Login

गूढ भाग १

रहस्य एका आग बळीचे
गूढ भाग १

“आत्याबाई sss,नका ओ मला मारू sss खरच मी काय बी गुन्हा केला नाय.”

“गप्प ए भवाने sss तुला काय वाटलं? मला कळणार नाय व्हय, पांढऱ्या पायाची पाल हाय तू पाल .”

एका विशीतल्या स्री लां दोन स्त्रिया खूप मारत होत्या. अगदी जमिनीवर लोळून रडत होती ती. बिचारीला वाचवायला कोणीही येत नव्हतं.त्या वयस्कर स्री चां वचक होताच तसा की,तिच्या शब्दापुढे जायची कोणाची हिम्मत नसायची.

तिच्या हातून चूक काहीच होत नव्हती. पण सासूर्रवासाचे कारण म्हणजे ती अतिशय गरीब घरातील होती. त्यामुळे सासरच्या लोकांना तिच्या माहेरकडून हवा तसा मान सन्मान मिळत नव्हता. आणि म्हणूनच तिची सासू आणि नणंद तिचा छळ करायच्या. तिला खूप मारायच्या, उपाशी ठेवायच्या. त्यामुळे ती शरीराने देखील अशक्त झाली होती. अंगात ताकत नसताना देखील ती सगळं काम करत असायची. पोटात अन्न नसताना फक्त कधी कधी पाण्यावर राहायची. नवरा शेतकरी असल्याने शेतातच असायचा. फक्त रात्री झोपण्यासाठी तो घरी यायचा. त्यामुळे तो फारसं तिच्याकडे लक्ष द्यायचा नाही. आपली प्रणयक्रीडा झाली की झाली तो तिच्याकडे न बघताच झोपून जायचा. बिचारी जेवली की नाही याची विचारपूस देखील तो कधी करत नसे. त्यामुळे बीचारीचे खूप हाल व्हायचे.

असेच दिवसामागून दिवस जात होते. एक दिवस कांचनला उलट्या होऊ लागल्या.आणि त्यावरून कळून चुकलं की ती गरोदर आहे. त्यातच ती नवऱ्याला दुपारचं जेवण द्यायला शेताकडे जायची. त्यांच्या घराच्या शेजारच्या शेवंता बाईला तिचा होणारा त्रास बघवत नसे. ती रोज आपल्या पोराला घरी आल्यावर सांगायची. नामदेवला ही तिच्यासाठी खूप वाईट वाटायचं. कांचन नामदेवच्या मामाच्या गावची होती.तिचं घर आणि त्याच्या मामाच घर समोरासमोर असल्याने आणि नामदेव चे मामाच्या घरी येणे जाणे असल्याने त्यांची तशी तोंड ओळख होतीच. कांचन शेताकडे जाताना नामदेवशी बोलायची. आणि हेच कुणीतरी तिच्या घरी जाऊन सांगितलं आणि तिचा होणारा छळ दुपट्ट वाढू लागला.तिच्या चारित्र्यावर संशय घेतला जाऊ लागला.अन् एक दिवस तिच्या सासू आणि ननदेने तिला रॉकेल ओतून जिवंत पेटवून दिलं.

ती ओरडत होती. दयेची भीक मागत होती.पण निर्दयी सासू आणि नंनद यांना तिळमात्र दया आली नाही.

ज्या दिवशी कांचनला पेटविण्यात आले. त्या दिवसापासून वाड्याला घरघर लागली. सासूने अंथरूण धरले. नणंद नदीवर पाणी आणायला गेली अन् पाणी भरता भरता बुडाली. कांचनचा नवरा शेतात काम करत असताना सर्प दंश होऊन मेला. पण सुदैवाने सासरे कांचनची जाऊ देवकी यांच्याकडे वास्तव्यास असल्याने ते मात्र बचावले.

पण ज्या कांचनला पेटविण्यात आले ती आत्मा अजूनही त्या वाड्यात आणि त्या बंद खोलीत धुमसत होता.


कांचनला मारल्यानंतर तिच्या सासूने एका मांत्रिकाला बोलावून त्या खोलीला कायमचे बंदिस्त केले. पण प्रत्येक अमावशेला रात्री बारा वाजता जोरदार ओरडण्याच्या आवाजाने तो वाडा मात्र दुमदुमून जायचा.
तिच्या ओरडण्याने तिच्या सासूचे कान अगदी फाटून त्यातून रक्तस्राव व्हायचा. आणि याचमुळे ती कायमची अंथरुणाला खिळली.

पण कोणीही तिची शांती केली नाही. सुडाने पेटलेल्या त्या आत्म्याला आता कोणीही शांत करू शकणार नव्हते. कांचनच्या नवऱ्याने आजारपणाला कंटाळून शेतातल्या झाडाला गळफास लावून आत्महत्या केली.


पण सासरे देवकी बाईंच्या घरी सुखरूप राहिले.त्याचा किंवा कांचनच्या दिराचा यात कोणताही सहभाग नव्हता. देवकीबाईची देखील कांचन सारखीच गत होती.
देवकीबाईना देखील या दोघी अशाच त्रास द्यायच्या त्यामुळे देवकीबाईंच्या नवऱ्याने त्यांना घेऊन बाजूला संसार थाटला.कांचनच्या सासर्यांचाही मानसिक छळ व्हायचा त्यामुळे आपल्या आईशी वाद घालून देवकीबाईंच्या नवऱ्याने त्यांना आपल्याजवळ ठेवले होते.इथ ते सुख समाधानाने जगत होते.

देवकीबाई मुळातच प्रेमळ होत्या. त्यामुळे सासर्यांच्या प्रत्येक आवडी निवडी त्या प्रेमाने जपायच्या. आपल्या सासर्याना पांडुरंगाची वारी आवडते म्हणून त्या त्यांना स्वतः घेऊन पंढरपूरला जायच्या. देवदर्शन करून त्यांना सुखरूप घरी घेऊन यायच्या.

असेच दिवस जात राहिले त्या गोकुळासम भरलेल्या वाड्याची दयनीय दुर्दशा झाली होती.आणि ती देवकी बाईना बघवेणा. आपल्या सासू सासऱ्यानी एवढ्या मेहनतीने उभारलेला तो वाडा असा बेवारस टाकणं त्यांना पटत नव्हते.

तशीही ती सगळी प्रॉपर्टी आता देवकीबाईनाच कागदोपत्री मिळणार होती. सासर्यानही मनापासून वाटत होतं की आपल्या मुलाने आता वाड्याची तसेच साऱ्या जमीन जुमल्याची जबाबदारी अंगावर घ्यावी. त्याच्याकडे सारं सोपवून आपण मरायला मोकळे होऊ.असे ते देवकी बाईना बोलूनही दाखवत.देवकी बाईना खरतर खूप वाईट वाटे पण, त्या आपल्या नवऱ्याच्या निर्णया पलीकडे कधी गेल्या नव्हत्या.

अखेर देवकी यांची इच्छा फळाला आली अन् त्यांच्या नवऱ्याने सगळी प्रॉपर्टी आपल्या नावे करण्यास सहमती दर्शवली.

देवकिबाईंचे वाड्यात पहिले पाऊल पडले.अन् ओसाड पडलेल्या त्या वाड्याला जणू नवचैतन्याचे दिवस येऊ लागले. वाड्यात आल्या आल्या बरोबर देवकी बाईंनी शांती करून घेतली. पण गुरुजींनी वाड्यातील ती बंद खोली कोणीही खोलायची नाही असा सल्ला दिला. तेंव्हापासून आजपर्यंत ती खोली आहे तशीच बंद होती.