तिची दमछाक होई. घरात सासू सासरे आणि एक अविवाहित दीर होता. तो सध्या शिकत असल्याने त्याच्या लग्नाला अजून बराच वेळ होता.
“अहो” दयमंतीताईंनी आपल्या नवऱ्याला अर्थातच दामिनीच्या बाबांना हाक मारली.
“बोल दयमंती काय आणायचं आहे का दुकानातून?”
“नाही ओ, पण आपली दामू गेले आठ दिवस पहाते आहे अशी आळसावलेली असते. लवकर उठणे नाही. सगळ काही जाग्यावर हवं असते. काळजी वाटते या पोरीची”
“अग, दयमंती पोर चार दिवस माहेरी आलीय तिला कस राहायचं आहे तसं राहू दे ना. तिकडे बिचारी कामाने दमून जात असेल. अखं घर बिचारी एकटीच सांभाळते. तिची सासू एका कामाला हात लावत नाही पाहिलं आहेस ना?” वसंतराव आपल्या बायकोला समजावत बोलले.
“बरोबर आहे तुमचं पण जर आपली लेक सासरी अशी वागत असेल तर..? मला तिची खूप काळजी वाटते ओ बाकी काही नाही. ” दयमंतीताईंना वेगळंच टेन्शन आलं होतं.
दयमंतीताईंच्या शेजारच्या मैत्रिणीच्या मुलीचं देखील दामिनी सोबतच लग्न झालं होतं. तिला अवघ्या तीन महिन्यातच सासरच्या लोकांनी मुलीला काहीही येत नाही या कारणाने तिला माहेरी पाठवलं होतं. आणि ती मुलगी आता वेड्यासारखी करत असायची. गावातल्या बायका तर ती वेडी झालीय म्हणून काही बाही बोलायच्या. ते कायम दयमंती ताईंच्या कानावर यायचं. आणि दयमंती ताईना खूप टेन्शन येई. कारण त्यांचीही विवाहित लेक सध्या मुंबईसारख्या मोठ्या शहरात नांदत होती. एक वर्ष होऊनही तिच्या सासरच्या मंडळींनी आतापर्यंत एकही तक्रार केली नव्हती त्यामुळे त्या निर्धास्त होत्या. दामिनी आठवड्यापूर्वी माहेरी येऊनही एक काम करायला मागत नव्हती त्यामुळे दयमंती ताईंना शंका येऊ लागलेली. आपली मुलगी जर सासरी असच वागत राहिली तर शेजारच्या कोमलसारखी तिचीही अवस्था होऊन जाईल याची चिंता त्यांना स्वस्त बसू देईना.
असेच चार दिवस निघून गेले. पंधरा दिवस होऊनही दामिनीच्या सासरच्या लोकांचा एकही फोन आला नव्हता. त्यामुळे दामिनीच्या बाबांनाही आता काळजी वाटू लागलेली. चार दिवसांपूर्वी दामिनीच्या आईने बोलून दाखवलेली खंत आता त्यांनाही खरी वाटू लागली होती. त्यांच्या जावयाचा एकही फोन न येणं, आणि आपली मुलगी आपल्या सासरच्या लोकांविषयी एका शब्दाने न बोलणे यात नक्कीच काहीतरी होतं जे आपली मुलगी आपल्या माहेरच्या लोकांना सांगत नव्हती. आणि त्यामुळेच त्या बिचाऱ्या नवरा बायकोचे टेन्शन अधिक वाढू लागलेलं.
आज या विषयी दामिनीशी बोलायचंच असा निर्धार करून वसंतराव शेतावररून लवकर घरी आले होते. पंधरा दिवसउलटून देखील आपल्या मुलीच्या मनातील आपण काहीही जाणून घेऊ शकलो नाही या गोष्टीचं त्यांना वाईट वाटत होतं.
“दामू!” वसंतरावांनी हात पाय धुवून दामिनीला हाक मारली. पण सुस्तावून झोपलेल्या दामिनीने आपल्या बाबांच्या बोलण्याकडे साफ दुर्लक्ष केलं.
“दामू!” कदाचित तिने ऐकलं नसेल म्हणून वसंतरावांनी तिला पुन्हा हाक मारली.
“काय कटकट लावलीय बाबा?” दामिनी रागात म्हणाली.
“दामू…अग् बाबा जेवायला बोलवत आहेत त्यांना अस उलट उत्तर देणार आहेस?” दयमंती ताईंना दामिनीचं वागणं अजिबात आवडलं नाही.
“माझं मी जेवेन नंतर तुम्ही जेवून घ्या.”दामिनी कुस बदलत बोलली.
“दामू मला तुझ्याशी बोलायचं आहे. चल तोंड धुवून जेवून घे…आपण नंतर निवांत बोलू.” वसंतराव मोठ्या आवाजात बोलले.
वसंतरावांचा जेव्हा जेंव्हा आवाज वाढत असे तेंव्हा तेंव्हा दामिनी घाबरून जायची.लहानपणापासून ती धाकात वाढली होती. वडील मोठे शैक्षणिक अधिकारी त्यामुळे अभ्यासात दामिनी हुशार होती. आणि तिच्यावर चांगले संस्कार देखील दयमंती आणि वसंतरावांनी केले होते. पण मुलगी आपल्या आयुष्यात जसजशी मोठी होऊ लागते तसतशी ती लग्न करून दूर जाणार या जाणिवेने कितीही धाकात आपण मुलीला वाढवलं तरी कधीतरी प्रेम अधिक होऊ लागतं. मुलगी मोठी झाली की प्रेम आणि धाक या तराजूच्या वजनाच्या दोन्ही बाजुपैकी प्रेम वरचढ होऊ लागतं.
दामिनी वडिलांच्या आवाजाने थोडी घाबरलेली होती. ती सरळ फ्रेश होवून जेवायला बसली. वसंतरावांचा एक नियम होता. ते कितीही श्रीमंत असले तरी जेवण करताना जमिनीवर बसून एकत्र जेवायचे. दयमंती ताईंनीदेखील लग्न झाल्यापासून आजपर्यंत वसंतरावांच्या या सवयीला मनापासून जपलं. त्या देखील त्याचे अनेक नियम काटेकोरपणे पाळत असत.
“दामू तुझ्या आवडीची शेपूची भाजी बनवली आहे तुझ्या आईने पोटभर खा.”वसंतराव आपल्या लेकीला प्रेमाने सांगत होते.
“मला नकोय शेपू” दामिनी मोठ्यानेच म्हणाली.
“अग तुला शेपू आवडते ना खूप?”
“ मला हल्ली काहीच आवडत नाहीय..ना कुठल्या भाज्या,ना कुठले काम, आणि तुम्ही मला दिलेलं ते भिकारी सासर सुद्धा अजिबात आवडत नाहीय” तीच्या बोलण्यात एक वेदना आणि प्रत्येक गोष्टीचा तिरस्कार होता.
दामिनी अशी का वागत आहे पाहूया पुढील भागात