Login

तिचा स्वतः चा वेळ भाग ४(शेवट)

ती कशी तिचा स्वतः चा वेळ सगळ्यातून काढून एक युक्ती शोधून काढते हेच ह्या कथेत वाचायला मिळेल.
तिसरा दिवस शनिवार होता.सार्वजनिक सुट्टीमुळे तिघे घरीच होते.आता थोडी साफसफाई करण्याची वेळ आली होती.
त्याने सर्व उशांचे कव्हर काढायला सांगितले आणि त्यावर दुसऱ्या उशांचे कव्हर लावण्यास सांगितले.कोण जास्त जलद करेल,जणू अशी स्पर्धा दोन्ही भावंडांच्यामध्ये लागलेली आणि गोड बोलून तो त्यांना ते काम करायला लावतो.

मैत्रिणींसोबत वेळ घालवल्यानंतर आणि त्यांच्या जुन्या आठवणींबद्दल गप्पा मारून विद्यालाही बरे वाटत होते.त्या रिसॉर्टमध्ये असलेल्या काही उपक्रमांमध्येही तिने भाग घेतला.तिला मनात कुठेतरी असे वाटले की,तिने खूप आधी हे करायला पाहिजे होते.

रविवार तिथे राहायचा तिचा शेवटचा दिवस होता.

पक्षी कितीही उडाला आणि कधीतरी बाहेर दूर गेला,तरीही तो नेहमी घरट्यात परततोच.कारण ते त्याचे हक्काचे घर असते.आता विद्यालाही तिचं घर आणि तिची माणसं त्यांची ओढ लागलेली.


घरी सर्वेशने शनिवारचा दिवसही सांभाळला.रविवारी त्याने आपल्या मुलीला स्विमिंग पोहण्याच्या क्लासला आणि मुलाला चित्रकलेच्या क्लासला सोडले.

तो जवळच्या बागेत गेला आणि एका बाकावर शांतपणे बसला.त्याच्या मनात विचारचक्र सुरू झाले.बायकोची आठवण येत असल्याने त्याने तिला फोन केला.

तिनेही फोन उचलला आणि रात्री येणार असल्याचे कळवले.लग्नानंतर ती पहिल्यांदाच तिच्या माहेरून आल्यावरही त्याला आनंद वाटला नाही,इतका आज तो खूप खूश होता.

त्याच्याशी फोनवर बोलताना तिला त्याच्या शब्दात पुन्हा काळजी आणि प्रेम जाणवले आणि ती त्यांच्या नवीन लग्नाच्या दिवसात हरवली.


सर्वेश आपल्या मुलांना घेऊन काही खरेदी करण्यासाठी बाजारात गेला.आज त्यांची आई येत असल्याने,मुलेही खूप उत्सुक होते.त्यांची आई उत्तम सुगरण असल्याने,ते चांगले पदार्थ खाऊ शकतात,त्यामुळे त्यांच्या चेहऱ्यावरून आनंद ओसंडून वाहत होता.

ते घरी गेले आणि त्यांच्या बाबांनी सांगितलेले काम करत होते.संध्याकाळी दारावरची बेल वाजते.

शाश्वतीने दार उघडले.

"आई…" तिची दोन्ही मुलं तिला बिलगली.

तिनेही भरलेल्या डोळ्यांनी त्यांना मिठी मारली.

"आधी तिला तिचे हात पाय धुवू द्या." सर्वेश त्यांच्याकडे बघत म्हणाला.

ती खोलीत गेली आणि मग लगेच स्वयंपाकघरात जाणारच, पण वरद पुढे आला आणि तिचा हात धरून तिला खुर्चीवर बसवलं.तो तिला स्वयंपाकघरात का जाऊ देत नाही,याचे तिला नवल वाटलं.

वरद आणि शाश्वती बाबांसोबत स्वयंपाकघरात गेले आणि एक केक घेऊन ते बाहेर आले.


तिने तिच्या कुटुंबात झालेला आमुलाग्र बदल पाहिला.त्यांनी त्या केकवर सुस्वागतम असा शब्द लिहिलेला.त्या आश्चर्याने तिचे डोळे मोठे झाले.तिच्या मुलांनी त्यांच्या बाबांची मदत घेऊन ऑनलाइन पाककृती पाहून घरी बनवलेला केक कापण्याचा तिला आग्रह केला.

केक तसा परिपूर्ण नव्हता,पण तिने त्यांचे उत्सुक डोळे आणि तो कापण्याचा उत्साह पाहिला.तिने आधी त्याच्याकडे एक नजर टाकली आणि मग तोही त्याच्या डोळ्यातूनच केक काप म्हणाला.

