तोतया वारसदार
पात्र रचना
सारंग - वकील, विनायकरावांच्या संपत्तीच्या ट्रस्टचे सदस्य
डॉ प्रशांत - डॉक्टर, विनायकरावांच्या संपत्तीच्या ट्रस्टचे सदस्य
किरीट - चार्टर्ड अकाऊंटंट, विनायकरावांच्या संपत्तीच्या ट्रस्टचे सदस्य
निशांत - शोधकार्य करणाऱ्या दक्षता कंपनीचा प्रतिनिधी. शोधकर्ता
नयना - निशांतची बहीण. आणि इंटिरियर डेकोरेटर
महादेवराव - घराण्याचा मूळ पुरुष.
सखारामपंत - महादेवराव – सखारामपंत. वेळणेश्वरला स्थायिक
विश्वनाथ - महादेवराव – विश्वनाथ. गोकर्ण महाबळवेश्वरला स्थायिक.
कौशिक - महादेवराव – कौशिक – समुद्रात बुडून मेला.
दिनकर - महादेवराव - - दिनकर साताऱ्याला गेला तिथून पुणे आणि तिथून
कानपूरला गेला
चंद्रकांत गोखले - दिनकर गोखल्यांचा सध्याचा वंशज. वेळणेश्वर
उज्ज्वला - चंद्रकांत गोखल्यांची बायको.
विश्वास - चंद्रकांत गोखल्यांचा मुलगा अमेरिका.
स्वानंदी - विश्वास ची बायको.
सुनील - चंद्रकांत गोखल्यांचा धाकटा मुलगा अमेरिका.
नर्मदा आणि गोदावरी – महादेवरावांच्या मुली, लग्न होऊन चिपळूण आणि नंतर
पुण्यास स्थलांतर पण पुण्याच्या प्लेग मधे दोन्ही कुटुंबाची संपूर्ण वाताहत झाली.
रंगनाथ आणि भास्कर – सखाराम पंतांची मुलं. प्रथम पुणे आणि मग नागपूरला
स्थायिक
रेवती सखाराम पंतांची मुलगी हरिहर साने यांच्याशी लग्नं करून सांगलीला
स्थलांतर.
अक्षय साने - महादेवराव – सखाराम – रेवती -अक्षय
सहावी पिढी. सुरतला स्थायिक.
अंबिका सखाराम पंतांची मुलगी अकाली मृत्यू.
कावेरी रंगनाथाची मुलगी. विश्वास देशमुख शी लग्न
श्रीरंग कावेरीचा मुलगा. दुसऱ्या महा युद्धाच्या वेळेस सैन्यात गेला.
सीता, सरिता जान्हवी – श्रीरंग च्या मुली.
शंकरन - श्रीरंगचा दुसऱ्या बायको पासून झालेला मुलगा.
विनायक भास्कर चा मुलगा वसंत त्याचा मुलगा विनायक
व्यंकटेश, सौमित्र आणि अविनाश - विनायकरावांची मुलं.
जय व्यंकटेशचा मुलगा.
रोहन - सौमित्रचा मुलगा
लक्ष्मण आणि वर्षा - महादेवराव – विश्वनाथ – श्रीपति -सहावी पिढी.
गोकर्णला स्थायिक.
वसुधाबाई - लक्ष्मणची आई.
विश्राम आणि अनिल - महादेवराव – विश्वनाथ – ओंकार -गंगाधर –
सहावी पिढी.
साताऱ्याला स्थायिक.
दिनेश आणि प्रांजल - विश्रामची मुलं. सातारा
विनय - अनिलचा मुलगा सातारा.
विश्वंभर - महादेव – विश्वनाथ- ओंकार- विश्वंभर.
माधव - विश्वंभर – राजाराम – माधव. तंजावरला
स्थायिक
वसुंधरा - माधवची बायको.
चिन्मय आणि विवेक - माधव ची मुलं.
हेमांगी - चिन्मयची बायको.
कावेरी - महादेव – विश्वनाथ- कावेरी. विश्वास परांजपे शी लग्न.
वसंतराव परांजपे कावेरी परांजप्यांचे आताचे वंशज
प्रभावती वसंतरावांच्या पत्नी
त्र्यंबक वसंतरावांचे काका.
गोविंद वसंतरावांचा धाकटा भाऊ.
श्रीकांत आणि विक्रम -वसंतरावांची मुलं. अमेरिकेत असतात.
सुधाकर गोखले निशांतला कानपूरला भेटलेले पहिले गोखले.
