एक संसार असाही…भाग 6
“दामू .. तुझे आणि सिद्धूचे मॉल मधले फोटो मला सेंड कर..”वसंतराव मागे न बघताच बोलले.
“हो बाबा!”
आई बाबा निघून गेल्यावर दामिनीला हुंदका फुटला. आपण खूप मोठी चूक करून बसलो आहोत याची तिला जाणीव होऊ लागलेली. रागाच्या भरात आपण आपल्या नवऱ्याला वाट्टेल ते बोलून खूप चुकीचं वागलो आहोत याचा तिला पश्चाताप होत होता. एक मन तिला आपल्या नवऱ्याची माफी माग म्हणून बजावत होतं. तर दुसरं मन तुझ्या नवऱ्याने तुझ्या आई वडिलांचा अपमान केला आहे. त्यांनी माफी मागायला हवी. तू अजिबात माघार घेऊ नकोस अस ओरडुन सांगत होतं. कोणाचं ऐकू? अशा दुहेरी पेचात सापडलेली दामिनी बेडवर पडून उशीत तोंड खुपसून ओक्साबोक्सी रडत होती. आता तिच्याकडे तिच्या नवऱ्याची माफी मागण्याशिवाय पर्याय नव्हता.
दामिनी समजूतदार होती. आपल्या वडिलांच्या बोलण्याने तिला आपली चूक कळली होती. पण आपण आपल्या भावाला भेटून कोणताही अपराध केला नव्हता. अस ती पून: पुन्हा आपल्या मनाला समजावत होती.
वसंतरावांनी आपल्या जावयाला मॉलमधले फोटो सेंड करून झालेल्या गैरसमजुती बद्दल बोलणे केले. अमनरावांनी देखील त्यांच्या बोलण्याचा मान राखून त्यांची मनापासून माफी मागितली. आपल्यात झालेल्या छोट्याशा वादाचे पडसाद पुन्हा उमटू नये म्हणून थोडे दिवस दामिनीची माफी मागणार नसल्याचे अमन रावांनी वसंतरावाना सांगितलं. एका अर्थाने त्याचंही बरोबर होतं. छोट्या छोट्या कारणाने संसारात पुन्हा गैरसमज व्हायला नकोत म्हणून अजून काही दिवस आम्ही दोघेही दूर राहु. हे नाते जपायला जर दामिनीने पुढाकार घेतला तर खऱ्या अर्थाने दोघांचाही संसार सुखाचा होणार होता.
जरी दोघांची चूक असली तरी, घर सोडून निघून जाण्याचा निर्णय स्वतः दामिनीने घेतला होता. जेणेकरून त्यानंतर अमनना देखील बरेच त्रास सोसावे लागले. घरात वादाची ठिणगी पडली असताना.. त्याच्या आईच्या आजारपणाने डोकं वर काढल्यामुळे आणि घरची सून माहेरी गेल्यामुळे घरचे खाण्याचे वांदे झाले ते निराळेच. संसारात समजुतदारपणा खूप महत्वाचा असतो. एक दुसऱ्याला समजावून घेणं आणि समजावणे यामुळेच पती पत्नी कोणत्याही परिस्थितीवर मात करून नात्यातील परमोच्च सुखावर स्वार होतात.
आज आठवडा असाच गेला. कोणीही दामिनीला एका शब्दाने बोलले नाही. घरी आलेल्या शेजारच्या बायका दयमंती ताईंना दामिनी विषयी विचारू लागलेल्या. महिनाभरासाठी आली आहे म्हणूनत्याही वेळ मारून नेत. वसंतराव शैक्षणिक खात्यात असल्याने त्यांच्या घरी काही बैठका होत. हे खूप आधीपासून सुरू होते. त्यामुळे दामिनी घरी दिसत असल्याने मित्र मंडळी मुलींविषयी चर्चा करत. पण वसंतराव हुशार होते. घरात बैठका असूनही ते कधीच घरातल्या बिघडलेल्या वातावरणाची जाणीव होऊ देत नसत. त्यामुळे कोणाला शंका येणं शक्य नव्हते. दामिनी देखील बाहेरचे लोक आल्यावर त्यांच्याशी हसून खेळून राहत असल्यामुळे कोण जास्त चौकशी करत नसत.
