Login

जन्म बाईचा भाग १८

कथा मालतीच्या जीवनाची
जन्म बाईचा भाग १८

श्रीपंतरावांचा चष्मा तुटला होता.
बराच वेळ तो चष्मा हातात घेऊन तसेच बसले होते.

'श्रीकांत असता तर म्हणाला असता बाबा मी चष्मा रिपेयर करून आणतो.'

"काय झालं? कितीवेळ असंच बसून आहात?" सुमन म्हणाली.

"आज श्रीकांतची खूप आठवण येतेय. गेल्यावेळी त्यानेच दुरुस्त करून आणला होता चष्मा. कधी काही काम सांगितलं तर लगेच करायचा. हिरा आहे आपला श्रीकांत."

"आणि तुम्ही दूर पाठवलं त्याला."

"सुमन, तुझं परत सुरू झालं?"

"तो गेल्यापासून करमत नाही." सुमनचाही चेहरा उतरला.


तितक्यात श्रीकांत दबक्या पावलांनी आला आणि सुमनचे डोळे झाकले.


"कोण आहे." तिने हात चाचपडला.


"श्रीकांत?" आई मुलाचा स्पर्श ओळखणार नाही असं होणारच नाही.

"हो श्रीकांत." त्याने डोळ्यावरचा हात काढला.

त्याला पाहून सुमन आणि श्रीपंतराव दोघेही खुश झाले.

सुमन डोक्यावरून हात फिरवू लागली. श्रीपंतरावांनी त्याच्या खांद्यावर हात ठेवला.

सगळ्यांच्या डोळ्यात आनंदाश्रू होते.


"आई, कशी आहेस?" श्रीकांत सुमनच्या पाया पडत म्हणाला.


"मी बरी आहे. तू किती बारीक झाला? नीट खातपित नाही का? खूप कामं असतात का? तिथे म्हणे खूप धावपळ असते."


"आई, मी ठीक आहे गं. माझी काळजी करू नको. खूप छान वाटलं तुम्हाला बघून."


"बाबा, तुम्ही कसे आहात?"


"मी अगदी ठणठणीत."


"रोज तुझी आठवण काढतात. आताच म्हणत होते श्रीकांतची आठवण येते." सुमन.

मालती देखील सुमन,श्रीपंतरावांच्या पाया पडली.


"मालती,कशी आहेस बाळा?" श्रीपंतराव.


"मी बरी आहे. तुम्ही कसे आहात मामाजी?"


"मी ठीक आहे."

"श्रीकांत, असं अचानक येणं केलं? तू काहीच कल्पना दिली नाही."


"हो बाबा मुद्दाम सांगितलं नाही. सरप्राईज द्यायचं होतं. तुमच्या आणि आईच्या चेहऱ्यावरचा हा आनंद टिपायचा होता."


तितक्यात निलेश आला.


"श्रीकांत, केव्हा आलास?"


"दादा, आताच आलो."


"कसा आहेस?"

"एकदम मस्त. तू कसा आहेस? वहिनी आणि निशा कशी आहे?"


"आम्ही सगळे छान आहोत. बरं झालं आलास. आता आला आहेस तर राहा. लगेच जाऊ नको."


"हो दादा चार दिवस खास सुट्टी काढली आहे."

हे ऐकून सुमनचा चेहरा उतरला.

"इतक्या दिवसाने आला आहेस आणि फक्त चार दिवस राहणार?" सुमन म्हणाली.


"आई, जास्त दिवस सुट्टी नाही मिळत आणि नवीनच लागलो आहे तिथे तर लगेच सुट्ट्या घ्यायला बरं वाटत नाही. मी पुन्हा चक्कर मारेल. अशी उदास होऊ नको बरं."


"चल हात पाय धुवून घे. काहीतरी खायला बनवते."


"हो आई."


दोघेही फ्रेश झाले.


सामानाची बॅग त्यांच्या खोलीत ठेवली.


"मालती, बघितलं आई, बाबा, दादा सगळेच खुश झाले."

"हो ना. सगळेच खुश झाले."


"इतकं छान वाटतंय ना मालती तुला काय सांगू? किती दिवसाने आपण घरी आलो. सर्वांना भेटून आनंद झाला."

श्रीपंतराव आले.

"श्रीकांत, येऊ का?"


"या ना बाबा."


"श्रीकांत, बरं झालं आलास. तू गेल्यापासून करमत नव्हतं."


"बाबा, त्यांचही तिथे मन लागत नव्हतं." मालती.


"कधी तो दूर राहिला नाही आणि आता असं एकाएकी दूर गेला. मला कल्पना होतीच. बरं आता करमतयं ना दोघांना तिथे?"


"हो मामाजी, तिथे ना आता हळूहळू ओळखी झाल्या आहेत. माझ्या मैत्रिणी देखील झाल्या आहेत. प्रिया माझी खास मैत्रीण आहे. आमच्या बाजूला लक्ष्मी आजी आणि नारायण आजोबा आहेत त्या देखील अधूनमधून गप्पा मारायला येतात." मालती तर भरभरून बोलत होती."


"चांगलं वाटलं ऐकून. मला थोडी काळजी वाटत होती की, तुम्ही इथे माणसांत राहिलेले. तिथे तुम्हाला करमेल की नाही? पण हे सगळं ऐकून छान वाटलं."


"बाबा, तुमची सून बदलली आहे हं." श्रीकांत तिला चिडवत म्हणाला.