विशाखा सुधाकररावांची बायको.
बबन - सारंग सरांचा चपराशी
सुभाष गोखले -बबनचा मित्र. कटातला भागीदार. तोतया वारसदार
अविनाशराव - निशांतचे वडील.
जयश्री - निशांतची आई.
भाग ७
भाग ६ वरुन पुढे वाचा .......
“सुभाष, रिक्शाचं भांडण देऊन टाक आणि हे सामान घेऊन आत ये.” लक्ष्मणने सुभाषला सांगीतलं, आणि तो अविनाश आणि सलमाला म्हणाला,
“चला चला आत चला. तुम्ही अगदी प्रॉपर वेळेवर आला आहात. तीन तीन गोखल्यांची लग्नं आहेत. या. या.” लक्ष्मण म्हणाला.
मांडवात शिरल्या, शिरल्या, त्याने आरोळी ठोकली. “सर्प्राइज.”
निशांत तिथे मांडवातच बसला होता त्याने अविनाशला पाहीलं आणि धावला. अविनाश आणि सलमाच्या पाया पडला.
“अरे, अवी तू?” असं म्हणून व्यंकटेश पण समोर आला आणि अविनाशला त्याने मिठी मारली. लक्ष्मणच्या आरोळी मुळे, घरातले लोकं पण मांडवात आले. सर्वांना निशांतने सांगीतलं की अविनाशकाका आणि सलमा काकु आले आहेत. मग सगळेच अविनाशच्या भोवती कोंडाळं करून बसले. व्यंकटेशच्या बायकोने सलमाला घरात नेलं आणि मग तिथे बायकांची मीटिंग सुरू झाली. सलमाच्या सौंदर्या बद्दल निशांतने सांगीतलं होतं, पण सर्वांना ती अधिकच सुंदर वाटली. चांगला तासभर हा कार्यक्रम चालला होता, मग जेवणं झाली. मग अविनाश निशांतला म्हणाला,
“निशांत मला सारंग वकिलांना भेटायचं आहे. आज भेटू शकतील का?” – अविनाश.
“हो भेटतील की पण काका अगदी आजच आवश्यक आहे का? लग्न आटोपल्यावर नाही चालणार का?” – निशांत.
“हो, अगदी आजच आवश्यक आहे. विचारतोस का माझ्याशी बोलायला ते मोकळे आहेत का म्हणून.” – अविनाश.
निशांतने सारंग सरांना फोन लावला. त्याना अविनाशकाका आणि सलमा काकू आल्याचं सांगीतलं.
“अविनाशकाकांना तुम्हाला भेटायचं आहे. लगेच. तुम्ही मोकळे आहात का?” – निशांत.
“निशांत मी आत्ता कोर्टात आहे. अजून तासाभराने मोकळा होईन, मी असं करतो, डायरेक्ट वाड्यावरच येतो. अविनाश आला आहे ही खूप चांगली गोष्ट आहे. गोखल्यांचं वर्तुळ आता पूर्ण झालं आहे. आनंदाची गोष्ट आहे. अविनाशला भेटायचंच आहे. मी तासाभरात येतो.” – सारंग.
“सारंग सर तासाभरात इथेच येत आहेत. आत्ता ते कोर्टात आहेत.” – निशांत.
“ठीक आहे आपण वाट पाहू. पण नक्की येतील ना?” – अविनाश.
“हो नक्की येतील. सारंग सर शब्दाचे पक्के आहेत. तुम्ही चिंता करू नका. पण काका इतकं काय अर्जंट आहे?” – निशांत.
मग अविनाशने सलमा आणि शाजियाचं काय बोलणं झालं ते सांगीतलं. म्हणाला,
“आता तिथे राहणं धोकादायक झालं आहे. इथलं नागरिकत्व मिळवण्याच्या दृष्टीने लगेच हालचाल करावी लागणार आहे. आमचा व्हिजा फक्त तीन महिन्या करता आहे.
पुन्हा मिलिटरी चा विषय आहेच.” अविनाश.
तासाभराने सारंग सर आले. अविनाशशी ओळख झाल्यावर, थोड्या गप्पा झाल्या. व्यंकटेश, सौमित्र, विश्राम, अक्षय सर्वच तिथे खुर्च्या ओढून बसले. तशी सारंग सर मुद्दाम आले आहेत, यांची कोणालाच कल्पना नव्हती. सर्वांना वाटलं की लग्नाचा माहोल आहे म्हणूनच आले आहेत. पण मग थोड्या गप्पा झाल्यावर जेंव्हा सारंग सरांनी म्हंटलं की,
“हां, बोल अविनाश कशा करता एवढ्या घाईघाईने बोलवलंस?” – सारंग.
