Login

हसरं घरकुल (टीम - बटाट्याची चाळ )

टीम बटाट्याची चाळ घेऊन येत आहे या फेरीतील चौथी खमंग खुसखुशीत कोटुंबिक कथा...आपलंस वाटणार आपल्य??

हसरं घरकुल…..!
(टीम -बटाट्याची चाळ.) 

(रमा आणि शशिकांत चाळीशी ओलांडलेलं जोडपं.)

रमा आज खुपच घाईत स्वयंपाकघरातील काम आवरत होती. दोन वेळचं जेवण, सगळ्यांचा नाष्टा बनवून तयार होऊन ती शशिकांतला म्हणाली... 

 " अहोऽऽऽ! मी निघते हो. " 

शशिकांत : आज मलाही जायचंय साहित्य संमेलनात. ' साहित्याची बदलती दिशा ' ह्यावर व्याख्यान आणि पुस्तकं प्रदर्शन आहे. मोठ-मोठे साहित्यिक येणार आहेत. भन्नाट योग जुळून आलाय. आज तर जायलाच हवे.
किती दिवसांपासून विचार करतोय लिखाण चालु करेन शेवटी आज निमित्त मिळालं. 

रमा : आणि ऑफिस? 

शशिकांत : आज ऑफिसला दांडी..  खुप सूट्ट्या बाकी आहेत माझ्या.. 

 रमा : बरऽऽ.. पण मी निघतेय. उशीर नको व्हायला. 

 शशिकांत : म्हणजेऽऽ.?  तू कुठे निघालीस..? 

 रमा : अहो काल रात्रीच सगळं रामायण सांगितलं नाही का तुम्हांला...?  आठवड्याभरापूर्वीच ठरलंय माझं. केक आणि कुकीज बनवायच्या शिबीराला जायचयं तेऽऽ….
पुन्हा पुन्हा काय तेच ते विचारताय ? 

( त्यांचा मुलगा उमेश नुकताच कॉलेज संपवून नोकरीच्या शोधात आहे. तोही 
मध्येच मजा घेत )
उमेश : रामाची सीता कोण? 

शशिकांत  :अरे तुला उशीर होतोय न इंटरव्ह्युला.. मग निघ लवकर. 

मुलगा : हो बाबा. पळतो. 

शशिकांत : अगंऽऽ पण आबांजवळ कोण थांबणार मग ? 

रमा : अहोऽऽ, मी विचार केलाय त्याचा.  आबांना फक्त तीन/चार तासच एकटे रहायला लागेल नंतर विशाखा येतेच कि कॉलेजहून. ती असेल आबांजवळ...  

(आबा तिथेच बसून ऐकत असतात हे सगळं. साधारणतः 80 ओलांडलेले आजोबा.. ह्या वयातही रोज 
मॉर्निंगवॉकला जातात, योगा, प्राणायाम, ध्यान करतात. म्हणूनच एवढं वय झाल तरी तब्येतीची एकही तक्रार नाही.. बांधा शिडशिडीत तरी एकदम काटक.. सगळ्यांना सांभाळून घेणारे. प्रेमळ असे व्यक्तिमत्व. )

आबा : शशिकांत मी काय म्हणतो , जाऊ दे तिला. माझा काही प्रॉब्लेम नाही..विशाखा येईलच 4 वाजेपर्यंत..  तुम्ही दोघेही जा.

रमा : जाऊ ना मग मी..? आता तर आबाही म्हणालेत. चला आपण दोघेही सोबतच जाऊ.. 

शशिकांत : नाहीऽऽ. मी आज कुठेही जाणार नाही..  मला काही आबांना एकटं सोडणं बर वाटत नाही. मी थांबतो घरी.तू जा.

रमा : तुम्हाला राग आलाय का ? 

शशिकांत : नाही गं. जा तू...

