Login

एक संसार असाही.. भाग 3

संसार म्हणजे खेळ नव्हे....
एक संसार असाही…भाग 3

आपली लेक वाट चुकली तर नसेल ना? या विचाराने वसंतरावांना घाम फुटला होता..

“ मग ती घरी आल्यानंतर वाद झाले का?” वसंत राव अतिशय शांत राहून विचारून घेत होते.

“नाही मी तिला पाहिलं हे नाही सांगितलं. कारण आपल्यावर वॉच ठेवतोय असा तिचा समज झाला असता म्हणून मी तिला याबद्दल काहीही विचारलं नाही.”

“मग दामिनी इकडे का निघून आलीय? काही का बोलत नाहीय?”

“असेच चार दिवस गेले या चार दिवसात तिचं फोन वापरणे अधिक वाढलं. त्यामुळे मला संशय येऊ लागला. पण मी गप्प होतो. तिचं स्वयंपाक करण्यातही लक्ष नसायचे. स्वयंपाक करतानाही हीचे फोन मधे चॅटिंग सुरूच असायचे. यामुळे एक तर भाजी खारट व्हायची किंवा पोळी खरपून जायची. अन्नही गोड लागत नव्हते. त्यामुळे एकदा आईने भाजीत मीठ जास्त पडलं म्हणून चार शब्द बोलले. तेच तिला लागलं. मी तेंव्हा जॉबवर होतो. ही गोष्ट मला माझ्या भावाकडून कळली. मी तिला फोन करून समजावलं. मला तिचा कितीही राग आला तरी खूप प्रेम करतोय मी तिच्यावर. पण दामिनी अजिबात ऐकून घेईना मग मात्र मी हाफ डे घेऊन घरी परतलो. तेंव्हा दामिनी रूम मधे होती. थोडी रडली होती. तिचे डोळे लाल झाले होते ते पाहून मला माझ्या आईचा राग आला. पण तीही तिच्या जागी बरोबर होती. ”

“दामिनीला तुमच्याकडून मारहाण झाली आहे का? हा प्रश्न विचारण्याचा उद्देश हाच आहे की, ती आल्यापासून अगदी गप्प गप्प आहे. ना कोणाशी बोलत आहे,ना कोणाला भेटायला बाहेर पडली आहे.”

“ मी ऑफिसमधून आल्यावर तिला समजवायला रूम मधे गेलो तेंव्हा ती फोन मधे व्हिडिओ कॉल वर कोणाशी हसून हसून बोलत होती. बाहेर सगळे टेन्शन मधे होते. मीही हिला वाईट वाटू नये म्हणुन हाफ डे घेऊन घरी परतलो. आणि ही मात्र मस्त कोणाशी तरी हसून हसून बोलत होती. मग राग येणारच ना? मी फोन हिसकावून घेतला तोवर पलीकडून फोन बंद झाला होता. मी याचा जाब विचारला तेंव्हा दामिनी माझ्याशी वाद घालू लागली . वादाचे एवढे मनावर घेतले नसते बाबा पण तिने माझी लायकी काढली अन् आपसूकच माझा हात तिच्यावर उचलला गेला. पण मी खर सांगतो अगदी आई शपथ मी तिला मारलं नाही.”
अमनच्या बोलण्यात खरेपणा होता. आणि काय झालं ते तो स्पष्ट सांगत होता. त्यामुळे त्याच्यावर संशय घेणं वसंतरावाना योग्य वाटले नाही.

“संसार म्हटल की, इकडचे तिकडचे होणारच ती नेमकी कोणाला भेटली? कोणाशी बोलत होती? याची उत्तरे आता तीच देईल. पण आज तिच्या आवडीची शेपूची भाजी बनवली होती तिच्या आईने तरी तिने त्या भाजीला हात देखील लावला नाही अस का?”

“बाबा, मी म्हटल ना पोळ्या खरपल्या होत्या भाजी खारट झाली होती म्हणून…त्या दिवशी तिच्या आवडीची भाजी आईने करायला लावली होती. पण फोनच्या नादात तिने त्या भाजीत दोन तीन वेळा मीठ टाकलं असावं. जेंव्हा सर्वजण जेवायला बसले तेंव्हा ती भाजी कुणीही खाल्ली नाही. कारण एकतर आई बाबांना मीठ कमी लागतं…भाऊही जेमतेम मिठाची भाजी खातो…राहिला प्रश्न माझा तर मी ऑफिस मधेच जेवतो. त्यामुळे आईने रागात चार शब्दात कानउघडणी केली अन् तिला तेच शब्द लागले. अन् दामिनी तडक बॅग भरून गावी आली. तेंव्हा मी इथे नव्हतो. ती घराबाहेर जातेय कळल्यावर मी तातडीने निघालो पण,मी बसस्टॉप वर पोहाचन्या आधीच दामिनीची बस अर्ध्या वाटेवर पोहचली होती.”

“ती इकडे येऊन पंधरा दिवस होऊन गेले तरीही एकही फोन तुम्ही का केला नाही?”

“बाबा दामिनी घरातून बाहेर पडली अन् आई चक्कर येऊन पडली. तिला हॉस्पिटलमध्ये दाखल केलं.. डॉक्टरांनी तिला ऍडमिट करून घेतलं. आधीच बीपीचा त्रास त्यात शुगर कमी जास्त होत राहते. त्यामुळे तिची काळजी घेणं महत्वाचं आहे. पण दामिनीच्या अशा वागण्याने घरी सगळ्यांनाच त्रास झाला. दामिनी एक सून म्हणून नव्हे घरची लक्ष्मी आहे. एक वर्ष लग्नाला झालं पण असा कधीच प्रसंग आला नाही की मी किंवा माझ्या घरचे लोक तिला ओरडले होते. पण ती मॉल मधल्या घटनेपासून कोणाशीच चांगल वागत नव्हती अन् घरात वाद होऊ लागले. ती स्वतः कोणाला न सांगता रागाने निघून गेली. म्हणून मीही जोवर ती फोन करत नाही तोवर आपणही करायचा नाही अस ठरवलं.”

“ठीक आहे वहिनीच्या तब्बेतीची काळजी घ्या आणि आम्हालाही कळवत राहा.. मी दामिनीशी बोलून तुम्हाला कळवतो.” वसंतरावांनी आपल्या जावयाचा निरोप घेतला. अन् ते दामिनीच्या रूमकडे निघाले.

दामिनी खरच चुकली आहे का? अमन जे जे बोलला ते खर होईल का? दामिनीशी कॉल वर बोलणारा कोण होता समजेल का?