"काय बदलले मी?" मालती.


श्रीपंतराव दोघांचं बोलणं कौतुकाने ऐकत होते.


"हल्ली मॉल,पिक्चर, पिकनिक असं चालू असतं मॅडमचं." श्रीकांत श्रीपंतरावांना डोळा मारत म्हणाला.


"मामाजी, हे काहीही बोलत आहेत. कधीतरीच जाते."


"अगं गंमत करतोय तो तुझी. त्याचं ऐकून मी तुला काही बोलेल का? तू कशी आहेस हे मला ठाऊक नाही का?"

ते ऐकून तिलाही बरं वाटलं.

"मालती, तू बाबांवर काय जादू केली आहेस?" श्रीकांत म्हणाला.

ती हसत होती.

"बरं बाबा तुमचा चष्मा तुटला आहे ना. द्या मी बनवून आणतो."

"आताच आला आहेस. थकला असशील. तू आराम कर."

"काही थकलो नाही. द्या बरं चष्मा."

"तू काही ऐकणार नाहीस."

"अजिबात नाही." तो हसत म्हणाला.

मालती आणि श्रीकांत एकेमकांशी इतक्या मोकळेपणाने बोलत नव्हते. दोघांना असं बोलतांना पाहून त्यांनाही बरं वाटलं.

'देवा! माझ्या श्रीकांत आणि मालतीचा संसार असाच सुखाचा राहो.'
मनोमन देवाचे आभार मानले.

त्यांना हेच हवं होतं.

मालतीमध्ये देखील बराच बदल झाला होता.

आधी शांत शांत असायची. विचारेल तितक्याच प्रश्नांची उत्तर द्यायची, मात्र आता ती ही बोलायला शिकली होती.


श्रीपंतराव गेले तसे मालती श्रीकांतला म्हणाली,

"काय हो? काहीही सांगत होता तुम्ही मामाजीना? त्यांना खरं वाटलं तर?"


"इतका विचार करू नको. बाबांना मी चांगला ओळखतो. ते तसा विचार करत नाही."


"बरं मी किचनमध्ये जाते. अत्याबाईंना मदत करते."

"ठीक आहे. मी देखील बाबांचा चष्मा रिपेयर करून आणतो."


सुमनची स्वयंपाकघरात घाईगडबड चालली होती.


तितक्यात नयन आली.


"आत्याबाई काय खूप खुश दिसताय?"

"अगं श्रीकांत आला आहे."

"कधी आले भाऊजी?"


"आताच आला."


"बरं."

"आज श्रीकांतच्या आवडीचं जेवण बनवूया."

मालती आली.

"नयन ताई कश्या आहात?"

"मी मजेत. तू कशी आहेस?"

"मी ठीक आहे. निशा कशी आहे?"

"हो बरी आहे ती. आता रांगायला शिकली आहे."

"आत्याबाई, काय जेवण बनवायचं आहे?" मालतीने विचारले.


"श्रीकांतला आवडतं तेच करायचं आहे. मी डाळ शिजायला घातली आहे. तू पीठ मळून घे. पुरणपोळी करायची आहे."


"हो चालेल."


"मालती, तिथे जाऊन तुझी तब्येत सुधारली." नयन म्हणाली.

'माझा श्रीकांतच बारीक झाला आहे.' सुमन मनातल्या मनात म्हणत होती.

तितक्यात निशा रांगत रांगत आली.

निशाला पाहून मालती खुश झाली. निशा देखील बरोबर मालतीकडे येऊ लागली. नवीन कोणी दिसलं की, बरोबर त्या व्यक्तीकडे जायची.

मालती पीठ मळत होती.
नयनने लगेच तिला उचललं.


"अगं ती पिठात हात घालेन."


"नयन, तू जा निशाला घेऊन. मालती आली आहे तर ती करेन कामं."


"हो आत्याबाई, मी देखील हाच विचार करत होते. निशा काहीच करू देणार नाही."


ती निशाला घेऊन निघून गेली.

मालती आणि सुमन दोघी मिळुन स्वयंपाक करत होत्या.


"काय गं मालती श्रीकांत वेळेवर जेवत नाही का? त्याला रोज डबा देते ना? का बाहेरचं खातो."


सुमन एक एक प्रश्न विचारत होती.


"आत्याबाई,मी रोज डबा देते. तिथे प्रवासात दगदग होते आणि कामं देखील खूप जास्त असतात. कधी कधी घरी यायला उशीर होतो. धावपळ जास्त आहे."


"चांगला इथे काम करत होता. तब्येत चांगली होती. त्या कंपनीने का बदली केली कोणास ठाऊक. माझ्याच पोराचे हाल होत आहेत. त्याला जरा चांगलं करून खायला घाल तिथे."

"हो त्यांच्या आवडीचं बनवते."

"लवकर उठते ना तू?"

"हो."

सुमन प्रश्न विचारत होती आणि मालती उत्तर देत होती.

क्रमशः
अश्विनी ओगले.
आजचा भाग कसा वाटला कंमेंटमध्ये जरूर सांगा. एक लाईक जरूर द्या.
सदर कथेचे लिखाण सुरु आहे. कथेचे भाग पेजवर येत जातील, पेजला जरूर फॉलो करा.
कथेचा वापर यु ट्यूब किंवा इतर ठिकाणी आढळून आल्यास कारवाई करण्यात येईल. साहित्यचोरी कायद्याने गुन्हा आहे.