Login

जाणीव प्रेमाची.. (भाग:-१)

दुसरी बाजू ऐकूनच न घेता गैरसमज करून घेतला. त्यातून अबोला धरला. त्यामुळे प्रेमाची जाणीव झाली. तो कसा तिचा गैरसमज दूर करेल हे सांगणारी कथा..

#ईरा जलद लेखन स्पर्धा:- फेब्रुवारी:-२०२६

विषय:- दुसरी बाजू/ क्षणिक सौंदर्य

शीर्षक:- जाणीव प्रेमाची

भाग:-१

"का तू माझ्यापासून लांब पळतेस? किती दिवस असेच चालणारं हे सगळं? काय आहे तुझ्या मनात ते स्पष्ट सांग ना. नाही सहन होत मला आता हा तुझा अबोला?" अमेय अगतिक होत जाणाऱ्या शरण्याची वाट अडवत म्हणाला.

"जाऊ दे मला, अमेय. माझ्या वाटेतून बाजूला हो. असंही तुझ्या लायक नाही आहे मी, हे तू चार माणसांत चांगले सांगितलेस की! आता राहते ना मी तुझ्यापासून लांब तर, मग आता काय प्राॅब्लेम आहे तुझा? आणि हो अजून काही बोलायच बाकी राहिलं असेल तर बोलून टाक, कारण आता परत मी नाही भेटणार तुला." शरण्या शांतपणे त्याला म्हणाली.

खरं तर तिला हे सगळं बोलताना खूप त्रास होत होता. तिचं मन तर तसं बोलायला तयार नव्हतं. जीभ जडावत होती. पण तरीही मनाचा हिय्या करून ती जड अंतःकरणाने बोलत होती. तिच्या शेवटच्या वाक्याने तर अमेय हदरलाच. त्याच्या काळजात चर्र झालं. ती दूर जाणार या कल्पनेनेच त्याच्या मनात कालवाकालव होऊ लागली.

"अगं शरू, काय बोलतेस तू? पुन्हा भेटणार नाही म्हणजे? तू मला सोडून कोठेही जाणार नाहियेस, समजलं ! आणि राहिलं मी तुला तसं बोलण्याचा, तर ते मी असंच सहज म्हणालो होतो. तुला दुखावण्याचा कोणताही हेतू नव्हता गं माझा. विश्वास ठेव माझ्यावर, मी खरंच खूप प्रेम करतो गं तुझ्यावर!" तो आधी तिच्या दंडाला धरत थोड्या जबर आणत आणि नंतर मृदू भाषेत गुडघ्यावर बसत तिला मनवण्याचा प्रयत्न करत म्हणाला.

"हं, प्रेम!..प्रेम नाही रे करत तू माझ्यावर आणि विश्वास हा शब्द तुझ्या तोंडी शोभत नाही रे. मी तर तुझ्या यशाची शिडी होते. माझ्या हुशारीचा तुला फायदा होता म्हणून तू मला झेलत होतास, बरोबर ना. नाहीतर माझ्यासारख्या बुटक्या, चश्मिश, जाड्या.. अं ..हं.. नाही.. नाही.. काय बरं म्हणत होतास तू..(ती डोक्याला ताण देत थोडा चेहरा चिडल्यासारखं करत) हा, आठवलं.. (उपहासक हसत) पांडा.. पांडा..मी पांडा आहे ना. ह्या पांडाला तू जवळ केलंस नसतस ना.." ती त्याच्यापासून दोन पावलं मागे सरकत हळवी होतं म्हणाली.

तिच्या बोलण्याने अमेयने मान खाली घातली. त्याला ओशाळून आले. त्याने चूक तर केली होती. पण आता त्याला त्याची चूक सुधारायची होती. त्याची दुसरी बाजू तिला सांगायची होती. तो तिला समजावण्याचा प्रयत्न करत होता.

"नाही गं तसं काही, तू चुकीचा अर्थ काढतेस. मी तुला पांडा म्हणतो पण ते प्रेमाने म्हणतो. तू लांब गेल्यावर मला जाणीव झाली गं तुझ्यावरच्या प्रेमाची. मी तुझ्या शरीरावर नाही, तुझ्या सुंदर, निरागस मनावर प्रेम करतो. सौंदर्य क्षणिक असतं माहिती आहे मला. त्या दिवशी जे बोललो त्यासाठी खरंच तुझी मनापासून माफी मागतो." तो तिला शरण जात म्हणाला.

क्रमशः

करेल का शरण्या अमेयला माफ? तो का तसं बोलला? काय असेल त्याची दुसरी बाजू? ती समजावून घेईल का त्याला?