भाग -03
सान्वी आता बऱ्यापैकी होस्टेल आणि कॉलेजमध्ये रुळली होती.अधे मधे अमेय आणि चित्रा ही भेटायला जायचे. सुट्टी असली की तीच घरी येऊन जायची. एकंदरीत चित्राच्या आयुष्यातली एक बाजू तरी सावरल्या जात होती. एक दिवस घरातली सगळी कामे आवरून चित्रा ऑफिस साठी निघाली असताना, सान्वीच्या हॉस्टेल मधून कॉल आला,यापूर्वी मागच्या सहा सात महिन्यात असा कॉल हॉस्टेल किंवा कॉलेजमधून कधीही आलेला नव्हता. चित्रानं तसाच अमेय ला कॉल करून बोलावून घेतलं आणि दोघेही आहे तसेच सान्वी कडे जायला निघाले.
हॉस्टेलवर पोहोचल्यावर चित्राची नजर आधी सान्वी ला शोधत होती पण तिची लेक तिला कुठेच दिसत नव्हती. अमेयने विचारल्यावर हॉस्टेलचे अधिकारी त्यांना शांत राहायला सांगत होते.दोघांनाही पाणी देण्यात आलं आणि वॉर्डनने सांगितलं सान्वी होस्टेलवर नसून हॉस्पिटलला आहे.हा दोघांसाठीही धक्का होता. दोघेही तसेच हॉस्पिटलसाठी निघाले.शेजारी सान्वी च्या रूमवरच्या मैत्रिणी एक वॉर्डन आणि एका पलंगावर निपचित पडलेली सान्वी होती,किरकोळ ताप किंवा सर्दी खोकल्याच्या वर कधी ऍडमिट होण्यापर्यंत न गेलेली सान्वीची तब्येत आज चक्क ती पलंगावर बघून चित्रा आणि अमेय एकदम काळजीत पडले.
डॉक्टरांसोबत बोलणं झाल्यावर लक्षात आलं की हायपर टेन्शनमुळे तिच्या डोक्यात तीव्र कळ जाऊन ती कोसळली. या कोसळण्यात सुदैवानं कुठेही तिच्या मेंदूला मार लागलेला नव्हता. पण हे सगळं होण्याचं कारण एकच कि ती अतिव टेन्शनमध्ये होती. पुढचे काही महिने तिच्या मेंदूवर आणि मनावर ताण येईल अशा कुठल्याही गोष्टी तिच्यापर्यंत पोहोचू द्यायच्या नाहीत असा डॉक्टरांनी सल्ला दिला.चित्राला आज आई म्हणून कमाल हरल्याची भावना जाणवत होती. दिवसभरात दोनदा आपल्याशी बोलणारी आपली लेक इतकी मानसिक तणावात होती हे आपल्याला कळले नाही,याच विचारांनी एक आई,लेकीची एक मैत्रीण म्हणून ती खचली होती. डॉक्टरांनी तिला मानसिक तणाव येऊ देऊ नका असे परत परत सांगितले कारण तसे झाल्यास तिच्या मेंदूला ताण येऊन तणावामुळे सारखं सारखं स्ट्रेस अटॅक यायचे चान्सेस होते.
अमेय आणि चित्रांन त्या क्षणी निर्णय घेतला सान्वी ला इथून पुढे इथे न ठेवता परत नेण्याचा. सान्वी च्या फीस साठी ऍडमिशन साठी उचललेल्या कर्जाचा चित्रानं मिनिटभर ही विचार केला नाही.पैसा लाख कमवता येईल. अजून कष्ट केले तर कर्ज फेडूनही टाकता येईल घेतलेले पैसे. पण एकुलती एक लेक जर सोबत राहिली नाही तर सगळं मातीमोल होऊन जाईल हाच विचार दोघेही करत होते. घरी परतल्यावर सांन्वी चुपचुपच राहायची, फार बोलायची नाही. मनमोकळी राहणारी सान्वी इतकी शांत होणं सगळ्यांसाठीच कमालीचं होतं पण बऱ्यापैकी ती आता नॉर्मल होती.
