Login

एक संसार असाही..भाग 5

संसार म्हणजे खेळ नव्हे...
एक संसार असाही… भाग 5


“बाबा तो. सिद्धू होता.”

“काय sss”

“हो बाबा!”

“ आपला सिद्धू तर ऑस्ट्रेलियाला होता ना?” दयमंती ताई आश्चर्याने बोलल्या.

“आई बरोबर आहे.. सिद्धू ऑस्ट्रेलियातच आहे. त्याच्या कंपनीच्या टीम सोबत तो इथे एका महत्वाच्या मीटिंग साठी आला होता. आणि त्याने फक्त मलाच कळवले.”

“अग आपला सिद्धू होता तर तू त्याला घरी का नाही बोलावलं.. तुझ्या लग्नातही तो आला नव्हता.” दयमंती ताई बोलल्या.

“आई तो त्याच्या टीमसोबत आला होता. तेही फक्त दोन दिवसासाठी एक दिवस त्याच्या कंपनीच्या कामातच निघून गेला. आणि दुसरा दिवस त्याच्या मित्रमैत्रिणीत .. फक्त मलाच त्याने कळवले होते. आणि कोणाला आपण भारतात आलोय हे न सांगण्याची त्याने विनंतीही केली होती. म्हणून मी कोणाला न सांगता त्याला भेटायला गेले होते. माझ्या लग्नात त्याने मला काहीही गिफ्ट घेतलं नव्हतं म्हणून तो मला गिफ्ट घेणार होता तेही माझ्या आवडीचे. आणि ते घेण्यासाठी आम्ही मॉलला गेलो होतो.” दामिनी सांगत होती.

“अग मग तू हे अमनरावना सांगायचं नाहीस का?”

“बाबा अमन केंव्हाही ऑफिसला जातात आणि केव्हाही येतात. त्यांचं कामाच तसे आहे. त्या दिवशी मी त्यांना हेच सांगायला फोन केला होता. पण फोन बंद होता. आधीच सिद्धूला येते म्हणून सांगितलं होतं. आणि त्याला वाट पाहायला लागू नये म्हणून मी एकटीच मॉलला निघून आले. आपल्या भावाला देखील मी भेटू शकत नाही का? भावाला मिठी मारू शकत नाही का? भावाला प्रेमाने भरवणे हा गुन्हा झाला का?” दामिनी अतिशय दुःखी होत बोलली.

“नाही दामू तुझंही बरोबर आहे. तू तुझ्या जागी बरोबर आहेस. आणि जावईबापु त्यांच्या जागी बरोबर आहेत. इथ चूक कोणाचीच नाही. निव्वळ गैरसमज झाले आहेत.”वसंतराव विचार करत बोलले.

“दामू.. तू अमन रावाना विश्वासात घेऊन सांगायला हवं होतेस की, सिद्धू तुझा सख्खा मामेभाऊ आहे.” दयमंतीताई म्हणाल्या.

“आई! अगं त्यांनी माझे काहीच ऐकून घेतले नाही.”

“तू त्यांच्याशी बोलताना संयमी वृत्तीने बोलली असतीस तर आज असा गैरसमज झाला नसता दामू.” वसंतराव चढ्या आवाजात बोलले.

“म्हणजे?”

“म्हणजे.. तू त्यांच्याशी बोलताना आपली बाजू मांडायला चुकलीस. इतकंच नाही तर घरच्या लोकांनाही वाटेल तसे बोलून मोकळी झालीस. एका अर्थाने तू तुझ्या जागी बरोबर होतीस.पण बोलताना मर्यादा ठेवायला विसरलीस. त्या घरात तू सून नाही तर मुलगी म्हणूनच वावरत होतीस. एक वर्ष झालं तुमच्या लग्नाला तुझ्या सासूबाईंनी कधी तुला वाईट बोलून तुझा अपमान केला आहे का? कधी सासर्यानी तुला दोन शब्दांनी दुखावलं? कधी तुझ्या लहान दिराने तुझे मन मोडले? सासू सासऱ्यानी तुला मुलगी मानलं. लहान दिराने तुला मोठ्या बहिणीचा दर्जा दिला. तर तुझ्या नवऱ्याने तुला फुलासारखं जपलं. तुझं लग्न झाल्यापासून आज पर्यंत आमच्यापर्यंत एकही तक्रार तुझ्या सासरकडून आलेली नाही. असं का माहितेय सर्वजण तुझ्यावर प्रेम करतात म्हणून. तुझ्या लहान सहान चुका पोटात घालून सर्वजण तुला प्रेमाने जपत होते.” वसंतराव दामिनीला तीची चूक तिला कळावी म्हणून तिला मनापासून समजावत होते.

“पण बाबा…अहो भाजीत मीठ जास्त पडलं म्हणून सासूबाईंनी माझ्या आईचे संस्कार काढले. सासरे माझ्या बाबांना वाईट बोलले. दिराने तर ताट पुढे सरकवले..” दामिनी सांगत होती.

“थांब दामू…सासूने आईचे संस्कार काढले यात त्यांची चूक नाही. तुझ्या आईने तुला स्वावलंबी आणि संस्कारी बनवलं. पण तुझ्या आईच्या संस्कारांना कोणीतरी नाव ठेवावे असे तूच वागलीस ना? सासऱ्यानी तुझ्या बाबांना वाईट बोलले यात त्यांचा काय दोष? तुझ्या बापाने आपल्या लेकीचे लेकीला त्यांच्या घरी देताना खूप गोडवे गायले होते. पण लेकीन बापाने गायलेल्या गोडव्याची माती केली मग बोलनाऱ्याला दोष का द्यायचा? तुझ्या दिराने ताट पुढे सरकवले का? तर दिवसातून फक्त एकदा जेवणाची वेळ तेही पोठभर जेवण्यासाठीच असते जर खूप भूक लागली असताना. पोटभर जेवण्यासाठी आतुर झालेल्या त्या भुकेल्याला जर तुझ्या चुकीने खारट अन्न खावं लागत असेल तर त्या भुकेल्याने ते अन्न कसे खावे.. मान्य आहे भाजी खारट होती. पण थोडी थोडकी नव्हती दोन तीनदा टाकलेल्या मिठाचा खारटपणा मेंदूची वाट लावणार नाही का?? एवढं सगळ झालं. पण तुझ्या नवऱ्याने तुला समजवायचा खूप प्रयत्न केला. असा नवरा सगळ्यांना नाही भेटत दामू…फोनवर ते तुला समजवायचा इतका प्रयत्न करत होते. तरीही तू त्यांची लायकी काढून घर सोडून माहेरी निघूनही आलीस.. का दामू आम्ही तुला हेच संस्कार दिले होते का??” वसंतराव पोटतिडकीने बोलत होते.

“बाबा!” दमिनीला काय बोलावं सुचत नव्हतं.

“ जे समजवायच ते आम्ही तुला समजावलं आता जो निर्णय घ्यायचा तो तुझ्या हातात आहे. चल दयमंती” दोघेही दामिनीच्या खोलीतून बाहेर पडले.

“दामू.. तुझे आणि सिद्धू चे मॉल मधले फोटो मला सेंड कर..” वसंतराव मागे न बोलताच बोलले.

“हो करते बाबा”

दामिनी अमनरावांची माफी मागेल का? अमनराव दामिनीला माफ करतील का? दामिनी आणि अमनराव यांच्यातील गैरसमज दूर होतील का? पाहू पुढच्या भागात..