दामिनी टी.व्ही पहात होती. वसंतराव बाहेरून आले. समोरच्या टेबलवरचा पाण्याचा ग्लास हातात घेऊन ते सोप्यावर बसून पाणी पिऊ लागले.
“दयमंती sss!” वसंतरावांनी दयमंती ताईंना हाक मारली. त्या स्वयंपाक करत होत्या. थोड्या वेळात जेवणाची वेळ होत आली होती.
“बोला..” पदराला हात पुसत दयमंतीताई बाहेर आल्या.
“दयमंती.. जवाईबापुंचा फोन होता.”वसंत रावांच्या तोंडून जावईबापू बाहेर पडताच टी. व्ही पाहणाऱ्या दामिनीचे कान पुढचे बोलणे ऐकण्यास आतुर झाले.
दमिनीला वाटले की, अमननी आपल्या बाबाची माफी मागितली असावी.
दमिनीला वाटले की, अमननी आपल्या बाबाची माफी मागितली असावी.
“काय म्हणत होते?” दयमंती ताईनी चिंताग्रस्त होत विचारलं.
चिंताग्रस्त झालेली आपली बायको पाहून ते क्षणभर थबकले. आणि एक नजर आपल्या लेकीवर टाकून बोलले.
“ जवाईबापू घटस्फोट घेण्यासाठी कोर्टात याचिका दाखल करणार आहेत..”
“काय ssss!!” जवळ जवळ दयमंती ताई किंचांळल्याच !
आपल्या वडिलांच्या तोंडून बाहेर आलेले शब्द ऐकून दामिनीला धक्काच बसला एवढ्याशा कारणासाठी आपला नवरा काडीमोड घेण्याचा विचार करेल अस तिला स्वप्नातही वाटलं नव्हतं. ती आलेला हुंदका रोखत आपल्या खोलीत पळाली.
दामिनी निघून गेल्यावर मात्र वसंतराव सोप्यावर पाय पसरून डोक्याखाली हात ठेऊन बसून हसू लागले. आपल्या नवऱ्याने सांगितलेल्या बातमीने चिंताग्रस्त झालेल्या त्या माऊलीने वसंतरावांकडे आश्चर्याने पाहिलं.
“आहों…आपल्या लेकीचा काडीमोड होतोय आणि तुम्ही इतके शांत आणि खुश कसे काय? ”
“ यात वाईट वाटून का घ्यायचं दयमंती?”
“ म्हणजे?..”
“आपल्या लेकीला कोणत्याच गोष्टीसाठी पुढाकार घेता येत नाही. ही आपली नाही तर, आपल्या लेकीची चूक आहे. आपण त्या चुकीचा विनाकारण भागीदार का व्हायचं?”
“आहों..”
“तुझी काळजी समजते मला, पण मुलीलाच जर आपल्या भवितव्याची, आपल्या खऱ्या सुखाची जाणीव होत नाहीय तर आपण काळजी करून काहीच अर्थ नाही.
“तरीही…बाप अहात तुम्ही. लाडक्या लेकीचा काडीमोड होत असताना अस तुमचे हसत बसणं मला अजिबात पटलेलं नाही. तुम्ही आताच्या आता जावई बापूंना फोन लाऊन जाब विचारा.”दायमंती ताईंच्या डोळ्यात अंगार फुलले होते. त्यांना आपल्या लेकीचा संसार सावरण्याची काळजी लागली होती. साध्याशा कारणासाठी आपल्या लाडक्या लेकीला दुःखाच्या खाईत लोटायला ती माऊली तयार नव्हती…
दामिनी घटस्फोट घेण्यासाठी तयार होईल का? वसंत राव आणि अमन यांच्या डोक्यात नक्की काय शिजतंय? पाहूया पुढील भागात..