बरेच दिवसानंतर चित्रा अन ती दोघीच घरी असताना,आईला बिलगुण ती खूप रडायला लागली.जणू काही इतके दिवस मनात साठवून ठेवलेलं सगळं बाहेर पडत होतं आणि रडता रडता ती बोलती झाली. तिच्या सगळ्या तब्येतीचं कारण होतं तिचं हे वर्ष काही विषय पास न झाल्याने वाया जाणार होतं. पहिल्या सहामाहीचे काही विषय पास न झाल्यावर तिला वाटलं दुसऱ्या सहामाही मध्ये आपण सगळे विषय पास होऊ पण तसं झालं नाही आणि तिच्यासमोर तिला आईने आपल्यासाठी उचललेलं कर्ज दिसू लागलं, तिची रोजची फक्त आपल्यासाठी ची कष्ट घेतानाची धावपळ तिला दिसू लागली, आणि आपण आपल्या आईसाठी काही करू शकत नाही या भावनेतून ही सतत तणावात राहू लागली.
चित्रांनी रडणाऱ्या सांन्वी ला शांत केलं.तिचं सार स्वतःही शांतपणे ऐकून घेतलं. तिला व्यक्त होऊ दिल.आणि मग समजवायला सुरुवात केली. आयुष्यात एक परीक्षा आपण नापास झालो म्हणजे आयुष्य संपलेलं नसतं. आयुष्याची रंगतच मुळात एकापाठोपाठ एक अशी वेगवेगळ्या परीक्षांना सामोरे जाण्यात असते. हरतो कोण?, ज्याला इमानदारीने कष्ट घ्यायचे नाहीत पण ज्याच्यात उमेद आहे, जिंकण्यासाठीची स्वप्न डोक्यात आहेत आणि ती पूर्ण करण्यासाठी अपार मेहनत ज्याला घ्यायची आहे तो कधी धरलेला नसतो. उशीर होईल पण त्याच्यासाठी एक दिवस नक्की त्याच्या यशाचा येईल इतकं मात्र पक्क असतं. चित्रांन समजावल्यावर सान्वी शांत झाली.
हळूहळू आता ती आधीसारखी मोकळी वागू लागली,सगळ्यांशी बोलू लागली, मित्र-मैत्रिणींसोबत बाहेर जायला सुरुवात झाली. बऱ्यापैकी आता चार-सहा महिन्यांचा काळ या सगळ्याला आटोपला होता.सान्वी भरपूर सावरली होती, चित्राचं ही रुटीन नॉर्मल सुरू झालं होतं.घरातल्या इतर कटकटींकडे तिने पूर्णतः काना डोळा करायचं ठरवलं. सान्वी च एक वर्ष या सगळ्यात गेलं होतं.आणि घरापासून दूरही तिला ठेवायचं नव्हतं, परत नव्याने पैसा भरायला चित्राकडे आता आर्थिक सबळता नव्हती. दोघांच्या तुटपुंज्या पगारावर तिघांच्या रोजच्या गरजा सहज भागतील इतकाच पैसा घरात यायचा.
लेकिनं ठरवलं आपणही आई-बाबांच्या स्ट्रगलमध्ये मदत करायचं.सान्वी चं इंजीनियरिंग पूर्ण नसलं तरी डिप्लोमा झालेला होता.आणि डिग्री हातात नसली,तरी ती हुशार होती,चपळ होती. तिने ट्युशन घ्यायचे ठरवलं. आपल्या घरी विद्यार्थ्यांना बोलवण्यापेक्षा आपण घरी जाऊन पालकांच्या डोळ्यासमोर बसून पाल्यांना शिकवलं तर जास्त पैसे मिळतील हे ती जाणून होती आणि खरंच तिचा हा निर्णय योग्यच ठरला. बऱ्यापैकी ती आता व्यस्त राहू लागली आणि मुख्य म्हणजे स्वतःच्या पायावर ठामपणे उभे राहण्याचा विश्वासाच तेज तिच्या व्यक्तिमत्त्वात स्पष्ट झळकत होतं. चित्राचीही काळजी बऱ्यापैकी शमली होती आणि खरंच कष्ट करणारे यश खेचून आणतात हा चित्रांना सांन्वीला दिलेला विश्वास तिने खरा ठरवला होता.
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा