तोतया वारसदार
पात्र रचना
सारंग - वकील, विनायकरावांच्या संपत्तीच्या ट्रस्टचे सदस्य
डॉ प्रशांत - डॉक्टर, विनायकरावांच्या संपत्तीच्या ट्रस्टचे सदस्य
किरीट - चार्टर्ड अकाऊंटंट, विनायकरावांच्या संपत्तीच्या ट्रस्टचे सदस्य
निशांत - शोधकार्य करणाऱ्या दक्षता कंपनीचा प्रतिनिधी. शोधकर्ता
नयना - निशांतची बहीण. आणि इंटिरियर डेकोरेटर
महादेवराव - घराण्याचा मूळ पुरुष.
सखारामपंत - महादेवराव – सखारामपंत. वेळणेश्वरला स्थायिक
विश्वनाथ - महादेवराव – विश्वनाथ. गोकर्ण महाबळवेश्वरला स्थायिक.
कौशिक - महादेवराव – कौशिक – समुद्रात बुडून मेला.
दिनकर - महादेवराव - - दिनकर साताऱ्याला गेला तिथून पुणे आणि तिथून
कानपूरला गेला
चंद्रकांत गोखले - दिनकर गोखल्यांचा सध्याचा वंशज. वेळणेश्वर
उज्ज्वला - चंद्रकांत गोखल्यांची बायको.
विश्वास - चंद्रकांत गोखल्यांचा मुलगा अमेरिका.
स्वानंदी - विश्वास ची बायको.
सुनील - चंद्रकांत गोखल्यांचा धाकटा मुलगा अमेरिका.
नर्मदा आणि गोदावरी – महादेवरावांच्या मुली, लग्न होऊन चिपळूण आणि नंतर
पुण्यास स्थलांतर पण पुण्याच्या प्लेग मधे दोन्ही कुटुंबाची संपूर्ण वाताहत झाली.
रंगनाथ आणि भास्कर – सखाराम पंतांची मुलं. प्रथम पुणे आणि मग नागपूरला
स्थायिक
रेवती सखाराम पंतांची मुलगी हरिहर साने यांच्याशी लग्नं करून सांगलीला
स्थलांतर.
अक्षय साने - महादेवराव – सखाराम – रेवती -अक्षय
सहावी पिढी. सुरतला स्थायिक.
अंबिका सखाराम पंतांची मुलगी अकाली मृत्यू.
कावेरी रंगनाथाची मुलगी. विश्वास देशमुख शी लग्न
श्रीरंग कावेरीचा मुलगा. दुसऱ्या महा युद्धाच्या वेळेस सैन्यात गेला.
सीता, सरिता जान्हवी – श्रीरंग च्या मुली.
शंकरन - श्रीरंगचा दुसऱ्या बायको पासून झालेला मुलगा.
विनायक भास्कर चा मुलगा वसंत त्याचा मुलगा विनायक
व्यंकटेश, सौमित्र आणि अविनाश - विनायकरावांची मुलं.
जय व्यंकटेशचा मुलगा.
रोहन - सौमित्रचा मुलगा
लक्ष्मण आणि वर्षा - महादेवराव – विश्वनाथ – श्रीपति -सहावी पिढी.
गोकर्णला स्थायिक.
वसुधाबाई - लक्ष्मणची आई.
विश्राम आणि अनिल - महादेवराव – विश्वनाथ – ओंकार -गंगाधर –
सहावी पिढी.
साताऱ्याला स्थायिक.
दिनेश आणि प्रांजल - विश्रामची मुलं. सातारा
विनय - अनिलचा मुलगा सातारा.
विश्वंभर - महादेव – विश्वनाथ- ओंकार- विश्वंभर.
माधव - विश्वंभर – राजाराम – माधव. तंजावरला
स्थायिक
वसुंधरा - माधवची बायको.
चिन्मय आणि विवेक - माधव ची मुलं.
हेमांगी - चिन्मयची बायको.
कावेरी - महादेव – विश्वनाथ- कावेरी. विश्वास परांजपे शी लग्न.
वसंतराव परांजपे कावेरी परांजप्यांचे आताचे वंशज
प्रभावती वसंतरावांच्या पत्नी
त्र्यंबक वसंतरावांचे काका.
गोविंद वसंतरावांचा धाकटा भाऊ.
श्रीकांत आणि विक्रम -वसंतरावांची मुलं. अमेरिकेत असतात.
सुधाकर गोखले निशांतला कानपूरला भेटलेले पहिले गोखले.
विशाखा सुधाकररावांची बायको.
बबन - सारंग सरांचा चपराशी
सुभाष गोखले -बबनचा मित्र. कटातला भागीदार. तोतया वारसदार
अविनाशराव - निशांतचे वडील.
जयश्री - निशांतची आई.
भाग ८
भाग ७ वरुन पुढे वाचा .......
“या सगळ्याला एक वर्ष लागू शकतं?” – अविनाश.
“हो अंदाजे एक वर्ष. पण जी काही माहिती मला मिळाली आहे, त्या वरून माझी खात्री झाली आहे, की नागरिकत्व मिळायला हरकत नाही. चौकशीला जेवढा वेळ लागेल, तेवढाच, पण नागरिकत्व नक्की मिळेल.” – सारंग.
हे ऐकल्यावर अविनाशच्या डोक्यांवरचं ओझं थोडं हलकं झालं.
तुम्ही आम्हाला काही टिप्स द्या न म्हणजे मी जेंव्हा आर्मी ऑफिस मध्ये जाईन, तेंव्हा माझा गोंधळ होणार नाही.” – अविनाश.
“हे बघ, या अश्या प्रश्नोत्तरांचा मला पण अनुभव नाहीये. पण एक गोष्ट सांगतो. जे काही असेल ते अगदी खरं खरं सांग, म्हणजे आपण आधी काय सांगितलं होतं ते आठवण्याची जरूर पडणार नाही. आणि खोटं काही सांगण्याची तुला जरूरच नाही. तू सुरवात अशी कर.” मग सारंग सरांनी त्याला बऱ्याच गोष्टी सांगितल्या. “फक्त एका गोष्टीवर ठाम रहा, आणि हे सलमाला पण निक्षून सांग, की निशांत भेटल्यांवरच तुला थोडं थोडं आठवायला लागलं आणि जेंव्हा गोष्टी क्लियर झाल्या, तेंव्हा भारतात येण्याचा निर्णय घेतला. त्या आधी तुला काहीच आठवत नव्हतं. अगदी पक्क. नाही तर तू मुद्दाम त्या देशात राहिलास असं धरून चालतील आणि मग चौकशीची दिशा काय असेल, ते सांगता येणार नाही.” – सारंग.
दुपारी अविनाश आर्मी वेलफेअर ऑफिस मध्ये ऑफिसर समोर बसला होता.
“सर मी अविनाश विनायक गोखले. मी ७१ च्या लढाईत ईस्टर्न बॉर्डर वर होतो. आम्हाला बांग्लादेश मध्ये पॅरा ड्रॉप केलं होतं. माझं पॅरॅशूट भरकटलं आणि फाटलं. मी अतिशय वेगात खाली कोसळलो. नंतरचं मला काही आठवत नाही. त्यानंतर मी सहा महीने बेशुद्ध होतो. शुद्धीवर आल्यावर सुद्धा मला काहीच आठवत नव्हतं. माझं नाव सुद्धा मी विसरलो होतो. गेली २५ वर्ष मी सुलतानी या नावांनी वावरतो आहे. आता माझी आठवण परत आली आहे म्हणून आम्ही भारतात आलो आहोत. आता आम्हाला इथेच राहायचं आहे.” – अविनाश.
“तुम्ही म्हणजे कोण? अजून कोणी तुमच्या बरोबर आहेत का?” – अधिकारी.
“हो, मी आणि माझी बायको सलमा.” – अविनाश.
“कशावरून तुम्हीच अविनाश गोखले आहात? आम्ही का विश्वास ठेवायचा? काय प्रमाण आहे तुमच्या जवळ?”- अधिकारी
मग अविनाशने त्याचं गळ्यातलं टोकन काढून त्यांच्या समोर ठेवलं. आणि त्याचा जीर्ण झालेला युनिफॉर्म टेबल वर ठेवला. म्हणाला,
“हे टोकन आणि युनिफॉर्म, माझ्या बायकोने जपून ठेवला होता, मला गोष्टी आठवायला लागल्यावर तिने मला दाखवल्या. मग मला सारंच हळू हळू आठवायला लागलं. आणि मगच आम्ही इथे यायचा निर्णय घेतला.” – अविनाश.
त्या अधिकाऱ्याने मग ते टोकन त्यांच्या रजिस्टर मधल्या नोंदीशी पडताळून पाहिल्या. त्याने युनिफॉर्म पण कसून चेक केला.
“तुम्ही आले कसे भारतात? सरळ की अवैध मार्गाने.?” – अधिकारी.
“हा माझा पासपोर्ट आणि हा व्हिजा. तीन महिन्यांचा व्हीजा आहे.” – अविनाश.
“इथे नागपुरात तुम्ही कुठे उतरला आहात?” – अधिकारी.
“माझ्या घरी. माझं घर आहे इथे साहेब. हा पत्ता. तुमच्या रेकॉर्डस वर देखील हाच पत्ता असेल.” – अविनाश.
अधिकाऱ्याने पुन्हा एकदा पडताळून पाहिलं, आणि म्हणाला की जरा थांबा. मी आलोच.
थोड्या वेळाने तो आला आणि अविनाशला म्हणाला की,
“चला इथले प्रमुख विंग कमांडर साहेबांनी तुम्हाला बोलावलं आहे.”
“बसा. तुम्हाला इतकी वर्ष तिकडे राहिल्यावर भारतात येण्याची इच्छा का झाली?, काही प्रॉब्लेम झाला का?” -कमांडर
“नाही, प्रॉब्लेम काहीच नाहीये, माझीच स्मृति वापस आली, म्हणून साहजिकच कोणालाही आपल्या देशात जायची इच्छा होणारच ना?” – अविनाश.
“तुम्ही तुमचं नाव पण बदललं, आणि तिथे लग्न पण केलं, मग खरं तर तुम्ही तिथेच राहायला हवं. तुमची बायको कशी तयार झाली? ती तर मुस्लिम असेल न?” – कमांडर
“मी नाही माझं नाव बदललं, मी सहा महीने बेशुद्ध होतो. ज्यांनी मला झाडाला लटकलेलं पाहीलं, त्यांनीच मला घरी आणलं. त्यांचा मुक्ती बाहिनीला सपोर्ट होता, आणि त्या भागात पाकिस्तानी फौजेचा खूप वावर होता, म्हणून त्यांनी मी हिंदुस्तानी सैनिक आहे ही गोष्ट उघड होऊ दिली नाही. त्यांनीच मला हे नाव दिलं. माझी स्मृति गेली होती, म्हणून मला ते खरंच वाटलं.” – अविनाश.
“कोणच्या डॉक्टर ची ट्रीटमेंट होती? तुम्ही इतके जखमी होता, आणि सहा महीने बेशुद्ध होता तेंव्हा कोणच्या डॉक्टरने तुम्हाला ट्रीट केलं? आणि काय ट्रीटमेंट होती? काय औषधं दिली होती यांची फाइल असेलच” – कमांडर.
“नाही ज्यांनी मला झाडावरून उतरवलं आणि घरी आणलं, ते तिथले प्रसिद्ध हकीम होते. त्यांनीच माझ्यावर उपचार केले.” – अविनाश.
“तुम्हाला वाटलं नाही की एखाद्या चांगल्या डॉक्टरला दाखवावं म्हणून?” – कमांडर.
“साहेब, मी बेशुद्धच होतो, आणि शुद्धीवर आल्यावर सुद्धा काही विचार करण्याची शक्तिच नव्हती माझ्यात. सलमाचे अब्बाच सर्व निर्णय घ्यायचे.” – अविनाश.
“सलमा कोण?” – कमांडर
“माझी बायको. अब्बा म्हणजे तिचे वडील, ते हकीम होते. त्यांनीच माझ्यावर उपचार केले आणि बरं केलं.” – अविनाश.
“तुम्ही पूर्ण पणे बरे केंव्हा झालात?” – कमांडर.
“हळू हळूच प्रगती होत होती, पण मी १९८० मधे मी कामाला सुरवात केली. किती दिवस लोकांवर अवलंबून राहणार? स्वत:च्या पायावर उभं राहणं आवश्यक होतं.” – अविनाश.
“कुठे नोकरी करत होता? काय काम करत होता तुम्ही?” – कमांडर.
“सायकल वर रोजच्या गरजेचे कपडे बांधून गावो गाव फिरत होतो. हळू हळू बस्तान बसलं आणि आता एक दुकान आहे. चांगलं चालतंय. सध्या एका मित्रावर सोपवून आलो आहे.” – अविनाश.
“काय करतो तुमचा मित्र?” – कमांडर.
“त्यांची शेती आहे. घरचा सधन आहे. फावल्या वेळात माझ्याच दुकानावर बसलेला असतो. आमची खूप चांगली मैत्री आहे.” – अविनाश.
“लोकांनीच सांगितलं का तुम्हाला की सलमा तुमची बायको आहे म्हणून?” – कमांडर.
“नाही. सलमाशी माझा निकाह झाला आहे.” – अविनाश.
“तुमच्या सारख्या स्मृति गेलेल्या, आणि जखमी माणसाला मुलगी द्यायला सलमाचे अब्बा कसे तयार झाले? त्यांना तर माहितीच होतं की तुम्ही मुस्लिम नाही आहात म्हणून. मग?” – कमांडर.
“नाही, त्यांना मी भारतीय सैनिक आहे, एवढंच माहीत होतं. आणि ते ही माझ्या युनिफॉर्म वरूनच कळलं असेल.” – अविनाश.
