Login

भूक, मूल्य आणि माणुसकीचा खरा कस

खूप म्हणजे पोट भरण्याचा साधन नाही तर प्रत्येकाची भूक वेगळी असते
शीर्षक : भूक, मूल्यं आणि माणुसकीचा खरा कस

“माणूस जेव्हा भुकेने व्याकुळ होतो, तेव्हा सगळ्यात आधी तो मूल्य आणि सिद्धांत सोडून वागतो.
ज्याचं तो आयुष्यभर ओझं वाहत आलेला असतो… मग ती भूक कशाचीही असो”

मानवाच्या जगण्याची कथा ही ‘भूक’ या एका शब्दाभोवती फिरत आली आहे. पण भूक म्हणजे केवळ पोटाची भूक नसते, ती असते मान सन्मानाची, आपलेपणाची, प्रेमाची, स्वीकाराची, यशाची… प्रत्येक भुकेला एक वेगळी वेदना असते आणि प्रत्येक वेदनेसमोर माणूस कधी ना कधी ढेपाळतोच. आयुष्यभर जपलेली मूल्यं, तत्त्वं, विचार… या सगळ्यांची परीक्षा या भुकेसमोरच घेतली जाते.

एखाद्याकडे खाण्यासाठी काहीच नसताना, त्याच्या घरी मुलं रडत असताना, तो आयुष्यभर जपलेले नियम मोडतो. चोरी करतो, खोटं बोलतो, कुणाला न कळू देता दोन वेळच्या जेवणाची व्यवस्था करतो.
याला समाज गुन्हा म्हणतो, पण त्या माणसाच्या नजरेत तो केवळ “जगणं” असतं.

पोटाची भूक माणसाला गुन्हेगार करत नाही; परिस्थिती त्याला गुन्ह्याकडे ढकलते.
भूक असह्य झाली की ‘नीती अनीती’ ही फरकाची रेषा धूसर होते.
भूक माणसाला विचारायला लावते
“मी जगलो नाही तर माझी मूल्यं कोण जपणार?”

कधी कधी माणसाला पोटाची भूक नसते, पण त्याला मान देणाऱ्यांची भूक असते.
त्याला कौतुक, आदर, टाळ्या, ओळख… यांची तीव्र उर्मी असते.
ही भूक पूर्ण करण्यासाठी कुणी आपले तत्त्व मोडतो, सत्तेजवळ वाकतो, अनावश्यक खुशामत करतो.

ज्याला आयुष्यभर शिकवलं जातं की "स्वाभिमान सर्वात मोठा", त्यालाच कधी कधी परिस्थिती स्वाभिमान सांभाळू देत नाही.
ही मानाची भूक हळूहळू माणसाला नकळत गुलामीकडे ढकलीत जाते.

एखादा माणूस अत्यंत नैतिक, संयमी आणि तत्त्वशील असू शकतो, पण प्रेमाची भूक त्याला सर्वात जास्त तोडते.
जेव्हा आपलेपणाची भूक वाढते, तेव्हा माणूस कधी कधी चुकीच्या माणसांना जवळ करतो.
त्यांना खुश करण्यासाठी स्वतःशी तडजोड करतो.
ज्यांना तो कधीच संधी दिली नसती, त्यांच्यासाठी तो झुकतो, कारण त्याला फक्त आधार हवा असतो.

प्रेमाची भूक माणसाला सर्वात जास्त मोडते, आणि सर्वात जास्त घडवतेही.
मात्र याच भुकेपोटी अनेकदा मूल्यं तुटतात
वाईट सवयी, विषारी नाती आणि आत्मगौरवाचा ऱ्हास सुरू होतो.

यश मिळवण्याची भूक माणसाला दोन मार्गांवरून नेऊ शकते
एक, जिद्दीचा आणि मेहनतीचा
आणि दुसरा, shortcuts आणि अनैतिकतेचा.

काही जिद्दी लोक ही भूक प्रेरणेत बदलतात.
पण अनेकांना हाच मार्ग हिंस्त्र बनवतो.
समोरचा पडावा, स्पर्धक हरावा, मिळालेले पद कसेही करुन हवे असे विचार चोरपावलांनी मनात घर करतात.

त्या वेळी आयुष्यभर जपलेला “प्रामाणिकपणा” कुठेतरी रेंगाळतो.

आपल्याकडे मूल्यं शिकवणं सोपं आहे, पण मूल्यं टिकवण्यासाठी परिस्थिती देणं कठीण.
एका अर्धपोटी माणसाला आदर्श शिकवल्यास त्याचा काही अर्थ नसतो.
त्याच्या पोटातील कुरकुर ही त्याची तत्त्वं खाऊन टाकते.

मूल्यं टिकण्यासाठी माणसाला सुरक्षा हवी असते
घर, पोट, मान, आधार, आणि संधी.
हे नसताना तत्त्वांवर उभं राहणं म्हणजे समुद्रावर वाळूचा किल्ला बांधण्यासारखं.

भूक संपवणं मूल्य टिकवण्यापेक्षा अधिक महत्त्वाचं आहे, हे आपण समाज म्हणून मान्य करायला हवं.

कुणाच्या पोटाची भूक संपली तर तो गुन्ह्याकडे जाणार नाही.

कुणाच्या मनाची भूक मान्य झाली तर तो आत्मनाशाकडे जाणार नाही.

कुणाच्या प्रेमाच्या भुकेला योग्य दिशा मिळाली तर तो चुकीच्या नात्याकडे जाणार नाही.

कुणाच्या यशाची भूक योग्य मार्गाने चॅनेलाइज झाली तर तो अनैतिक होणार नाही.

माणसाला जेव्हा समाधान मिळतं, तेव्हा तो मूल्यांनी जगायला तयार होतो.
भूक नसलेल्या मनाला मूल्यं बांधता येतात.
भूक लागलेल्या मनाला फक्त कसं जगायचं हेच दिसतं.

“भूक हा माणसाचा शत्रू नाही, पण भुकेसमोर हरलेला माणूस स्वतःचा शत्रू बनतो.”

म्हणूनच भूक कोणतीही असो
पोटाची, मनाची, प्रेमाची, ओळखीची…
ती वेळेत ओळखणं आणि योग्य दिशेने पूर्ण करणं हे समाजाचंही आणि स्वतःचंही कर्तव्य आहे.

तेव्हाच मूल्यं जगली जातात.
तेव्हाच सिद्धांत टिकतात.
आणि तेव्हाच माणूस, माणूस राहतो.

©® सचिन कमल गणपतराव मुळे...
परभणी, ९७६७३२३३१५
0