Login

जन्म बाईचा भाग २७

कथा मालतीच्या जीवनाची
जन्म बाईचा भाग २७


सुमन चक्कर येऊन पडली होती.

किशोर सुमनच्या डोक्यावरून हात फिरवत होता.

"आई" श्रीकांत मोठयाने ओरडला.
काही केल्या सुमन डोळे उघडत नव्हती.

श्रीकांतला काही सुचेना.


मालतीने लगेच फॅमिली डॉक्टरांना फोन केला.

डॉक्टरांनी येऊन तपासले.

शुगर खूपच कमी झाली होती.

ऍडमिट करायला सांगितले.

किशोरने पटकन गाडी काढली.

सुमनला घेऊन गेले.

श्रीकांतने ही खबर निलेशला सांगितली.


सुमनला त्या अवस्थेत बघून सर्वांनाच वाईट वाटत होतं.

कधी सुमन शुद्धीत येतेय सगळेच वाट बघत होते.

किशोरलाही आजीची अशी अवस्था बघवत नव्हती.


श्रीकांत सुन्न होऊन बसला होता. डोळे काठोकाठ भरले होते.

मालती त्याच्याजवळ गेली.

"आत्याबाई ठीक होतील. काळजी करू नका."
ती त्याला धीर देत होती.


"हो बाबा आजी लवकरच शुद्धीत येईल." किशोर देखील समजावत होता.

श्रीकांतला या अवस्थेत किशोर पाहू शकत नव्हता. त्याचा श्रीकांतवर खूप जीव होता.


किशोर थोडा दूर जाऊन बसला.

मालती त्याच्याकडे गेली.


"किशोर, असं धीर सोडून चालणार का? सांग बरं?"


"आई, काही वेळापूर्वी मी आजीला जे बोललो त्यामुळे झालं का हे सगळं? मला फार वाईट वाटतंय."

"तुझ्यामुळे काहीच झालं नाही. आजीचं वय झालं आहे, हे असं होत राहतं. तू स्वतःला दोष देऊ नको." ती त्याच्या पाठीवरून हात फिरवत म्हणाली.

तितक्यात डॉक्टर आले.


"डॉक्टर, कशी आहे माझी आई?" श्रीकांत म्हणाला.

"हो आता शुद्ध आली आहे. दोन दिवस इथेच राहू द्या. थोड्या फार टेस्ट आहेत त्या करूया."


मालती,किशोर,श्रीकांत तिला बघायला गेले.


"आई, बरं वाटतंय ना?" श्रीकांत म्हणाला.


"हो बरं वाटतंय."


"मालती, मी आईकडे थांबतो तू आणि किशोर घरी जा." श्रीकांत म्हणाला.


"तुम्हाला सकाळी ऑफिसला जावं लागेल. मी थांबते." मालती म्हणाली.

"आई - बाबा मी सुट्टी घेतली आहे. मीच थांबतो." किशोर म्हणाला.

तितक्यात नर्स आली.

"ही काही औषध आणावी लागतील."

किशोरने तिच्या हातातील चिट्ठी घेतली आणि औषध आणायला गेला.

"आई, मी येतो उद्या. तू आराम कर. काही त्रास होत असेल तर किशोरला सांग." श्रीकांत सुमनचा हात पकडत म्हणाला.

"ठीक आहे." सुमन अगदी हळू आवाजात म्हणाली.


"आत्याबाई, मी तुमच्यासाठी जेवण बनवून आणते."

"हम्म."


किशोर आला.

"किशोर, आजीकडे लक्ष ठेव. मी उद्या लवकर येते." मालती.

"हो आई तू काळजी करू नको मी आहे ना." किशोर.


किशोर सुमनच्या बाजूलाच बसून होता. सतत तिची विचारपुस करत होता.


सुमनला वॉशरूमला देखील हात पकडून घेऊन जात होता.

रात्रभर तो जागाच होता.

बाजूच्या बेडवर वृद्ध स्त्री होती. तिला खूप खोकला येत होता.

किशोर उठला त्यांच्या पाठीवरून हात फिरवला.

"आजी, पाणी प्या." असं म्हणत स्वतःच्या हाताने पाणी पाजलं.

त्या खोकायच्या थांबल्या.

"बरं वाटतंय ना आजी?"

"हो बाळा."

"काही त्रास होत असेल तर सांगा, मी इथेच आहे."

तिने त्याच्या डोक्यावरून प्रेमाने हात फिरवला. भरभरून आशीर्वाद दिला.


दुसऱ्या दिवशी सकाळी मालती टिफिन घेऊन आली.


"किशोर तू घरी जाऊन आराम कर. मी थांबते इथे."


"आई, कशाला त्रास? मी थांबतो."

"किशोर, जा म्हणतेय ना. रात्रभर जागरण केलं असशील. आता आराम नाही केला तर त्रास होईल."


"आई, आराम करून पुन्हा येईन मी."

"चालेल."

बाहेर गेला आणि पुन्हा आला.

"आई, त्या बाजूला आजी आहेत त्यांनाही थोडं खायला देऊ का?"

"हो चालेल."

त्याने त्या आजीसाठी देखील ताट केलं.

"आजी, घरचं जेवण आहे. दोन घास खाऊन घ्या."

आजीच्या डोळ्यात पाणी तरळलं.

कितीतरी वर्षांने तिला कोणीतरी प्रेमाने आग्रह केला होता.

किशोर निघून गेला.

"आत्याबाई, कशी आहे तब्येत?" मालतीने तिची विचारपूस केली.

"बरी आहे."


