एक संसार असाही.. भाग 4
“अमनराव तुम्ही वहिनीची काळजी घ्या. आणि त्यांच्या तब्येतीबद्दल आम्हालाही कळवत राहा.मी दामिनीशी बोलून घेतो.” वसंतरावांनी आपल्या जवयासोबतचे बोलणे आटोपते घेतले. अन् ते दामिनीच्या रूमकडे निघाले.
वसंतरावांनी दार वाजवले. दामिनीने दरवाजा खोलला.
“दामू आत येऊ का?”
“बाबा! अहो हे काय विचारणं झालं. तुम्हाला माझ्या रूममध्ये येण्यास मी कधीच मज्जाव करू शकत नाही. आणि का करेल हे घर दादुचे आहे.मी फक्त चार दिवसाची पाहुनी आहे.” दामिनीच्या बोलण्यात एक प्रकारचा खेद होता. दुःख होतं. आपल्या दुःखाला कोणी समजून घेईल का? या प्रश्नाचं उत्तर तिचे डोळे शोधत होते.
“बरोबर बोललीस दामू.. हे घर तुझ्या दादुच आहे. आणि तू चार दिवसाची पाहुनी आहेस.. पण तुला एक सांगू? हे घर जितकं तुझ्या दादूचे आहे ना त्यापेक्षा जास्त हक्क या घरावर तुझ्या आईचा आहे. जिने कधीकाळी आपले गर्भ श्रीमंत माहेर सोडून माझ्यासारख्या एका गरीब शेतकरी पुत्राशी लग्न करून आनंदाने याच घरात तिने सुखाचा संसार थाटला. ज्या वेळी पाच दहा नोकर तिच्या मागोमाग तिला काय हवं नको ते पाहायला फिरत असायचे. तिला कशाचीच कमी नव्हती. जणू सोन्याचा चमचा तोंडात घेऊन जन्माला आलेली तुझी आई आज एक दोन नव्हे आजपर्यंत शेकडो संकटे झेलून तुझ्या बापाशी सुखाचा संसार करते आहे.” वसंतराव बोलत होते.
“म्हणजे बाबा?” दामिनीला त्यांच्या बोलण्याचा उद्देश समजला नव्हता.
“सांगतो…ज्या घरावर हक्क गाजवायचा असतो, ज्या घरात आपले सर्वस्व अर्पण करायचे असते, आपल्या सुखासाठी नव्हे आपल्या परिवारातील संपूर्ण माणसाच्या सुखासाठी अहोरात्र जेंव्हा आपण झटतो ना..तेंव्हा त्या घरावर आपला हक्क गाजवायचा अधिकार आपल्याला आपसूकच मिळत जातो. मग त्याला कारण द्यावे लागत नाही. आपल्या कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीवर मनापासून प्रेम करणं, त्यांची काळजी घेणं, त्यांच्या शब्दाचा मान राखणं या त्याच क्रिया आहेत ज्या एका मुलीला हक्क मिळवून देतात. जन्मापासून लग्नापर्यंत मुलगी माहेरची लक्ष्मी असते. तिला आई बाबा तळतावरच्या फोडाप्रमाणे जपतात ,तिचे प्रत्येक हट्ट पूर्ण करतात, तिला सर्व कलात निपुण बनवून अखेर तिचं चांगल्या व्यक्तीशी लग्न लावून देतात. माहेरची लक्ष्मी दुसऱ्या घरची सून असते.. जिला आता महत्वाचा संसार नावाचा नवा प्रवास सुरू करायचा असतो.” वसंतराव बोलायचे थांबले. शांतपणे ते आपल्या मुलीच्या चेहऱ्यावरचे भाव टिपत होते. पण ती आपल्या वडिलांच्या बोलण्याने अधिक गोंधळलेली वाटत होती.
“बाबा..”
“बोल दामू..”
“मी खरचं चुकतेय का ओ?”
“पोरी मी तू चुकतेस अस म्हणत नाही. पण आपण कुठे चुकत आहोत का? या प्रश्नाचं उत्तर आपल्या मनाने शोधायला नको का?”
“पण बाबा मलाच कळत नाहीय की, मी कुठे चुकतेय आणि माझ्या हातून इतक्या चुका का आणि कशा होत गेल्या.”