तिने केक कापला आणि एक एक करून त्यांना खाऊ घातला.अखेरीस ती त्याच्याजवळ आल्यावर त्याने तिला थांबवले आणि तो केक आधी तिला खायला दिला.

"बाबा,हा कच्चा आहे."शाश्वती चेहरा लहान करून म्हणाली.

"छान आहे,मला आवडला आणि ही तुमची पहिलीच वेळ आहे."ती हसत म्हणाली.


"जेवण तयार आहे.चला आधी जेवू या."सर्वेश तिच्याकडे बघत म्हणाला.

तिच्यासाठी हा दुसरा धक्का होता.

तोपर्यंत तिने तिच्या मुलांना जेवणाच्या टेबलावर ताट,
पाणी,ग्लासेस आणायला मदत करताना पाहिले.ती ते पाहून जागेवरच स्तब्ध झाली.


"आई पटकन ये." वरदने तिला हाक मारली.

तशी ती भानावर आली.


मग त्यांनी बोलत रात्रीचे जेवण केले आणि तिला हे देखील समजले होते की,तिच्या अनुपस्थितीचा परिणाम तिच्या कुटुंबावर सकारात्मकरीत्या झाला होता.


नंतर त्यांनी आपापली भांडी धुतली आणि मुलांनी झोपण्यापूर्वी,वेळापत्रकानुसार पुस्तके व वह्या शाळेच्या दप्तरात ठेवल्या.


"तुझी सहल कशी होती?" तिने त्यांच्या बेडरूममध्ये पाऊल ठेवल्यावर त्याने विचारले.

"छान."ती एवढंच म्हणाली.

"विद्या…" सर्वेश म्हणाला.

"बोला." बेडवर त्याच्या शेजारी बसून ती म्हणाली.

"खूप खूप धन्यवाद." तो तिचा एक हात धरून म्हणाला.

तिने प्रश्नार्थक नजरेने त्याच्याकडे पाहिले.

"जर तू त्या सहलीला गेली नसतीस,तर मला नोकरी आणि आपले घर संतुलित करताना तुझी होणारी धडपड किती होते,हे मला कधीच कळले नसते.मी रोज बघत होतो की,तू कशी थकतेस,पण मी त्याकडे दुर्लक्ष केले.जेव्हा मी स्वतः याचा अनुभव घेतला,तेव्हा मला कळले की,तू स्वतःचा विचार न करता आमच्यासाठी किती करत आहेस.मला माफ कर आणि प्रत्येक गोष्टीसाठी धन्यवाद." तो भरलेल्या डोळ्यांनी म्हणाला.

"आपण दोघेही आपल्या मुलांसाठी करतो,म्हणून आभार मानू नका." त्याच्या हातावर हात ठेवून ती म्हणाली.


"मी आता ठरवलं आहे."अश्रू पुसत तो म्हणाला.

"काय?"तिने त्याला विचारले.

"तुला आराम मिळणे,देखील आवश्यक आहे.त्यामुळे जेव्हा जेव्हा मला वेळ मिळेल,तेव्हा तेव्हा मी तुम्हाला नक्कीच मदत करेन आणि किमान आठवड्याच्या चार दिवसात सकाळचा नाश्ता मी बनवेन."त्याने आपले बोलणे नंतरही चालूच ठेवले,पण ती थकल्यामुळे झोपी गेली होती.

दुसऱ्या दिवशी तो लवकर उठला आणि त्याने सांगितल्याप्रमाणे,सर्वांसाठी नाश्ता बनवला.शिवाय तिने तिचे वाचन आणि लेखन फावल्या वेळात छंद म्हणून सुरू केले.

अनेक वर्षांपासून चाललेल्या या व्यस्त जीवनात तिलाही विश्रांतीची आणि स्वतःला वेळ देण्याची गरज असल्याचे,
तिने आपल्या कुटुंबाशी कोणताही वाद न घालता दाखवून दिले.तसंच तिच्या घरच्यांनीही तिला नंतर गृहीत धरलं नाही आणि तिचं महत्त्व आधीपेक्षा जास्त जाणलं.


समाप्त.

©® विद्या कुंभार

कथा कशी वाटली हे कमेंट्स करून नक्की सांगा.तुम्हाला माझ्या आणखी कथा वाचायला आवडतील का,हे सुद्धा जरूर सांगा.

🎭 Series Post

View all