“तुम्ही जर सहा महीने बेशुद्ध होता, तर तुमची सेवा त्यांनीच केली असणार, तेंव्हा त्यांना कळलंच असेल की तुमचा खतना झाला नाहीये आणि तुमचे कान पण टोचलेले आहेत म्हणून. तुम्ही भारताचे सैनिक आहात, तर यांचा काय अर्थ लावायचा असेल, तो त्यांनी लावलाच असेल.” – कमांडर.
यावर अविनाश काही बोलला नाही. बोलण्या सारखं काही नव्हतंच.
“तुम्ही माझ्या प्रश्नाचं उत्तर दिलं नाही?” – कमांडर.
“कोणच्या?” – अविनाश.
“तुमच्या सारख्या स्मृति गेलेल्या, आणि जखमी माणसाला मुलगी द्यायला सलमाचे अब्बा कसे तयार झाले?” – कमांडर.
“७८ मधेच हकीम चाचा वारले. मी तेंव्हा थोडा थोडा चालायला लागलो होतो. जातांना त्यांनी सलमाकडून वचन घेतलं की ती मला अंतर देणार नाही आणि मी पूर्ण बरा होई पर्यन्त माझी देखभाल करेल म्हणून. बरीच वर्ष एकत्र राहिल्यामुळे आमच्यात पण बंध निर्माण झाले होते. मग माझा व्यवसाय व्यवस्थित चालू झाल्यावर आम्ही दोघांनी ८४ साली निकाह करण्याचा निर्णय घेतला.” – अविनाश.
“तुम्हाला काही मूल बाळ?” – कमांडर.
“मुलगा होता, पण एका आजाराचं निमित्त होऊन ८९ साली गेला. चार वर्षांचा होता फक्त. रहमान त्याचं नाव.” – अविनाश.
“तुमची स्टोरी खूप फिल्मी वाटते आहे. यावर विश्वास ठेवणं कठीण आहे. असो, आम्ही पोलिसांना बोलावलं आहे. ते येतच असतील.” – कमांडर.
“पोलिस? ते कशाला?” – अविनाश.
“घाबरू नका, तुम्ही २५ वर्षांनंतर भारतात परत येण्याची गोष्ट करत आहात, तर पोलिस चौकशी आवश्यक आहे. आणि ही प्राथमिक चौकशी आहे. पोलिसांनी रीपोर्ट दिल्यानंतर, आमची मिलिटरी इनव्हेस्टीगेशन सुरू होणार आहे आणि ती कसून असणार आहे. तेंव्हा तयार रहा.” -कमांडर.
“पोलिस इंस्पेक्टर आले आहेत.” – अधिकारी.
इंस्पेक्टर धनशेखर केबिन मधे आले.
“बोला साहेब, काय काम काढलं?” – धनशेखर.
“हे मिस्टर सुलतानी आहेत. यांच्या म्हणण्यांनुसार हे ७१ च्या लढाईत बेपत्ता झाले होते, हे इतकी वर्ष बांग्लादेशात होते. आणि गेली कित्येक वर्ष यांची स्मृति गेली होती. यांना २५ वर्षांनंतर आता भारतात यायचं आहे. यांचं म्हणण असं आहे की यांचं नाव अविनाश गोखले आहे, अविनाश गोखले बेपत्ता होते, हे आमच्या रेकॉर्डस वर आहे. याचं पोलिस व्हेरीफिकेशन व्हायला पाहिजे. म्हणून तुम्हाला बोलावलं.” – कमांडर.
“पोलिस व्हेरीफिकेशन करू, पण साहेब, मी यांनाच काय सर्व गोखले कुटुंबाला ओळखतो. यांची मेमरी वापस आली आहे हे पण मला माहीत आहे. ही एक मोठी स्टोरी आहे. तुम्हाला वेळ असेल, तर सांगतो.” – धनशेखर.
“सांगा. आम्हाला पण माहिती पाहिजे.” – कमांडर.
मग धनशेखरांनी विनायकरावांच्या मृत्यू पासून सुरवात करून आता पर्यन्त सर्व सांगितलं. कमांडर साहेब, ऐकून थक्कच झाले.
“मला आठवतंय की निशांत एकदा आमच्या ऑफिस मध्ये येऊन अविनाशची चौकशी करून गेला होता, त्याला आम्ही दिल्ली हेडक्वार्टरला पाठवलं होतं. पण काही असलं तरी तुमचा रीपोर्ट आम्हाला आला की आम्ही तो दिल्लीला पाठवून देऊ. मग दिल्ली ऑफिस जी अॅक्शन घ्यायची ती घेतील.” – कमांडर.
क्रमश:........
दिलीप भिडे पुणे
मो :9284623729