(रमा जाते. शशिकांत घरूनच ऑफिसचे काम करत असतो.. पण त्याची चिडचिड होत असते. त्याला लिखाणाची फार आवड पण कामामुळे वेळ देता येत नसतो. आज खुप दिवसांनी त्याच्यातला लेखक जागा होणार होता. पण सगळंच राहून जातं.)
    __________________

आबा : अरे तू गेला नाहीस का अजून ? 

शशिकांत : एवढं कुठे नशीब आमचं ? गेल्या 4-5 वर्षात साहित्याशी संबंधच राहिलेला नाही. तेच ऑफिस तेच घर नुसतं.. !! 
किती छान लिहतात लेखक. मलाही वाटत लिहावं काहीतरी तडफदार,छानसं. पण छे ! राहिलच सगळं..! 

आबा : अरेऽऽ जायचं ना मग. !!

शशिकांत : अहोऽऽ कस जाणार आबा तुम्हांला एकटं टाकून. तुमचं जेवणखाणं  सगळं बघायला नको.? शशिकांतची चीडचीड चालूच होती.

आबा आपल्या रूममध्ये जायला निघाले तेवढ्यात विशाखा आली.
(विशाखा त्यांची सुंदर,बडबडी, नृत्य, डान्स ह्या सगळ्याची आवड असलेली नात. कलाक्षेत्रात कॉलेजमध्ये शिकत असते. )

विशाखा : आबा जेवलात तूम्ही ? 

आबा : तु जेवलीस का ? 
विशाखा : नाही आबाऽऽ. बिलकुल भूक नाही. मैत्रिणीचा वाढदिवस होता ना आज. तिच्याकडूनच पार्टी उकळली. खुप पाणीपुरी,शेवपुरी सटर-फटर खाल्लं.. 

आबा त्यांच्या खोलीत येतात. खरेतर त्यांनाही वाईट वाटत असतं की त्यांच्यामुळे शशिकांतला जाता आलं नाही आणि ह्या विचारातच ते त्यांचा रेडिओ लावतात आणि त्यावर...

" म्हातारपण अनेकवेळा असह्य वाटू लागते जेव्हा घरातल्या इतर सदस्यांना तुम्ही अडगळ वाटू लागता. " तेव्हा…..किंवा जेव्हा तुमच्या मनात अशा वरील भावना येतील तेव्हा उठा. या भावना झटकून टाका आणि घरातल्या इतर सदस्यांना त्यांच्या कामात मदत करा. घरकामात हातभार लावा..  जेणेकरून तुम्ही घरातली अडगळ नसून एक महत्वाची व्यक्ती आहे हे पटवून देऊ शकाल. "

आबांना हे खुप जिव्हारी लागले. 
" खरच आपण ह्या घरातली अडगळ झालो आहोत का… ?? "
(आबा ताडकन उठतात आणि घरातली सर्व कामे आवरायला घेतात...  )

टेबलावरच्या सगळ्या कागदांचा पसारा एकत्र करून कपाटात ठेवतात.. 
पण नेमके ते शशिकांतच्या ऑफिसचे पेपर्स विभागून ठेवलेले असतात हे आबांना माहीतच नसते..  

कपड्यांचा पसारा घड्या घालून ठेवतात पण त्यातल्या ओढण्या विशाखाने मैत्रिणीला डान्ससाठी हव्या म्हणून वेगळ्या काढून ठेवलेल्या हे आबांना माहित नसते..

सोफा कव्हर्स नीट लावून ठेवतात..  वर्तमानपत्राची घडी घालून ठेवतात... 

किचनमध्ये भांडी आवरायला जातात आणि त्यांच्या हातातुन ग्लास पडतो. नुकताच डोळा लागलेला शशिकांत खाडकन जागा होऊन आबांकडे येतो.. 

शशिकांत : आबा काय झालं?  काय करताय किचनमधे ? 

आबा :अरे काही नाहीऽऽ.. पाणी पीत होतो तर भांडी दिसली इकडे म्हटलं आवरावीत जरा. तेवढीच रमाला मदत.. 

शशिकांत : कायssss! काही पण काय आबा..! राहू दया. तुम्ही झोपा बघू जाऊन जरा.

तेवढ्यात विशाखा येते..
" मी इथे काही ओढण्या काढून ठेवल्या होत्या त्या कुठे गेल्या ?? "

आबा : अग किती तो पसारा…!  मी आवरून ठेवल्या कपाटात. 

शशिकांतलाही त्याचे ऑफिसचे कागद टेबलवर दिसत नाही. तोही चिडतो..  आणि इथले माझे ऑफिसचे कागद कुठे गेले ? 

आबा : मी तेही छान एकत्र करून कपाटात ठेवले. 

शशिकांत : आबा अहो काय चाललंय तुमचं ???  कुणी सांगितल तुम्हांला नसते उद्योग करायला.. ?
 नुसती कामे वाढवून ठेवलीएत तुम्ही.. आता परत मला 2 तास घालवावे लागतील त्यामध्ये. तुम्ही गुपचूप जाऊन पडा बरं तुमच्या खोलीत..नसता व्यापऽऽ!! 

(आबा दुःखी होऊन त्यांच्या खोलीत येतात. आपल्या अर्धांगिनीच्या जानकीच्या  फोटोसमोर ऊभे राहतात. आणि काय आश्चर्य…!!
जानकी चक्क फोटोमधून बाहेर येऊन त्यांच्याशी बोलतेय असा भास होऊ लागतो आबांना..... नाकात नथ, केसांचा अंबाडा त्यावंर जूईचा गजरा, कपाळी कुंकुवाचा मोठा टिळा, हातभर बांगड्या आणि गळ्यात आबांच्या नावचे ठसठशीत डोरले.....जणू साक्षात लक्ष्मीच अवतरल्याचा भास.. )
आबा : अगंऽऽ ए आत्ता गं कशी आलीस इकडे….?

जानकी (मिश्किल हसत) : तुमची मज्जा बघत होते.शेवटी राहवेना म्हणून आलेच मग... मी म्हणायचे नाऽऽ माझी किंमत तुम्हांला आत्ता नाही कळणार, मी गेल्यावरच कळेल… 
बघा कळले नाऽऽ आता तरी..!  

आबा : हो गंऽऽऽ! खरच..!  तुझा खुप आधार होता मला. तुझ्याशी वाद घालण्यात, थट्टा मस्करी करण्यात दिवस कुठे जायचा कळायचाही नाही. खरंच तुझी कमी खुप जाणवते आता. आपलं अस कुणीच नाही वाटत बघ सारखं.... !

 जानकी :  अहोऽऽऽ असं काय करता ! किती सोन्यासारखा परिवार आहे आपला.. सगळे किती जीव लावतात तुम्हांला,आणि हे कसले खूळ आठवले तुम्हाला…?

आबा : कसच काय गंऽऽ. आज बघ नं त्यांना मदत करायला गेलो तर माझ्यावरच डाफरले. शशिकांत म्हणाला नसता उद्योग वाढवून ठेवला.
खरंच त्यांना मी अडगळ वाटत असेल का गं..?  
माझी अडचण होतेय का त्यांना..?
मला घरात एकटं राहावं लागेल म्हणून नाइलाजाने कुणीतरी थांबतय माझ्याजवळ.

जानकी : अहो रेडिओवर काहीतरी ऐकून मदत करायचे खुळ तुमच्या डोक्यात शिरले आणि त्यामुळे हा सगळा गोंधळ झालाय. बाकी काहीऽऽऽ नाही.. 

आणि मी असताना इकडची काडी तिकडे केली नाही कधी. किचनमध्ये साधा पायही ठेवला नाहीत कधी आणि आता बरी मदत करताय….! 

आबा : अग तेव्हा तरुण होतो,कामाचा व्याप होता मागे आणि तु कूठे काही करू द्यायचीस तेव्हाही.  

