"अगं उद्या ताई आणि दाजी येणारेत, जेवायला थांबतील..काहीतरी मस्त बेत बनव.."
"अय्या हो? किती दिवसानी येताय ते..काळजी करू नका, मस्त काहीतरी बनवते मी."
"बरं आपल्या काव्याच्या शाळेत पण बोलावलं आहे ना उद्या?"
"हो की..विसरूनच गेले..आता कसं करायचं?"
"मी जाऊन येईन.."
"बरं होईल, आणि हो...बाजारात जा आणि भाजीपाला घेऊन या जरा..आणि हो, जातांना त्या देसाई मॅडमला हे लाडू द्या, मागितले होते त्यांनी.."
"बरं पिशवी दे आणि लाडू पण दे डब्यात पटकन.."
रश्मी आणि केदारच्या घरातील ही रोजची धावपळ. या दोघांनी इतका व्याप जमवला होता की श्वास घ्यायला फुरसत नसायची. रश्मी पूर्णवेळ घराकडे लक्ष द्यायची आणि केदार पूर्णवेळ आपल्या व्यवसायमागे. दोघांनी माणसांचा इतका गोतावळा जमवला होता की एक दिवस बिना पाहुण्याचा जायचा नाही.
कधी कुणाला लाडू द्यायचे तर कधी एखाद्याला डबा पोचवायचा..कधी एखाद्या पेशंटला पाहायला जायचं तर कधी एखाद्याच्या घरात कार्यक्रमासाठी हातभार लावायचा. दोघांनी एकमेकांसाठी वेळ द्यावा यापेक्षा दोघांनी मिळून लोकांसाठी वेळ देण्यात त्यांना समाधान वाटायचं.
दुसऱ्या दिवशी नणंदबाई आणि त्यांचे मिस्टर आले..दोघांनी मनसोक्त पाहुणचार घेतला. दादा आणि वहिनीचं भरलेलं घर बघून ताईला बरं वाटलं, तरी कुठेतरी काहीतरी चुकतंय असं तिला सतत वाटायचं..
रात्री जेवणं आटोपली, केदार दाजीना सोबत घेऊन कॉलनीत फेरफटका मारायला गेला. घरात नणंदबाई आणि वहिनी यांच्या चांगल्याच गप्पा रंगल्या,
"काय सांगू ताई, दिवस कसा जातो कळतच नाही बघा..वारेमाप व्याप आहेत.."
"ते सगळं ठीक आहे, पण पुढे जाऊन मनात सल नको राहायला.."
"कसली सल??"
"बऱ्याचदा माणूस आपल्या व्यापात इतका अडकतो की त्याचं जगणं राहूनच जातं..मी तुम्हाला दोघांना कधी कुठे फिरायला गेलेलं पाहिलं नाही, कधी एकत्र ट्रीपला गेलेलं पाहिलं नाही..काय करता काय तुम्ही दोघे?"
क्रमशः