Login

गोड नात्यांची वीण....भाग 2

सासू सुनेने मिळून घराला संकटातून बाहेर काढलं
गोड नात्यांची वीण....भाग 2

गावातल्या शेजारणींना नेहमीच नवीन सुनेबद्दल उत्सुकता होती.
एके दिवशी अंगणात बसलेल्या सुमतीबाईंकडे शेजारी लक्ष्मी काकू आल्या.

त्या हसत म्हणाल्या,
"सुमती, तुझी सून जरा शहरातली दिसते हो. हाताखाली ठेवतेस ना तिला?"

सुमतीबाईंनी लगेच प्रत्युत्तर दिलं,
"लक्ष्मी, ती माझी सून नाही – माझी मुलगी आहे. माझ्या हाताखाली नाही, माझ्या बाजूला उभी असते."

हे ऐकून स्वराच्या डोळ्यात पाणी आलं.
तिला वाटलं, 'आईने खरंच मला आता स्वीकारलंय.'

काही महिन्यांनी स्वराच्या गरोदरपणाची बातमी घरात आली.
संपूर्ण घरात आनंद झाला.

सुमतीबाई दररोज तिची काळजी घ्यायच्या.

वेळेवर दूध द्यायच्या.

पौष्टिक खाणं बनवायच्या.

तिला आराम मिळावा, म्हणून घरकाम ही करायच्या.

एकदा स्वरा म्हणाली,
"आई, तुम्ही एवढं कशाला करता? मी सांभाळते."

सुमतीबाई हसून म्हणाल्या,
"बाई गं, ही वेळ स्त्रीसाठी खास असते. मी जे अनुभवले ते तुला अनुभवायला मिळावं म्हणून करत आहे. आई म्हणून नाही, आईसारखी काळजी घेणारी सासू म्हणून."

तो काळ स्वरासाठी जरा कठीण होता, पण आईसारखी माया मिळाल्याने तिने ते सहज पेललं.

नऊ महिन्यांनी स्वराला गोंडस मुलगा झाला.
घरात नव्या जीवाचं आगमन म्हणजे जणू घरावर आशीर्वादाचा वर्षाव.

सुमतीबाईंच्या चेहऱ्यावर समाधान होतं.
त्यांनी बाळाला मांडीवर घेतलं आणि स्वराकडे पाहून म्हणाल्या,
"बाई गं, आजपासून आपलं नातं अजून घट्ट झालं. आता तू फक्त माझी सून नाही, माझ्या नातवाची आई आहेस."

स्वराच्या डोळ्यांतून आनंदाश्रू वाहू लागले.

काही वर्षांनी गावातल्या सगळ्यांना सुमतीबाईंच्या सूनबाईचं कौतुक वाटू लागलं.
"स्वरा खूप छान आहे, शहरातली असूनही किती छान जुळवून घेतलं तिने." असं लोक म्हणू लागले.

सुमतीबाई अभिमानाने उत्तर द्यायच्या,
"माझं नशीब बघा, मला मुलगी मिळाली."

सासू–सुनांचं नातं नेहमी कटू असावं असं नाही. जर दोघींनीही समजूतदारपणा, प्रेम आणि संयम दाखवला, तर हे नातं आई–मुलीच्या नात्यापेक्षाही घट्ट होऊ शकतं.

स्वराचा मुलगा आता सहा महिन्यांचा झाला होता.
घरात त्याच्या खळखळाटाने प्रत्येकाला जिवंतपणा वाटत होता.

सुमतीबाई अनुभवाने सांगायच्या –
"बाळाला अंगाई गाऊन झोपवलं तर पटकन झोपतो."
आणि मग त्या गोड आवाजात अंगाई गात असतं

स्वरा मात्र त्याला नव्या पद्धतीने झोपवायची – खेळणी दाखवत, गाणी गुणगुणत.
सासू–सुनांचे हे दोन वेगवेगळे मार्ग होते, पण दोघींचं ध्येय एकच – बाळ सुखात राहावा.

एकदा बाळ तापाने रडत होतं.
स्वराला घाबरायला झालं.
"आई, काय करू आता?" ती रडत विचारू लागली.

सुमतीबाई शांतपणे म्हणाल्या,
"बाई गं, मी दोन मुलं वाढवली आहेत. माझ्यावर विश्वास ठेव. आपण डॉक्टरकडे नेऊ."

त्या रात्री स्वराने जाणलं की संकटात खरी साथ देणारी व्यक्ती म्हणजे तिची सासूच आहे.

एक वर्षी समीरच्या नोकरीत अडचण आली. त्याला पगार उशिरा मिळत होता.
घरात खर्च वाढले, पण उत्पन्न कमी झालं.

माधवराव काळजीत पडले.
पण सुमतीबाई म्हणाल्या,
"काळजी करू नका. आपण थोडं काटकसरीत राहू. मी दागिने विकेन तरी घर डळमळणार नाही."

हे ऐकून स्वराने त्यांना थांबवलं.
"आई, मीही शिवणकाम शिकले आहे. गावातल्या महिलांना कपडे शिवून देईन. त्यातून काही पैसे मिळतील."

सुमतीबाईंनी स्वराकडे आश्चर्याने पाहिलं.
"अगं, मला वाटलं होतं शहरातली आहेस, घरकामच जमणार नाही. पण तू तर घराला आधार देणारी ठरलीस."

त्या दिवसानंतर सासू–सुनांनी मिळून घराला संकटातून बाहेर काढलं.

गणपती उत्सव जवळ आला.
गावातल्या सगळ्या घरात उत्साह होता.

स्वराने यावेळी ठरवलं – सजावट मीच करणार.
तिने रंगीबेरंगी फुले, कंदील, आरास केली. खूप छान सजावट  केलेली होती.

सुमतीबाई आनंदाने म्हणाल्या,
"बाई गं, तुझ्या हातामुळे आपला बाप्पा जणू मुंबईतल्या सजावटीत बसलाय."
सगळीकडे आनंदी आनंद होता.

गावातल्या महिलांनीही कौतुक केलं.
"सुमतीबाई, तुमची सून फार हुशार आहे."

सुमतीबाई अभिमानाने म्हणाल्या,
"माझ्या स्वरामुळे माझं घर उजळलंय."