मालती देखील व्यवस्थित काळजी घेत होती.


श्रीकांत ऑफिसवरून सुटून सुमनला बघायला आला.

दोन दिवस कसे निघून गेले कळलंच नाही.


सर्वांनी तिची खूप काळजी घेतली.


बाजूला जी आजी होती, ती हे सगळं पाहत होती. तिला सुमनचा खूप हेवा वाटला.
न राहून ती सुमनला म्हणाली,

"तुम्ही फार नशीबवान आहात, तुमचा मुलगा,सून,नातू तुमची खूप काळजी घेतो. नाहीतर मी बघा माझ्याजवळ कोणाला थांबायला वेळ नाही. सगळे फोनवरच विचारपूस करतात. ह्या वयात आपलं माणूस जवळ हवं. तुमचा नातू देखील खरंच गुणी आहे. मी रात्री खोकत होते तर लगेच पाणी पाजलं. जेवण सुद्धा दिलं, इतका विचार तर जवळच्या लोकांसाठी देखील करत नाही.
खरंच नक्कीच काहीतरी पुण्य केलं असणार तुम्ही, म्हणून तर ह्या वयात देखील सगळे तुम्हाला जपतात, नाहीतर पिकलेल्या पानाला कोण विचारतयं? तुमचं कुटूंब पाहून बरं वाटलं. आजच्या जगातही अश्या काळजी घेणाऱ्या सुना,मुलं, नातवंड आहेत हे पाहून डोळे तृप्त झाले."

ती आजी सगळं खरं बोलत होती. काहीच चुकीचं बोलली नाही.


"तुम्हीही काळजी घ्या. निघते मी." सुमन निघाली.


निघतांना मात्र त्या आजीचं प्रत्येक वाक्य तिला आठवत होतं.


श्रीकांत आणि मालतीने सुमनला व्यवस्थित गाडीत बसवलं.


"किशोर, गाडी सावकाश चालव." श्रीकांत.

"हो बाबा." किशोर.


सुमन आराम करत होती.


"अत्याबाई, आई आली आहे."

कांता आली.

सुमन उठू लगाली.

"ताई, असू द्या तुम्ही आराम करा. बऱ्या आहात ना?"

"हो."

तिने सुमनला खायला फळं आणली होती.

बेडच्या बाजूला ठेवली.

"बरं, तुम्ही आराम करा. निघते मी." दोघीही रूममधून बाहेर आल्या.

कांता खास भेटायलाच आली होती.


"मालती, सासूबाईंची काळजी घे. पथ्यपाणी असेल ते व्यवस्थित सांभाळ. तू करशीलच म्हणा."

"हो आई." मालतीचा चेहरा उतरला होता.

"मालू, काय गं काय झालं?"

"आई, तू दिलेले संस्कार, तू लावलेलं वळण तशीच वागते गं. पुढेही वागणार पण..."

"पण काय मालू?" ती तिच्या गालावरून हात फिरवत म्हणाली.

"आई, काही लोकांसोबत कितीही चांगलं वागलं तरी ते आपल्याशी वाईटच वागतात गं. त्रास होतो. मलाही,माझ्या किशोरलाही."

"आलं माझ्या लक्षात. मालू, चांगुलपणावर तेव्हाही विश्वास होता आणि आताही आहे. माझं लग्न झालं तेव्हा तुझ्या आजीने मला एक मंत्र दिला होता, समोरचा कितीही वाईट वागला तरी आपण आपला चांगुलपणा सोडायचा नाही. आपणही त्यांच्यासारखं वागलं तर त्यांच्यात आणि आपल्यात फरक काय? शेवटी आपल्या कर्माचा हिशोब होतो. आपण चांगले कर्म करायचे बाकी देवावर सोडून द्यायचे, देव सगळं ठीक करतो. तुला काय कमी आहे? किशोर सारखा संस्कारी मुलगा तुझ्या पोटी जन्मला. नवरा देखील समजून घेतो. तुझ्याकडे खूप मौलव्यान गोष्टी आहेत मालू, त्यांना जप, त्यांचा विचार कर. सगळं ठीक होईल."

असं बोलून कांता निघून गेली.

सुमनला वाटलं होतं निलेश,नयन आणि निशा तिला बघायला येतील.

तसं झालं नाही.

निलेशचा फोन आला.

"आई, बरी आहेस ना?"

"हो, बरी आहे. कधी येतोय तू?"

"आई, काम जास्त आहे. सुट्टी काढून नक्की येईन."

"बरं."

नयनने देखील फोनवर तब्येतीची चौकशी केली.


चार महिने झाले तरी नयन,निलेश आले नाही.


सुमनला फार वाईट वाटलं.


नेहमीच सुमनने नयनला प्राधान्य दिलं होतं.

आता मात्र सुमनचे डोळे उघडले.


सुमनचेच नव्हे तर श्रीकांतचे देखील.
त्यालाही वाटत होतं निलेश आईला बघायला येईन.

तसं झालं नाही.


त्यादिवशी मालती जे देखील बोलली होती त्यातील प्रत्येक शब्द खरा होता. श्रीकांतला जाणीव झाली.


क्रमशः
अश्विनी ओगले.
सदर कथेचे लिखाण सुरु आहे. कथेचे भाग पेजवर येत जातील, पेजला जरूर फॉलो करा.
कथेचा वापर यु ट्यूब किंवा इतर ठिकाणी आढळून आल्यास कारवाई करण्यात येईल. साहित्यचोरी कायद्याने गुन्हा आहे.

अष्टपैलु स्पर्धा २०२५
दीर्घकथा लेखन