जानकी   : होऽऽऽ बरोबर…. पण आता तुमचं वय झालय. तुमच्या काळजीपोटीच कुणीतरी थांबते ना तुमच्याजवळ. तुम्हाला काही लागलं सवरलं तर जवळ कुणीतरी हवं ना.. तुम्हांला आठवतंय... तुमच्या आईजवळ पण आपण कुणी ना कुणी असेच आवर्जून थांबायचो... 

आबा : हो एकदाच काय ती सुमन (बहीण) माहेरी आली म्हणुन मीच शक्कल लढवली आणि मुद्दाम डबा घरीच विसरून आलो.. म्हटलं त्या निमित्ताने तरी तुला बाहेर नेता येईल तुझ्यासोबत वेळ घालवता येईल. पण इतक्या सहजासहजी शक्य होता का ते... फोन करून आईला सांगितलं की जानकीला पाठव डबा घेऊन.. डब्बा घरीच विसरलो मी...तर वसकन अंगावर धावून आली. वरून म्हणाली "मीच येते डबा घेऊन"
कसं तरी तिला पटवलं. खूप जिने आहेत, तुझे गुडघे दुखतील असं कारण सांगितल तेव्हा कुठे तुला पाठवायला तयार झाली.

नवीन लग्न झालेलं आपलं पण थोडा सुद्धा एकांत मिळत नव्हता आपल्याला.  एवढसं दोन खोल्यांचं घर त्यात सतत पाहुण्यांचा कचाटा. तूला काय वाटत असेल ? ह्याच विचाराने फार वाईट वाटायचे. थोडा बोलण्याचा प्रयत्न केला की सगळ्यांच्या नजरा आपल्यावरच...  

पण त्यादिवशी मस्त योग जुळवून आणला मी... 

जानकी : होऽ नाऽऽ ! किती मज्जा केली त्यादिवशी. कित्ती फिरलो,मस्त नाटक बघितलं. 'गाढवाचं लग्न'
केवढं गाजलं होत ते नाटक त्यावेळी.. त्यानंतर चौपाटीवर मस्त भेळ/पाणीपूरीवर ताव मारलेला....  समुद्रकिनारी बसून लाटांना बघण्याचा मी मनसोक्त आनंद लुटत होते. तेव्हा माझे लक्ष नसताना तुम्ही काय चावटपणा केलेला आठवतोय का ?? 

आबा : हो तरऽऽ..! आणि त्यात कसला आला चावटपणा…! अर्धांगिनी होतीस तू माझी... देवा-ब्राह्मणांच्या साक्षीने लग्न केलेलं तुझ्याशी... 
कसलीऽऽ गोडऽऽऽ दिसत होतीस तु मनसोक्त हसताना !
ना कसले बंधन ना रोखठोक..तुझ्या त्या निखळ सौदर्यात हरवून गेलो मी.. ! न राहवून माझे ओठ कधी तुझ्या गालावर टेकले माझे मलाच कळले नाही! 
किती सुंदर होता तो क्षण ! 
असे वाटले तो काळ तिथेच गोठून जावा....!!

जानकी : मला तर बाई शरमेने काय कराव काही सुचतच नव्हत. कोणी बघितलं तर काय बोलेलं या विचारानेच ऊर धपापत होता.खरच किती सुंदर क्षण होते ते!!
आणि मग माझी आवडती मटका कूल्फी. ती संपते न संपते तोच पाऊस चालू झाला.. मुंबईचा तो अंगचटी येणारा अवखळ पाऊस....! 
पावसात भिजण्याचा खरेतर मला प्रचंड तिटकारा पण त्यादिवशी तो पाऊसही हवाहवासा झालेला…!
अगदी मनसोक्त भिजलो होतो ना आपण त्यादिवशी. खूप मज्जा केलेली.
एवढी मज्जा आयुष्यात कधीच केली नव्हती मी….!
किती अविस्मरणीय आठवणी..!