“त्यासाठी तू तुझ्या आई बाबाशीं मनापासून बोलायला हवं, काय झालं ते सांगायला हवं, बोलून मन मोकळं केल्याशिवाय बाळा कोणत्याही परिस्थितीवर मात करता येत नाही. तू गुणवान आहेस. तुझ्याजवळ प्रतिभेची कमी नाही. पण तू ज्या प्रॉब्लेम ने आज हताश होऊन गेली आहेस त्यावर विचार विनिमय करून तोडगा काढल्याशिवाय पर्याय नाही. म्हणून म्हणतो जे काही घडलं आहे ते सगळ तू तुझ्या आई बाबांच्या कानावर घालावे.” वसंतराव शांतपणे या विषयाकडे वळू पहात होते. घाई करून चालणार नव्हती. रागात असताना कोणताही विषय ताणला की समोरचा माणूस अधिक चेकाळला जातो. आणि समोरची परिस्तिथी अधिक गुंतागुंतीची होऊन जाते.
“हो बाबा सांगते…” ती क्षणभर विचार करत बोलली.
“थांब !…दयमंती आत ये.. अशी लपून ऐकण्यापेक्षा समोर येऊन ऐक.” दयमंतीताई केंव्हापासून दरवाजाच्या आडोशाला उभ्या राहून त्यांचे बोलणे ऐकत होत्या.
“ अहो…ते ते मी” दयमंती ताईंच तप तप सुरू होतं.
“अग लेक आपलीच आहे. तिची प्रत्येक गोष्ट आई बाबा म्हणून आपल्याला माहीत व्हायला हवी. तू अशी लपून ऐकण्याची चूक का करतेस?”
“दामू मला बघून बोलली नसती म्हणून मला बाहेर थांबावं वाटलं.”
“आई, माफ कर मला मी आल्यापासून तुझ्याशी एका शब्दाने बोलले नाही.” दामिनी आईला बिलगुन रडु लागली.
“ दामू…तू आमची लाडकी लेक आहेस. तू माहेरी आलीस म्हणून खूप खुश होतो आम्ही. वाटलं आता लेक घरी आलीय तर मस्त तिच्या हातचे चार दिवस चमचमीत खावे, आपण तिघांनी मिळून थोडी भटकंती करावी. किती अन् किती मनसुबे रचत होते मी. पण तू माहेरी येऊनही आपली रूम अन् आराम याव्यतिरिक्त काहीही करत नव्हतीस. साधं बोलणेही सोडून दिलं होतं. मग आम्हा आई बाबाला काळजी वाटणार नाही का? मान्य आहे तू.. माहेरी रागावून निघून आलीस पण आल्यावर एका शब्दाने बोलायला हवी होतीस.” दयमंतीताई भाऊक होऊन बोलत होत्या. त्याच्या प्रत्येक शब्दातून दुःख व्यक्त होत होते.
“माफ कर आई मला, मी चुकले ग.. तुमच्याशी संवाद देखील मी साधू शकले नाही. तुम्हाला वाईट वाटलं असेल असा विचार मी केलाच नाही. मी माझेच दुःख घेऊन बसले होते.”
“दामू..” वसंतरावांनी हाक मारली.
“बोला बाबा.”
“दामू.. आता मी जे काही तुला विचारणार आहे ते तू मला खरं खरं सांगायचं कळलं?” वसंत रावांनी मेन मुद्द्याला हात घातला.
“हो बाबा!”
“तू मॉल मधे ज्याला प्रेमाने भरवत होतीस, ज्याच्या हाती हात घालून फिरत होतीस, ज्याला मिठी मारत होतीस तो कोण होता??” वसंतरावांच्या शब्दाला कमालीची धार होती. त्यांचा आवाज आता रागीट वाटत होता.
“बाबा तुम्हाला….” आता दामिनी घाबरली होती.
“हो मला सगळं समजलं आहे.. तेही तुझ्याच नवऱ्याकडून.”
“म्हणजे…अमनना सगळं माहिती आहे?” दामिनीला खरतर धक्का बसला होता. आपल्या नवऱ्याने स्वतः च्या डोळ्यांनी पाहिलं आहे म्हणजे आपलं काही खर नाही.
“बोल दामू sssss कोण होता तो?” वसंत रावांचा आवाज संपूर्ण रूम मधे दुमदुमत होता.
“बाबा ss ते..ते” दामिनीला काय बोलावं सुचत नव्हतं.
“बोल दामू…बोल!” वसंत रावांच्या चेहऱ्यावर अंगार फुलला होता.
“ बाबा!...तो सिद्धू होता ss”
“काय ssss!”वसंत राव आणि दयमंती ताई मोठ्याने बोलले.
हा सिद्धू नेमका कोण आहे? पाहूया पुढील भागात…
क्रमशः….!