Login

ही नाजूक नात्यांची वीण भाग ४ - अंतिम

तिचा सतत अपमान होत होता शेवटी तिने. पूर्ण कथा जरूर वाचा.
ही नाजूक नात्यांची वीण भाग ४ अंतिम

कथेचा पूर्वार्ध
राधाला महेशसाठी वाईट वाटत होतं.  त्याबद्दल ती राज आणि सरलासोबत बोलणार होती. आता पाहू पुढे.

"राधा, काय बोलायचं आहे." राज म्हणाला.

"हो खूप महत्त्वाचं बोलायचं आहे."

सरला देखील लक्ष देऊन ऐकू लागली.

"माझी एक मैत्रीण आहे. उच्च पदावर कार्यरत आहे. तिला मी महेश भाऊजीना नोकरी हवी आहे सांगितले होते. त्यांचा रिज्यूम पाठवला होता. उद्याच तिने कंपनीत मुलाखतीसाठी बोलावलं आहे. ती खूप मोठी कंपनी आहे, भाऊजींना इतक्या वर्षाचा अनुभव आहे. नक्कीच ते सिलेक्ट होतील, मला पूर्ण विश्वास आहे."

हे ऐकून सरला आणि राज दोघेही खुश झाले.

"राधा, हा आशेचा किरण आहे. खरंच दादाला इथे जॉब लागला तर सगळे प्रॉब्लम सॉल्व्ह होतील. थँक्स राधा."

"खरंय इथे जॉब लागणारच. भाऊजी खूप मेहनती आहेत, माझं मन सतत तेच म्हणतंय त्यांना इथे जॉब लागणार. तुम्ही सर्व डिटेल त्यांना पाठवा. फोन करून सांगा."

"हो ठीक आहे." राजने लगेच महेशला फोन करून सांगितले.


महेश देखील तिथे जाण्यास तयार झाला.


दुसऱ्या दिवशी मुलाखत होती.


महेश गेला. इतकी मोठी कंपनी होती की तो बघतच बसला. भारतातील टॉप पाच कंपन्याच्या यादीत त्या कंपनीचं नाव होतं.

महेश व्यवस्थित तयारी करून गेला होता. सगळ्या प्रश्नांची उत्तरं दिली. बरेच जण इंटरव्ह्यू देण्यासाठी आले होते. तो तर देवाकडे प्रार्थना करत होता काहीही करून नोकरी मिळू दे.

मंदा देखील टेंशनमध्ये होती.

तो घरी आला.

मंदाने प्रश्न विचारायला सुरवात केली.

"मुलाखत कशी गेली?  काय प्रश्न विचारले?  कधीपर्यंत सांगतील?."  असे अनेक प्रश्न तिच्या डोक्यात होते.

"अगं मला श्वास तरी घेऊ दे.  आत्ताच आलो आहे, पाणी तरी दे?"

तिने त्याला पाणी आणून दिले.

"सिलेक्ट झालो तर दोन दिवसात कंपनीतून फोन येईल."

"इतका काय वेळ लावतात?"

"बस देवाकडे हीच प्रार्थना काहीही करून इथे नोकरी मिळू दे."

"मी तुम्हाला बोलले होते की, बाबांकडून पैश्याची मदत घेऊया. तुम्ही ऐकत नाही." मंदा.

"मला ते पटत नाही. असं किती दिवस त्यांच्या जीवावर जगणार. हात पाय मारावे लागतात मंदा. आज ना उद्या मला नोकरी बघावी लागणारच ना? पुन्हा तो विषय नको."
तो काही केल्या पैसे मागणार नव्हता.


दुसऱ्या दिवशी  महेशला कंपनीतून फोन आला. त्याची निवड झाली होती.

त्याने ही बातमी मंदाला सांगितली. ती  प्रचंड खुश झाली.  नंतर त्याने राज, राधा, आईला देखील फोन करून ही बातमी सांगितली.

"तुम्ही त्या राधाला कशाला फोन केला ? तुमच्या बायकोचा तिने इतका अपमान केला तरी देखील तुम्ही तिला फोन केला." मंदा रागातच म्हणाली.

"मंदा, सर्वात आधी हे डोक्यातून काढ, तिने तुझा अपमान केला नाही , तर तूच तिचा अपमान केला होता. तिच्या माहेरच्या परिस्थितीवरून तू अनेकदा तिला बोलली होती.
त्यादिवशी जेव्हा बारशाच्या वेळेस  तुमच्या दोघींचं संभाषण चालू होतं, ते मी ऐकलं होतं आणि चूक तुझीच होती.
आणि आज जो आनंदाचा क्षण आला आहे तो केवळ राधामुळे."

"काय राधामुळे?" मंदा आश्चर्यचकित होऊन म्हणाली.

"हो तू बरोबर ऐकलं.  ही नोकरी मिळाली आहे ते केवळ राधाच्या सहकार्यामुळे. राधाची मैत्रीण त्या कंपनीत कामाला आहे आणि राधानेच माझे नाव सजेस्ट  केले होते.  आज जे  आपण संकटातून बाहेर आलो आहोत,  ते राधामुळेच हे कायम लक्षात राहू दे."

मंदाला जाणीव झाली. खरंच महेशची नोकरी गेल्यापासून किती टेंशन होतं, पण राधामुळे चांगल्या कंपनीत नोकरी मिळाली.

दुसऱ्या दिवशी मंदा आणि महेश घरी गेले.

महेशच्या हातात पेढ्याचा बॉक्स होता.

सरलाच्या पाया पडला. राजला घट्ट मिठी मारली.
राधाचे अभार मानले.

इतके वर्ष मंदा आणि राधामध्ये अबोला होता.

"राधा, मी प्रत्येकवेळी तुझा अपमान केला, वाट्टेल तसं बोलले पण तू मात्र अश्या वेळेस आम्हाला मदत केली." असं बोलून तिने राधाला मिठी मारली.

आज राधाच्या आणि मंदाच्या डोळ्यातील अश्रूंनी दोघीमधील अंतर दूर केले होते.

नात्यांमध्ये बरोबरी करणं , एकमेकांचा सतत अपमान करणं, समोरच्याला सतत घालूनपाडून बोलणं ह्यामुळेच  अनेक नाती विखरुली जातात.  ह्या गोष्टी वेळीच लक्षात यायला हव्या.
नाही का?

समाप्त.
अश्विनी ओगले.
कथा आवडली असेल तर एक लाईक जरूर द्या आणि कंमेंट करायला विसरू नका. कथेचे हक्क लेखिकेकडे राखीव आहेत. साहित्यचोरी कायद्याने गुन्हा आहे. कथेचा वापर कुठेही करू नये.

0

🎭 Series Post

View all