“अरे, माझं काम आहेच, पण तुझी महत्त्वाची कामं बाजूला सारून ये असं मी म्हंटलं नाही.”- अविनाश
“नाही रे, माझी सगळी कामं आटोपली आहेत. निशांतच्या बोलण्यावरून असं जाणवलं की अडचणीत आहेस. काय प्रॉब्लेम आहे? – सारंग.
मग अविनाशने शाजियाच्या बरोबर घडलेला प्रसंग सांगितला. म्हणाला,
“सलमा त्या प्रसंगा नंतर खूप घाबरली. तिला वाटलं की जर ही गोष्ट पसरली आणि चौकशी सुरू झाली आणि ती शेवटी माझ्या पर्यन्त येऊन पोचली, तर आफत येईल. म्हणून तिने इथे यायचं ठरवलं. मला म्हणाली की अजमेर शरीफ ला चादर चढवायची आहे मन्नत पुरी करायची आहे. पण अजमेरला जाऊन आल्यावर म्हणाली की नागपूरला जायचं आहे, आपलं घर बघायचं आहे, निशांतला भेटायचं आहे. सारंग सरांना भेटायचं आहे. तेंव्हा माझ्या डोक्यात प्रकाश पडला की हिला आता वापस जायचंच नाहीये. आमचा व्हीजा फक्त ३ महिन्यांचा आहे. वेळ खूप कमी आहे. म्हणूनच तुम्हाला बोलावलं.” – अविनाश.
“म्हणजे नागपूरला यायचा काहीच प्रोग्राम नव्हता?” – सारंग.
“माझी खूप इच्छा होती, घराला भेट द्यायची, पण विचार केला, की बाबा तर गेले, दादा आणि सौमित्र लंडनला. बाहेरूनच घर बघू आणि जाऊ असा विचार केला होता, पण सलमा तर हट्टालाच पेटली, सरळ आपल्या घरीच जायचं, हॉटेल वर नाही. आणि इथे आल्यावर मांडवच दिसला. पण छान झालं सर्वांच्या भेटी झाल्या आणि ओळखी पण झाल्या. निशांत मुळे कळलं तरी, किती गोखले आपले नातेवाईक आहेत ते.” – अविनाश.
“तुझ्या बोलण्याचा असा अर्थ निघतो आहे की आता तुम्हाला भारतातच राहायचं आहे. आणि त्याकरता मी काही करावं अशी तुझी अपेक्षा आहे.” – सारंग.
“अरे, सारंग तुझ्या शिवाय आम्हाला कोण आहे? आमची अडचण तुलाच सोडवावी लागणार आहे.” – व्यंकटेश.
“हे बघा हा माझ्या कामाचा भाग नाहीये, हे वेगळंच प्रकरण आहे. याच्यात बरीच गुंतागुंत आहे. मला जरा याचा अभ्यास करावा लागेल. सिटिजनशिप साठी अर्ज करायचा आणि त्याचा पाठपुरावा करायचा इतकं सोपं काम नाहीये हे. अविनाश मिलिटरी मधे होता आणि गेली ३० वर्ष बेपत्ता होता. याची बऱ्याच अंगाने चौकशी होऊ शकते. पोलिसांच्या आणि सैन्यदलाच्या निरनिराळ्या चौकशांना सामोरं जावं लागेल. मला जरा वेळ द्या. मी सर्व प्रयत्न करेन. पण घाईघाईने होणारं हे काम नाहीये. पण आधी याची व्याप्ती किती आहे हे कळणं जरुरीचं आहे.” – सारंग.
“पण सारंग, आमचा व्हीजा फक्त तीन महिन्यांचा आहे. आणि तुझ्या बोलण्या वरुण असं दिसतंय की हे तीन महिन्यात होणारं काम नाहीये, मग कसं करायचं? आम्हाला आता वापस जायचं नाही.” – अविनाश.
आपल्या हातात सध्या तरी तीन महीने आहेत. काय डेव्हलपमेंट होते, त्यावर अवलंबून आहे. प्रगती जर योग्य रीतीने झाली, तर व्हीजा वाढवून मिळेल. पण ते आत्ताच सांगता येणार नाही. पण अविनाश तू काळजी करू नकोस. जी जान लड़ा देंगे यार। जब तक सारंग और निशांत की जोडी हैं, चिंता की कोई बात नहीं। आता तुम्ही फक्त लग्न एंजॉय करा. एकदाची लग्न होऊन जाऊ द्या, मग आपण बसून सर्व बाबींवर विचार करू. योग्य मार्ग चोखाळला तरच यश मिळण्याची खात्री आहे. घाई करून काही होणार नाही. माझ्यावर विश्वास ठेवा आणि निश्चिंत रहा.” सारंग म्हणाला.
“हो अविनाश, सारंग म्हणतो आहे त्यात तथ्य आहे. तुझी केस, तू मिलिटरी मध्ये होतास, आणि इतकी वर्ष बेपत्ता होतास, म्हणून जरा कॉम्पलीकेटेड आहे. त्यावर नीट विचार करूनच समोर जायला पाहिजे. सारंग सर्व व्यवस्थित करेल यांची आम्हाला खात्री आहे. तू काळजी करू नकोस.”
सलमा पण म्हणाली की “दादा म्हणताहेत ते बरोबर आहे. आपण एक हप्ता थांबून जाऊ. लग्न पण महत्वाची आहेत. आणि सारंग सर मार्ग काढतीलच.” – सलमा.
मग हा विषय बाजूला पडला. अविनाश आणि सलमाला पण विश्वास वाटला की सारंग सर नक्की मार्ग काढतील. आता सर्वांचीच लगबग सुरू झाली. आज चौघांचही श्रीमंत पूजन होतं. वधू पक्ष आणि वर पक्ष सर्वांचीच सरमिसळ होती. अपक्ष होते ते फक्त कानपूरहून आलेले सुधाकर गोखले आणि त्यांची पत्नी विशाखा आणि त्यांची मुलं. धडाक्यात श्रीमंती आणि लग्न पार पडली. नागपूर वरूनच सारी जोडपी हनीमून ला जाती झाली. आता सर्वांनाच थोडा निवांतपणा आला होता. स्नेह संमेलना सारखंच याही वेळेस संपूर्ण व्यवस्था हॉटेलवर सोपवली होती त्यामुळे दमणूक अशी कोणाचीच झाली नव्हती.
मग दुसऱ्या दिवशी सारंग आले, आणि मीटिंग भरली.
“मी बरीचशी माहिती गोळा केली आहे. ती आता मी सांगतो. अविनाशला इथल्या मिलिटरी ऑफिस मध्ये जाऊन तो जीवंत वापस आला आहे हे डिक्लेअर करावं लागेल. त्यांच्या रेकॉर्डस प्रमाणे अविनाश हा बेपत्ता आहे. मग बहुधा सर्वात प्रथम पोलिस चौकशी सुरू होईल. त्यांचा प्राथमिक रीपोर्ट मिलिटरी ऑफिसला गेल्यावर मिलिटरीच इन्वेस्टिगेशन डिपार्टमेंट च्या अखत्यारीत ही बाब येईल आणि मग खरी सर्वंकष चौकशीला सुरवात होईल. खूप मोठी प्रोसीजर आहे. या दिव्यातून जावं लागणार आहे. अविनाश तुझी तयारी आहे ना? आणि हो सलमाची पण कसून चौकशी केल्या जाईल. तिला पण या सर्वातून जावं लागणार आहे. एक वर्ष धरून चला.” – सारंग.
“सारंग मला यांची बरीचशी कल्पना आहे, पण प्रश्नोत्तरांना कसं सामोरं जायचं हाच प्रश्न आहे. आम्हाला सवय नाहीये. सलमाला तर मुळीच नाही.” – अविनाश.
“एक काम करूच शकतो. आपण प्रश्नोत्तरांचा सराव करू. आणि मगच तू प्रकट हो. पण जास्त दिवस लावता येणार नाही, कारण याच कारणांसाठी भारतात आले असतांना इतके दिवस काय करत होता? हा प्रश्न विचारल्या जाऊ शकतो.” – सारंग.
“या सगळ्याला एक वर्ष लागू शकतं?” – अविनाश.
“हो अंदाजे एक वर्ष. पण जी काही माहिती मला मिळाली आहे, त्या वरून माझी खात्री झाली आहे, की नागरिकत्व मिळायला हरकत नाही. चौकशीला जेवढा वेळ लागेल, तेवढाच, पण नागरिकत्व नक्की मिळेल.” – सारंग.
हे ऐकल्यावर अविनाशच्या डोक्यांवरचं ओझं थोडं हलकं झालं.
क्रमश:........
दिलीप भिडे पुणे
मो :9284623729