आबा : हो पण घरी आल्यावरही चांगली मज्जा निघाली होती हं आपली..! आठवतंय का...?
आईची चूर्णाची डब्बी सापडत नव्हती म्हणुन तिने अख्खे घर डोक्यावर घेतलेलं. सूमन शोधून शोधून थकलेली.. 

आजी : होऽऽ ना ! त्यात सुमन वंन्संनी डबा पहिला तर तो भरलेला तसाच.त्यावर तुम्ही…  

" बघ ना हिने मला डबा वेळेत पोहचवलाच नाही... मी किती वाट बघितली...  कुठे फिरत होती काय माहित…?? " 
असे म्हणून आई आणि वन्संच्या तोफी मला देऊन झालात की नामानिराळे. 

" असलाऽऽऽ राग आलेला तुमचा तेव्हा… ! केवढी पंचाईत करुन ठेवली होती माझी. 
काय बोलावं काहीच सुचेना. त्यात सुमन वन्स आणि आई माझ्याकडे नजर रोखून बघत होत्या... मी पत्ता नाही सापडला असं काहीतरी सांगितल पण त्यांना वाटलं मी मस्त भटकत होते... नंतर कितीतरी दिवस वंन्संनी मला ह्यावरूनच टोमणे मारले काय सांगू तुम्हांला...!! तुम्ही मात्र गालातल्या गालात हसत माझी फजिती बघत होतात. 

आबा : सॉरी गं..! एंऽऽ पण त्यानंतर  सुमनने जो कानाला खडा लावला ते परत कधी ती एकटी आईजवळ थांबली नाही. 

जानकी : आणि ज्या चूर्णाच्या डब्बीवरून इतके रामायण घडले ती त्यांच्याच उशीखाली होती पण उशीच्या 
खोळीमध्ये गेल्याने…..
असोऽऽ…..
झालंऽऽ गेलंऽऽ गंगेलाऽऽ मिळालंऽऽ…!

आबा : पण तु सगळं ऐकून घेतलंस एक अक्षरही तोंडातून काढला नाहीस.
आपल्या पिढीला नाहीच जमलं ना कधी मोठ्यांशी उलट-सुलट बोलायला..? 

जानकी  : चालायचचं..काळ बदलतो तशी पिढी/परंपरा पण बदलत जातात... तेव्हाच वातावरण वेगळं होत. कोणी काही बोललं तरी ते एवढं मनावर घेतलं जात नव्हतं...काहीतरी निमित्ताने बोलणं व्हायचं आणि भांडण मिटायची… तेव्हाची घर छोटी आणि माणसांची मने मोठी होती.. आता घरं मोठी पण माणूस माणसाला पारखा झालाय.. आता प्रत्येकाला स्वतःची स्पेस लागते. 
पण काळ कितीही बदलला तरी आपले संस्कार वाया जात नाही होऽऽ..!
जे आपण आईंसाठी केल तेच आपली मूल तुमच्यासाठी करताएत हे कळतय का तुम्हाला... ?
आणि आपण मोठे आहोत नाऽऽ मग आपलच कर्तव्यच नाही का लहानांच्या चुका पदरात घालायच्या…!  रागात बोलले एखादा शब्द तर घ्यायचा समजुन... एका कानाने ऐकायचे, दुसऱ्याने सोडुन द्यायचं. देवाने 2 कान त्याचसाठी तर दिलेत नाऽऽ.! 

आबा : होऽऽ..तुला तिथून ज्ञान वाटायला काय जातेय... इथे राहून बघ मग कळेल… एकटेपणा किती खायला उठतो..! त्यात कुणी काही बोललं तर अजूनच लागत ते...  
राहिलो असतो की मी एकटा. मी काय लहान मूल थोडीच आहे सोबत थांबायला. जायचं होत तर जायचं ना... कशाला उगाच माझ्यावर चीडचीड.. माझ्यासाठी कुणी अडकून पडलेलं मला मुळीच पटलेलं नाही.
मला नाही गरज कुणाच्या आधाराची. 
मी माझा खंबीर आहे कळलं नाऽऽ... !
      -----------------------
उमेश  : आबाsss! अहो आबाsss ! कूठे आहात??
आजचा इंटरव्हू मस्त झाला आबा..
आबा काय झाल..? "

( उमेशच्या आवाजाने आबांची तंद्री भंगते. आणि इतक्या वेळपासून आपण स्वप्नातच जानकीशी बोलत होतो ह्या सत्याची जाणीव होऊन ते भानावर येतात....)

 इकडे त्यांना अवेळी झोपलेलं पाहून उमेश त्यांच्या तब्येतीची विचारपूस करतो..
आबा नको-नको म्हणत असतानाही त्यांना थंडी वाजून आली असणार अस गृहीत धरून त्यांच्या पायात पटकन मोजे घालतो,कानाला मफलर गुंडाळतो. 

थोड्यावेळाने शशिकांतही जवळ येऊन पाण्याचा जार ठेऊन जातो.. 

विशाखाही विचारत येते…...

विशाखा : आबा झोपलात का..? 
उठा नाss मला तुम्हांला एक गंम्मत सांगायचीय.. 
तेवढ्यात रमाही येते. आबांना असे अवेळी झोपलेलं पाहून ती म्हणते…..

रमा : अहो काय हाल केलेत आबांचे मी एक दिवस घरी नव्हते तर.. ??
 आबा काय होतय.. ?
 जेवलात का तुम्ही ? 
चला, जेऊन घ्या पटकन मग झोपा. मी ताट वाढते….

शशिकांत आणि विशाखा अबांजवळ येतात. त्यांना एव्हाना कळलेल असतं की आपण आबांवर उगाचच चिडलो.. आबा तर त्यांच्या परीने मदत करण्याचाच प्रयत्न करत होते. आपली चूक ओळखून दोघेही आबांना सॉरी म्हणतात..


आबा : नाही रेऽऽ.. माझंच चुकलं.. 
मी उगीच तुमच्या कामात लुडबुड केली... जाऊ द्या. झाल गेलं गंगेला मिळालं... चला आपण सगळे एकत्रच जेवूया. 

(सगळे जेवायला म्हणून आबांच्या खोलीतून बाहेर पडतात..
 जाता-जाता आबांची नजर जानकीच्या फोटोवर पडते.त्यांच्या चेहऱ्यावर समाधानाचे हसू तरळते.. जानकीच्या  फोटोकडे बघुन तिला ते नजरेनेच खुणावतात..
आबा : जानकी तू बरोबरच बोलत होतीस गं.. माझच चुकलं.  मीच स्वत:ला अडगळ समजून गैरसमज करून घेतला. पण खरच आपले संस्कार मूले विसरलेली नाहीत हं..मी अजुनही महत्वाचा आहे त्यांच्यासाठी..
आपले घरकूल खरच हसरे घरकूल आहे.. 

फोटोतील जानकीच्या चेहऱ्यावरही एक मिश्किल हास्य फुलले.. ( !?!?!?! )
 
    ~~~~~~~(समाप्त)~~~~~~~

ज्या घरात वयस्कर व्यक्ती नसतात त्या  घराला घरपण नसतं खरयं ना?  

नमस्कार मंडळी..!

कस वाटलं हे हसरं घरकुल?? 
तुमच्या प्रतिक्रिया कंमेंट्स मधून नक्की कळवा... 

मी ईरा चँम्पयन्स ट्रॉफीच्या स्पर्धेत माझी अतरंगी  टिम ' बटाट्याची चाळ ' सह उतरले आहे.आत्तापर्यंत माझ्या सर्व कथांना तूम्ही भरभरून दाद दिलीय तशीच दाद ह्या कथेला देवून भरघोस व्ह्यूजसह माझी टिम विजयी करा ही विनंती.

धन्यवाद.
©प्रिया बनकर.